Friday 31 August 2012

बोगस आकडेवारीची जादूगिरी

    A A << Back to Headlines     
माझ्या एका मित्राला हार्ट अटॅक आला. त्याची आर्थिक परिस्थिती बेताची. दवाखान्यातील खर्च जवळपास एक लाख रुपये. आजारापेक्षा उपचाराचा खर्च जीवघेणा. गरिबांना आजारी पडायची मुभा नाही. आम्ही मित्रांनी मदत करायचे ठरविले. मित्रांची मदत कितीक असणार? वेळ निभावून नेता येईल, पण पुढे? उपचाराने मरण टळेलही. परंतु अशक्त गरीब माणूस चार पैसे कसे कमावेल? कुटुंबाचा सांभाळ कसा करेल? लेकरांचे काय होईल? या चिंतेने त्याला झोप येईना. दारिद्रय़रेषेखालील लोकांना मोफत उपचाराची योजना आहे असे कळले. आजारी मित्र दरिद्री असूनही त्याच्याकडे पिवळे रेशनकार्ड नव्हते. नगरपालिकेत दारिद्रय़रेषेखालच्या लोकांची यादी आहे, ती नोंद दाखविली तर तहसीलदार पिवळे रेशनकार्ड देतो, असे कोणीतरी सांगितले म्हणून नगरपालिकेत गेलो. दारिद्रय़रेषेखालच्या लोकांच्या नावांची यादी पाहिली. सुस्थितीतील अनेक लोकांची नावे त्यात दिसली. मला आश्चर्य वाटले. त्यात एका माजी नगराध्यक्षाचे नाव छापलेले दिसले अन् मी उडालोच! आमच्या दरिद्री मित्राचे नाव मात्र सापडले नाही.

दारिद्रय़रेषेखालच्या लोकांची यादी सरकारी यंत्रणेमार्फत तयार करण्यात येते. या यंत्रणेशी ज्यांची घसट होती. त्या-त्या सगळ्यांनी आपली नावे त्यात टाकून घेतली. गावोगावच्या बहुतेक सगळ्याच पुढार्‍यांनी वाहत्या गंगेत हात धुऊन घेतले. गंगा दिसली की जे आपले घोडे त्यात बुडवू शकतात तेच पुढारी होतात. सहकार क्षेत्रात दरिद्री लोकांना स्थान मिळावे याकरिता दारिद्रय़रेषेखालच्या लोकांसाठी 'दुर्बल घटक' नावाचा एक मतदारसंघ असतो. बहुतेक 'ओपन'मधील गडगंज पुढारी त्यातून निवडून येतात. या पुढार्‍यांना 'तू दरिद्री कसा?' असा प्रश्न कोणी विचारत नाही. विचारले तर तो तहसीलदाराने दिलेले दारिद्रय़रेषेखालचे प्रमाणपत्र दाखवितो. तहसीलदाराला आधार त्या यादीचा. ज्यात नगराध्यक्षाचे नाव असते. मात्र माझ्या गरीब मित्राचे नाही.

आपल्या देशात मतदार याद्यादेखील अजून धड तयार करता आल्या नाहीत. कोठे नाव धड नाही तर कोठे पत्ता. जे लोक गाव सोडून पाच-पन्नास वर्षे झाली तरी त्यांची नावे, बोगस मतदारांची नोंदणी. नाना प्रकार.. सरकारी आकडेवारीची बोगसगिरी केवळ मतदारयादी आणि दारिद्रय़रेषेपुरती सीमित नाही. ती सगळ्याच क्षेत्रात आहे. परवा मंत्रिमंडळाने काही तालुके दुष्काळग्रस्त जाहीर केले. त्यात बीड जिल्ह्यातील केवळ दोनच तालुक्यांचा समावेश झाला. बीड आणि माजलगाव. हेच दोन तालुके का? साधे उत्तर आहे. हे दोन तालुके दोन मंर्त्यांचे आहेत. बाकीच्या तालुक्यात कोणी मंत्री नाही म्हणून त्यांचा समावेश नाही. मंर्त्यांनी ही सोय कशी करून घेतली? निकषपूर्तीसाठी लागणारी सर्व आकडेवारी अधिकार्‍यांनी पुरविली. सरकारी आकडेवारी आणि सरकारी अधिकार्‍यांचे अहवाल तद्दन खोटे आणि पुढार्‍यांची चापलुसी करणारे असतात. 'जे दरबारी त्यांच्या बाजूने आकडेवारी' ही सरकारी यंत्रणेची रीत झाली आहे.

आकडेवारीचा बोगसपणा शेतीक्षेत्रात पदोपदी दिसतो. आठ 'अ' नावाचा एक फॉर्म असतो. त्यावर पिकांची नोंद केली जाते. प्रत्यक्ष पाहणी करून तलाठय़ाने ही नोंद करावी असा नियम आहे. कोणता तलाठी प्रत्यक्ष पाहणी करून ही नोंद करतो? एकतर तो सज्यावरच जात नाही. त्याने प्रत्यक्ष पाहणी करून नोंद करायचे ठरविले तर साधा आठ 'अ'चा नमुना मिळायला सहा महिने लागतील. तो तालुक्याच्या गावात बसून खानेपूर्ती करतो. तीच आकडेवारी तहसीलकडे जाते. याच आकडेवारीच्या आधारावर सरकार योजना बनविते. 'खोटी आकडेवारी त्यावर योजनांचे इमले भारी' अधिग्रहण केलेल्या जमिनीची सरकार नुकसानभरपाई देते. तोकडी नुकसानभरपाई घेऊन शेतकरी गुमान घरी जातात. अलीकडे या क्षेत्रात काही दलाल निर्माण झाले आहेत. ते त्या शेतकर्‍याच्या हातावर दहा-पाच हजार रुपये ठेवतात व कोर्टात प्रकरण दाखल करतात. नुकसानभरपाई जास्त मिळावी म्हणून शेतात झाडे दाखविली जातात. जेवढी मौल्यवान झाडे तेवढी नुकसानभरपाई जास्त. महसूल खात्याच्या अधिकार्‍याला पकडून अशा खोटय़ा नोंदी करून घेतल्या जातात. वारेमाप नुकसानभरपाई मिळते. दलाल चिंब भिजतो. शेतकरी कोरडाच राहतो. बोगस नोंदींमुळे असे अनेक गैरप्रकार होताना दिसतात.

शेतीक्षेत्राच्या निकषांच्या बाबतीत केवळ बेफिकीरपणाच नव्हे, तर क्रूरपणाही आहे. 'नजरी आणेवारी' हे त्याचे एक उदाहरण आहे. शेतातील उत्पन्न मोजण्यासाठी कोणी एकेकाळी ही पद्धत ठरविली. इंग्रज आले, गेले तरी तीच पुरातन पद्धत आजही तशीच चालू आहे. कोणीतरी तीनपाट अधिकारी.. त्याची ती नजर.. त्याचा अंदाज.. त्यावर ठरणारं शेतकर्‍यांचं भवितव्य. ज्यांची या अधिकार्‍याशी घसट असते ते त्यांच्या सोयीची आणेवारी ठरवू शकतात. अर्थात, पुढार्‍यांचा या अधिकार्‍यांशी जास्त संबंध येतो. त्यामुळे 'नजरी आणेवारी'चा लाभ पुढार्‍यांनाच मिळतो.

शेतीमालाच्या भावाबद्दल शिफारस करणारी राज्य सरकारची एक समिती आहे. केंद्रात कृषिमूल्याची शिफारस करणारा आयोग आहे. ते विद्यापीठांकडून आकडेवारी गोळा करतात. विद्यापीठ आपल्या परिसरातील पाच-पन्नास गावांची यादी काढतात. त्या गावातील शेतकर्‍यांची नावे. प्रत्येकाला भेटून त्याने कशावर किती खर्च केला याची माहिती घेतली जाते. ती आकडेवारी सांख्यिकी विभागाकडे जाते. तो विभाग माहितीचे वर्गीकरण करतो. ती आकडेवारी घेऊन ह्या समित्या आणि तो आयोग शेतीमालाच्या भावाची शिफारस करते. मुळात प्रत्यक्ष शेतकर्‍याकडून घेतलेली माहिती खरी असते की खोटी? बहुतेक वेळा विद्यापीठाच्या कार्यालयात बसूनच ती तयार केली जाते. समजा प्रत्यक्ष भेटून जरी घेतली तरी तिची विश्वासार्हता काय? हे बोगस आकडे गोळा करून तुम्ही शेतकर्‍यांच्या जीवाशी का खेळता? शेतीमालाच्या भावासाठी एवढे नाटक करण्याची गरज काय? समजा उसाचा उत्पादनखर्च काढायचा. उसासाठी अनुकूल हवामान, जमीन कोठे आहे, सर्वात जास्त उतारा किती येतो. एवढी माहिती घेतली की पुरे आहे. वस्तूंच्या किमती बाजारात मिळतात. ऊस पिकवायला काय काय लागते याचे शास्त्र आहे. खर्चाची बेरीज करा. शास्त्रीय भाषेत याला 'मॉडेल मेथड' म्हणतात. आदर्श पद्धतीने शेती केली तर किती खर्च येतो? किती उतारा येतो? खर्चाला उतार्‍याने भागाकार केला की उत्पादनखर्च निघतो. त्याची शिफारस करायला या समित्या का तयार होत नाहीत? साधे, सोपे, सरळ केले तर यांची कमाई मार खाते. शेतीमालाचे भाव किती कमी दिले जातात हे शेतकर्‍यांना कळते. मालक नाखूश होतात. शेतकरी मेला तरी चालेल, मालक मात्र खूश राहिला पाहिजे, असा विचार करून आकडेवारीचे जंजाळ उभे केले जातात.

आपल्या देशात सरकारी यंत्रणांमार्फत निर्माण करण्यात येत असलेली बहुतेक आकडेवारी बोगस असते. बिगर सरकारी संस्थांच्या पातळीवर असे काम फारसे होताना दिसत नाही. जे होते तेही पूर्वग्रह दूषित पद्धतीने केले जाते. एका माहितीची दुसर्‍या माहितीशी पडताळणी केली जात नाही. बोगस आकडेवारीमुळे सर्व योजनांचा बोजवारा उडतो. एवढेच नाही तर सर्व योजनांचा लाभ अधिकार्‍यांना आणि पुढार्‍यांना होतो. पुढारी आणि अधिकार्‍यांनी देशाची तिजोरी लुटण्यासाठी जी साधने निर्माण केली आहेत त्यात बोगस आकडेवारी हे एक साधन आहे. मरणार्‍यांच्या नावाने खेळला जाणारा हा एक खेळ आहे. जे दरबारी त्यांच्या सोयीची आकडेवारी हेच खरे आहे.

(लेखक हे नामवंत विचारवंत व

सामाजिक कार्यकर्ते आहेत.)

भ्रमणध्वनी - 9422931986

'अरे भाई, इतना सन्नाटा क्यू हैं?'


नुकतेच ए. के. हंगल या सिनेनटाचे निधन झाले. त्यामुळे त्यांनी काम केलेल्या सिनेमांची, त्यातील संवादांची आवर्जून चर्चा झाली. 'इतना सन्नाटा क्यू हैं, भाई' हा त्यांचा गाजलेला संवाद 'शोले' सिनेमातील. त्यामुळे अपरिहार्यपणे 'शोले' सिनेमाचीही चर्चा झाली. तीस-पस्तीस वर्षांपूर्वी शोले सिनेमा त्यातील संवादासह तुफान गाजला. त्यातील 'जय-वीरू'ची जोडी, सतत बडबड करणारी टांगेवाली बसंती, ठाकूर, ठाकूरच्या घरातील विधवा जया भादुरी, गब्बर सिंग, ए. के. हंगलचा रहिमचाचा. सर्वच आजही सिनेरसिकांच्या जसेच्या तसे स्मरणात आहे. त्यातील संवाद तर त्यावेळेस गल्लीबोळातून, लहानमोठय़ांच्या तोंडपाठ असायचे. ते लोकांच्या तोंडून ऐकू यायचे. वीरूने 'बसंती तुम्हारा नाम क्या है?सारखा विचारलेला प्रश्न असो किंवा ठाकूरने गब्बरसिंगच्या मानेभोवती विळखा टाकून म्हटलेला, 'ये हाथ नहीं गब्बर, फाशी का फंदा है'सारखा संवाद असो किंवा बाजी पलटता गब्बरने ठाकूरला 'ये हाथ मुझे दे दे ठाकूर' म्हणत ठाकूरचे दोन्ही हाथ छाटल्याचा प्रसंग असो. आजही तीनचार दशक उलटून गेल्यानंतरही जसाच्या तसा प्रेक्षकांना आठवतो. त्यातही, 'अरे! ओùù सांबा, कितने आदमी थे'सारखा संवाद गल्लीबोळातून कानावर पडत नाही तोच प्रत्युत्तरादाखल, 'सरदार मैने आपका नमक खाया है,' असा संवाद कानी यायचा तातडीने लगेचच. 'अब गोली खा,' असा गब्बरचा सिनेमातील संवाद कानावर आदळायचा.

'अब गोली खा' म्हणणारा गब्बरसिंग व त्याची टोळी बंदुकीच्या 'गोळ्य़ा' खाऊन तर जगत नसतील. त्यांनासुद्धा जगण्यासाठी अन्नच खावे लागत असणार. गब्बरसिंगच्या टोळीने कितीही तिजोर्‍या फोडल्या. रुपये, पैसे, सोनेनाणे, चांदीचे दागिने साठवले असतील तरीही 'गोळ्य़ा' खाऊन जसा गब्बरसिंग व त्याची टोळी जगू शकत नव्हती तसेच रुपये, पैसे, सोने, चांदीसुद्धा खाऊन जगू शकणार नव्हती. आज कितीही विकास झाला असला तरी खायला 'अन्नच' लागते. तसेच ते 'अन्न' गब्बरसिंग व त्याच्या टोळीला लागत असणार. आता गब्बरसिंग त्याच्या टोळीसह दरोडे टाकेल की पोट भरण्यासाठी 'अन्न' पिकवेल? संपूर्ण 'शोले' सिनेमात गब्बरसिंग त्याच्या दरोडेखोर साथीदारांसह शेती पिकविताना दिसत नाही. तरीदेखील तो व त्याचे साथीदार जिवंत दिसतात. अन्नधान्यावाचून उपाशी मरताना दिसत नाही. याचाच अर्थ शेती न करताही त्याला व त्याच्या साथीदारांना नियमितपणे अन्नधान्य मिळत असले पाहिजे. हे अन्न त्यांना कसे मिळत असेल? 'शोले' सिनेमातीलच एका प्रसंगातून त्याचा खुलासा होतो.

खळ्य़ावरून अन्नधान्य शेतकर्‍यांच्या घरी येते. तेव्हा गब्बरसिंगची तीन माणसं शेतकर्‍यांच्या दारात घोडय़ावर बसून खांद्याला बंदुका टांगून उभी होतात. शेतकरी त्यांच्या घरातील अन्नधान्य त्यांच्या पुढय़ात टाकतात. त्यातील एक हाडाचा सापळा झालेला शेतकरी कंबरेत वाकून पाठीवर अन्नधान्याचं अर्धच पोतं गब्बरसिंगच्या माणसाच्या समोर टाकतो. तर गब्बरसिंगची माणसं म्हणतात, 'मुठ्ठीभर अनाज? बाकी अनाज क्या अपने बेटी के शादी में बारातीयोंको खिलाने के लिये रख्खा है?'

तेवढय़ात ठाकूर गरजतो, 'गब्बरसिंगसे कह दो कि, अब रामगढवासीयोंने पागल कुत्ताेके सामने रोटी डालना बंद किया है.' वगैरे वगैरे.

प्रसंगातील तात्पर्य असे की, शेतकर्‍यांच्या घरात असलेले धान्य कोणताही मोबदला न देता गब्बरसिंगची माणसं लुटून नेतात. एरवी तेच धान्य शेतकर्‍यांच्या घरात राहिलं असतं किंवा योग्य त्या भावात त्याला ते विकता आलं असतं. तर त्यांची ती वर्षभराची 'बेगमी' झाली असती. अर्थशास्त्रीय भाषेत याच बेगमीला 'बचत' म्हटले गेले असते. ही 'बचत' गब्बरसिंगची माणसं वर्षानुवर्षे लुटून नेत असतात. आता वर्षभराची 'बेगमी' किं वा 'बचत' लुटल्या गेली. वर्षभर जगायचे तर आहे. पण बचत लुटल्या गेली. मुलीचे लग्न करायचे आहे. मुलीच्या लग्नासाठी वेगळे काढून ठेवलेले अन्नधान्य, लग्नासाठी करून ठेवलेली 'बेगमी' अर्थशास्त्रीय भाषेत 'बचत' गब्बरसिंग घेऊन गेला. त्याला आता मुलीचे लग्न करायचे असेल तर एकतर सावकाराकडे 'कर्ज' तरी काढावे लागेल किंवा जमिनीचा तुकडा विकून मुलीच्या लग्नाची 'बेगमी' करावी लागेल.

शेतकर्‍यांच्या दुरवस्थेचं खरं कारण वर्षानुवर्षे त्याच्याकडे तयार होणारी 'बचत' कोणी ना कोणी लुटतो आहे. काळ बदलला तशी लुटीची पद्धत बदलली. पण शेतकर्‍यांची 'लूट' या नाही त्या रूपात सुरूच राहिली. 'शोले' सिनेमातील गब्बरसिंग दरोडेखोराचं उदाहरण बरचसं 'फिल्मी' व तेवढेच बटबटीत असेलही, पण शेतकर्‍यांची 'बचत' कशी लुटल्या गेली हे समजायला उपयोगी ठरते.

खळ्य़ातून शेतकर्‍यांच्या घरी धान्य येताच आता गब्बरसिंगच्या माणसांना शेतकर्‍यांच्या दारी जाण्याचे कामच उरले नाही. ते आता फक्त एवढंच करतात. शेतकर्‍यांचा माल घरी येताच ते अन्नधान्याचे 'भाव' पाडतात आणि त्याची बेगमी व बचत लुटून नेतात. ही लूट फक्त दिसत नाही एवढेच.

बैलाने शेती करण्यापेक्षा घोडय़ावर बसून, खांद्यावर बंदूक लटकून शेती करणे फायद्याचे होऊ लागले. नांगराने शेती करण्यापेक्षा तलवारीने शेती करणे किफायतशीर होऊ लागले. करायचं काहीच नाही. तयार शेतीमाल तलवारीच्या बळावर लुटून न्यायचा. बस्स एवढंच. कोणी तलवारीने लुटले, कोणी दीडदांडीच्या तराजूने लुटले. कोणी 'व्याजाच्या' हत्याराने लुटले. कोणी मध्यस्थ, दलाल होऊन लुटले. कोणी 'धर्मग्रंथ' दाखवून लुटले. शेतीत पाऊस पडतो म्हणून शेती पिकते. पाऊस का पडतो तर आम्ही 'यज्ञ' करतो म्हणून पडतो. तेव्हा दे 'दक्षिणा' म्हणत कोणी लुटले. ग्राहकांचे कसे होणार? अन्नधान्याचे भाव वाढले तर गोरगरिबांचे कसे होणार म्हणत अन्नधान्याचे भाव पाडत किंवा स्थिर ठेवत शेतकर्‍यांना लुटले. तर कधी, 'कांद्याने आणले डोळ्य़ात पाणी' असा आरडाओरडा करीत लुटले. आता शेतकर्‍यांची बचत लुटायला गब्बरसिंग किंवा त्यांच्या माणसांना घोडय़ावर बसून यावे लागत नाही. गब्बरसिंग आता चंबळच्या घाटीतही राहत नाही. तो आता दिल्ली, मुंबईत राहतो. त्याला आता कोणी दरोडेखोरही म्हणत नाही. म्हणायचे झाल्यास त्याला 'सत्ताधारी' म्हणतात. प्रत्यक्ष घोडय़ावर बसण्याऐवजी खांद्यावर बंदूक लटकवून फिरण्याऐवजी केवळ सत्तेत बसून 'कागदी घोडे' नाचवत, शेतकरीविरोधी धोरण राबवीत तो शेतकर्‍यांची बचत सहज लुटू शकतो. दुष्काळ असेल तर शेतकर्‍यांवर सक्तीची 'लेव्ही' लावा. अन्नधान्याचे भाव वाढताच परदेशातून का होईना महाग अन्नधान्याची आयात करून भाव पाडा. अन्नधान्याला निर्यातबंदी करा. आयात खुली करा, असे अनेक हातखंडे आता गब्बरसिंग वापरू शकतो.

कारखान्यात एक किलो लोखंड टाकलं तर त्याचे दोन किलो काय साधे एक किलो एक ग्रॅमदेखील होत नाही. कारखान्यात वस्तूचं फक्त रूप बदलतं. लोखंडाचे खिळे, टाचण्या, दाभन, नटबोल्ट होतील. पण त्याचे वजन एका किलोपेक्षा वाढणार नाही. उलट ते कमी होईल. कारखान्यात केवळ वस्तूचं रूप बदलतं. 'रूपांतरण' होतं तरीही तेथे बदाबदा पैसा आहे. 'भांडवल' आहे. व्यापारात तर या हाताने वस्तू घ्यायची व त्या हातात सोपवायची. फक्त एवढंच करायचं आहे. व्यापारात वस्तूचं केवळ 'हस्तांतरण' होतं. तरीदेखील तेथेही श्रीमंती आहे. भरभराट आहे. तेथेही बदाबदा भांडवलचं भांडवल आहे. पण शेतीत एका दाण्याचे हजार दाणे होतात. चिमूटभर दाण्याचे मणभर होतात. एका किलोचे क्विंटलभर दाणे होतात. पसाभर दाण्याचे टनभर दाणे होतात. शेतीतच फक्त गुणाकार होतो. तो कारखान्यात होत नाही. व्यापारात तर नाहीच नाही. झालेच तर 'रूपांतरण' व हस्तांतरण होते. पण शेतीत गुणाकार होतो आणि जेथे गुणाकार होतो तेथेच भांडवल निर्मिती होते. त्याच शेतीत भांडवलाचा अभाव का? जेथे निर्मिती होते तेथेच तुटवडा का? जेथे संपत्ती तयार होते तेथेच विपन्नता का? जेथे धान्याच्या राशी उभ्या राहतात तेथेच शेतकर्‍यांच्या उरावर कर्जाचे डोंगर का? असे प्रश्न विद्वानांना कधी पडले नसतील? जिथे गुणाकार होतो तेथेच भांडवलाचा अभाव हा चमत्कार कसा व कोण करीत असेल, असे प्रश्न बुवाबाजीचा भंडाफोड करणार्‍यांना, अंधश्रद्धा निर्मूलनाच्या नेत्यांना कधी पडला नाही. पण का? का?? आणि का???

कारण ही सर्व मंडळी शेतकर्‍यांची बचत लुटून नेणार्‍या दरोडेखोर गब्बरसिंगनीतीचे 'लाभार्थी' राहिलेले आहेत. या देशातील विद्वान, विचारवंत, पर्यावरणवादी, अर्थतज्ज्ञ, समाजकारणी, राजकारणी हे शेतकरीविरोधी धोरणाचे लाभार्थी होते. म्हणून कधी या विषयावर बोलले नाही. तुकडोजी महाराजांसारख्या राष्ट्रसंताला जे कळले,

'कच्च माल मातीच्याच भावे

तो पक्का होता चौपटीने घ्यावे

मग ग्रामजन कैसे सुखी व्हावे

पिकवोनही उपाशी'

स्वातंर्त्याच्या सेनापतीला, महात्मा गांधींनाही हे कळले होते. म्हणून ब्रिटिशांच्या साम्राज्यवादी शोषणाच्या विरोधात 'चले जाव' म्हणत मँचेस्टरच्या कापडांच्या कारखान्यांना शह देण्यासाठी स्वातंर्त्याच्या लढाईचे 'चरखा' हे प्रतीक निवडले होते.

विचार येतो समजा 'शोले' नवीन पद्धतीने काढायचा ठरल्यास त्यात गब्बरसिंगला घोडय़ावर बसण्याची गरज नसेल. तो केवळ कागदी घोडे नाचवील. गब्बरसिंगला ए. के. हंगल व सिनेमातील रहिमचाचाच्या मुलाला गोळी घालून मारण्याचीही गरज पडणार नाही. गब्बरसिंगनीतीने तो एवढा त्रस्त होईल की, तो स्वत:च शेतकरी जसे जहर घेऊन आत्महत्या करतात तसाच तो जहर घेऊन आत्महत्या करेल. तेव्हा गब्बरसिंग विचारेल, 'अरे ओ ù ù सांबा, कितने, किसान मरे?' तर आंधळा रहिमचाचा (ए. के. हंगल) मुलाच्या आत्महत्येनंतर पसरलेली स्मशानशांतता अनुभवल्यानंतर व्यथित होऊन गदगदल्या स्वरात विचारेल, 'अरे भाई, इतना सन्नाटा क्यू हैं?' आणि सिनेमाचा 'दी एण्ड' होईल.

(लेखक शेतकरी आंदोलक आणि सामाजिक कार्यकर्ते आहे.)

भ्रमणध्वनी - 9822587842

करलो वोट मुठ्ठी में..


काही वर्षांपूर्वी अशा प्रकारचं घोषवाक्य घेऊन एका कंपनीने आपली मोबाईल सेवा धडाक्यात सादर केली होती. या सेवेचा शुभारंभ करताना एका मंर्त्याने असे म्हटले होते की, उद्या भारतातल्या माणसाच्या पायात एकवेळ चप्पल नसेन, पण त्याच्या हातात मोबाईल असेल. तो संबंधित कंपनीचाच असावा यासाठी विशेष प्रयत्नदेखील झाले होते. हे सारे याकरिता आठवले की, संपुआ सरकार 'हर हाथ में फोन' या नावाची योजना जाहीर करण्याच्या विचारात आहे. हा लेख लिहेपर्यंत ती घोषणा झाली नव्हती. दुसर्‍या पक्षाच्या माजी मंर्त्याच्या भविष्यवाणीला वास्तवात उतरविण्यासाठी मनमोहनसिंगांचे सरकार अशी योजना आणेल, असे स्वप्नातदेखील वाटले नव्हते. आणि तीदेखील दारिद्रय़रेषेखालील जनतेसाठी, म्हणजे पायात चप्पल तर सोडा, ज्यांना दोन वेळचे खायची भ्रांत आहे अशांना मोबाईल देण्याची ही अद्भुत, अभिनव, अतिकल्पक अशी ही योजना आहे. 'बौद्धिक दिवाळखोरी' हा शब्द ऐकला होता. माझ्या वडिलांचे एक सुप्रसिद्ध उद्बोधन होते, 'जागतिक बिनडोक' तर, ह्या दोन्ही उपमा, संबोधने, इ. सार्थकी लावणारी मंडळी याच एका जन्मात बघायला मिळेल, असे वाटले नव्हते. नरदेहाचे कल्याण म्हणतात ते हेच. असे धन्य लोक बघायला आणि अशा कल्पना ऐकायला मिळणे याला भाग्यच लागते. ही अद्भुतरम्य कल्पना ऐकल्यावर माझ्या मन:पटलावर अनेक चित्र तरळू लागली. विचारांचे थैमान उठले. प्रश्नांचे काहूर माजले (काहूर, थैमान यांचा क्रम इकडला-तिकडे झाला असेल, तर समजून घ्या. माझ्या मेंदूचं सध्या संसदभवन झालेलं आहे.) सदरहू योजनेंतर्गत प्रत्येकाला 200 रुपयांचा टॉकटाईम देण्यात येणार आहे. पण मेसेज पॅकबद्दल काहीच खुलासा नाही. तेव्हा किती मेसेजचं पॅकेज राहील, हे स्पष्ट व्हावे. त्याबरोबर हँडसेट साधा राहील की, मल्टिमीडिया? कनेक्शन 2 जी राहील की 3 जी. शक्यतो 3 जी याकरिता द्यावे की, समजा भूक लागली आणि खायला काही नसेल, तर नेटवर वेगळ्य़ा डिशेशची चित्रे पाहता येतील आणि डाऊनलोड करता येतील आणि लेकरू रडलं तर समजूतही काढता येईल. 'आज मेरी गुडिया क्या देखेगी, पनीर बटर मसाला या चिकन करी?' (माझं खाद्यपदार्थातलं ज्ञान यापुढे नसल्याने कृपया हेही समजून घ्यावे) हँडसेट टचस्क्रीन राहील की साधा, कलर राहील की ब्लॅक अँड व्हाईट, डय़ुएल सिम राहील की सिंगल सिम, मेमरी कार्ड किती जीबीचे असेल, खाजगी कंपनीचा असेल की, 'भगवान से भी नहीं लगता'वाल्या नेटवर्कचा, नेटवर्क चांगलं असेल तर सरकारला अशी जाहिरातही करता येईल! आपके पेट में भलेही अन्न का दाना ना हो, लेकिन आपके फोन में नेटवर्क जरुर होगा', 'रुखी-सुखी खाएंगे मगर कनेक्ट रहेंगे', कोई भी धरम हो, कोई भी जात, भुखे पेट अब सभी करेंगे बात! कनेक्शन लाईफटाईम असेल की बॅलन्स संपल्यावर बंद पडेल?

सरकारी नोकर्‍यांमध्ये ज्याप्रमाणे जातीनिहाय सवलती असतात तशा सवलती मोबाईलधारकांना मिळतील का? अमुक एका जातीच्या माणसाला मेसेज पॅकेज मोफत, तमुक एका जातीच्या माणसाला आयफोन, अशा सोयीसवलती राहतील का?

कल्पना करूयात रिंगटोन कसे राहतील? काही अशा असतील.. मोहे सजन तोहे भुख लगी तो पुरी-कचेरी रसगुल्ला बन जाऊंगी, मैं तो रस्तेसे जा रहा था - मैं तो भेलपुरी खा रहा था.. 'जमाईराजा' या अनिल कपूर-माधुरी दीक्षित यांच्या सिनेमातलं 'बट्टाटावडा', 'चंदामामा दूरके पुए पकाये खीरके, आप खाये प्यालीमें मुन्ने को दे थाली में..'

गरिबांना मिळणार्‍या सवलतीमध्ये या योजनेंतर्गत मिळणारा मोबाईल आयकार्ड म्हणून वापरता येईल का? स्वस्त धान्याच्या दुकानात मोबाईल दाखवून अन्नधान्य मिळेल का? जीवनदायी योजनेंतर्गत मोबाईल पाहून डॉक्टर फुकटात ऑपरेशन करेल का? रजिस्टरमध्ये नावाऐवजी अमक्या-अमक्या नंबरचे ऑपरेशन झाले, अशी नोंद करतील का? रिचार्ज मारण्यासाठी 'शासकीय मोबाईल रिचार्ज केंद्र' (दारिद्रय़रेषेंतर्गत) राहील का? ज्या गरिबांकडे वीज नाही त्यांच्यासाठी विद्युत महामंडळ 'शासकीय रिचार्ज केंद्र (दारिद्रय़रेषेंतर्गत) सुरू करेल का, की त्याऐवजी सरकार सोलर मोबाईल देईल? उद्या चालून या योजनेत घोटाळा झाल्यास 'अमक्या अधिकार्‍याने लाटला गरिबांचा टॉकटाईम' असे वृत्तपत्रांतील बातम्यांचे मथळे असतील का? आणि सरतेशेवटी कुठल्याही सरकारी योजनेच्या अशाप्रकारे चिंध्या फाडू नयेत म्हणून सरकार मला लाईफटाईम कार्डसहित फुकटात मोबाईल देईल का?

(लेखक नामवंत व्यंगचित्रकार व कॅलिग्राफर आहेत.

'गंमतजंमत' हा त्यांचा लोकप्रिय एकपात्री कार्यक्रम आहे.)

भ्रमणध्वनी - 9823087650

Wednesday 29 August 2012

फिकीर कराची नाई!


कार्यक रमाले तवा जुनी गाडी घेऊन आमी बाहेरगावी जावो. थे जुनाट झालेली गाडी तिच्या तब्यतीच्या हिसोबानं चाले. आखरीले सुरूडुरू करत ते गाडी त्या गावाले थांबली. ते गाव म्हंजे स्टॅँडवर्त दोन लहान हटेल आन् गाव थोडसं आतनी. आमच्या कलाकारायले वाटलं का उसीर झाला म्हून लोकं आपली वाट पाह्यत असनं म्हून त्या तोर्‍यात जवा हे खाली उतरले तं खाली एकयी मानूस वाट पाहत नोता. यायची हवाचं निघून गेली. मी सुधाकर संग त्या हटेल पावतर गेलो तं भट्टीपासी बसलेल्या मानसानं मुंडकं हालवून 'या' म्हनलं. म्या मनात म्हनलं हा मुंडकंच हालवते हातनयी या म्हनत नाई? मंग वाटलं हा त्या मंडयाचा होय का नाई आपल्याले का मालूम. थो मुंडकं हालवते हेच खूप झालं. म्या तिथं गेल्यावर इचारलं, ''भाऊ, त्या नवदुर्गा मंडयाचं इथं कोणी हाय का?'' त्याच्यावर्त ते म्हने,''मंग म्या उगीचं मुंडकं हालवलं का? ''आमी आलो हे सांगाले आलो.'' ''मी तुमच्याचंसाठी आलो,'' असं म्हनत तो उभा झाला. डावा हात खांद्यावर ठेवत आन् उजव्या हाताचा पंजा माह्या तोंडासमोरून फिरवत तो म्हने, ''हे पाहा सायेब, मी तुमाले सांगतो फिकीर कराची नाई.'' म्या म्हणलं, ''मी कायले फिकीर करू?'' तो म्हने,''सांगून राह्यलो, मी हावो ना! च्या पेता का?'' म्या म्हनलं, ''आता च्याचा टाईम हाय का?'' तो म्हने, ''इचारून राह्यलो, म्हनानं पुसलयी नाई, चाला.'' म्या हटकलं, ''हे वाद्य ठुवा लागन ना.'' ''त्याच्यावर्त थो, हडट राज्याहो म्या तुमाले सांगतलं ना फिकीर कराची नाई, चाला.''

तो पुढं त्याच्या मांग आमी बारा- तेरा कलाकार असा ताफा निंघाला. गाव लागल्यावर तो आमाले या गल्लीतून त्या गल्लीत, त्या गल्लीतून पुढच्या गल्लीत असा फिरवून राह्यला. म्या सुधाकरले म्हनलं, ''कारे, हा आपल्याले असा फिरवून पांदनीतून बाहेर तं नाई काढून दिन?'' ''इचारू का?'' सुधाकर म्हने. राहू दे तो आणखी म्हणल,''फिकीर कराची नाई.'' तितल्यात एका घरासमोर कायी मंडयी दिसली तवा माह्या जीवात जीव आला. ते त्या मंडयाच्या अध्यक्षाचं घर होतं. समोर दोन बकेटात पानी, बाजूले पाटं, पाटापासी साबना असा इंतजाम पाह्याल्यावर म्या सुधाकरले म्हनलं, ''हे तं सोयरीकीच्या पावन्यासारकी सोय दिसून राह्यली. यानं चुकीनं तं आपल्याले नाई आनलं? इचारू का? ''त्याच्यावर तो म्हने, ''मुकाटय़ानं बस.'' आमी बैखटीत पाह्यतो तं गादीले गादी लावून वरतं पांढर्‍याभक चादरी भितीकून कुठी तकिया, कुठी लोड. लोड कमी पडला तिथं गादी गोल गोल गुंडायून त्याचा लोड. उरोटय़ाले पुरोटा कसा लावावं ते खेडय़ातल्या मानसालेचं समजते.

आमी बैखटीत गाद्यायवर जाऊन बसतं नाई का एक कार्यकर्ता सार्‍यायले पानी पाजून गेला आन् बैखटीत आमचे आमीचं फकस्त. आतनी बोलल्याचा आवाज ये. बैखट आन् घर याच्या मंधात जे दाठ्ठा (दार) होता त्याले पडदा लटकून म्हून अंदरचं काई दिसे नाई. तो पडद्याचा कपडा काटनचा असल्याच्यानं धुतल्यावर आकसला असनं म्हून खालून हित हित आखूड झाला होता. त्याच्याच्यानं अंदरच्या मानसायचे फकस्त पायाचे पंजे दिसत बस्स. आमी बसून बसून कटायल्यावर्त जसे पडद्याखालून मले दोन पाय दिसले तं मले नाई राहवलं. म्या देल्ला आवाज, ''ओ भाऊ'' तसा पडदा बाजूले सरकला आन् डावा हात कमरीवर आन् उजव्या हाताचा पंजा फिरवत, ''हट राजे हो, तुमाले भेटल्यापासून सांगून राह्यलो ना! फिकीर करायची नाई. बसा.'' आन् तो अंदर.

अंदूरन वारा वाहाले लागला का असा सुवास नाकाले फोडनी दे का, काई इचारू नोका. त्याच्याच्यानं भूक अनखीनचं भुकीजल्यावानी झाली. उपासी मानूस आकातल्यावानी हटेलातल्या तयून ठुलेल्या आलूबोंडय़ाकडं पाह्यते तसे आमी मंधा मंधात त्या पडदा लावलेल्या मंधातल्या दाठ्ठय़ाकडं पाहो. आखरीले पडदा हालला आन् चाला जेवाले म्हनल्याबराबर आमी शाया सुटल्यावर पोट्टे जसे भरभर घराकडं पयते तसे आमी आतनी. आतनी गेल्यावर्त पाह्यतो तं काय पाह्यतचं राहावं असा इंतजाम. दोनी भितीकून चांगल्यावाल्या पट्टय़ा आथरून सामोर पाटं. पाटावर ताट मांडून. रांगोया काढून मंधा मंधात वल्या मातीचा घट गोया करून त्याच्यातनी दोन-दोन मस्ताना उदबत्त्या खोसून. ते सारं पाहून आमी सारे खूस झालो. माह्या उजव्या बाजूले सुधाकर आन् डाव्या बाजूले महेश शिरे जो मुकेसचे गाने म्हने तो गायक बसला होता. ताटात पाह्यतो काय तं चुलीवर्त शिजलेलं वाफा निंघनारं सादं वरन. एका वाटीत आलू-वांग्याची रस्याची भाजी, मिठाच्या बाजूले तियाची चटनी, फुरका माराले आमसुलची कढी, भजे, नरमलच पोया आन् गोड म्हून बुंदीचे लाडू. याले म्हंते पाहुनचार मनापासून केलेला. घ्या कवा म्हन्ते म्हून आमी वाट पाहत असतानी कोन्टय़ात उभ्या असलेल्या त्या मंडयाच्या कार्यकर्त्यानं श्लोक सुरू केला, ''वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे.. श्लोक झाल्याबराबर 'पंढरीनाथ महाराजकी जय..' सार्‍यायनं एका सुरात म्हनल्याबराबर काई तं घ्या म्हनाच्या आंधीच सुरू झाले. आता तुमाले एक सांगू का? सांगू नोका कोनाले. आपली आपल्यातचं ठेव जा. म्यातं श्लोक चालू असतानी ताटातले भजे पाहून राहवलं नाई म्हून एक भजा गुपचूप देल्लाच तोंडात टाकून.

आता खरं तं आमी सारे वयानं पोट्टेसोट्टेच आन् इतकं सुंदर जेवाले भेटल्यावर कोनी ढकलं करते का? त्यातनी वाढनार्‍यायचा आग्रव नातलगासारका. घ्यानं इतल्यान काय होते. नाई म्हणाले गेलं तं, ''इतला एक लाडू जादा होते का?'' असं चालू असतानी एकजन आला 'भजे, भजे' करत. माह्या डाव्या हाताले शिरे बसून तो गायक म्हून तो म्हने, ''भाऊ, मला भजे नका वाढू.'' वाढनारा म्हने, ''चार भज्यानं काय होते.'' म्या इचार केला, ''तयलेले भजे खाल्ल्यानं गयाले तरास झाला तं काय करता? म्हून म्या खालच्या मुंडक्यानं सांगतलं,''ओ भाऊ, त्याले भजे वाढू नोका.'' तसा मले ते भज्याचं टोपलं खाली ठुल्याचा ठप्कन आवाज आला म्हून म्या वरतं पाह्यलतं त्याचा डावा हात कमरीवर आन् उजव्या हाताचा पंजा माह्या तोंडासमोर फिरवत म्हने, ''हट राजे हो, मी सांगून राह्यलो ना फिकीर कराची नाई!'' म्यायी त्यायले पाह्यल्यावर म्हनलं, ''मले काय माईत तुमी हाय म्हून. वाढा लेकाले वाढा पाह्यल्या जाईन बिलकूल ढकल करू नोका.''

इतकं ठासून जेवन झालं होतं का त्या आडव्या गाद्या उभ्या करावं आन् द्यावं तानून इतकं पोटभर झालं होतं, पन इलाज नोता. बैखटीत पानदानयी इतकं अपटूडेट का अस्मानतार्‍यापासून इलायची पावतर. थोडासा आराम करून आन् तार वाद्य सुरात लावाले टाईम लागते म्हून आमी स्टेजकडे निंघालो. स्टेजवर चढलो आन् लाऊडस्पिकरवाल्याले माईक मांगतला तं त्यानं एक चपटा माईक पावरफुल जर्मनचा होय म्हून माह्या हातात देल्ला. सामोर पाच-सा बाया, सात-आठ मानसं बसून होते. सार्‍या तयारीत पंदराईस मिन्ट गेले. साडेअकरा वाजाले आले तरी कोनाचाच पत्ता नाई. झोपले का म्हनलं मंडयवाले. म्या लाऊडस्पिकरवाल्याले इचारलं चालू कराचं का? थो म्हने तुमच्या मनानं. जसी आमची टायटल टय़ुन चालू झाली तसे आठ-दहा जन बंद करा, बंद करा असे बोंबलत धावत आले. आर्केस्ट्रा बंद झाला तसे ते पोचल्याबराबर म्हनाले लागले, ''आमचे भांडन लावता का तुमी? ''म्या म्हनलं, ''आमी कसे काय भांडन लावनार?'' मंग त्याच्यातला एकजन म्हने, ''अवो आमच्या गावात दोनचं मंडय हाय आन् आमचं आपसात असं ठरलं हाय का एक दिवस आमचा आन् एक दिवस त्यायचा पह्याले कार्यकरम मंग दुसर्‍या मंडयाचा. आज त्या मंडयाचा पह्यला नंबर हाय तिथचं किरतन सरलं का लोकं इथ येतीन. मंग आपला कार्यक्रम सुरू होईन, समजलं? तवा मांगून येनार्‍यानं याले बाजूले सारत पुढं आला तं डावा हात कमरीवर आन् उजव्या हाताचा पंजा फिरवत तो म्हने, मी मंघापासून तुमाले सांगून राह्यलो का फिकीर कराची नाई. आपल्याले टाईम हाय.'' म्या म्हनलं, ''टाईम हाय हे कवा सांगान?'' तो म्हने, ''मले काय मालूम तुमी घाई करान म्हून. जाऊ द्या आता. थोडं थांबा आन् भाऊ फिकीर कराची नाई!

(लेखक हे नामवंत वर्‍हाडी कथाकार आहेत. 'बॅरिस्टर गुलब्या' हा त्यांचा एकपात्री कार्यक्रम अत्यंत लोकप्रिय आहे.)

भ्रमणध्वनी - 9420551260

'मोरां'च्या नावाने 'कोंबडय़ां'ची विदेशवारी!


काही लोकांचं वागणं पाहिलं की, हसावं की रडावं हेच कळत नाही.

खरंतर साहित्यिक, कवी, लेखक, विचारवंत ह्यातला प्रत्येक शब्द ऐकताना किती भारी वाटतो. एकेकाचा केवढा रुतबा, केवढा दबदबा! सर्वसामान्य लोकांच्या मनात यांच्याबद्दल एकप्रकारचं कुतूहल असतं. आदराचीही भावना असते. विविध सामाजिक कार्यक्रमात यांना मोठा मानही मिळतो, हेच लोक समाजाला दिशा देतात. वेळोवेळी मार्गदर्शन करतात. हेच लोक मनोरंजनसृष्टीचे प्राण असतात, आधारस्तंभ असतात.

पण बाजारपेठेत जसा एके काळी 'दिल्ली मॉडेल'ने किंवा अलीकडे 'चायना मार्केट'ने धुमाकूळ घातला तशीच अवस्था साहित्य क्षेत्रातही पाहायला मिळते. विविध भागात असे तक लादू किंवा डुप्लिकेट मालाचे ठेकेदार असतात. विदर्भातही आहेतच. 'विदर्भ साहित्य संघ' नावाची एके काळची गौरवशाली संस्था हल्ली 'चायना मार्केट'चे मोठे केंद्र होऊन बसली आहे. सर्व प्रकारचा डुप्लिकेट माल इथे मिळतो. इकडच्या तिकडच्या चिंध्या गोळा करून कादंबर्‍या 'असेम्बल्ड' करणारे आणि स्वत:च्या नावाच्या पट्टय़ा चिकटवणारे लोक इथे 'कॉलर टाईट' करून वावरतात. गालिच्याचे व्यापारी असल्याचा पुरस्कारही मिळवितात आणि चोरीचा माल दिला म्हणून लोकांच्या लाथाही खातात. साराच अफलातून कारभार! वरून हे 'चिंधीचोर' इतरांना साहित्याची प्रमाणपत्रंही वाटत फिरतात.

जागतिक मराठी साहित्य संमेलनाच्या नावानेही असाच धिंगाणा सुरू आहे. मोरांच्या नावानं अनुदान लाटायचं आणि कोंबडय़ांनी विदेशात 'फडफडून' यायचं, असा सारा प्रकार. त्यातले किती लोक खरंच साहित्यिक असतात? साहित्यिक संस्थेवर कब्जा करून बसलेल्या ह्या लोकांचं साहित्य क्षेत्रातलं योगदान नेमकं काय? आपण लायब्ररीमध्ये झाडपूस करतो, या आधारावर एखाद्या पोरानं स्वत:ला विद्वान म्हणवून घ्यावं किंवा सिनेमा थिएटरच्या गेटकिपरला 'सिनेस्टार' म्हणवून घेण्याची दुबरुद्धी सुचावी तसा हा केविलवाणा प्रकार!

कुणाला काय बोलणार? बोलून तरी काय फायदा?

'अरे' बोललो चुकले माझे

'बरे' बोललो चुकले माझे

तुझ्या सोवळ्य़ा मैफलीमध्ये

'खरे' बोललो चुकले माझे!

यंदा होऊ घातलेल्या जागतिक साहित्य संमेलनाचा याच कारणामुळे बोर्‍या वाजण्याची वेळ आलेली आहे. तिकडची आयोजक संस्था फक्त साहित्यिक असलेल्या लोकांची तिकिटं द्यायला तयार आहे. पण या संस्थांमधील लोकांना त्यात समाधान नाही. त्यांना मोरांच्या तिकिटावर आपल्या कोंबडय़ांना विदेशात पाठवायची खाज आहे. आतापर्यंत हे चालत आलं. त्या अनुभवातूनच यांची चालबाजी उघड झाली आणि पुढचे आयोजक शहाणे झालेत. पण ह्या साहित्य संस्था काही शहाण्या व्हायच्या विचारात दिसत नाहीत.

हे कसे साहित्ययात्री, हा कसा आजार झाला

संपल्या साहित्य संस्था, 'चायना' बाजार झाला!

ज्या क्षणाला 'कोंबडी'ला 'मोर' व्हावे वाटले

पाखरांनो, हाय चालू त्या क्षणी व्यभिचार झाला!

खरंतर हे जागतिक साहित्य संमेलन हाच मुळात एक हौशा-गौशा लोकांचा उत्सव आहे. त्यात कसलं साहित्य अन् कसली साहित्यसेवा, पण सरकारलाही अक्कल नाही. उगीच या संस्थांना अनुदान देत असते. त्यांच्याही हाडावर चोट नाही. यांच्याही हड्डीवर थोडं मांस येऊन जाते, विदेशात उंडारून आल्यामुळे सया साहित्यिकांची तिथे काय गोची होत असेल याची कल्पनाच केलेली बरी.

पण एकंदरीत सर्वत्र असाच गोंधळ सुरू आहे. केवळ साहित्यिकांना किंवा या संस्थावाल्यांना दोष देऊन काय फायदा? पण यामुळे साहित्याचं महत्त्व कमी व्हायला हातभार लागतो. अखिल भारतीय साहित्य संमेलनामध्येही आपल्या आपल्या जवळच्या लोकांना घुसविण्याचा प्रयत्न असतो. थोडंफार प्रमाण तसं स्वीकारायलाही हरकत नाही. पण इथे दुधामध्ये थोडं पाणी मिसळण्याऐवजी सरळ सरळ पाण्यामध्येच दुधाचे काही थेंब मिसळण्याचा आणि त्यालाच 'ब्रॅण्डेड दूध' म्हणून खपविण्याचा निर्लज्जपणा कुणी करीत असेल तर ते कसं खपवून घ्यायचं? म्हणूनच मग रसिक असल्या आयोजनाकडे पाठ फिरवितो.

जी गोष्ट साहित्य संमेलनाबद्दल तशीच परिस्थिती पाठय़पुस्तकातील साहित्याबद्दलही. त्यातील दर्जा पाहिला तर अक्षरश: संताप येतो. अभ्यासक्रमामधल्या किती कविता विद्यार्थ्यांना पाठ असतात? आवडतच नाहीत तर पाठ तरी कशा होणार? विद्यार्थी सोडा, वर्षानुवर्षे शिकविणार्‍या प्राध्यापकांना तरी किती कविता पाठ असतात? आणि नसतील तर का होत नाहीत याचा आपण विचार करणार आहोत की नाही? तुकाराम, बहिणाबाई, तुकडोजी महाराज, कबीर, मीराबाई, गालीब हे कसे लोकांना पाठ आहेत?

मी कुणाला काय बोलू

या उन्हाला काय बोलू

बाग जर बैमान झाली

कुंपणाला काय बोलू?

या अंध:पतनाला तुम्ही-आम्ही सारे जबाबदार आहोत. हा गुन्हा जसे साहित्यिक करतात तसे रसिकही करतात. त्यांनीच 'असली'ला असली म्हणून डोक्यावर घेतानाच 'चायना' मालाला चायनाच्याच एवढी किंमत द्यायला हवी. केवळ दिखाऊपणावर किंवा 'चमकेगिरी'वर भाळून नकली मालाचा उदोउदो करणं बंद करायला हवं.

जाऊ द्या. उगीच आपलं डोकं खर्च करण्यापेक्षा खरा पाऊस अंगावर झेलू या.. जागतिक साहित्य संमेलनाला शुभेच्छा देऊ या आणि संस्थाचालकांनाही आतातरी सद्बुद्धी येईल अशी आशा करू या.

(लेखक हे नामवंत कवी, चित्रपटनिर्माते आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत. ' सखे-साजणी' हा त्यांचा कार्यक्रम अतिशय लोकप्रिय आहे.)

भ्रमणध्वनी - 9822278988

जगणे आणि जगविणे ही आदिम प्रेरणा

जड पदार्थातून व जडाचे आधारे उगवलेले जीवन क्षणभंगुर असते. पदार्थमय देहात दीर्घकाळ प्राण टिकू शकत नाही. त्यामुळे प्राणाचा अथवा जीवनाचा विकास होण्यासाठी जगण्याची व प्रजातीच्या पुनरुत्पादनाची मूलभूत प्रेरणा (इन्स्टिंक्ट) सर्व सजीवांच्या अंतरंगात दृढ होणे गरजेचे होते. जीवनाचा विकास म्हणजे अधिकाधिक वाढत्या प्रमाणात सृष्टीचा बोध होण्याची, सृष्टीवर नियंत्रण मिळविण्याची व अनेक प्रकारे उपभोग घेण्याची प्रक्रिया. वैज्ञानिक असे सांगतात की, जर एखाद्या जिवाणूवर संकट आले-म्हणजे तो नष्ट होण्याची परिस्थिती निर्माण झाली - तर तो जिवाणू स्वत:मधले डीएनए रेणु भोवतालच्या वातावरणात विखरून टाकतो आणि आजुबाजूचे जिवाणु लगेच त्या विखुरलेल्या डीएनए रेणुंना स्वत:मध्ये शोषून घेतात. डीएनएची ही देवाणघेवाण कल्पनातील वेगाने होत राहते व काही महिन्यांतच संपूर्ण पृथ्वीवरील जिवाणूंच्या डीएनए रचनेत काही बदल घडून येतात, जे त्यांना संकटांचा मुकाबला करण्यासाठी पूर्वीपेक्षा अधिक सक्षम बनवितात. त्यामुळेच कालपर्यंत प्रभावी ठरलेले अँंटीबायोटिक औषध अथवा किटकनाशक आज निष्प्रभ ठरल्याचा अनुभव येतो.

म्हणजेच जगणे, व स्वत:ची प्रजाती वाढविणे या सर्व सजीवांच्या मूलभूत प्रेरणा आहेत. त्या प्रेरणा नसत्या तर पृथ्वीवर जीवनाचा विकासच झाला नसता. शिवाय आपल्या देहाच्या पोषणासाठी, रक्षणासाठी व देहाच्या पुनर्निर्मितीसाठी देहाबाहेरील पर्यावरणातून पोषक घटक (पदार्थ व ऊर्जा) देहाच्या आत ओढून घेणे, त्या घटकांवर देहान्तंर्गत प्रक्रिया करून जीवपेशी बनविणे व नको असलेले घटक पुन्हा विष्ठेच्या रुपात बाह्य पर्यावरणात टाकून देणे (जी विष्ठा इतर कोणत्या तरी सजीवाचे अन्न असते) हे कार्य प्रत्येक सजीव अखंड करत राहतो. भोवतालच्या पर्यावरणातील संभाव्य बदलांचा अंदाज घेऊन अनुकूल काळातच अन्नाचे साठे जमवून ठेवण्याची अथवा पाऊस - वार्‍यापासून स्वत:चे संरक्षण करण्यासाठी भक्कम निवार्‍याची तजवीज करण्याची कल्पक बुद्धीही मुंगी सारख्या क्षुद्र सजीवांमध्ये देखील आढळून येते. अर्थात 'पावसाळ्यापूर्वी आपण अन्न साठवून वारुळाची डागडुजी केली पाहिजे' असा माणसारखा विचार कोणतीही एक मुंगी करू शकत नसेल. परंतु 'मुंगी' या प्रजाती (स्पेसीज) मध्ये ते शहाणपण उत्क्रांतीक्रमात जगण्याच्या व वृध्दींगत होण्याच्या मूलभूत प्रेरणेतून पर्यावरणीय संकटांना तोंड देता-देता विकसीत झाले असणार. आमच्या घराच्या मागील भिंतीच्या आश्रयाने एक वेल वर चढत गेली. खोलीच्या खिडकीइतकी उंची होताच त्या वेलीने खिडकीच्या आतून गजाला वळसा घातला व पुन्हा उंची वाढल्यावर दुसर्‍याही वरच्या गजाला वळसा घातला. स्वत:चा आधार भक्कम करण्याचे हे 'शहाणपण' वेलीत प्रगटले. माझ्या घराच्या मागील बाजूचे तारेचे कंपाऊड तुटले होते. मागच्या सर्व्हिस गल्लीतून डुकराची एक गर्भार मादी आमच्या परसदारी असलेल्या झुडपामध्ये मोठा खड्डा स्वत:च्या पायांनी करू लागली. सुरूवातीला हाकलले तर ती पळून जायची. परंतु जसजसे तिचे दिसत भरत आले, तसतशी ती धीट व आक्रमक होत गेली. खड्डा करून तिने त्यात पाचोळा अंथरला व पिलांना जन्मही दिला. पिले जन्मल्यावर ती अधिकच आक्रमक होऊन त्यांचे संरक्षण करत होती. पुढे पिले चालू लागून स्वतंत्र झाल्याबरोबर या डुकरीणीची सर्व आक्रमकता लोप पावली व ती हाकलल्यावर घाबरुन पळू लागली. स्वत:च्या प्रजातीची वृद्धी व्हावी यासाठी प्राण्यांची नित्याची प्रकृती देखील प्रसंगविशेषी कशी बदलते व असहाय अवस्थेतील पिलांचे रक्षण करण्यासाठी एरवी भित्रा स्वभाव असलेली मादी-माता कसा चंडिकेचा अवतार धारण करते, याची असंख्य उदाहरणे प्राण्यांमध्ये आढळून येतात.

उत्क्रांतीच्या खालच्या टप्प्यांतील सजीवांच्या प्रजातीतील प्रत्येक जीवाचे स्वत:चे वेगळेपण (त्या प्रजातीतील इतर जीवांपेक्षा) प्रगटताना दिसत नाही. त्या त्या प्रजातीची एकूण सामुदायिक प्रकृती जगण्याच्या ओघात अधिक शहाणी होत गेली, व्यक्तिगत जीवांची नव्हे, असे म्हणता येईल. मात्र उत्क्रांतीच्या वरच्या टप्प्यात म्हणजे सस्तन प्राण्यांमध्ये मात्र प्रजातीतील वैयक्तिक जीवांमध्ये देखील स्वत:चे वेगळेपण व वैशिष्टय़च उमलू लागले. सर्व गायी साधारणपणे सारख्याच दिसत-वागत असल्या तरी प्रत्येक गायीच्या रुपात व स्वभावात इतर गायींपेक्षा वेगळेपण कसे असते, हे आपण जाणतोच. असे डास अथवा मुंग्यांच्या बाबतीत म्हणता येत नाही. निर्जीव व सजीवांमधला एक महत्त्वाचा फरक वैज्ञानिक असाही सांगतात की आपण एखाद्या दगडाला लाथ मारली तर त्याची प्रतिक्रिया काय होईल, याचा अचूक अंदाज करता येतो. परंतु एखाद्या कुर्त्याला लाथ मारली तर त्याच्या प्रतिक्रियेचा अचूक अंदाज करणे अशक्य असते. दुसर्‍या शब्दांत सांगायचे तर लाथ मारल्यावर दगड किती दूर जाऊन पडेल हे न्यूटनच्या भौतिकीय सिध्दांताच्या आधारे लाथेतील जोर व दगडाचे वजन माहीत करून अचूक वर्तविता येते, कारण त्या लाथेमुळे दगडाच्या आतील संरचने (स्ट्रक्चर) मध्ये बदल होत नसतो. परंतु सजीव प्राण्याला लाथ बसल्यावर त्याच्या अंतरंगातील एकूण संरचनेत काही बदल होऊ लागतात व त्या बदलांसह त्याची प्रतिक्रिया घडते. भोवतालच्या जगाकडून घडणारी क्रिया ही सजीवांच्या आतील संरचनांमध्ये बदल घडविण्यास कारणीभूत ठरू शकते; परंतु ते बदल नेमके कशा स्वरुपाचे असावे, हे त्या बाह्य जगाला ठरविता येत नाही. क्रियेला प्रतिसाद देणार्‍या सजीवाची एकूण प्रकृती ते ठरविते.

व्यक्तिस्वातंर्त्याची ही प्राथमिक सुरूवात आहे.

भोवतालच्या पर्यावरणाशी आपले जीवन सुसंगत करण्याकरिता सर्व सजीव प्रजातींच्या प्रकृतीमध्ये उत्क्रांतीच्या ओघात बदल होत गेले. हे बदल त्यांनी ठरवून जाणतेपणी केलेले नाहीत. परंतु ही यांत्रिकपणे अथवा अपघाताने घडलेली प्रक्रिया असावी, असेही म्हणता येत नाही. जगणे व आपली प्रजाती वृध्दिंगत करणे या आदिम प्रेरणा सजीवांमध्ये इतक्या बलवान आहेत की जगणे व प्रजा वाढविणे शक्य व सुसह्य होण्यासाठी प्रकृती परिवर्तन ही अपरिहार्य व क्रमप्राप्त बाब ठरत गेली. खरे पाहता जगणे व आपल्या प्रजातीची संख्या वाढविणे या दोन वेगळ्या प्रेरणा नसून 'आपली प्रजाती प्रदीर्घकाळ टिकून राहणे' ही एकच मूळ प्रेरणा त्या त्या सजीवाच्या प्रजातीच्या ठायी असते. एक व्यक्ती म्हणून सजीवाचे जगणे-मरणे ही गौण बाब असून निसर्गाला खरे मोल प्रजातीच्या टिकून राहण्याचे असते. पृथ्वीवर जीवनाचा सर्वागीण विकास पदार्थमय देहांच्या आधारे होण्यासाठी ही मूलभूत प्रेरणा अत्यावश्यक ठरते.

(लेखक हे नामवंत विधिज्ञ आहेत.)

Monday 27 August 2012

भाषा शुद्ध, अशुद्ध की प्रमाण आणि बोली?

     A A << Back to Headlines     
मी ज्या महाविद्यालयात नोकरीस लागलो त्या महाविद्यालयात स्पष्ट अशा दोन वर्गात विद्यार्थ्यांची वर्गवारी करता येईल असे विद्यार्थी असत. एक वर्ग शहरातल्या अथवा खेडेगावांतल्या दलित, मजूर, कष्टकर्‍यांचा तर दुसरा वर्ग शहरांतला, मध्यमवर्गीय वस्तीतला. सुमारे 30-40 वर्षापूर्वी कुठलेच जातीय अभिसरण नव्हते. त्यामुळे मध्यमवर्गीय वस्तीतही मुलं ही प्रामुख्याने ब्राह्मण अथवा श्रीमंत मराठा, वाणी कुटुंबातली असत. तर श्रमिकांची मुले प्रामुख्याने मागासवर्गीय असत. त्यांच्या भाषिक उच्चारामुळेसुद्धा या दोन वर्गातल्या विद्यार्थ्यांना ओळखता येत असे. आपली बोलीभाषा हीच आपली इतरांना आपण कोण हे ओळखण्याचं पहिलं आणि महत्त्वाचं साधन असतं. आपण मागासवर्गीय आहोत, मागास जातीचे आहोत हे वर्गातल्या इतर

मुलामुलींच्या लक्षात येऊ नये म्हणून मग हे विद्यार्थी वर्गात बोलायचंच टाळत असत. त्यांचा हा न्यूनगंड शिक्षक या नात्याने कसा दूर करता येईल, याचा मी विचार करीत असे.

भाषेच्या उच्चारणाबाबत ब्राह्मण जेवढा जागरूक असतो तेवढा अन्य जातीचा पालक मुळीच जागरूक नसतो. त्याचे कारण सांस्कृतिक आहे. भाषा हेच ब्राह्मण जातीचे महत्त्वाचे उपजीविकेचं साधन होतं. त्यात संस्कृत ही देववाणी. त्यामुळे तिथे उच्चारात चूक केली तर आपणाला पाप लागेल. ही भीती आणि उच्चारभेदामुळे किती वेळा अनर्थ घडू शकतो त्याचीही उदाहरणे ब्राह्मण कुटुंबांत वंशपरंपरेने मुलांच्या अंगवळणी पडलेली असत. पूजाअर्चा आणि मंत्रोच्चारण हेच ज्यांच्या उपजीविकेचे साधन असेल त्या वर्गाला भाषिक उच्चारणाची काळजी घेणे अतिशय गरजेचे होते. त्याउलट सर्व ब्राह्मणेतरांचे जन्म, व्यवसाय, भाषेशिवाय अन्य होते. ब्राह्मणेतरसुद्धा भाषा हे

फुकटचं साधन प्रयत्नपूर्वक मिळवू शकतात, हे लक्षात आल्याबरोबर आमच्या स्मृतिकारांनी संस्कृत भाषेला देववाणी ठरवून अन्य कुणी उच्चारण्याचा प्रयत्न केल्यास शिक्षेची तरतूद करून ठेवली. त्यामुळे एका बाजूस 'देववाणी' अन्य कुणी उच्चारू नये यासाठीही दंड ठोठावण्यात येई आणि मुलगा उच्चार करण्यात चुकला तर ब्राह्मण आईबाप त्याला अतिशय कठोर शिक्षा करीत असत. यामुळे भाषेच्या उच्चारशुद्धीची जी जागरूकता ब्राह्मण कुटुंबात असे ती अन्य कुटुंबांत कधीच नसे. त्यामुळे ब्राह्मणेतर मुलांचे उच्चारदोष दूर करावेत, असे वातावरण घरात नसे आणि घराबाहेरही अशी कोणतीच तरतूद नसे. माझ्या महाविद्यालयात दलित वस्तीतली मुलं मराठी विषय शक्यतो टाळत असत. ज्यांनी घेतला ते वर्गात शक्यतो बोलणं वज्र्य करीत असत. आज ही परिस्थिती फारशी आढळून येत नाही. त्याचं एक कारण ब्राह्मण पालक इंग्रजीकडे वळला असून ब्राह्मणेतर त्यांचंच अनुकरण करताना दिसतो, पण भाषिक उच्चाराच्या किती अहंता होत्या या अनुभवातून माझी पिढी गेली आहे. एकदा स्व. शंकरराव चव्हाण पाहुणे म्हणून महाविद्यालयात आले होते. त्या वेळी त्यांच्या भाषणात किती उच्चारदोष होतात हे मोजण्याचा प्रयत्न माझ्या महाविद्यालयातील काही प्राध्यापक करीत होते, हे मला पूर्ण आठवते.

हा न्यूनगंड अगदी सुरुवातीला माझ्याही मनात होता; पण शालेय पातळीवर मी नाटकात काम करू लागलो. नाटकाचे दिग्दर्शन करू लागलो. त्यातून तो नाहीसा झाला. महाविद्यालयीन विद्यार्थिदशेत कुठलीही भाषा शुद्ध नसते अथवा अशुद्ध नसते, ती बोली असते किंवा प्रमाण असते. या विवेचनाने माझा धीर वाढला. गुरुवर्य कुरुंदकर सर जाहीर व्याख्यानातच खास मराठवाडी लकबीचे काही शब्द उच्चारून अशा गैरसमजुतीवर हल्ला करायचे. त्यामुळे माझा तर आत्मविश्वास वाढलाच, पण प्रत्येक वर्षी फर्स्ट इअरच्या विद्यार्थ्यांसमोर कोणतीही भाषा शुद्ध नसते वा अशुद्ध नसते या विषयावर मी किमान तासभर बोलत असे.

व्हतो अशुद्ध पण न'व्हतो' शुद्ध हे कसे काय? मी काही टिळक नव्हतो, पण बोर्डावर 'येकनाथ' आणि 'एकनाथ' हे दोन शब्द लिहून वेगळा उच्चार करून दाखवा हे आव्हान देत असे. 'चहा' आणि 'चाहा', 'चमचा' आणि 'च्यमचा' असे लिहून कोणता उच्चार रूढ आहे आणि कोणता उच्चार शुद्ध आहे असा प्रश्न विचारत असे आणि 'न'मधला उच्चारभेद तर ब्राह्मण कुटुंबातील विद्यार्थ्यांनाही कळून येत नसे. ते सर्वच 'पाणी' म्हणण्याऐवजी 'पानी' म्हणत असत. मला वाटतं बहुजन समाजाच्या सर्वच शिक्षकांना मुलांमधल्या या न्यूनगंडाला दूर करण्यासाठी काही ना काही करावेच लागले असावे. उच्चार नीट व्हावेत यासाठी संस्कृत भाषेत काही अंगभूत एक्सरसाईज आहेत. तसे बोली अथवा देशी भाषेत नाहीत. त्यामुळे 'संस्कृत' ही सर्व भाषांची जननी आहे. हा चुकीचा सिद्धांत आपणा सर्वाच्या अंगवळणी पडला. इंग्रजीपेक्षाही आमची देशी भाषा जुनी आहे. कारण मुळात ती संस्कृत भाषेतून उद्भवलेली आहे. अहंतेपोटी सैद्धांतिक विमोचन आहे. मूळ शब्द 'कर्ण' त्याचे स्थित्यंतर 'कण्ण', 'कान' असे झाले. मूळ शब्द 'यज्ञोपवीत' त्याचे 'यजोअवीअम आणि 'जानवे' असे झाले. हे शिकविताना मुळात 'कर्ण' अथवा 'यज्ञोपवीतम' हे शब्द तरी कुठून आले हा प्रश्न मनात थैमान घालायचा. संस्कृत ही 'बोलीभाषा' म्हणून केव्हा प्रचलित होती हे विद्वान आजही सांगू शकत नाहीत. (क्रमश:)

(लेखक हे नामवंत विचारवंत

व नाटककार आहेत.)

भ्रमणध्वनी - 9881230084

मीसकॉल आला


''ओ डाक्टरसाहेब..''
''बोला..काय होते तुमाले?''

''मले एका आंगोळावर झोपच लागत नाही'

''कशावर?''

''आंगोळावर! म्हनजे एका साइडले''

''उजव्या आंगोळावर लागते काय?''

''नाही.. जेवन्या आंगोळावर लागते''

''त्यालेच उजवा म्हंतात''

''डाव्या आंगोळावर अजिबात लागत नाही''

''मग चित्ते झोपत जा''

''चित्ता झोपलो की मान अकडते''

''मग उबळे झोपत जा''

''उबळा झोपलो की दम कोंडते''

''कशावर झोपता तुम्ही?''

''बाजीवर''

''खाली झोपत जा''

''खाली पाठ अकडते''

''मग पलंगावर झोपत जा''

''पलंगावर मी फुकटई झोपत नाही''

''काहून?''

''पलंगावर झोपलो की मले भेव लागते''

''कायचा भेव?''

''भयंकर सपन पडले, सपनात मले खावराडीवरा वाघ दिसते, तो माह्या अंगावर धाऊन येते''

''तुमची काहीतरी मानसिक बिमारी दिसते''

''मानसिकचा सवालच नाई.. आपलं सारं बरोबर हाये.. दोन टाइम जेवतो.. चार टाइम बिली पेतो''

''दिवसा झोपता काय तुम्ही।''

''दिवसा कोनाले झोप लागते हो? पोट्टे झोपू देत नाहीत, दिवसभर दांगळो करतात''

''किती वाजता झोपता?''

''सारे झोपल्यावर झोपतो''

''कुठं झोपता?''

''बायकोपाशी! म्हनजे अन् मी वसरीत झोपलो.. तरी बयाबया डोया लागत नाही''

''तुम्ही एक काम करा''

''काय करू?''

''घरात मोठा पायना बांधा अन् पायन्यात झोपत जा.. बायकोले झोके द्याले लावत जा''

''चेंढायन्या करता काय?''

''तुमची मानसिक बिमारी आहे म्हनून म्हनतो, ह्या झोपीच्या गोळ्या घ्या.. रोज रात्री एक घेत जा''

''झोपल्यावर की झोपीच्या आगुदर?''

''तुमाले टाइम सापडला तशी घ्या.. या आता..''

''हे घ्या तुमची तीस रूपये फी.. अदीक एक राह्यलं साहेब..''

''आता काय राह्यलं?''

''बायकोची कंबर दुखते.. तिले गोया द्या''

''ह्या कंबरच्या गोया लिहून देतो''

''अदीक एक राह्यलं.. पोहीले गालफुगी झाली.. तिलेबी काहीतरी औषीध द्या''

''झालं काय आता?''

''बुढय़ाचं काय झालं?''

''बुढय़ाले यादमुई झाली.. लय तरास हाय बुढय़ाले..''

''बुढय़ाले तपासाले घेऊन या''

''तशाच गोया लिहून देना.. बुढा कुठी जात नाही''

''ह्या गोळ्या लिहून देल्या''

''आता शेवटचं राह्यलं..''

''आता काय?''

''बुढीले दमा हाये..''

''तीस रूपयात घरचे सारेच पेशंट तपासून घेता काय? बुढीले घेऊन या ..चला या आता.. नेस्ट.. काय नाव तुमचं?''

''पोपटराव! मोबाईलच्या दुकानात काम करतो''

''काय त्रास आहे?''

''दोन दिवसापासून माहा पोट बिघडलं साहेब.. अलग अलग मिसकॉल येतात.. तर्‍होतर्‍हेचे रिंगटोन वाजतात''

''जेवन सुरू आहे काय?''

''जेवन सुरूच आहे.. म्हनजे इनकमींग सुरू आहे पन आऊटगोइंग बंद हाये''

''किती वाजता जेवता?''

''आपली कॅपॅसीटी जास्त नाही.. फक्त टू जीबी''

''म्हनजे?''

''सकाऊन संध्याकाई दोन-दोन पोळ्या। मंधात पाच दहा रूपयाचं व्हाऊचर मारतो''

''म्हनजे?''

''हाटेलात भजेवळे..''

''हाटेलात खाऊ नका''

''तरी मी कव्हरेज एरीयाच्या बाहीर जात नाही, म्हनजे कोनाच्या घरी खात नाही, तरी मले एसएमएस येतात''

''काय येतात?''

''खट्टे डकार येतात, मंधामंधात एफएम वाजते, म्हनजे पोट कुरकुर करते, रात्री आलार्म वाजतात, तरी मी बारा वाजेलोक व्हायब्रेटरवर असतो, म्हणजे काहीच खात नाही''

''तुमचं नेटवर्क बिघडलं, डबल सेटींग करा लागते''

''ते रिसेट होइन पन आगुदर हे मीसकॉल बंद करा''

''तुम्ही गरम पानी येत जा''

''गरम पानी पेलो की हॅंडसेट गरम होते''

''म्हनजे?''

''पोट गरम लागते, गरम पानी जास्त धकत नाही म्हनून मी थंडा रिचार्ज मारतो'' ''थंडा म्हजे काय?''

''थम्सअप.. आपलं सीमकार्ड लहान आहे, जास्त भूक लागत नाही''

''पोट साफ होते काय?''

''होतच नाही.. समजा संडासची इच्छा झाली तरी तिकून मॅसेज येते.. इस रूटकी सभी लाइने व्यस्त है।''

''कठीन काम झालं तुमचं''

''मी कावलो साहेब या बिमारीले.. बरं जेवलो की बॅलन्स कमी होते.. कालपासून किलोभर वजन कमी झालं''

''काही हरकत नाही.. ह्या गोळ्या घ्या''

''पहा साहेब.. बोलता बोलता मिसकॉल आला..''

''आता तुम्ही लवकर उठा इथून''

''पैसे देतोना..''

''पैसे राहू द्या.. आगुदर बाहीर व्हा.. चला नेस्ट..''

(लेखक हे नामवंत वर्‍हाडी कथाकार आहेत.)

भ्रमणध्वनी - 9561226572

Saturday 25 August 2012

ज्योतिष खरं असतं का हो?


'ज्योतिष खरं असतं का हो? ज्योतिष हे शास्त्र आहे का?' असे अनेक प्रश्न गेल्या शनिवारचा लेख प्रसिद्ध झाल्यावर मला विचारल्या गेले. भारतात ज्योतिष्य, भविष्य हा प्रत्येक भारतीयांच्या संस्काराचा अविभाज्य भाग आहे. प्रत्येक नव्या कामाची सुरूवात शुभमुहूर्तावर केली पाहिजे. तरच ते यशस्वी होतं. अशुभ मुहूर्तावर सुरू झालेल्या कामाची परिणती नेहमी अयशस्वीतेत होते. हा आपल्या संस्काराचा भाग आहे. थोडक्यात ज्योतिष आणि त्यासंबंधीच्या विचारांनी भारतीयांचं सारं जीवनच व्यापलेलं असतं. सर्वसामान्य सुशिक्षित माणसाला ज्योतिष हे शास्त्र आहे याची पक्की खात्री असते. तसं शाळा - कॉलेजातील कोणत्याही पुस्तकात शिकलेलं नसताना सुद्धा ही समजूत मात्र मनात घट्ट रूजलेली असते. ज्योतिषाचं भविष्य चुकलं तरी ती मानवी चूक आहे. त्या ज्योतिषाचा शास्त्राचा अभ्यास अपुरा होता असचं मानलं जातं. अँस्ट्रोलॉजी, ज्योतिर्विद्या म्हणजे ग्रहगोलांचा अभ्यास करण्याचं शास्त्र. हे मानवी जीवनातलं पुरातन शास्त्र आहे. किमान पाच हजार वर्षापासून या शास्त्राची मानवजातीला माहिती आहे. क्लाडेमस्, प्लोटेमस् या ज्योतिर्विदानं 'टेट्रा - बिब्लियस' हा ग्रंथ लिहिला. त्याद्वारा ग्रीस, रोम, युरोप, बॅबीलॉन, इसेरिया या परिसरात हे शास्त्र पसरत गेलं. भारतात 'होराशास्त्र' या गं्रथाच्या माध्यमातून भारत, चीन, नेपाळ, पूर्व एशियात हे शास्त्र पसरत गेलं.माणूस समुद्रात प्रवास करायला लागल्यावर रात्री दिशादर्शनाकरिता सूर्य उपलब्ध नसे. बदलत्या चंद्राच्या आधारावर वा चंद्र दिसत नसताना इतर ग्रहांच्या आधारावर दिशा ठरवता येणं आवश्यक होतं. त्यासाठी ग्रहगोलांच्या अभ्यासाला अधिक महत्त्व प्राप्त झालं. या संगळ्यांसाठी गतीचा अभ्यास आवश्यक असल्यामुळं त्याकाळी प्रत्येक ज्योतिर्विद हा गणितज्ञही असे. याच काळात ग्रहगोलांचा मानवी जीवनावर परिणाम होतो. या विचाराला प्रतिष्ठा प्राप्त झाली आणि जवळपास प्रत्येक ज्योतिर्विद ग्रहगोलांच्या स्थितीवर आधारीत मानवी भविष्य सांगू लागला.

आधी केवळ राजांचं भविष्य सांगितलं जात असे. जसजशी ज्योतिष्यांची संख्या वाढत गेली तसं तसं इतरांचं भविष्य सांगण्याच्या पद्धती विकसित झाल्यात आणि भारतासारख्या देशात त्याला धार्मिक अधिष्ठान लाभल्यामुळं ते संपूर्ण जीवनव्यापी बनलं. ज्योतिर्विद्येत दोन भाग असतात. एक ग्रहगोलांच्या स्थिती गतीचा अभ्यास. या आधारावर महिना, ऋतू, अमावस्या, पौर्णिमा, सूर्यादय, सुर्यास्त, ग्रहण याची माहिती मिळवली जाते. आजच्या काळात याला आपण अँस्ट्रोनॉमी खगोलशास्त्र म्हणतो. आज आपलं खगोलशास्त्र अतिशय अचुक आहे. त्याआधारे आपण पुढच्या पाच लाख वर्षानंतर होणार्‍या पौर्णिमा, अमावस्या, ग्रहण, सुर्यादयाचं अचूक निदान करू शकतो. म्हणूनच माणसाचं दान चंद्रावर जाऊन माणसाला घेऊन परत येऊ शकलं. आता अमेरिकन यान मंगळावर उतरून तेथील सारी माहिती पृथ्वीवर पाठवतं आहे. ज्योतिर्विद्येचा दुसरा भाग - भविष्य कथानाचा. याला आज अँस्ट्रोलॉजी फलज्योतिष असं म्हणतात. अठराव्या शतकापर्यंत या दोन्ही शाखा वा दोन्ही भाग एकच होते. प्रत्येक खगोलशास्त्रज्ञ भविष्य सांगण्याचं काम करत असते. ग्रीक तत्ववेत्ता अरिस्टकर्स ऑफ सॅमॉस याने 2250 वर्षापूर्वी सांगितलं होतं की 'पृथ्वी गोल आहे आणि ती सूर्याच्या भोवती फिरते.' एवढं मोठं सत्य सांगणारा हा गणितज्ज्ञही त्याकाळी भविष्य कथनाचं काम करत असे. पाचव्या शतकात भारतातील आर्यभट्टाने हेच मत (पृथ्वी गोल, सूर्याभोवती फिरते) मांडलं. त्याला गणिताच्या आधारावर हेच मत खरं आहे हे कळत होतं. पण त्या काळातल्या इतर ज्योतिर्विदांनी आर्यभट्टाची खिल्ली उडवली. 'पृथ्वी गोल असती तर दूरवर प्रवास करणारे प्रवाशी घसरून पडले नसते का?' 'पृथ्वी फिरत असती तर सकाळी उडणार्‍या पक्षांना आपलं घरटं - झाड कसं सापडलं असतं' असले तार्किक दृष्टय़ा खरे वाटणारे प्रश्न विचारले. या प्रश्नांची उत्तरं आर्य भट्टाला देता आली नाहीत. ज्योतिषी म्हणून आर्यभट्टाला प्रचंड प्रतिष्ठा होती. तरी त्याचं हे मत मात्र कुणी मान्य केलं नाही. हा आर्यभट्टही त्याकाळी भविष्यकथनाचं काम करत असे.

'सूर्याभोवती फिरताना पृथ्वी स्वत:सोबत साधारणत: 200 मैलांचं वातावरण - गुरूत्वाकर्षणामुळं घेऊन फिरते. त्यामुळं माणसं घसरून पडत नाही. आणि पक्ष्यांना आपली घरटी बरोबर सापडतात' हे कारण त्या काळात आर्यभट्टाला कसं सांगता येणार? त्याला कुठे गुरूत्वाकर्षणाची माहिती होती. सोळाव्या - सतराव्या शतकात दुर्बिणीच्या आधारे अधिक अचूक पृथ्वी - सूर्याचं नातं मांडणारा गॅलिलिओ हाही भविष्य सांगत असे. माणसांचे होरोस्कोप, कुंडली तयार करत असे. त्याकाळी युरोपमधील विद्यापीठांमध्ये गॅलिलिओचं खुप नाव होतं. तो अतिशय मोठा गणितज्ज्ञ, वैज्ञानिक म्हणून नावाजला होता, प्रतिष्ठित झाला होता. डय़ूक फर्डिनांड आजारी पडला. सगळ्यात मोठा ज्योतिषी म्हणून गॅलिलिओकडे त्याची कुंडली अभ्यासासाठी आली. गॅलिलिओकडे त्याची कुंडली अभ्यासासाठी आली. गॅलिलिओनं त्यावेळच्या शास्त्रानुसार कुंडलीचा अभ्यास केला. भविष्य वर्तविलं. डय़ूक फर्डिनांड अजून दीर्घकाळ जगणार आहे. अर्थात डय़ूक फर्डिनांड मोठं प्रस्थ असल्यामुळं गॅलिलिओचं हे भाकित युरोपभर पसरलं. पण 25 दिवसांतच डय़ूक फर्डिनांड वारला. अख्ख्या युरोपमध्ये हा चर्चेचा विषय झाला. सगळ्या विद्यापीठांमध्ये कुंडलीचा अभ्यास केला जात असे. पुन्हा पुन्हा डय़ूक फर्डिनांडच्या कुंडलीचा अभ्यास केला गेला. 'गॅलिलिओचं गणित अचुक होतं, भाकितही अचुक होतं' तरी प्रत्यक्षात डय़ूक वारला. भविष्य चुकलं. असं का घडलं?' म्हणून युरोपभर यावर चर्चा घडून आली. डय़ूक फर्डिनांडची जन्मवेळ चूक असावी, त्याची कुंडलीच अचूक नव्हती म्हणून भविष्य चुकलं. अशी पळवाट युरोपियन विद्यापीठांनी काढली नाही. यातून एका नव्या विचारांचा अंकुर फुटला. ग्रह गोलांचा अभ्यास खरा आहे. पण ग्रहगोलांचा मानवी जीवनावर परिणाम होतो हे मानून आपण भविष्य सांगतो ते खरं नसावं. पुढील काटेकोर अभ्यासातून हा विचार अधिकाधिक पक्का होत गेला. कारण दुर्बिणीच्या शोधानंतर, गॅलिलिओनंतर, ग्रहगोल गतींचा, स्थितींचा (म्हणजे खगोलशास्त्राचा) अभ्यास खुप अचूक होऊ लागला. पण दुसर्‍या बाजूनं भविष्य कथनातल्या चुकाही, फोलपणाही तेवढय़ाच तीव्रतेनं लक्षात येऊ लागला.

अठराव्या शतकाच्या शेवटी अँस्ट्रोलॉजी ज्योतिर्विद्येच्या दोन स्वतंत्र शाखा निर्माण झाल्यात. एक अँस्ट्रोनॉमी खगोलशास्त्र आणि दुसरी उरलेली अँस्ट्रोलॉजी फलज्योतिष. विसाव्या शतकात मात्र खगोलशास्त्रानं फलज्योतिष्याला पूर्णत: नाकारलं. जर एखादा खगोलशास्त्रज्ञ भविष्य सांगत असेल तर त्याला खगोलशास्त्राची फेलोशिप दिली जाणार नाही. म्हणजे त्याला खगोलशास्त्रज्ञ म्हणून मान्यता मिळणार नाही असा नियम रूढ झाला. आज जगताल्या सगळ्या विद्यापीठांमध्ये सायन्सचा एक भाग म्हणून (फिजिक्स, अँस्ट्रोफिजिक्स वा अँस्ट्रोनॉमी, अँस्ट्रोनॉमी शिकवली जाते. पण कोणत्याच विज्ञान - विद्यापीठांमध्ये अँस्ट्रोलॉजी मात्र शिकविली जात नाही. अँस्ट्रोलॉजी, फलज्योतिष्याला विज्ञानाची प्रतिष्ठा नाही. यावर दीर्घकाळ संशोधनं झालीत. त्यात काही तथ्थ्य न आढळल्यामुळं एक निर्थक, टाकावू भाग म्हणून फलज्योतिष्याला टाकून देण्यात आलं आहे.

कोणताही आधार नसताना, तत्थ्य नसतानासुद्धा आज भविष्य कथनाची पद्धती, फलज्योतिष टिकून आहे ते अंधश्रद्धांवर. तुमच्या माझ्यावर झालेल्या लहानपणापासूनच्या अंधश्रद्धाळू संस्कारांमुळं. एकेकाळी माझाही फलज्योतिषावर खुप विश्वास होता. अँस्ट्रोलॉजी इज ए सायन्स, फळज्योतिष हे विज्ञानच आहे. असं मी ठणकावून सांगत असे. माझ्या कॉलेज जीवनात मी अभ्यास केला. इतरांचं भविष्य सांगू लागलो. मी सांगितलेलं भविष्य खुप बरोबर ठरतं असं मला वारंवार अनुभवाला येऊ लागलं. अधिक अभ्यास करावा म्हणून त्या विषयावरची वेगवेगळ्या लेखकांची आणखी चार पुस्तकं आणली. जेव्हा या पाच पुस्तकात अनेक महत्त्वाच्या मुद्यांबाबत वेगवेगळी मतं मांडलेली पाहिली तेव्हा माझ्या मनात शंका निर्माण झाली. मी इंटरसायन्सपर्यंत विज्ञानाचा विद्यार्थी होतो. विज्ञानाचे बेसिक पक्के होते. एवढय़ा मोठय़ा प्रसिद्ध ज्योतिष्यांमध्ये जर एकमत नाही तर हे कसं विज्ञान? असा प्रश्न मनात घर करू लागला. आणि एका प्रसंगानंतर मी भविष्य कथन बंद केलं. पण त्या काळातला तो अनुभव ज्योतिष्यांना पुढे एक्सपोज करण्यासाठी खुप उपयोगी पडला. आज गेल्या 30 वर्षापासून आपण ज्योतिष्यांना 90 टक्के तरी अचुक भविष्य सांगा आणि आमचं 15 लाख रूपयांचं पारितोषिक घेऊन जा अशी जाहीर आव्हानं टाकतो आहे. ज्योतिष महामंडळांना टाकतो आहे पण पुढे कुणीही येत नाही. जे आले त्यांचा दारूण पराभव झाला.कारण फलज्योतिष हे शास्त्र नाही. त्यात काहीही सत्य नाही. तुमचं माझं भविष्य कुणालाच सांगता येत नाही. आपलं भविष्य आधीपासून ठरलेलं नसतं. तरी ज्योतिष्यांचं भविष्य अनेकदा खरं कसं ठरतं? तुमचा ज्योतिष्याचा काहीच अभ्यास नाही ना? तरी तुम्ही सहज ज्योतिषी बनू शकता. कदाचित अभ्यासू ज्योतिष्यापेक्षा तुमचं भविष्य अधिक अचुक ठरू शकेल.

गरोदर बाईचं भविष्य सांगा. तिला मुलगा होईल की मुलगी होईल. झाला तुम्ही ज्योतिषी. समजा तुम्ही हुशारीनं शंभर गरोदर स्त्रियांना सांगितलं 'बाई तुला मुलगाच होईल.' निसर्गाच्या नियमाप्रमाणं बाईला एकतर मुलगा होतो वा मुलगी होते. दोन चान्सेस असल्यामुळं पन्नास टक्के तरी स्त्रियांना मुलगा होण्याची शक्यता आहे. ज्या बाईला मुलगा होतो तिला 100 टक्के मुलगा होतो. ती ज्योतिषी म्हणून तुमची खुप प्रसिद्धी करले. किमान आणखी पाच - दहा स्त्रियांना तुमच्याकडे घेऊन येईल. मुल झालेल्या 50 स्त्रिया, 500 स्त्रियांना तुमचा ग्राहक बनवेल. मुलगी झालेल्या स्त्रिया म्हणतील जाऊ द्या या ज्योतिष्याला कळत नाही. आपण, दुसर्‍या रामशास्त्राकडे जाऊ.. झाला तुमचा भविष्याचा धंदा सुरू..पण ज्योतिषी बनण्यासाठी एक महत्त्वाची योग्यता असावी लागते. दुसर्‍याला फसवण्याची तयारी. फसवण्याची तयारी असल्याशिवाय ज्योतिषी बनू शकत नाही.

(लेखक हे अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक संघटक आहेत.)

दूरध्वनी-9371014832

Friday 24 August 2012

सरकारने नको तेथे नाक खुपसू नये

सरकारने जे करायला हवे ते करीत नसल्यामुळे पुण्यात बॉम्बस्फोट, मुंबईत हिंसाचार व ठिकठिकाणी महिलांवर अत्याचार होतात. जे करायला नको ते केल्यामुळे भ्रष्टाचार माजतो आणि शेतकरी आत्महत्या करायला लागतात. या सत्याची प्रचिती पदोपदी येत असतानाही अजून सरकारला 'तुझे काम तू कर, इतर कामात लुडबुड करू नकोस' असे कोणी खडसावत नाही. स्फोट किंवा हिंसाचाराची घटना घडली की तेवढय़ापुरता निषेध नोंदविला जातो. पुन्हा पहिले पाढे पंचावन्न. सरकारने किमान कामात लक्ष घालावे अशी मर्यादा घालून दिल्याशिवाय सरकारची कार्यक्षमता वाढणार नाही. या कार्यक्षमतेच्या अभावामुळे आज निरपराध लोकांचे जीव टांगणीला लागले आहेत.

कायदा आणि सुव्यवस्था ठेवणे या कामासाठी समाजात सरकार नावाची संस्था जन्माला आली. आज त्याच कामाकडे नेमके दुर्लक्ष होत आहे. जीवित आणि वित्ताचे रक्षण करणे हा धर्म सोडून नसती उठाठेव सरकार करीत आहे. ज्या काळात सरकार नावाची संस्था अस्तित्वात नव्हती त्या काळात, कोणीही यायचा आणि शेतकर्‍यांनी पिकविलेले धान्य लुटून न्यायचा. स्त्रियांवर अत्याचार करायचा. कोणी अडविले तर त्याला जीवानिशी मारून टाकले जायचे. या व्यवहाराला लोक वैतागले. त्यांनी तडजोड केली. म्हणाले, ''तुम्ही वारंवार येऊन असे लुटू नका, किती द्यायचे ते एकदाच सांगा. तेवढे आम्ही देतो. फक्त आमचे एक काम करा, दुसर्‍याने कोणी येऊन आम्हाला लुटू नये, एवढी व्यवस्था करा.'' लुटारू आणि कुणब्यांमध्ये झालेल्या या करारानंतर जी व्यवस्था जन्माला आली ती म्हणजे सरकार. लोकांनी सारा द्यायचा. त्या मोबदल्यात सारा घेणार्‍याने लोकांचे रक्षण करायचे. सुरुवातीला राजेशाही आली, त्यानंतर लोकशाही आली. लोकशाही आली तरी रीत बदलली नाही. फरक एवढाच पडला की त्या काळात लोक धान्याच्या स्वरूपात सारा द्यायचे. त्याला 'मालगुजारी'ही म्हटले जायचे. आता करन्सीच्या रूपात टॅक्स दिला जातो. कोणत्याही देशातील, कोणाही व्यक्तीला

विचारले की, ''बाबा, सरकारचे आद्यकर्तव्य कोणते?'' एकच उत्तर मिळेल, ''जीवित आणि वित्ताचे रक्षण करणे.''

माझा जीव सुरक्षित राहावा. माझ्या मालमत्तेचे रक्षण व्हावे एवढी किमान अपेक्षा सरकारकडून असते. आज नेमके हेच होताना दिसत नाही. आतंकवादी येतात. आमच्या देशात राहतात. कटकारस्थाने रचली जातात. एवढेच नव्हे, तर बॉम्बस्फोट करून हिंसाचार माजवितात. अशा परिस्थितीत लोकांनी कोणाकडे पाहावे? आतंकवादी कारवाया रोखणे सर्वसामान्य माणसाच्या आवाक्याच्या बाहेरचे. तो काय करणार? आमची सरकारकडून एकच अपेक्षा आहे की, त्याने आमच्या जीविताचे संरक्षण करावे. बाकीचे आमचे आम्ही पाहून घेऊ. कुठे कोण्या समाजावर अन्याय झाल्याची हाकाटी केली जाते, कुठे पुतळ्याची विटंबना झाल्याचे ऐकिवात येते, काही अफवा कानावर पडतात. निषेध मोर्चे काढले जातात. मोर्चात उडाणटप्पू लोक सहभागी होतात. हिंसाचार करतात. वाहने जाळून टाकतात, दुकाने लुटतात, पिकांची नासधूस करतात. आमचे ना जीवित सुरक्षित राहिले ना वित्त. मुंबईच्या हिंसाचाराच्या घटनेनंतर एक वरिष्ठ अधिकारी म्हणाला, ''देवाची कृपा होती म्हणून अनर्थ टळला.'' देवाच्या कृपेवरच आमचे जगणे अवलंबून असेल तर तू पगार कशाचा घेतोस? असे त्याला कोणी विचारीत नाही. तुम्ही लोकांडून कर घेता. तुमची जबाबदारी आहे हे कोणी तरी ठणकावून सांगायला हवे.

हे पाप सरकारचेच

देशाचे आर्थिक धोरण चुकले. त्यामुळे दारिद्रय़ वाढत गेले. शहरात झोपडपट्टय़ा वाढल्या. खेडी भकास झाली. मूठभर श्रीमंतांची श्रीमंती वाढत चाललीय आणि गरिबांनी कितीही कष्ट केले तरी त्यांच्या घरावरचे छप्पर त्यांना बदलता येत नाही. नवे रोजगार निर्माण होत नाहीत. लोकसंख्या तर वाढतेच आहे. या परिस्थितीत एक नवा वर्ग तयार झाला. तो कमवता नाही. त्याच्यावर जबाबदारी नाही. त्याला करिअरची काळजी नाही. 'गरीब घरातील अनुत्पादक बदमाश मुले' हा तो नवा वर्ग आहे. ही मुले गर्दीत अनावर होतात. त्यांना कोणाच्या मालमत्तेची कदर नसते. कायद्याची तमा बाळगत नाहीत. करिअरची चिंता नसल्याने ही मुले वाट्टेल ते करायला सरसावतात. हुल्लडबाजी करण्यात त्यांना मजा वाटते. गांधी, जयप्रकाशच काय अलीकडच्या शेतकरी आंदोलनातदेखील कमवती, कुटुंबाची जबाबदारी सांभाळणारी उत्पादक माणसे मोठय़ा प्रमाणात यायची. हे लोक जबाबदारीने वागायचे. त्यामुळे त्यांच्या आंदोलनाला गालबोट लागत नसे. अलीकडच्या अण्णा हजारे आणि रामदेव बाबांच्या आंदोलनातही करिअरची काळजी करणार्‍या वर्गातील मुले जास्त होती म्हणून ती हुंदळली नाहीत. 'गरीब बदमाश अनुत्पादक मुलां'चा सर्वात जास्त वापर जातीयवादी आणि धार्मिक संघटनांमार्फत केला जातो.

रामजन्मभूमी-बाबरी मशीद वादाच्या वेळेस ही मुले मोठय़ा प्रमाणात हिंदू संघटनांच्या सोबत दिसली. कोठे पुतळ्याची विटंबना झाली म्हणून निषेध मोर्चे निघाले, रेल्वे जाळण्यात आली. त्याही वेळेस याच वर्गातील मुले आघाडीवर होती. मुसलमान संघटनांच्या निषेध मोर्चातही याच प्रकारच्या मुलांनी उच्छाद मांडला. ही मुले जातीय आणि धार्मिक संघटनांच्या कार्यक्रमात सहजपणे सामावली जातात. कारण जातीय आणि धार्मिक व्यासपीठावरून त्यांच्या भावना चेतवणारी भाषणे होतात. शहाणीसुरती माणसे याच मुलांचा वापर करून उपद्रव घडवून आणतात. अनेकदा या मुलांचा हुडदंग आंदोलक नेत्यांच्या अंगलट येतो. हीच मुले राजकीय पक्षाचे लोकही वापरताना दिसतात. या 'गरीब बदमाश अनुत्पादक मुलां'ना आवरायचे कसे? हा प्रश्न आहे. याची सर्वाना चिंता आहे. या 'गरीब बदमाश मुलांचा अनुत्पादक वर्ग' निर्माण का होतो? वाढतो का? या गोष्टीचा विचार केल्यास असे लक्षात येईल की हे पापदेखील सरकारचेच आहे. ज्या प्रमाणात दारिद्रय़ वाढेल त्या प्रमाणात हा वर्ग वाढत जातो. गरीब समुदायांमध्येच तो आढळतो. उच्चभ्रू समाजात असा वर्ग तयार होत नाही. आपण आपले भविष्य घडवू शकतो असे ज्या समाजात वातावरण असते त्या समाजातील तरुण मुले मोठय़ा संख्येने आपले भविष्य घडविण्याच्या मागे लागतात. जेथे ती शक्यता दिसत नाही तेथे 'गरीब बदमाशां'चे थवे तयार होतात. सरकारने वातावरण बिघडविले असल्यामुळे या मुलांचे पालकत्व अंतिमत: सरकारकडेच जाते. नको असलेल्या कामात सरकारने लुडबुड केल्याचे हे दुष्परिणाम आहेत. एखादा दुसरा माणूस गुन्हेगार किंवा दुष्प्रवृत्तीचा निर्माण झाला तर आपण समजू शकतो. तो त्या गुन्हेगाराचा दोष आहे असे आपण म्हणू; परंतु जर थवेच्या थवे तसे तयार होत असतील तर तो दोष समाजव्यवस्थेचा मानायला पाहिजे. अलीकडच्या काळातील 'गरीब बदमाश अनुत्पादक मुलांचा' उच्छाद ही एक सामाजिक समस्या बनली आहे. गुन्हेगारविरहित समाज तयार होईल, अशा भ्रमात कोणी राहू नये. दुष्प्रवृत्तीचे लोक पूर्वीही होते. पुढेही राहतील. अशा गुन्हेगारांपासून उत्पादक, जबाबदार लोकांना संरक्षण मिळावे यासाठीच तर सरकार हवे आहे. सरकार उत्पादक व जबाबदार नागरिकांच्या बाबतीत बेफिकीर झाले आहे व ही उनाड मुले निवडणुकीत वापरता येतात म्हणून त्यांच्याबद्दल उदार झाले आहे ही चिंतेची बाब आहे.

(लेखक हे नामवंत विचारवंत व सामाजिक कार्यकर्ते आहेत)

भ्रमणध्वनी- 9422931986



     

Thursday 23 August 2012

सत्ता व विरोधी पक्षांचा 'राजकीय भाद्रपद


महागाईची जेव्हा ओरड होते तेव्हा हमखासपणे स्व. मृणालताई गोरेंच्या 'लाटणे' मोर्चांची आठवण होते. त्यासोबतच मनोजकुमारच्या 'रोटी, कपडा और मकान' सिनेमातील 'हाय मेहेंगाई, मेहेंगाई, मेहेंगाई. तु कहाँ से आई, तुझे क्यो लाज ना आई' या गाण्याचेही हटकन स्मरण होते. अर्थात सिनेमातील मनोजकुमारला, हिरोईनला, त्यांच्यासोबत नाचणार्‍या स्त्री-पुरुष समूहाला, ते गाणे चित्रित करणार्‍या दिग्दर्शकाला व निर्मात्याला महागाईची चिंता असतेच असे नाही. त्यांना चिंता असलीच तर सिनेमा 'बॉक्स ऑफिस'वर हिट होण्याची व 'गल्ला' भरण्याची. गल्ल्यावर नजर ठेवूनच त्यांची 'महागाई' सिनेमात नाचत वा ठुमकत असते. राजकीय पक्षांचीही गोष्ट काही यापेक्षा वेगळी नसते. तेही या प्रश्नावर समूहाने नाचगाणे करतात. 'हाय मेहेंगाई, हाय मेहेंगाई' करीत ऊर बडवेगिरी करतात तेव्हा त्यांची नजरही 'मतांच्या गल्ल्यावर' असते. त्यावर डल्ला मारता यावा आणि निवडणुकीत 'बॅलेट बॉक्स' हिट जावा. यावर नजर ठेवूनच हे सर्व केले जाते. यावर मतभेद असण्याचे कारण नाही.

विरोधी पक्षांचा 'महागाई'वर राजकीय सिनेमा सुरू असताना, सत्ताधारी पक्षाचे पी. चिदंबरम 'कसली आली आहे महागाई, अन्नधान्याचे भाव रुपया-दोन रुपयांनी वाढले तर आरडाओरड होतो. पण याच वर्गाला आईस्क्रीमसाठी जादा पैसे देताना काही वाटत नाही,' असे विधान करतो तेव्हा पुन्हा सत्ताधारी व विरोधी पक्षाचा राजकीय धांगडधिंगा जोरात सुरू होतो. नुकतेच केंद्रीय पोलादमंत्री बेनीप्रसाद वर्मा यांनी 'वाढती महागाई शेतकर्‍यांसाठी फायद्याची आहे' असे म्हटले आणि विरोधी पक्ष त्यावर तुटून पडले. विरोधी पक्ष जेव्हा 'महागाई'वर रान उठवते तेव्हा त्यांना जसे सर्वसामान्यांशी सोयरसुतक असत नाही तसेच 'वाढती महागाई शेतकर्‍यांच्याच हिताची' म्हणणार्‍या बेनीप्रसाद वर्मांनाही शेतकर्‍यांशी काही सोयरसुतक असते अशातला भाग नाही. दोघांचीही नजर असते ती केवळ बॅलेट बॉक्सवर म्हणजे अर्थात मतपेटीवर. शेतकर्‍यांची दुरवस्था, शेतकर्‍यांचा कर्जबाजारीपणा, शेतकर्‍यांच्या वाढत्या आत्महत्या व त्यामुळे शेतकर्‍यांच्या 'शवपेटीला असलेली वाढती मागणी याच्याशी मात्र 'महागाई'विरोधात ओरडणारे किंवा महागाईचे समर्थन करणारे यांचा अर्थाअर्थी संबंध असत नाही.

अर्थात 'महागाई, महागाई' म्हणत असताना ती केवळ शेती उत्पादनाशी निगडित असते हेही तेवढेच खरे. कांद्याचे भाव वाढले तर सार्‍या देशाच्या डोळ्य़ात पाणी येते. गरिबांच्या कांदाभाकरीतील कांदाही आता गायब झाला म्हणून ढाळण्यात येणारे नक्राश्रू. दुधाचे भाव वाढताच आता गोरगरिबांच्या मुलांचे घोटभर दूधसुद्धा हिरावले जाणार. अन्नधान्याचे भाव वाढताच आता गरिबाने खावे काय? त्याने काय उपाशीच मरावे? असा गरिबांच्या नावाने आरडाओरडा करणारे भरल्या पोटाचे असतात. पोटभर दूध पिणारेच गरिबांच्या 'घोट'भर दुधाचा कांगावा करतात. गरिबाच्या नावाने कांगावा करायचा व श्रीमंतांनीसुद्धा अन्नधान्य शक्यतो फुकटात किंवा नाईलाज म्हणून का होईना स्वस्तात अन्नधान्य कायमस्वरूपी मिळत राहावे म्हणून सुरू ठेवलेला 'कावा' आहे हेही समजून घेणे गरजेचे आहे. अन्नधान्याचे भाव वाढले तर गरिबांचे कसे होणार? ग्राहकांचे कसे होणार? हा प्रश्न केवळ अन्नधान्याच्या किंवा शेती उत्पादनाच्या बाबतीतच का येतो? औषधांचे भाव वाढले तर गरिबांचं कसं होणार? शिक्षणाचा खर्च वाढला तर गरिबांचं कसं होणार? आरोग्याचा खर्च वाढला तर गरिबांनी जावे कोठे? सिमेंटचे भाव वाढले तर गरिबांनी घरे बांधावी कशी? रासायनिक खते, बी-बियाणे, रासायनिक औषधे, शेतीला लागणारे मजूर यांचे भाव वाढले तर शेतकर्‍यांनी जगावे कसे? असले प्रश्न 'महागाई' कक्षेत मात्र येत नाहीत.

ग्राहकांचे कसे होणार? याची दहशत निर्माण करून शेतीमालाचे भाव एकतर पाडले जातात किंवा स्थिर ठेवले जातात. शेती व शेतकर्‍यांना लागणार्‍या सर्व वस्तू महाग, पण महाग वस्तू घेऊन उत्पादित केलेला शेतमाल मात्र स्वस्त. शेतकरी जगणार कसा? बरं महागाईमुळे ग्राहकांचं कसं होणार असं म्हणत ग्राहकांना परवडतील, गरिबांना परवडतील अशाच शेतीमालाच्या किमती स्थिर वा स्वस्त ठेवण्याच्या धोरणाला शेतकरीही ग्राहक असतो व गरीब ग्राहक असतो याचा विसर का पडतो? गरिबांना, ग्राहकांना अन्नधान्य स्वस्त मिळाले पाहिजे. दूध, भाजीपाला, फळफळावळे स्वस्त मिळाले पाहिजे. हे मान्य केले तर ग्राहक म्हणून शेतकर्‍यांना स्वत:साठी व शेती उत्पादनासाठी लागणार्‍या वस्तूही मग स्वस्त मिळायला पाहिजे असे अन्नधान्याचे भाव वाढताच 'बोंब' मारणार्‍यांनी का म्हणू नये? शेतकरी डॉक्टरकडे गेला तर डॉक्टरने शेतकर्‍यांकडून कमी पैसे घ्यावे. मुलाच्या शिक्षणासाठी कोण्या कॉलेजमध्ये गेला तर मुलाकडून कमी फी घ्यावी. कापड दुकानात किंवा अन्य दुकानात गेला तर त्याला इतरांपेक्षा कमी किमतीत वस्तू मिळाव्यात. कारण त्याच्या शेतीमालाला 'ग्राहकांचे कसे होणार?' या कारणाने कमी किमती दिल्या जातात असं कोणी 'मायचा लाल' का म्हणत नाही? त्याचा शेतीमाल गरीब ग्राहक म्हणून कमी किमतीत घेताना शेतकर्‍यांनासुद्धा गरीब ग्राहक म्हणून इतरत्र उत्पादित होणार्‍या वस्तू मग स्वस्त का दिल्या जात नाही?

केंद्रीय पोलादमंत्री बेनीप्रसाद वर्मांनी 'वाढती महागाई शेतकर्‍यांसाठी फायद्याची आहे,' असे म्हणताच या महागाईचा फायदा शेतकर्‍यांना कोठे होतो? फायदा अखेर मध्यस्थ, दलालच घेतात? अशी हाकबोंब झाली. मध्यस्थ आणि दलालांचा फायदा झाला नसता आणि शेतीमालाच्या वाढत्या किमतीचा फायदा जर शेतकर्‍यांना झाला असता तर मात्र आनंदाने ती 'महागाई' सहन केली असती. असा शेतकरी कळवळ्य़ाचा भावसुद्धा आणल्या जातो. जेव्हा शेतीमालाच्या किमती वाढतात (फायदा कोणालाही होवो) तेव्हाच महागाईच्या नावाने 'कावकाव' सुरू होते. कांदा तेव्हा डोळ्य़ात पाणी आणतो. साखर महाग होताच 'साखर झाली कडू'चे मथळे झळकतात. आंबा महाग होताच 'आंबा झाला आंबट' म्हणून तोंड वाकडे करणारी ही सर्व मंडळी. शेतीमालाचे भाव जेव्हा दणक्यात पडतात तेव्हा आता शेतकर्‍यांचं कसं होणार? असा प्रश्न बोंब ठोकत तर सोडाच, पण या प्रश्नावर हूं का चू करीत नाही? अस का? शेतीमालाच्या वाढत्या महागाईचा फायदा मध्यस्थ आणि दलालच करून घेतात. शेतकर्‍यांना त्याचा फायदा नाही असे म्हणत महागाईचा विरोध करणारे शेतीमालाचे भाव जेव्हा पडतात तेव्हा मात्र तोंडात 'बोळा' घालून का गप्प असतात? कांद्याने आणले डोळ्यात पाणी म्हणणारे, कांद्याचे भाव पडले तेव्हा शेतकर्‍यांच्या डोळ्य़ात आता पाणी आले असेल म्हणून त्याचे 'अश्रू' पुसायला का धावत नाही? तेव्हा शेतकर्‍यांचे अश्रू पाहायला प्रसारमाध्यमांना सवड नसते. एरवी कांद्याचे भाव वाढले म्हणून माय मेल्यासारखा टीव्हीवर रडणारा जसपाल भट्टी कांद्याचे भाव पडल्यावर कोण्या मसनात जाऊन मरतो? कांद्याचे भाव वाढताच व्यंगचित्र काढणार्‍या लक्ष्मणचा कुंचला जसा सरसावतो तसा तो शेतीमालाचे भाव पडले म्हणून का सरसावत नाही? शेतीमालाचे भाव पडले तर 'मागणी-पुरवठय़ाचा' सिद्धांत सांगणारे 'अर्थतज्ज्ञ' शेतीमालाचे भाव वाढताच मागणी-पुरवठय़ाच्या सिद्धांताची पुंगळी करून कोठे घालतात?

शेतीमालाचे भाव वाढताच 'महागाई'ची ओरड होते हे खरे आहे. केंद्रीय पोलादमंत्री म्हणतात तसा त्याचा शेतकर्‍यांना फायदा होतो अथवा नाही हा वादाचा विषय असला तरीही शेतीमालाचे भाव जेव्हा पडतात, पाडल्या जातात तेव्हा सर्वच एकत्रितपणे 'मौन' पाळतात. तेव्हा शेतकर्‍यांचं आता कसं होणार? ग्राहक म्हणून तो कसा तगेल, जगेल? याची चिंता कोणी करीत नाही. त्यांनी तरी किमान वाढत्या महागाईचा फायदा शेतकर्‍यांना न होता तो केवळ मध्यस्थ आणि दलालांनाच होतो त्याचीही चिंता करू नये.

गरिबांच्या नावावर शेतीमध्ये निघणारे उत्पादन स्वस्तामध्ये खाण्यासाठी आता सर्वच सोकावले आहेत. यावर एक उपाय होऊ शकतो. गरिबीरेषा जशी निश्चित केली जाते तशीच 'श्रीमंतीरेषा'सुद्धा निश्चित केली जावी. ती कशी करावी याचा विचार विद्वानांनी करावा. एकतर गरिबीरेषेच्या जे वर आहेत त्यांना 'श्रीमंत' म्हणावे किंवा श्रीमंतरेषा निश्चित केल्यानंतर त्याच्या खाली जे असतील त्यांना गरीब म्हणावे. हे जर झाले तर गरिबांना वाटल्यास सर्वच अन्नधान्य मोफत द्यावे. पण गरिबीरेषेच्या जे वर आहेत त्या 'श्रीमंतां'कडून शेतीमालाचा उत्पादनखर्च भरून निघेल व शेतकर्‍यांना नफा मिळेल अशा शेती उत्पादनाच्या किमती 'श्रीमंतांकडून वसूल कराव्या म्हणजे तरी निदान या श्रीमंतांना गरिबांची ढाल करून शेतीमालाच्या किमती पाडणे सोपे होणार नाही. गरिबांच्या नावेच 'गब्बर' माणसं अन्नधान्याच्या वाढत्या किमतीचा बोभाटा करतात व बिगर शेतीतील गरिबांना शेतीवर जगणार्‍या गरिबांशी झुंझवत ठेवतात. किमान हे तरी थांबेल.

मनोजकुमार 'क्रांती' सिनेमा काढतो म्हणून त्याला क्रांती करायची आहे असं आपण समजत नाही. त्याने 'रोटी, कपडा और मकान' या सिनेमात उरफाटेस्तोवर 'हाय मेहेंगाई, हाय मेहेंगाई' म्हटलं म्हणून त्याला गरिबांचे कंबरडे महागाईने मोडेल याची चिंता आहे असं आपण म्हणत नाही. तसंच विरोधी पक्षाची महागाईची ओरड, त्यावर केंद्रीय पोलादमंर्त्यांचे वक्तव्य यांनाही गांभीर्याने घेण्याची गरज नाही. भाद्रपदातील कुर्त्यांच्या कोकाटण्याला, एकमेकांना चावण्या-भुंकण्याला, पस्परांवर चढण्या-पाडण्याला जसे आपण गांभीर्याने घेत नाही. तसेच विरोधी पक्षाचा महागाई विरोध व सत्ताधार्‍यांचे महागाई फायद्याचीच, असली विधाने सत्ता व विरोधी पक्षांचा 'राजकीय भाद्रपद' म्हणून दुर्लक्षित करणेच श्रेयस्कर नव्हे काय?

(लेखक शेतकरी आंदोलक आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत.)

भ्रमणध्वनी - 9822587842

शब्दांचीच रत्ने


प्रिय वाचकहो, ज्याप्रमाणे वाचक हे प्रिय असतात (नाईलाजाने का होईना! बरेचदा तर हेच प्रिय वाचक तुमच्यासमोर तुमच्या लेखनाची तारीफ न करता दुसर्‍याची करतात). त्याचप्रमाणे लेखक हा तरुण असला तर तो ताज्या दमाचा असतो आणि कवी हा विद्रोही असतो (मुळात तो कवी असतो. त्यामुळे त्याला बाकी काही विशेषणं लावण्याची गरज पडत नाही आणि शहाणे ती गरज न पाडून घेता सुखात राहतात.) विचार हा नेहमी मांडला वा दिला जातो. (हे विचार घेऊन मी एकदा दुकानदाराला छटाकभर तेल मागितलं, भाजीवाल्याला भाजी मागितली पण नाही, कोणी काहीच द्यायला तयार नाही. पानठेलेवाला म्हणाला गजूभाऊ, तुम्ही शिग्रेट माझ्याकडून प्या, पण विचार मात्र तुमच्याजवळच ठेवा.) पुरोगामी महाराष्ट्रात केवढा हा विचारांचा अनादर? तोच, तोच पुरोगामी महाराष्ट्र ज्याच्या मुख्यमंर्त्याच्या घरी सत्य साईबाबा दोन दिवस राहतात, बरोब्बर! तोच महाराष्ट्र जिथे 'विचार' देणारे साहित्यिक अध्यक्षपदाची निवडणूक 'लढवतात', जात, साहित्याचा दर्जा यावरून एकमेकांचे कपडे फाडतात अर्थात हे फाडणेही विचारातूनच) याच महाराष्ट्रात न्याय हा सामाजिक असतो. (म्हणजे ज्या समाजाची, (जातीची) शाळा त्याच समाजाच्या शिक्षकांना त्या शाळेत नोकरी मिळणार व त्याच समाजाचे विद्यार्थी त्या शाळेत प्रवेश घेणार) दृष्टिकोन आधुनिक असतो. (पाय खड्डय़ात असला तरी हातात मोबाईल असला पाहिजे). लढाई तत्त्वांची असते. (सुज्ञ वाचकांना हे तत्त्व कुठे मिळाले, दिसले तर प्रस्तुत लेखकालाही दाखवावेत) अस्मिता ही राष्ट्राची असते. (अमेरिकेमागे फरफटत जाते तीच ती अस्मिता काहो?) विजय हा नैतिकतेचा असतो. (हर्षद मेहता, अब्दुल करीम तेलगी झिंदाबाद) दाद जनतेच्या न्यायालयात मागायची असते. (मधू कोडा ऐकताय ना?) कार्यक्रम संपन्न होतो. (आयोजन कितीही विपन्न असले तरी) फलश्रुती ही संमेलनाची असते. (ज्यात सहभागी असणार्‍यांना चांगले मानधन रूपी 'फल' मिळते तेच हे संमेलन) संचालन बहारदार असते. (काय झोप लागली होती आ हा हा हा) गाणं सुरेल असतं. (अगदी हिमेश रेशमियाचंही? मग अन्नू मलिकचं काय?) स्वभाव मनमिळाऊ असतो, मंत्रिमहोदय किंवा आमदार महोदयाच्या पत्नी 'सुविद्य' असतात, गृहिणी ही कुशल असते, तरुणी ही चवळीच्या शेंगेसारखी कवळी असते. (म्हणजे कॅटरिना कैफ का हो?) गाल लाजून आरक्त होतात. (वर्ण सदाशिव अमरापूरकरसारखा असल्यास डार्क कथीया रंगाचे होतात का?) व्यक्तिमत्त्व हे रुबाबदार असते, बांधा शेलाटा असतो, कंबर ही लवलवती असते, तंत्रज्ञान हे आधुनिक असते, संताप हा सात्त्विक असतो (तुम्हा-आम्हाला येतो तो. दुसरा येऊनही आपली काही बोंब पडू शकत नाही) मान्यता ही तात्त्विक असते, भ्रष्टाचार हा समूळ उखडून काढायचा असतो. (आतंकवाद्यांना सन्मानपूर्वक विमानात बसवून सोडून दिल्यानंतर! असा कुजलेला विचार काही लोकांच्या मनात आला असेल.) पंतप्रधानांचा विदेश दौरा यशस्वी होतो. परिणाम हे दूरगामी असतात, नेता हा द्रष्टा असतो (म्हणजे कसा बघा, खूप कांदा झाला की कांदा निर्यातीवर बंदी आणायची म्हणजे शेतकरी मेले अन् कांद्याचं पीक कमी झालं की ग्राहक मरेपर्यंत निर्यात चालू ठेवायची) खोटं हे धादांत असतं तर खरं हे देवाशपथ बोलायचं असतं. उपाययोजना या तातडीच्या असतात. (26/11 हल्ल्याला 1 वर्ष पूर्ण झाल्यानंतर मग 'फोर्स वन'ची उभारणी करणे वगैरे) चौकशी ही रीतसर असते. तर गाशा हा गुंडाळण्यासाठी असतो. सूत्र हे सरकारी असतात अन् माहिती ही आतल्या गोटातली असते, लढत ही चित्तथरारक असते रपव ङरीं र्लीीं पेीं ींहश श्रशरीं, रकोणी मोठा कलावंत, नेता, विचारवंत, शास्त्रज्ञ, समाजसेवक गेला की निर्माण होत असते ती पोकळी!

(लेखक नामवंत व्यंगचित्रकार व कॅलिग्राफर आहेत. 'गंमतजंमत' हा त्यांचा लोकप्रिय एकपात्री कार्यक्रम आहे.)

भ्रमणध्वनी - 9823087650

वा! मर्दानो.. वारे वा!


जात-पात-धर्माच्या आधारावर कुणावर अन्याय, अत्याचार होत असेल तर त्याचा निषेधच करायला हवा! ज्याच्यात माणुसकी जिवंत आहे त्या प्रत्येकाच्या मनात अशा घटनांबद्दल चीड निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही.

पण म्यानमारमध्ये घडलेल्या घटनांचा मुंबईतल्या लोकांशी काय संबंध? आसाममध्ये घडणार्‍या हिंसाचाराचा निषेधच करायचा असेल तर शांततेच्या मार्गानेच व्हायला हवा? त्यासाठी निरपराध लोकांना 'टार्गेट' करण्याचे काय कारण? मुंबईमधल्या पोलिसांच्या गाडय़ा जाळण्याचे कारण काय? टीव्ही चॅनेलवाल्यांच्या गाडय़ा पेटविणारे कोण होते? पोलिसांवर हल्ला करण्यापर्यंत ज्यांची हिंमत झाली ते लोक कोण होते? महिला पोलिसांचा विनयभंग करणारे हात कुणाचे होते? आणि विशेष म्हणजे टीव्ही कॅ मेर्‍यामध्ये स्पष्ट चेहरे दिसत असताना, वृत्तपत्रांत छापून आले असताना त्यांच्यावर सरकार कारवाई का करीत नाही?

शेतकरी हा गुंडगिरी करीत नाही. शेतकरी लाचारच आहे. स्वत:च्या हक्कासाठी सरकारकडे जातानाही अगदी भिकार्‍यासारखीच त्याची अवस्था असते. कधी कधी भिकारीसुद्धा भीक न देणार्‍याकडे तुच्छतेने पाहतात. पण शेतकरी तेही करू शकत नाही. 'जय जवान जय किसान' असा नारा लालबहादूर शास्त्री यांनी दिला होता. त्या शेतकर्‍यांची या भारतात काय अवस्था आहे?

जहाँ न जाने किसान कितने

हर दिन भुखे सोते है

भुखे पेट हाथों में हल और

नैन में आसू होते है

यही वह पावन धरती जहाँपर

भुखा भुखसे मरा है..

पर इसकी ना कदर जिसे

वह भारत देश हमारा है।

असा हा शेतकरी स्वत:चे हक्क मागायला जातो तेव्हा त्याच्यावर गोळ्य़ा चालविल्या जातात. सरकारही मर्दपणा दाखविते. गृहमंत्रीही गोळीबार करण्याचे आदेश देऊन मोकळे होतात. पोलिसांनाही आपल्या बंदुकांचा उपयोग करण्यासाठी निमित्त मिळाल्याचे समाधान होते. तेही वरील आदेशाची वाट न पाहता बंदुका चालवितात. नंतर सरकारही अधिकार्‍यांना पाठीशी घालतात.

मग हेच मर्द सरकार यावेळी गप्प का? मुंबईमध्ये सरळसरळ महिला पोलिसांचा विनयभंग होत असताना यांच्या गोळ्य़ा कुणाकडे गहाण पडल्या होत्या? एवढी जाळपोळ होत असताना पोलीस काय करीत होते? मुख्यमंत्री झोपले होते काय? गृहमंर्त्याला कसली गुंगी चढली होती?

आसाम जळत असतानाही आमच्या देशाचे महामर्द पंतप्रधान किती शांत आहेत? परम पूजनीय सोनिया गांधी कशाच्या चौकशा करायचे आदेश देत आहेत पोलिसांना?

आपले मुख्यमंत्रीही कुणाला पाठीशी घालत आहेत मुंबईच्या बाबतीत?

आहे कशी म्हणावी देशात लोकशाही

खुर्चीमध्ये खुन्यांचे बसले छुपे शिपाई

निष्पाप माणसांना हे घालतात गोळ्य़ा

अन् गुंडापुढे सलामी देतात राजशाही!

काय होईल देशाचं, माहीत नाही. अतिरेकी मोकाट. गुंड मोकाट. दंगेखोर मोकाट. सामान्य माणसावर मात्र यांची दादागिरी. सारे कायदे निरपराध लोकांसाठी. तुमचा जात-पात-धर्म पाहून यांच्या बंदुका चालणार!

मागे इंदिरा गांधींच्या काळात आसाम असाच पेटला होता. पंजाबही हातातून गेला असेच वाटत होते. पण इंदिराजींनी मर्दपणा दाखविला. आसामही वाचला. पंजाबही वाचला. बांगलादेशाचीही निर्मिती इंदिरा गांधी यांनी केली. पण आजच्या नेत्यांना स्वार्थाशिवाय काहीच दिसत नाही.

माकडांच्या हाती, कोलीत दिधले

माकड बैसले, गादीवर!

आता धोक्यामध्ये आला गाव सारा

एकही देव्हारा, मुक्त नाही!

एक एक घर, वाढताहे आग

फौज मागोमाग, माकडांची?

वस्तीमध्ये मर्द, असल्यास कोणी

मशाल घेऊनी पुढे यावे!

आता जनतेनंच देशाच्या भवितव्याचा विचार करावा. असल्या दंगेखोरांच्या समोर निर्लज्जपणे लोटांगण घालणार्‍या मंर्त्यांचे खरेतर सत्कारच करायला हवेत! मानवाधिकारवाले महापुरुषही मर्दपणे कुठल्या बिळात घुसून धसले आहेत याचाही शोध घ्यायला हवा! मुंबईतील दंगल ही यांच्या दृष्टीने 'मानवते'च्या पराक्रमाची गाथा आहे की काय?

असल्या ढोंगी लोकांना नको एवढा भाव देणार्‍या मीडियानेही आता त्यांना विचारायला नको का? यांच्या शेपटय़ा धरून त्यांना बाहेर आणायला नको का?

पण विचारून तरी काय फायदा?

सरळ सरळ मीडियात फोटो दिसत आहेत. उघड उघड गुंडगिरी सुरू आहे. संपूर्ण जनमानसात संतापाची लाट असताना आमचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री कुणाच्या शेतात काय उपटत बसले आहेत माहीत नाही!

वा! महापुरुषांनो..! खरंच कमाल आहे तुमची!

मंत्रालय दिवसाढवळ्य़ा धोधो जळालं-

तुम्ही अजूनही काय निवडत आहात माहीत नाही?

आदर्श घोटाळ्य़ातल्या फाईल्स गायब झाल्यात- सहजपणे एखाद्याचं पाकीट मारावं तशी महत्त्वाची कागदपत्रं मंत्रालयातून मारलीत-

तरी तुमच्यावर परिणाम नाही.

फाईल्स मारू द्या.. कागदपत्रं मारू द्या.. काय वाट्टेल ते मारू द्या.. पण..

तुमच्या तोंडातून हूं की चूं निघणार नाही?

वा! केवढी तुमची सहनशीलता!

वा! मर्दांनो.. वारे वा!

(लेखक हे नामवंत कवी, चित्रपटनिर्माते आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत. ' सखे-साजणी' हा त्यांचा कार्यक्रम अतिशय लोकप्रिय आहे.)

भ्रमणध्वनी - 9822278988

Tuesday 21 August 2012

आर्केस्ट्रा..!

मी जवा भाग्योदय कला मंडयाच्या शिवरंजन आर्केस्ट्रात जाले लागलो ते गोठ 1967-68 सालची. हे मी याच्यासाठी सांगून राह्यलो का तवा यवतमाय इतकं मोठं नव्हतं हे एक, आन् त्यावक्ती यवतमायसारख्या लहान शयरात आर्केस्ट्रा? लोकायले हे पटतचं नव्हतं का आपल्या गावातले पोरं असं काई करू शकतीन. तवा आर्केस्ट्रा म्हनलं का मुंबईचा दांडेकर आर्केस्ट्रा, म्हात्रेचा आर्केस्ट्रा यायचंच नाव चाले. लोकायचं शंभर टक्के चुकत होतं असयी नाई. या आर्केस्ट्राच्या आफिसात मी यातला गायक महेश शिरे याच्या आग्रवान पह्यल्यांदा आलो तं यायची तालीम सुरू होती. एक पेटी, तबला, ढोलकी, झांज अन् नईन वाद्य म्हंजे बोंगो. दोन पायात पकडून वाजवाचा बस. हो इसरलो होतो व्हायलिन, बासरी आन् गिटार आता झालं. कोंगो नाई, अँकारडियन नाई, कार्यकरमाच्या वक्ती आमचे जे अध्यक्ष गजापुरे त्यायनं एक लोखंडाचा पेटी बसनं आन् उभं राहून वाजोता इन असा स्टॅंड बनवून आनला होता. त्याच्यावर पेटी ठेवून सुधाकर कदम ते वाजवे.

त्यावक्ती गनपतीत, दुर्गादेवीत कार्यकरमचं राहत म्हून मोठे जे मंडय असत त्यायच्या गनपतीच्या मूर्तीच्या बाजूले स्टेज तयारचं राहे, पन आमी फुकट कार्यकरम करतो म्हनल्या वरयी कोनी स्टेज द्याले तयार नोते. आखरीले गांधी चौकातल्या मंडयान होकार देल्ला. तेयी ओखयीच्यानं स्टेज देल्ला हेचं तं लय झालं. मले अजूनयी ते आठोलं का हासू येते का आमी सारे कलाकार भजनवाल्यासारके खाली गोलाकार बसून आन् डफये तवा बोंगो वाजवे त्यायच्यासाठी आमीचं फोल्डिंगची खुर्ची मांगून आनली होती तिच्यावर बसून पायात बोंगो घेऊन ते वाजवे. पन जसी यवतमायच्या लोकायले खातरी पटाले लागली तसे कार्यकरम भेटाले लागले. या शयराचा सभाव असा हाय पह्यले पारखते मंग पाठीवर शाबासकीची थाप देते आन् आखरीले कायजात बसवते. आपल्या मानसाची कदर करून त्याच्यावर जीव लावनं दुसर्‍या शयरानं आमच्या यवतमायकून सिकाव.

आमच्या मंडयात मानधन परकार नोता. सारे छंद म्हून येत होते. तवा कार्यकरमाचे पयसे असे भेटे किती म्हनानं? दोन-तीन वर्साच्या कमाईतून मुंबईवून सेकंड हॅंड अँकर्राडयन आन् कोंगो आनल्या गेला. अँकारडियनच्यानं आर्केस्ट्राची जरा शान वाढली. सुधाकर कदम आपल्या मनानचं ते वाजवन सिकला. थोडं थोडं नाव व्हाले लागल्यावर्त कार्यकरम वाढाले लागले आन् नावयी. आमचे अध्यक्ष गजापुरे कलेक्टर आफिसात होते आन् आमच्या परीस वयानं मोठे होते. पन असं काई पोरायनं आपल्या यवतमायच्या पोरायनं करावं यासाठी त्यायची सारी धडपड होती. त्यासाठी त्यायनं जयहिंद चौकापासी असलेल्या गुप्तेच्या मकानात खोली भाडय़ानं घेऊन घरची मोठी सतरंजी आनून तिथं आथरली आन् आमाले बसवलं. त्यायले तबला वाजवता येत होता, पन स्टेजवर्त ते कवा बसले नाई. त्यायले पुढं पुढं कराची आदत नोती, पन आपण मांग राहून सारं सांभाळून आमो पुढं कराचा त्यायचा सभाव होता. आमी सारे जवान पोरं, पन त्यायचा आमच्यावर कन्ट्रोल होता. तवा नईन गानं बसवाचं असलं म्हंजे गायक आन् वादकाची कसी सरकस होये हे आताच्या नईन पिढीतल्या जवान पोरापोरील समजनारचं नाई. एकतं तवा सेनीमाच गान आयकाचं म्हंजे एच.एम.व्ही. कंपनीचा गान्याचा जो तावा राहे तो रेकाड प्लेअरवर लावून आयकने. पन तसी सोय नसल्याच्यानं तो उपाव बाद. हे आयकाची सोय याच्यासाठी पाह्यजे होती का गान्याच्या पहल्या दोन ओयी आन् कडव्याच्या मंधात जे संगीत राहे ते बसवासाठी. त्यासाठी मग सुधाकर आन् हे गायक मंडयी विविध भारतीवर फरमाईसीत ते गानं वाजन्याची वाट पाहून वाजलं का ते कान देऊन आयकून ते पीस ध्यानात ठेवून मंग बसवाचं. होती का नाई कसरत?

आमच्या आर्केस्ट्रात सुधाकर कदम अँकारडियन, विष्णू वाढई व्हायलिन, दीपक देशपांडे, ढोलकी, तबला, डफळे, योगेश मारू कोंगो आन् मुकेवार महम्मद रफी, महेश शिरे मुकेश, शरद नानवटकर किशोर कुमार तं अविनाश जोशी 'वंडरबॉय' म्हून फेमस होता. त्यायचे चाहते त्यायचा आवाज आयकाले हजरी लावाले लागले. 'जहॉं डाल डाल पे-सोनेकी चिडीया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा' या गान्यानं आमच्या कार्यकरमाची सुरवात मुकेवारच्या आवाजानं व्हाची आन् ते चुकू नये म्हून त्याचे चाहते आंधीपासून हजर राहाचे. तवा एखांद्या संगीतकाराचे एक-दोन सेनिमे हिट झाले का तेच गाने बसवा लागे. काऊन का, लोकायची फरमाईस चाले. एका सिझनले ओ. पी. नय्यरच्या गान्याचं मार्केट होतं आन् त्यातल्या काई गान्यात त्यानं सिक्सोफोनचे पिसेस वापरले होते. आता पंचाईत असी का आमच्यात ते कोनाले वाजोता ना ये. त्याच्यावर्त गजापुरे म्हनेत का, तुम्ही काळजी करू नका मी प्रयत्न करतो, त्यायनं काय केलं का एका बॅंड पार्टीतला त्यायच्या ओयखीचा गुनी कलाकार होता. त्याले इचारलं तं तो तयार झाला आन् अडचन सुटली. 

मी कार्यकरमाच्या दिसीचं बोरीवून संध्याकाळी येवो. त्या वर्सी आल्यावर माह्या ध्यानात आलं का एक कलाकार वाढला हाये. स्टेजवर्त घोडय़ाची जे नाल असते त्या आकाराची कलाकाराची बसायची वेवस्था राहे. समोरच्या भागाच्या एका कोन्टय़ात सुधाकर अँकारडियन लटकवून उभा राहे. मंधात गायकासाठी दोन माईक राहे. ज्याचं नाव घेतलं का थो गायक मागून येऊन माईक समोर उभा आन् त्याच्या थोडं मांग मी उभा आन् माह्या मांग थो नईन कलाकार गयात सिक्सोफोन घेऊन उभा. मी पुढच्या माईकवर जाऊन नाव सांगून मांगच्या कलाकारात थोड अंतर ठेवून पुढं तोंड करून उभा राहो. त्यानं गान्यात जवा त्याचा पीस वाजवला त्या सिक्सोफोनचं तोंड माह्या कमरीपासी टेकलं. मी थोडासा दचकलो आन् मले नवलयी वाटलं का इतकी कमी अंतर आमच्या दोघात नसूनयी ते तोंड आपल्या कमरीले भिडलं कसं? त्यायची माही ओयख नसल्यानं म्या त्यायले कायी म्हनलं नाई. मंग मी बराबर अंतर ठेवून उभा राह्यलो. पुढच्या गान्यात जसं त्याच पीस आलं ते तोंड माह्या कमरीले टेकलं. सगया कार्यकरमात असं पाच-सात खेपा झालं. म्या तयाले काई म्हनलं नाई पन अंतर ठेवूनयी असं काऊन होते हे माही तिकडं पाठ असल्यानं मले कायी दिसे नाई. 

म्या कार्यकरम झाल्यावर अध्यक्षाले ते सांगतलं. ते म्हने मी पाहतो दुसर्‍या दिसी कार्यकरमासाठी बोरीवून मी मंडयाच्या आफिसात आलो तं मले गजापुरे सायेब जरा एकीकडं घेऊन गेले आन् सांगाले लागले, ''बाबा, त्याची अडचन काय हाय का एक पाय पुढं टाकल्यासिवाय त्याच्या तोंडून फुकचं निंघत नाई आन् त्यानं एक पाय पुढं टाकला का त्या सिक्सोफोनचं तोंड तुह्या कमरीले टेकते.'' म्हणलं टेकू द्या काई हरकत नाई. शंका फिटली. माहा एक दोस्त एस.टी.त कन्डक्टर हाय. त्याले आपल्या सारकं सुदं बसून लेयताचं येत नाई. खालचा कागद हालल्यासिवाय त्याचे अक्षरचं उमटत नाई. आदतसे मजबूर अखीन काय? हे थोडीसी गंमत झाली पन मले खरं तं त्यावक्तीची त्यायची मेहनत तुमच्या ध्यानात आनून द्याची होती. आता सारं सोपं झालं. सिंथेसायझर या वाद्यातून अनेक वाद्यायचे गिटार, बासरी असे आवाज काढता येते तवा लहान-लहान गोठीसाठी अडून बसा लागे म्हून त्या कलाकारायच्या जिद्दीची कमाल वाट्टे. त्या कलाकाराले सलाम ! एक सांगू, ज्याचा आवाज त्याच्यातूनच निंघाला का सुदं वाट्टे!

(लेखक शंकर बडे   हे नामवंत वर्‍हाडी कथाकार आहेत. 'बॅरिस्टर गुलब्या' हा त्यांचा एकपात्री कार्यक्रम अत्यंत लोकप्रिय आहे.)

पेशवे प्लॉट, यवतमाळ

भ्रमणध्वनी - 9420551260

Monday 20 August 2012

बाईचा नखरा

                                    ''दार उघड''
                                  ''कोन आहे?''
''मी आहो''

''मी कोन?''

''घरच्या मानसाचा आवाज वयखू येत नाही काय तुले?''

''थांबा पाच मिनिट.''

''अव पन तू दरवाजा लाऊन घरात काय करून राह्यली? उघड दरवाजा..''

''एवढय़ा मोठय़ानं दार ठोकू नका.''

''मंग दार उघड लवकर.''

''उघडलं दार.. काय म्हनता?''

''काय करून राह्यली अंदर एकटी?''

''हे दिसत नाही काय तुमाले?''

''हे काय लावलं तोंडाले भुतासारखं?''

''मुलतानी माती लावली.''

''तोंड धुई पटकन.. मले तुहा भेव लागून राह्यलं.''

''थांबा जराभर.. तोंड सोकू द्या.''

''आपल्याले वाढदिवसाले जा लागते...उशीर होते. म्या गाडीत पेट्रोल भरून आनलं.. अध्र्या घंटय़ापासून तयार झालो पन तुहा नखराच सुरू आहे मघापासून.''

''किती वाजता आहे वाढदिवस?''

''सहा वाजता. आता साडेसहा झाले.''

''वाढदिवस वक्तावर होते काय? जेवाच्या टाइमले गेलं म्हनजे झालं.''

''तुव्ह हे नेहमीचंच आहे... कुठं जायाचं असलं, की तुले चार घंटय़ाच्या आगुदर सांगा लागते.. तवा कुठं वक्तावर तयारी होते.. आटप लवकर..''

''तोंडाचं सोकू द्या.''

''राहू दे तसंच.. रस्त्यानं सोकते.''

''तुम्ही त काही बोलता.. तोंडाले माती लाऊन कोनी जात असते काय?''

''फॅशन हाय म्हना!''

''सोंग दिसते हे!''

''विशेष दिसते. तिथं गेल्यावर सारे लोकं तुलेच पाह्यतीन.''

''हासा करता काय? पोट्टे भेतीन मले!''

''धुई लवकर.. कधीही पाहावं त हेच गर्‍हानं असते. लगAाने चाल म्हटलं की, तिकडे लगन लागते, पंगत बसते; तरी तुहा नखरा सुरूच असते. बजारात जायाले मेकप करते.. चक्कीवर पावडर लाऊन जाते.. वारे वा बाई!''

''कल्ला नका करू.. धुतलं तोंड''

''मंग आटप लवकर''

''साडी नेसू की ड्रेस घालू?''

''ड्रेस कायले? जाडय़ा बाइले ड्रेस शोभते काय?''

''जाडय़ा बाया ड्रेस घालत नाहीत काय?''

''जाडी बाई ड्रेसवर अबूगबू दिसते.''

''मग साडी कोनती नेसू? हिरवी की गुलाबी?''

''एकावर एकदोन साडय़ा नेस.''

''एक सांगा कोनती नेसू?''

''कोनतीही नेस पन लवकर नेस.''

''या साडीवरचा मॅचिंग पेटीकोट पाहा आलमारीत.''

''तूच पाह्य''

''मले दिसला नाई म्हनून तुमाले सांगून राह्यली!''

''सारं मॅचिंगच पाह्यजे काय? दुसरा चालत नाही काय? एवढं बारीक कोन पाह्यते तुले?''

''पाहा लवकर.. पेटीकोट सापडल्याशिवाय गाडी पुढे सरकत नाही.''

''हा सापडला!''

''येनी घालू की केसं मोकये सोडू?''

''तशीच चाल झिपरी!''

''काताऊ नका.. बाईच्या जातीले टाइम लागतच असते.''

''अवं पन तुले सकाळपासून सांगून ठेवलं होतं, की संध्याकाळी सहा वाजता आपल्याले वाढदिवसाले जा लागते. काय केलं दिवसभर?''

''तुम्हीच त उशिरा आले आफिसातून!''

''टाइमपास करू नको.पावनेसात वाजले.''

''थांबा मेकप राह्यलं.''

''आता मेकपले किती घंटे लागतात? तिकडे त्या पोराचा वाढदिवस होईन.. तो पोरगा झोपून राहीन.. तो झोपल्यावर जाशीन काय?''

''कोनती क्रीम लाऊ?''

''लाव लवकर.. नाहीतर सोबत घेऊन चाल.. तिथं गेल्यावर लावजो.''

''तुमाले भलकशी घाई असते कोन्या गोष्टीची.. तिथं सार्‍या बाया मेकप करून येतीन अन् मी खरकटय़ा तोंडाची जाऊ काय?''

''हारला मानूस तुले.. आता काय पाहून राह्यली आलमारीत?''

''या साडीवरची मॅचिंग टिकली पाहून राह्यली!''

''लाल टिकली चालत नाही काय?''

'नाही.. मॅचिंगच पाह्यजे.''

''अवं त्या धामधुमीत कोन पाह्यते तुव्ह मॅचिंग?''

''तुम्ही जराशीक पावडर लावा तोंडाले.. असेच जाता काय खापर्‍या तोंडाचे?''

''मले काही गरज नाही.''

''नाकात नथ घालू काय?''

''नथ कायले पाह्यजे? नथीचा वाढदिवस आहे काय?''

''उलट नथ घातल्यावर नाक मोठं दिसते.''

''गजरा आनला काय?''

''नाही''

''तुमाले मघाच म्हटलं होतं, की गजरा आनजा.. जा लवकर.''

''राहू दे आता.. रस्त्यानं घेऊ.. मी म्हनतो, एवढा नखराच कायले करा लागते? बाईले बुद्धी पाह्यजे.. शिल्लकचा शिनगार करून काय फायदा?''

''म्हनजे मले बुद्धी नाही काय?''

''बुद्धी असती त एवढा उशीर लागलाच नसता!''

''नेकलेस कोनता घालू?''

''तुव्ह एकएक शेपूट लांबूनच राह्यलं.. निम्मेराती चालशीन काय?''

''झालं ना.. मागचे दारं लाऊन घ्या.''

''ते आगुदरच लाऊन बसलो.. तू आटप लवकर.''

''आजून लय राह्यलं''

''काय राह्यलं?''

''नेलपालीस राह्यलं.. स्प्रे राह्यला.. गजरा..''

''मंग तू असं कर.. तू उद्या ये.. मी चाललो आज.''

''अवं थांबा ना!''

''तू एकटीच थांब.. पुढच्या वाढदिवसापर्यंत नखराच करत राह्य..''

''झालं ना.. लावा कुलूप.. झाली मी रेडी!''

(लेखक हे नामवंत वर्‍हाडी कथाकार आहेत.)

भ्रमणध्वनी : 9561226572

चकव्याची गोष्ट

आपण केलेल्या चुका ह्या वैयक्तिक नव्हे, तर कौटुंबिक व सामाजिक दुष्परिणाम करणार्‍या आहेत. त्या चुकांमुळे आपल्याला घरचे-दारचे दोष देतील. पर्यायाने आपली छी:थू होईल. अशी चूक आपल्याकडून घडत आहे याची जाणीव जेव्हा चूक करणार्‍याला होते तेव्हा त्या चुकांवर पांघरूण घालण्याचा तो आटोकाट प्रयत्न करतो. जे काही विपरीत वर्तन आपल्या हातून घडले आहे त्याला आपण जबाबदार नाही किंवा नव्हतो. कोणत्या तरी अमानुष अमानवी शक्तीने आपल्याला तसे वागायला भाग पाडले. आपण तर खूप सत्शील आहोत. चार्त्यिवान आहोत हे इतरांना दाखवून देण्यासाठी किंवा कधी कधी दुसर्‍याची सहानुभूती मिळविण्यासाठी कुण्यातरी प्रतिभावान कल्पक माणसाने 'चकवा' हा प्रकार शोधून काढला असावा, असे वाटते.

काही संकल्पना समाजमनात रूढ झाल्या की, त्या संकल्पनांचे उदात्तीकरण करण्याची समाजाला सवयच असते. कारण ह्या संकल्पना बर्‍याच वेळा जास्तीतजास्त लोकांच्या सोयीच्या असतात. भविष्यात प्रसंग आला तरी कधी काळी आपल्यालाही बचावाच्या ह्या फांदीला लटकता येईल अशी सुप्त भावना कुठेतरी खोल खोल मनाच्या आतल्या भागात वसत असते. त्यामुळे त्याचा स्वत:चा बचाव करण्याचा प्रयत्न तो जसा करतो, तसेच इतरही त्याला बचाव करण्याची संधी देत असतात. बर्‍याचशा संकल्पना किंवा समाज मनात रूढ असणार्‍या बाबी ह्या कालांतराने नष्ट होत असतात. कारण प्रत्येक दशकाच्या काळात काही नवनवीन बाबी, काही नवीन शब्द, नवे विषय काळच समाजव्यवस्थेच्या झोळीत टाकत असतो असे लक्षात येते. पंचवीस वर्षापूर्वी गावखेडय़ातून जसे भुताने झपाटलेले बायका-माणसं दिसत तसे आता कुठे दिसतात? वावरात गेला अन् चकवा लागून जंगलात भटकला! अशा गोष्टी आता घडलेल्या दिसून येतात ? अर्थात, समाजातली नवी मनोरंजनाची साधने, नव्या समस्या, समाजातील आदर्शभूत असणारी नवी आकर्षणाची केंद्रे ह्या सर्व बाबी नवीन सामाजिक मूल्यांची रुजवण करीत असतात.

बर्‍याच वेळा स्वत:च्या स्वार्थासाठी समाजातली काही चतुर माणसं अशा लोकभ्रमित गोष्टींचा आपल्यासाठी उपयोग करून घेत असतात. कधी अशा भ्रमातून अवमान, धमक्या, नको त्या गोष्टीही घडत असतात. रूपराव इंगळेच्या संयुक्त कुटुंबातसुद्धा चकव्यानेच विघटन आणलं. खरं म्हणजे तीन भावांच्या शेतीकरी वर्गात मोडणार्‍या शेतकरी कुटुंबातला रूपराव हा मोठा भाऊ.घरचा कर्ताधर्ता कारभारी. पेरणी केव्हा करायची, कोणत्या शेतात काय पेरायचं, कोणती पिके घ्यायची, कापणी-मळणी कधी करायची. माल केव्हा विकायला न्यायचा, असे सगळे निर्णय तो घेत असे. सगळ्यांना ते मान्य असतं. कारण काटकसरीने व्यवहार कसे करावे, घराच्या आर्थिक उन्नतीसाठी कोणत्या योजना आणाव्यात, कोणत्या टाळाव्यात, या सर्व बाबींचं त्याला दीर्घकालीन ज्ञान होतं. त्यामुळं सगळे भाऊ त्याला मानायचे.

पण एक दिवस त्याला लागलेल्या चकव्याने त्याच्या ह्या कुटुंब संस्थेलाच सुरुंग लावला. त्या दिवशी शेतमाल विकून मोठी रक्कम घेऊन गावी परतत असताना त्याला चकवा लागला. चकव्याने त्याला गावाकडे जाणार्‍या एसटीत न बसवता भलत्याच शहरात जाणार्‍या एसटीत बसवून नेले. चक्कर येत राहिले आणि ती सगळी रक्कम त्याच्याकडून गहाळ झाली.

गावात आल्यावर घरी बैठकीत बसून रूपराव इंगळे चकव्याने आपल्याला कुठे कुठे नेले, पैशाची बॅग कशी गहाळ झाली, हे सर्व घडत असताना आपल्या डोळय़ावर कशी झ्याक आली, आपल्याला कसं काहीच कळलं नाही. मनासारखं वागताच येत नव्हतं. कारण चकवा त्याच्या मनासारखंच वागवून घेत होता. आताही काही सुचून नाही राहिलं. मांत्रिकाकडे गेलं पाहिजे. आपल्यावर इलाज केले पाहिजे. किमान गावदेवीला, आपल्या कुलदैवतेला नवस कबूल केला पाहिजे असं बोलून दाखवत होता. गावातले ओळखीचेही त्याची कीव करून त्याला पुष्टी देत होते. इलाजाचे मार्ग सुचवीत होते.

हे सगळे घडत असताना त्या एकत्र कुटुंबातील एक भाऊ मात्र घराच्या बाहेर ओटय़ावर बसलेला होता. वर्षभर राबराबून कमाई केलेल्या शेतमालाची रक्कम अशी एका झटक्यात गेली. शेतकरी कुटुंबाचं तर असं असते की, एका पिकाला बसलेली ठोंग पाच वर्षे झांज आणते. अर्थकारणाचं सगळं बजेट विस्कळीत करते. पण ती अस्मानी आपत्ती असते. इथं तर हाती आलेला पैसा कारभार्‍याने गमावला होता. म्हणताना तो बाहेर बसून मोठय़ाला शिव्या देत होता.

घरातून मोठय़ा भावाजवळ बसून त्याच्याजवळ आलेल्या लोकांना तो पोटतिडकीने सांगत होता.

''आमचा कारभारी बंग्या मारून राह्यला. आम्हाला सगळय़ायले च्युत्या बनवून राह्यला. हा पैसा त्यानं त्याच्या सासर्‍याच्या घरी नेवून ठेवला आसंल. नाईतं आपल्या नावानं खात्यावर बचत टाकला आसंल. भावाच्या बार्‍यात आता याची नियत चांगली राह्यली नाई. यानं याच्या समद्या पोरीयचे लगनं करून घेतले. आता आमच्या पोरीयचे लगनं आले तं हा आशे मतलबी धंदे कराय लागला. याले नाई चकवा-गिकवा लागला. यानंच आमच्या समद्यायले चकवा लावला.''

थोडय़ा वेळापूर्वी घरात बसून मोठय़ा भावाचं सांत्वन करणारे आता लहान्याची बाजू घेऊन त्याला भडकावून देण्याचं काम करत होते.

''हाव गडय़ा ! बरोबर आहे तुहं! त्याच्या मनात दोन सालापासून वाटण्या करायचं घाटून राह्यलं नं तं ही मोठी रक्कम त्यानं बरोबर पचवली. कशाचा चकवा न बिकवा लागला. असं कुठी होत असतं कां ? बाता मारते तुमचा कारभारी !''

दुसर्‍या दिवशी त्या घरात भावाभावांत, बायकाबायकांत घनघोर भांडण झाले आणि दोन वर्षापासून ज्या वाटण्या करण्याचं खांडूक त्या एकत्र कुटुंबात ठसठसत होतं ते फुटून मोकळं झालं. एक चकवा लागला आणि त्याने वर्षानुवर्षापासून सुखाने नांदणार्‍या त्या संयुक्त कुटुंबाचे विघटन केले.

दुसरा असाच एक सधन शेतकरी. खरं म्हणजे दारूचं दुकान चालवणारा सावकारच. त्याला शेजारी असणारी पाच एकर शेती अल्पभूधारक शेतकर्‍याकडून विकत घ्यायची होती. पण शेतीवर प्रेम असणारा तो कष्टकरी शेतकरी ती शेती विकायला तयार नव्हता. त्यावेळीही त्याने चकव्याचा आधार घेतला. अमावस्या किंवा पुनव असली की तो बरोबर त्या शेजारच्या शेतात जाऊन अर्धवट खोदून बुजवलेल्या विहिरीत म्हणजे भामटात जाऊन पडायचा अन् ''चकव्यानं आपल्याले त्या वावरात नेलं. चकवा आपल्याशी बोलला. त्यो वावराच्या मालकाचा भग मांगते अन् मले पुन्हा माह्या वावरात नेऊन आदळते,'' अशी बोंब केली.

त्या शेताचा मालक आपल्या मायचा एकुलता एक लेक.शेजारपाजारच्या पेटवलेल्या बायका मायच्या मनात भय निर्माण करायच्या. मग माय म्हणायची-''काय करायचं बाळू आपल्याले असं चकव्याचं वावर ! एखादं दिवशी त्यो चकवा तुहा भग घेईल. मंग आम्ही कोणाच्या भरवशावर जगावं बाळ्या? तुह्या लहान लेकरायचं कसं होईल बाप्पा !''

त्या शेताचा मालक असणारा तो शेतकरी आता धाकी पडला आहे. सध्यातरी आमावस्या आणि पुनवेच्या दिवशी तो आपल्या शेतात जात नाही. धाकीच पाडलं लोकांनी त्याला तसं ! येणार्‍या काळात त्याच्या मस्तकात उजागर होणारा चकवा मरून जाणार आहे, की आणखी उग्र रूप धारण करणार आहे. हे मात्र त्या अल्पभूधारक शेतकर्‍याचं मनच ठरवणार आहे.

(सदानंद देशमुख हे साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखक असून 'बारोमास','तहान' या त्यांच्या गाजलेल्या कादंबर्‍या आहेत.)

जानेफळ, ता. मेहकर, जि. बुलडाणा