Friday 14 December 2012

एफडीआय' आले, पुढे?'


एफडीआयचा प्रस्ताव मंजूर करून घ्यायला सरकारला मोठय़ा 'करामती' कराव्या लागल्या. लोकसभेत सपा आणि बसपा यांनी 'वॉक आऊट' केला. राज्यसभेत बसपाकडून मतदान करून घेतले. अखेर कॉंग्रेसने दोन्ही सभागृहात हा ठराव मंजूर करून घेतलाच. माझ्यासारख्या एफडीआय समर्थकांनी या निणर्याचे स्वागत केले. पण मला एक प्रश्न पडतो की, सरकारला हे करायचेच होते तर ते त्यांनी यापूर्वी का केले नाही? इतकी वर्षे का वाट पाहिली? की सरकारला करायचेच नव्हते. आता नाईलाजाने 'जुलमाचा राम राम' करावा लागला? नेमके कारण काय?

करायचेच होते तर..

1990 साली भारत सरकार दिवाळखोरीच्या उंबरठय़ावर होते. विदेशी कर्जावर सरकारी खर्चाचा गाडा चालवावा लागत होता. कर्जाचा हप्ता देणे ही दुरापास्त झाले होते, व्याज चुकते करायलाही कर्ज काढण्याची नामुष्की आली होती. त्याच काळात रशियाचे विघटन झाले. एका महासत्तेचा अस्त झाला. अर्थात, सरकारनियंत्रित अर्थनीतीचा अस्त झाला. भारताला जुने आर्थिक धोरण सोडून नवे धोरण स्वीकारणे भाग पडले. अशा परिस्थितीत मनमोहन सिंग आणि नरसिंगराव या जोडीने 1990 साली पहिल्यांदा भारत सरकारच्या आर्थिक धोरणांची दिशा बदलली. भारताने गेट करारावर सही केली. नेहरूप्रणीत आर्थिक धोरण बाजूला ठेवले व आर्थिक उदारीकरणाचा मार्ग धरला.

आपण नवे आर्थिक धोरण स्वीकारले. उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरण हे परवलीचे शब्द बनले. याच काळात नवे तंत्रज्ञान आले होते. सरकारी संचार यंत्रणा एका मिनिटाला 12 रुपये घेत होती. जाणार्‍या कोलला तर पैसे होतेच, पण येणार्‍या कोललाही पैसे मोजावे लागत होते. नव्या आर्थिक धोरणामुळळे अनेक कंपन्या बाजारात आल्या. त्यांच्यात स्पर्धा झाली. कोलचे दर कोसळत गेले. याचा लाभ ग्राहकांनाही झाला. सरकारी कारखाने विक्रीला काढण्यात आले. उद्योग आणि सेवा क्षेत्रात नवे चैतन्य निर्माण झाले. मधे अटलबिहारी यांच्या नेतृत्वाखाली एनडीएचे सरकार आले. त्यांनी हेच आर्थिक धोरण पुढे चालू ठेवले. 1990 साली स्वीकारलेले धोरण 2012 पर्यंत शेती क्षेत्रात मात्र आले नाही.

1942 साली देश स्वतंत्र होईल असे वातावरण तयार झाले होते. 1947 साली स्वातंर्त्य मिळाले. भारतीय जनतेला केवळ पाच वर्षे वाट पाहावी लागली. मात्र नवे आर्थिक धोरण शेती क्षेत्रात पोहोचायला 22 वर्षे लागली. अवतीभोवती विकास झाला. त्याचा ताण शेतकर्‍यांवर पडू लागले. लोकांना वाटते की, शेतकरी हे नव्या आर्थिक धोरणामुळे आत्महत्या करीत आहेत. वास्तविकता अशी आहे की, नव्या धोरणामुळे बिगर शेती क्षेत्रात जी सुबत्ता आली तिचे ताण शेतीवर पडू लागले. शेती क्षेत्रात या सुधारणा आल्या नाहीत. शेतकरी विकलांग राहिला. तो नवे ताण सोसू शकला नाही म्हणून तो आत्महत्या करू लागला. किती शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या? हा आकडा लाखो आहे. महायुद्धात जेवढे सैनिक मारले गेले नाहीत तेवढय़ा शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या. रिटेल क्षेत्रातील एफडीआयला मंजुरी ही पहिली सुरुवात आहे. शेती क्षेत्राला नव्या आर्थिक धोरणाचे किंचितसे दार उघडले जाण्याची शक्यता निर्माण झाली. शेती क्षेत्राला वगळून आर्थिक उदारीकरणाचे धोरण सरकारने राबविले. त्याची किंमत शेतकर्‍यांना चुकती करावी लागली. ही पावले सुरुवातीला उचलली असती तर एवढय़ा आत्महत्या झाल्या नसत्या व विकासही वेगाने होऊ शकला असता.

विरोधकांचा विरोध बेताल-

एफडीआयची चर्चा दूरदर्शनवर दाखविली जात होती. विरोधी पक्षांचे नेते त्याबद्दल सतर्क होते. ते सभागृहासाठी कमी आणि बाहेरच्या लोकांसाठी जास्त बोलत होते. जणू उद्याच निवडणूक आहे व आपल्याला कसेही करून लोकांची मते घ्यायची आहेत अशा आविर्भावात हे खासदार बोलत होते. त्यामुळे कोणी देश विकायला निघाले. ईस्ट इंडिया कंपनीने जसा बहारात काबीज केला होता तसेच 'वॉलमार्ट'वाले करतील, वाफिरे विधाने करण्यात आली. खास टाळीबाज विधाने अनेक वक्त्यांनी केली. मला साधा प्रश्न पडला, विदेशी गुंतवणूक काही पहिल्यांदा येते आहे असे नाही. 15-20 वर्षापूर्वीच आपण विदेशी गुंतवणुकीचा ठराव केला. त्या आधारे या देशात अनेक कंपन्या आलेल्याच आहेत. जोपर्यंत विदेशी गुंतवणूक बिगर शेतकर्‍यांना फायद्याची होती तोपर्यंत त्यांना ना ईस्ट इंडिया कंपनी आठवली ना देश विकला जाण्याची भाषा केली गेली. आज जेव्हा विदेशी गुंतवणुकीचा लाभ पहिल्यांदा शेतकर्‍यांना होण्याची शक्यता निर्माण झाली तेव्हाच नेमके त्यांना या सगळ्या गोष्टी आठवल्या. आयटी क्षेत्रात जोपर्यंत यांच्या मुलांना नोकर्‍या मिळत होत्या तेव्हा हेच लोक शायनिंग इंडियाची भाषा करीत होते, आज जेव्हा शेतकर्‍यांच्या मुलांना रोजगाराची शक्यता दिसू लागली तेव्हा त्यांनी गदारोळ सुरू केला.

भारतीय स्वातंर्त्यलढय़ात ज्यांनी गांधीजींना विरोध केला ते सगळे आज रिटेलमधील एफडीआयला विरोध करीत आहेत. हिंदुत्ववादी तर गांधी हत्येत सामील होते, कमुनिस्टांनीही गांधीजींना काही कमी विरोध केला नाही. आज हे दोघे हातात हात घालून रिटेल मधील एफडीआयला विरोध करीत होते. भाजपाने आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात रिटेलमधील एफडीआयचे समर्थन केले होते. आज ते नेमकी विरोधी भूमिका घेत आहेत. यापेक्षा दांभिकतेचा दुसरा कोणता पुरावा असू शकतो?

एफडीआय पुरेसे नाही

दोन्ही सभागृहात ठराव पास झाला. रिटेलमधील एफडीआयचा मार्ग मोकळा झाला. मला वाटते, ज्या मुख्यमंर्त्यांनी याला विरोध केला, ते उद्या संमती देतील. कदाचित येत्या पाच वर्षात कोलकाता, मद्रास, भोपाल आणि अहमदाबादमध्ये मोठे मॉल उघडलेले आपल्याला दिसतील. नरेंद्र मोदींच्या गुजरात राज्यात सात महिन्यांपूर्वीच वॉलमार्टने जागा विकत घेतल्याची बातमी प्रकाशित झाली आहे. शेतकर्‍यांच्या दृष्टीने एवढे पुरेसे नाही. शेती क्षेत्रात उदारीकरण आणायचे असेल तर सरकारला 1. भूमी अधिग्रहण कायदा, 2. जमीन मर्यादा कायदा व 3. जीवनावश्यक वस्तूंचा कायदा या तीन कायद्यांत बदल करावा लागेल. हे तीन कायदे जोपर्यंत अस्तित्वात राहतील तोपर्यंत शेतकर्‍यांसाठी आलेल्या कोणत्याही योजनांचा खरा लाभ शेतकर्‍यांना मिळणार नाही.

शेतकर्‍यांच्या कल्याणा 'वॉलमार्ट'ची विभूती


थेट विदेशी गुंतवणूक शेतकर्‍यांच्या कल्याणासाठी हे आम्ही ऐकत होतो. वाचत होतो. त्या मुद्यावरून सत्ताधारी व विरोधी पक्ष यांच्यात अनेक दिवसांपासून वादावादीही सुरू होती. हाच वाद लोकसभेतही झाला. थेट विदेशी गुंतवणूक 'शेतकर्‍यांच्या कल्याणासाठीच' असे ठासून सांगणारे तर थेट विदेशी गुंतवणुकीत शेतकर्‍यांचे अकल्याण आहे असेही म्हणणारे. एकूण शेतकर्‍यांच्या 'कल्याणा'बाबतच हा 'कळवळा' पाहून आमचे मन भरून येत होते. परंतु काल-परवा थेट विदेशी गुंतवणुकीसाठी 'वॉलमार्ट' कंपनीने भारतात 'लॉबिंग' करण्यासाठी 125 कोटी रुपये खर्च केल्याची बातमी वाचली आणि आम्ही अक्षरश: गहिवरून गेलो. भारतीय शेतकर्‍यांबद्दल भारतीय नेत्यांना, समाजसेवकांना, शेतकरी नेत्यांना 'कळवळा' येणे यात नवल ते काय? पण

'बुडती हे जन देखवेना डोळा

म्हणुनी कळवळा येतसे'

हा तुकाराम महाराजांचा कळवळा वॉलमार्ट या अमेरिकन कंपनीला येऊ शकतो. कंपनी अमेरिकन आहे म्हणून त्याला भारतीय शेतकर्‍यांचा कळवळा येत नसेल असे कसे म्हणावे? जागतिकीकरणानंतर कळवळाही जागतिक झाला नसेल कशावरून? फार तर अमेरिकन कंपनीच्या कळवळ्य़ाला अमेरिकन कळवळा म्हणा. आता अमेरिकन झाला म्हणून त्याला कळवळाच म्हणायचे नाही हे तर फारच झाले! याच कळवळ्य़ापोटी 'वॉलमार्ट' कंपनी थेट विदेशी गुंतवणूक भारतात व्हावी. त्यातून शेतकर्‍यांचा फायदा व्हावा, निराशेच्या गर्तेत जाऊन आत्महत्या करणार्‍या शेतकर्‍यांनी गळफास घेऊ नये यासाठी 125 कोटी रुपयांची 'गळ' टाकून भारतीय नेत्यांना, शेतकरी पुढार्‍यांना लेखक, विचारवंतांना फशी पाडत असेल तर ही कळवळ्य़ाची जातच न्यारी. या कळवळ्य़ाला 'लॉबिंग'सारखा घाणेरडा शब्द वापरावा हे तर हीनतेचेच लक्षण म्हणावे लागेल. या सर्व प्रकाराने आमची अवस्था, 'कधी गहिवरलो कधी धुसफुसलो' अशी झाली आहे. वॉलमार्ट कंपनीच्या कळवळ्य़ाने कधी गहिवरून यायला होते, तर या कळवळ्य़ाला नतद्रष्ट लोक 'लॉबिंग' म्हणतात म्हणून आम्ही धुसफुसलो. लॉबिंग या शब्दालाच काहीतरी 'बिंग'फुटावे असा घाणेरडा वास आहे. 'जगाच्या कल्याणा संतांची विभूती' याची तर केव्हाच 'एक्स्पायरी' झालेली आहे. पण आता 'फ्रेश' प्रकार, 'शेतकर्‍यांच्या कल्याणा वॉलमार्टची विभूती'. या प्रकाराने तर आम्ही गदगद झालो आहोत. शेतकर्‍यांच्या 'कोट' कल्याणासाठी थेट विदेशी गुंतवणूक भारतात व्हावी यासाठी कोटी कोटी रुपये वॉलमार्ट कंपनी खर्च करीत असेल तर त्यांना कोटी कोटी दंडवतच द्यायला नको कां?

आता 'कल्याणा'च्या आड येणारीसुद्धा नाठाळ मंडळी असतातच. ही नाठाळ मंडळी स्वत:चे 'कल्याण' झाल्याशिवाय इतरांचे कल्याण होऊ देत नाही. तेव्हा अशा नाठाळ मंडळींना वठणीवर आणण्यासाठी वॉलमार्ट कंपनीने 125 कोटी रुपये खर्च केले असतील तर बोंबलण्याचे कारण काय? थेट विदेशी गुंतवणुकीच्या विरोधात कठोर भूमिका असणार्‍यांची भूमिका 'नरम' व्हावी यासाठी काहींचा खिसा गरम करावा लागला असेल. काहीचे कोरडे ठणठणीत हात ओले करावे लागले असतील. यासाठी धो धो पैसे वॉलमार्ट कंपनीने खर्च केला असेल तर यात वॉलमार्ट कंपनीची 'कल्याणाची' तीव्र आसच दिसत नाही कां? त्यातही दान द्यायचेही, पण या हाताचे त्या हाताला, या कानाचे त्या कानालाही माहीत होऊ द्यायचे नाही, ही तर भारतीय संस्कृतीची शिकवण. पण वॉलमार्टसारखी अमेरिकन कंपनी भारतीय संस्कृतीची आब राखत हे दान भारतात कोणाकोणाला दिले? कसे कसे दिले? किती किती दिले? याची वाच्यताही करीत नाही. खरेतर या सर्व प्रकाराने संस्कृती रक्षकांचा ऊर दाटून यायला हवा होता. पण तसेही होताना दिसत नाही. दुर्दैव आपले दुसरे काय? देणारा दिल्याची वाच्यता करीत नाही म्हटल्यावर 'बिचार्‍या' घेणार्‍यांनी तरी त्याची वाच्यता कां करावी? घेणारे वॉलमार्टच्या खाल्ल्या मिठाला जागतात किंवा नाही एवढाच काय तो प्रश्न आहे. 'थेट परकीय गुंतवणूक' ही शेतकर्‍यांच्या हिताचीच व हितासाठीच आहे असे एका तालासुरात ते म्हणताहेत हे काय पुरेसे नाही? 125 कोटी रुपये 'वॉलमार्ट' खर्च करतो याला तुम्ही लॉबिंग म्हणा, पण तो त्याचा शेतकर्‍यांच्या 'कल्याणा'साठी केलेला दानधर्मच आहे. दानालाही 'दान' म्हणायची 'दानत' या देशात संपते आहे. किती दुर्दैवी बाब ही? 'देणार्‍याने देत जावे आणि घेता घेता घेणार्‍याने देणार्‍याचे हात घ्यावे,' असे म्हणणार्‍याने म्हणून ठेवले असेल, पण आम्ही तर त्याच्याही पुढे जायच्या तयारीत आहोत, ''देणार्‍याने देत जावे आणि घेता घेता देशालाही विकता यावे,'' असा ध्यास आम्हाला लागून आहे. अर्थात, देश विकायला काढू तेव्हासुद्धा तो या देशातील गोरगरिबांच्या, दीनदुबळ्य़ांच्या, शेतकरी, शेतमजुरांच्या 'कल्याणासाठीच' असेल याची मात्र खात्री बाळगा. आता तुमचं 'कल्याण' करण्यासाठी थोडंफार आमचं कल्याण होत असेल तर इतरांच्या पोटात दुखण्याचे कारण काय?

लोकसभेत घसा खरवडू-खरवडू माया-मुलायम थेट परकीय गुंतवणुकीच्या विरोधी बोलत होते, पण मतदानाच्या वेळेस 'थेट परकीय गुंतवणुकीच्या' बाजूने असलेल्या सरकारला मदत व्हावी यासाठी ते अनुपस्थित राहिले. त्यावेळेस असा चमत्कार कसा घडतो असे वाटून गेले. पण 125 कोटी रुपयांचा 'वॉलमार्ट' खुलासा झाला तेव्हा डोक्यात थोडा थोडा प्रकाश पडू लागला. 125 कोटी मधले किती माया-मुलायमला गेले असतील? सत्ताधारी पक्षाचा त्यातील हिस्सा किती असेल? शेतकरी नेतेही थेट विदेशी गुंतवणुकीची तरफदारी करताना दिसताहेत त्यांचाही हिस्सा यात असेल की काय? भाजपानेसुद्धा सत्तेत असताना 'थेट परकीय गुंतवणुकीची' भलावण केली होती. पण आता ते विरोध करताहेत. वॉलमार्ट कंपनीला भाजपची 'तोडी' करण्यात अपयश आले की काय? अखेर 125 कोटी रु. खर्च वॉलमार्टने 'लॉबिंग'साठी केला. म्हणजे हा खर्च नेमका कसा, कोणावर व कशा प्रकारे झाला याचे तपशील बाहेर यायला नको? पण ते येणार नाहीत. काही दिवस आरोप-प्रत्यारोप होतील. याने घेतले. त्याने घेतले. याची कुजबुज होईल. थोडी धूळफेक होईल. धुळवड होईल आणि परत वातावरण शांत होईल. आणि नंतर दिमाखात 'थेट परकीय गुंतवणूक' भारतात शेतकर्‍यांच्या 'कल्याणासाठी' केली जाईल.

ज्या शेतकर्‍यांच्या कल्याणासाठी 'थेट परकीय गुंतवणुकीची' उठाठेव, खटाटोप आज देशात सुरू आहे. त्याच शेतकर्‍याला याबाबत मी प्रश्न विचारला.

'एफडीआयमुळे शेतकर्‍यांचा फायदा होणार असे बरेच लोक म्हणतात. तुला काय वाटते?' त्याने उत्तर दिले.

'फायदाच होईन ना जी. समजा गावात श्रीमंत लोकांची पंगत झाली तर त्याचे नवीन नवीन चमचमीत पदार्थ शेतकर्‍यांना पहिल्यांदाच पाहायला मिळतील. हा शेतकर्‍यांचा फायदाच नाही कां? त्या पदार्थांचा घमघमीत सुवास शेतकर्‍यांना फुकटात घेता येईल हा कितीतरी मोठा फायदा शेतकर्‍यांचा होईल. असे पदार्थ शेतकर्‍यांच्या बापजन्मी पहायला, वास घ्यायला मिळाले नसते ते त्या 'पंगती'मुळे मिळेल. आता श्रीमंतांची पंगत म्हणजे ते ताटातले पदार्थ गरिबांसारखे चाटून पुसून तर खाणार नाही. उलट जो ताटात सर्वाधिक उष्टे टाकेल तो अधिक श्रीमंत. त्यामुळे ताटात भरपूर उष्टे शिल्लक राहील. ते स्थानिक शेतकर्‍यांनाच खायला मिळेल. उष्टे कां होईना आमच्या बापजन्मी जे खायला मिळाले नसेल ते खायला मिळेल. त्यामुळे 'थेट परकीय गुंतवणुकीची 'पंगत' भारतात बसली तर शेतकर्‍यांचा फायदाच फायदा.'

तो हे गंभीरपणे बोलत होता कां उपरोधिकपणे बोलत होता हे मला समजले नाही. समजून घेण्याची आवश्यकताही वाटली नाही. 125 कोटी रुपये 'वॉलमार्ट' कंपनी थेट परकीय गुंतवणुकीसाठी 'लॉबिंग' म्हणून खर्च करीत असेल तर 'भुक्कड' शेतकर्‍यांना विचारतो कोण? अखेर 'वॉलमार्ट' कंपनीचा कळवळाच महत्त्वाचा. जेव्हा कळत नाही कोठे वळा कदाचित त्याचेच नाव 'कळवळा' असेल!

(लेखक शेतकरी आंदोलक आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत.)

भ्रमणध्वनी - 9822587842

चैतन्याच्या अनुभूतीचे वस्तुनिष्ठ संशोधन आवश्यक


विश्वाच्या व आमच्या जीवनाच्या अस्तित्वाचे प्रयोजन काय, याबाबत परस्परविरोधी धारणा असलेले भौतिकवाद व अध्यात्मवाद हे दोन विचारप्रवाह समजून घेण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. मागील एका लेखात भौतिकवादाची तात्त्विक भूमिका थोडक्यात मांडली होती. सृष्टीच्या मुळाशी केवळ जड/निश्चेतन पदार्थ/ऊर्जा असून कोणतीही ज्ञानी, चैतन्यमय अथवा सामर्थ्यशाली अशी वेगळी शक्ती नसल्याचा भौतिकवादाचा दावा आहे. सर्व प्रकारचे चैतन्य हे जडातूनच उगवले असून कोणत्याही जीवाला/चेतनेला देहाबाहेर वेगळे अस्तित्व नसते. सृष्टीच्या निर्मितीमागे कोणताही हेतू नाही. मनुष्य हाच ज्ञात सृष्टीतील सर्वात ज्ञानी व समर्थ प्राणी असल्यामुळे कशासाठी जगायचे हे मानवालाच ठरवायचे आहे. ईश्वर ही एक काल्पनिक धारणा असून त्याच्या प्राप्तीसाठी खटाटोप करणे निर्थक असते. ईश्वराच्या कल्पनेने, त्याच्या कोपाच्या भयाने व त्याच्या प्राप्तीच्या इच्छेने मानवाला नैतिक वागणुकीचे वळण मिळते ही बाब काही प्रमाणात खरी असली, तरी त्यातून दांभिकताही बळावते व धार्मिक मनुष्य अधिक दांभिक असल्याचे दिसून येते. त्यापेक्षा सत्य जाणून मनुष्याने स्वत:ची व समाजाची फसगत न करणे इष्ट ठरेल. अशा प्रकारची भौतिकवादाची थोडक्यात तात्त्विक मांडणी आहे.

भौतिकवादी मनुष्य हा जसा व्यक्तिवादी, आत्मकेंद्रित व स्वार्थपरायण असू शकतो, तसेच तो समाजशील, मानवतावादी व अत्यंत त्यागीदेखील असू शकतो. तो मुक्त अर्थव्यवस्थेचा पुरस्कर्ता, लोकशाही राज्यव्यवस्थेचा समर्थक, हुकूमशाही किंवा सैनिकशाहीचा पाठीराखा अथवा लोकशाही, समाजवादाचा, साम्यवादाचा वा अराजकवादाचादेखील पाईक असू शकतो. सारांश, भौतिकवादी विचारसरणीमध्ये वरील सर्व आर्थिक/राजकीय विचारांना स्थान आहे. सामाजिक बाबतीत भौतिकवादी मनुष्य समाजव्यवस्था टिकून रहावी व माणसांनी एकमेकांसोबत सलोख्याने रहावे या कारणांसाठी नैतिक आचरणाचा आग्रह धरू शकतो. तसाच तो स्वत:ला मृत्यूनंतर अस्तित्व राहणार नसल्याच्या धारणेमुळे बेबंद, चंगळवाद व अनैतिक जीवन जगण्याचेही समर्थन करू शकतो.

वस्तुनिष्ठ (जलक्षशलींर्ळीश) व तर्कशुद्ध (ीरींळेपरश्र) विचार करण्याची शिस्त, ही भौतिकवादाने मानवजातीला दिलेली अमूल्य देणगी मानावी लागेल. तशी शिस्त नसली आणि आपल्याला

अंत:स्फूर्तीने एखाद्या वस्तूचे वा विषयाचे आकलन झाल्यासारखे वाटले तर त्या आकलनात आपले पूर्वग्रह, स्वभावाची बैठक, प्राणिक आवेग वगैरे मिसळून व्यक्तिगणिक आकलनात फरक पडू शकतो.

भौतिकवादी विचारसरणीची आमच्या मानवी समाजाला दुसरी देणगी म्हणजे विज्ञानाचा प्रसार ही होय. सर्व वैज्ञानिक भौतिकवादी विचाराचे नसतात. किंबहुना अध्र्याहून अधिक वैज्ञानिक वा शास्त्रज्ञ हे ईश्वरावर श्रद्धा असणारेच आढळतात. परंतु मागील 3-4 शतकांमध्ये तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रात भौतिकवादी विचारसरणीचे प्राबल्य पाश्चात्त्य देशांमध्ये बळावले. त्यामुळे वस्तुनिष्ठ व तर्कशुद्ध विचारांना मोलाचे स्थान मिळाले. ती शिस्त बाळगून सृष्टीरचनेतील नियम व त्यामागील तत्त्वे शोधून काढण्याकडे प्रगत बुद्धीच्या मानवाचा कल वाढला. त्यांनी संशोधनामध्येही अशीच शिस्त बाळगली. एखाद्या पदार्थाच्या अथवा ऊर्जेच्या विशिष्ट वर्तणुकीला जर 'नियम' म्हणायचे असेल, तर त्या पदार्थाची वा ऊर्जेची समाजन वातावरणात सर्व काळी व सर्व जागी तशीच वर्तणूक आढळून येणे आवश्यक मानण्यात आले. असे घडले तरच विज्ञानदृष्टय़ा तो नियम सिद्ध झाल्याचे मानले जाते. वस्तुनिष्ठ पद्धतीने निरीक्षण करणारा वैज्ञानिक त्या निरीक्षणात स्वत:चे पूर्वग्रह, धारणा, संस्कार, इच्छा इत्यादींचे मिश्रण होऊ देत नाही. ईश्वराच्या अस्तित्वावर श्रद्धा असणारे वैज्ञानिक /शास्त्रज्ञदेखील याच पद्धतीने वस्तुनिष्ठ दृष्टी बाळगून प्रयोग करतात व प्रयोगात आढळणार्‍या घटनांचे तर्कशुद्ध बुद्धीने विश्लेषण करतात. तसे त्यांनी केले नाही तर विज्ञान प्रगतीच करू शकणार नाही. विज्ञानाच्या घोडदौडीमुळे मानवजातीला जे अद्भुत लाभ झाले आहेत, त्यांचे श्रेय बर्‍याच अंशी भौतिकवादाला निश्चितपणे दिले पाहिजे.

परंतु काही मूलभूत प्रश्नांची उत्तरे भौतिकवाद समाधानकारक अशी देऊ शकत नाही. ही अफाट सृष्टी केवळ अपघाती योगायोगांच्या लांबलचक मालिकेतून निर्माण झाली व कार्यरत आहे, हा भौतिकवादी विचार बुद्धीचे व मनाचेदेखील सर्वागीण समाधान करू शकत नाही. सभोवतालच्या व दूरवरच्या सृष्टीचे आम्ही अधिक बारकाईने निरीक्षण केले तर ही बुद्धिहीन, आंधळय़ा जड पदार्थाची/ऊर्जेची करामत वाटत नाही. वनस्पती, कीटक, पशुपक्षी व मानवात असलेले चैतन्य जडातूनच उगवले असे मानले, तरी ते चैतन्य बीजरूपाने जडात वास करत असणारच! त्याशिवाय ते उगवणार कसे? शिवाय आमच्या ज्ञानेंद्रियांना व तार्किक बुद्धीला जे कळत नाही, ते अस्तित्वात असूच शकत नाही, असे मानणे योग्य नाही. कारण मानवाच्या ज्ञानेंद्रियांना व बुद्धीलाही मर्यादा आहेत. मानवाच्या व मानवसदृश प्राण्यांच्या उत्क्रांतीक्रमातील आगमनापूर्वीचे प्राणी-जगतदेखील असे म्हणू शकले असते की, तर्क-बुद्धी नावाची गोष्ट या सृष्टीत अस्तित्वात असूच शकत नाही! आमच्या अंतर्मनाचे व मनाच्या अवचेतन भागाचे नियमन व नियंत्रण करणारी आमच्या जागृत मनापेक्षा अधिक ज्ञानी असणारी यंत्रणा कार्यरत असते, हेदेखील आपण स्वत:चे निरीक्षण केल्यास समजू शकतो. जडाच्या आधारे चैतन्याचा अधिकाधिक विकास साधणे, अशी स्पष्ट दिशा उत्क्रांतीमध्ये आढळून येते. सृष्टीच्या मुळाशी जर फक्त अज्ञानी जड तत्त्वच असते तर त्याला ही नेमकी दिशा कशी धरता आली असती? एखाद्या आंधळय़ाने धडपडत, चाचपडत, झोकांडय़ा खात वाटचाल करावी तसे उत्क्रांतीचे स्वरूप दिसते खरे, परंतु त्या वाटचालीला एक निश्चित दिशा आहे, त्यात एक सुसंगती आहे, ती कुठून आली? शिवाय प्राणिमात्रांच्या ठिकाणी जगण्याची व वंशवद्धीची जी उपजत, मूलभूत व बलवान प्रेरणा आढळून येते, तिच्या उगमस्थानाचा व कारणाचा समाधानकारक खुलासा भौतिकवाद करत नाही. जर सृष्टीच्या मुळाशी अचेतन, जड तत्त्वच असेल, तर ते जडभौतिक तत्त्व सजीवांच्या रूपात चेतनेला टिकवून ठेवण्यासाठी व वृद्धिंगत करण्यास असा आणि इतका अट्टाहास कसा करू शकेल? जगत राहण्याची व अधिकाधिक सचेतन होत राहण्याची ही आदिम प्रेरणा भौतिक पदार्थातून उगवणे शक्य वाटत नाही.

पृथ्वीवर काही वेगवेगळय़ा जागी आजपावेतो असंख्य मानवांना जी इंद्रियातीत चैतन्याच्या अस्तित्वाची अनुभूती झाली आहे, त्या अनुभूतीचे अधिक वैज्ञानिक पद्धतीने निरीक्षण, संशोधन व आकलन करणे आवश्यक आहे. तसे न करता उथळपणे 'तो त्यांचा भ्रम होता' असे झटकून टाकणे उचित नव्हे. विशेषत: तशा अनुभूती येणार्‍या व्यक्तींचे आंतरिक व बाह्य जीवन बदलते काय व कशा प्रकारचे ते बदल होतात, याबाबतदेखील अद्याप पुरेसे संशोधन वस्तुनिष्ठपणे झालेले आढळून येत नाही. अतिंद्रिय वा आध्यात्मिक अनुभूतींचे व ज्यांना त्या अनुभूती येतात, त्या व्यक्तींचे वस्तुनिष्ठ व तर्कशुद्ध बुद्धीच्या आधारे संशोधन करणे भौतिकवादी व्यक्तींना कठीण जाते. कारण तशा विज्ञाननिष्ठ संशोधनाकरिता 'ज्ञात भौतिक सृष्टीखेरीज वेगळे असे काहीही अस्तित्वात नाही' हा आपला पूर्वग्रहदेखील बाजूला ठेवावा लागतो.

ज्या सूक्ष्मातिसूक्ष्म पदार्थकणांचे व ऊर्जेच्या तरंगाचे सैद्धांतिक स्वरूपात का होईना, (गणिती पद्धतीने) अस्तित्व विज्ञानाला शक्य वाटत आहे, त्या सूक्ष्म कणांचे अथवा ऊर्जा-लहरींचे अस्तित्व शे-दीडशे वर्षापूर्वी वैज्ञानिकांना माहीतही नव्हते. हिग्ज-बोसॉन (गॉड पार्टिकल) या अणूतील सूक्ष्म कणाचे अस्तित्व केवळ गणितीय आधारावर शक्य मानले जात होते, त्याचा प्रत्यक्ष पुरावा तर नुकताच मिळाला. सृष्टीमध्ये आम्हाला माहीत असलेल्या तत्त्वाखेरीज इतरही तत्त्व अस्तित्वात असू शकतात, ही संभावना विज्ञानाला नेहमी गृहीत धरावी लागते. भौतिक अथवा जड पदार्थाच्या सर्वात सूक्ष्म स्वरूपाचा शोध घेताना फोटॉनसारखे अतिसूक्ष्म कण ऊर्जातरंगाच्या रूपातदेखील वावरत असल्याचे विज्ञानाला आढळून आले. त्याहून अधिक सूक्ष्मात शोध घेता-घेता कदाचित भौतिक-अभौतिक असा भेददेखील वितळून जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

(लेखक हे नामवंत विधिज्ञ आहेत.)

असी आपली इस्टेट


शंकर बडेमांगच्या एका भागात तुमाले सांगतलं होत का म्या बोलीतली पयली कविता 'पावसानं इचिन..आर्केस्ट्रात असतानी लेयली होती. त्याच्याच्यानं माही इतर कवीसंग कायी ओयख नोती. फकस्त एकामेकाले नावानं ओयखत होतो. पयल्या कवितेनंतर मंग ह्या कवितेचा झरा वाहतचं होता. एका मांग एक 'उन्हायात गेलो होतो पोरगी पाहाले', 'हाऊसफुलं द्या,' 'झाडाखाली डोस्की' असी रांग लागत गेली आन् आर्केस्ट्राचा स्टेज असल्याच्यानं हौस भागत गेली. असे सात-आठ वर्स निंघून गेले आन् मंग आर्केस्ट्रा सोडा लागला. त्याच्या दुसर्‍या साली यवतमायच्या नेहरू युवक केंद्रात आमा काई कवीले आवतनं देल्लं. त्यातनी बोरीवून मी, दाभा पहूरवून सुभाष परोपटे, दिग्रसवून सुरेश गांजरे, दया मिश्र, राजू मिश्र बाकी एक-दोन नावं इसरलो असनं तं माफी मांगतो. हे जन्मातलं पयलं कविसंमेलन खूप हरकीजलं होतो. त्यायनं बलावलं त्याच्या दोन घंटय़ा आगुदरचं मी तिथं पोचलो. मनात तिथं जाच्या आंधी हे आलंयी का लयचं होईल का हे? आता तुमाले सांगाले हरकत नाई तुमी का दुसरे कोनी नवाडे थोडीचं हा. त्या दिसी बोरीले सकायपासूनंच मनाची येरझार यवतमायले सुरू होती. असे वाटे कवा जावं नं कवा नाई.

दोयपारचं जेवन नाई होत तं म्या झोरा (पिशवी) उचलला. त्यातनी सकायीचं लुंगी आन् एक चादर ठुली होती. प्रेयसीले सांजीले भेटाले जाचं असनं तं हा असा सकायपासून चिंत हरपून बसते तं तुमी मले सांगा तिले भेटाले जानं आन् पयलं कविसंमेलन यातनी फरक काय अस्ते? बोरीवून दोयपारी दोन वाजता निंघालो तं सव्वातीन वाजता यवतमायले पोचलो. इचार केला इतक्या आंधी सुद नाई दिसनार मंग भाडय़ाची सायकल काढून दोस्ताकडं गेलो. म्हणलं त्याले सांगनयी होते आन् आपला टाईमपासयी होते. त्याच्या घरी बसलो पन चित सारं तिकडं. आखरीले साडेचार वाजता सारस्वत चौकात आलो काऊन का ते आफिस त्यायच्याच बंगल्यात होतं. मी आफिसात जाऊन काय पाह्यतो तं दिग्रसवाली कवी मंडयी माह्या पयले हजर. मनात म्हणलं चाला निरी आपल्यालेचं घाई होती असं नाई.

आमचं कविसंमेलन त्यायनं त्या राती टाऊन हालवर्त ठेवलं हाय असं आमाले सांगण्यात आलं तं आमाले लय खुसी झाली, काऊन का त्यावक्ती कोन्त्यायी सुद्या कार्यकरमाची जागा टाऊन हालचं राहे. आमाले हालवर चाला म्हनलं तवा आमी खुसीनं निंघालो का हाल आयकनार्‍यायनं खचाखचं भरला असंनं. जवा आमी हालपासी पोचलो तवा पायतो तं काय हाल उघडून द्याले आलेला नगरपालिकेचा चपरासी कुलूप उघडत होता. भाहेरच्या भितीवर पांढर्‍या कागदावर्त काया शाईनं बोरूच्या कांडीनं लेयल्यावानी कविसंमेलनाची तेवढीचं जाहिरात चिपकवून होती. असी जाहिरात आन् दुसरं म्हणजे सारे कवी नईनं मंग लोकायनं कावून याव म्हंतो मी. आमी आतनी गेलोतं मोठी सतरंजी आथरून तिच्या तिकडच्या टोकाले चार मानसाले बसता इन असा तकतपोस, त्याच्यावर एक लहान सतरंजी. आमी असं ठरोलं, का स्टेजवर जो संचालन करन फ कस्त त्यानं बसाचं, बाकीच्यायनं सामोर. काऊन का आमी सार्‍यायनं स्टेजवर बसतो म्हनलं तं आयकाले सतरंजीचं राह्यली असती. असं ठरलं का सुभाष परोपटे संचालन कराचं आन् ज्याचं नाव घेतलं त्या कवीनं स्टेजपासी उभं राहून कविता म्हनायची. सुभासनं बोलनं चालू केलं तो आवाज स्पिकरातून भाहेर गेल्यानं दोन-दोन करता सातजन झाले. श्रोते होते असंतं सांगाले मोकये झालो. किती होते कायले सांगाचं. आखरीले सुभासनं माहा नाव घेतलं. उठतानी मनात आलं म्हनलं सातजनाचे काई सतरा झाले नाई, पन म्हनलं सतरानं खतरा कायले सात शुभ आकडा हाय. हे सातची बोहनी पुढच्या कविसंमेलनात सातसे आनल्यासिवाय राह्यनार नाई.

म्या स्टेजपासी जाऊन कविता चालू केली आन् चार-पाच जनं समोरच्या दाठ्ठय़ापासूनचं व्वा व्वा करतं आले. मनात म्हनलं याले म्हन्ते पायगुन. त्यायच्या व्वा व्वा नं कार्यकरमात एकदम जीव वतला पन तवाचं ध्यानातं आलं का ते वतूनचं इथं आले हाय. म्या नुकताचं आर्केस्ट्रा सोडला होता आन् हे त्याचेच श्रोते होते. त्यायनं कविता झाल्याबराबर बम्म टाया वाजोल्या. काऊन का ते बम भोले झाले होते ना, मी आर्केस्ट्रात असतानी जस्या वर्‍हाडी कविता म्हनो तसी एक कामेडी कव्वाली म्हनो. 'एक चायके प्यालेने दिवाना बना डाला, मस्ताना बना डाला' त्यायनं त्या कव्वालीची फरमाईस केली. सुभासच्या ध्यानात आलं का हे मंडई काई आयकत नाई म्हून तो मले म्हने, बाबा होऊ न जाऊ दे आता म्या म्हनलं आलीया भोगासी तो काई राती दहाले बंदचा जमाना नोता. कार्यकरमचं नव साडेनवले चालू होये, त्याच्याच्यानं आमाले जेवाले घालूनचं त्यायनं आनलं आन् कविसंमेलन अटपल्यावर्त आफिसात नेऊन सोडलं. तिथं बाजूच्या हाल सारक्या खोलीत आमच्या गाद्या टाकून ठुल्या होत्या. याच्या आंधी माही फकस्त सुभास परोपटे संग ओयख होती. आता सार्‍यायची ओयख झाली, चर्चा झाली आन् सकायी चार पावतर कविसंमेलनानंतरच कविसंमेलन रंगत गेलं. माहा फायदा असा झाला का मले हे दोस्त भेटल्यानं माहा दिग्रसले सुरेशकडं आन् त्याचं कवा कवा बोरीले येनंजानं सुरू झालं. दया आन् राजू मिश्रची गढीपासची खोली आमच्यासाठी ऐदी हाऊस झालं. रामाच्या देवयात मंधा मंधात कविसंमेलन व्हाले लागले. त्या मिसानं होनार्‍या भेटीतून 'इरवा' हा माझा कवितासंग्रह काढाचं ठरलं. बाकी त्याचा इतिहास एका भागात म्या तुमाले सांगतलाच हाय. आता तुमाले सांगून खरं नाई वाटनारं, पन दिग्रसच्या मंडयान काढलेला 'इरवा' हा कवितासंग्रह 'ना नफा ना तोटा' या बेसवर इकाचं ठरल्यानं 1977 साली निघालेल्या त्या पुस्तकाची किंमत ठुली होती एक रुपया साठ पयसे. लहानस्या शयरात काढूनयी दोन वर्सात ते पुस्तकं आऊट ऑफ मार्केट. रगतात धंदा असताना आता पावतर पाच, सा आवृत्ता निंघाल्या तिथचं मांग राह्यलो आपन!

भाऊसाहेब पाटणकर मराठी शायरीचे जनक पन त्यायचं या मातीवर्त आन् वर्‍हाडी बोलीवर लय पिरेम. त्यायनं पयलं वर्‍हाडी साहित्य संमेलन यवतमायात भरवलं त्यावक्ती मी एकदम नवखा कवी होतो. भाऊसाहेब, पां. श्र. गोरे, प्रा. सोटे सायेब यायच्या म्होर एवढय़ा मोठय़ा स्टेजवून आन् इतक्या हजारानं असलेल्या लोकायसमोर आपल्याले कविता म्हनाले भेटनार हाय, याची भलकाई खुसी मले झाली होती. त्या संमेलनाचा दुसरा फायदा हे झाला का अनेक लेयनार्‍याय संग ओयखी झाल्या. त्यातनी आकोल्याचे तीनजन होते श्रीकृष्ण राऊत, नारायण कुळकर्णी कवठेकर अन् पुरुषोत्तम बोरकर. काई लोकायच्या ओयखी ओयखी पावतरचं राह्यल्या पन यायची ओयख दोस्तान्यात बदलनार हाय हे जसं नियतीनं ठरूनचं ठुलं असावं.

शिरीकिह्या तवा मोठे भाऊ बॅंकेत बोरगाव मंजूच्या शाखेत असल्यानं त्यायच्यापासी राहून आकोल्याच्या कालेज मंदी सिकत होता. एका दिसी मी बोरीवून सकायी निंघून पयले बोरगावले उतरलो. शिरीकिह्याच्या वयनीनं केलेला सयपाक त्याच्यासंग बसून भरपेट जेवलो. आलेल्याले परकेपना वाटू नये असा सार्‍यायचा सभाव. दोयपारी तिथून आमी दोघ आकोल्याले पुरुषोत्तमकडं आलो. तवा तो जयहिंद चौकात मायबापासंग राहत होता. त्याचे बावाजी म्हंजे सावली देनारं झाड आन् माय मायाळू होती हे निल्ख सांगाची गरज हाय का? ते तं होतीचं पन चालता बोलता वर्‍हाडी म्हनीचा खजिनाचं. पयले कविता लेयनार पुरुषोत्तम बोरकर त्याच्या 'मेड इन इंडिया' या कादंबरीनं अख्ख्या महाराष्ट्राच्या ओयखीचा झाला तं नारायण कुळकर्णी कवठेकर गं्रथालीच्या कविता दशकाची याचा एक कवी म्हणून नईन लेयनार्‍यासाठी कवितेचा सगर (रस्ता) झाला तं अभ्यासून लेयलेल्या कोरकू वरच्या आदिवासी कविता आन् गझलावर्त त्याची असलेली हुकमत अनेक संगीतकारायले चाली देन्याच्या मोहात पाडनारी ठरली हाय. एका अंकुर साहित्य संमेलनाचा अध्यक्ष झाला नारायणसी, वि.सा. संघाच्या वाशीम साहित्य संमेलनाचा अध्यक्ष काय, 'युगवानी'चा संपादक काय! एकावक्ती संगमंग राह्यनारे इतले उची झाले का आपलातं त्यायच्या डांगीले हात नाई पुरत. असे लेयन्यानं मोठे झालेले आपले दोस्त असनं हेही आपली इस्टेटच अस्ते कानी?

(लेखक हे नामवंत वर्‍हाडी कथाकार आहेत. 'बॅरिस्टर गुलब्या' हा त्यांचा एकपात्री कार्यक्रम अत्यंत लोकप्रिय आहे.)

भ्रमणध्वनी - 9420551260

आना कुकाची वाटी!''

''रेखे.. व रेखे.. कुठी गेली लेकाची पोट्टी?''

'' काय म्हनता बाबा?''

'' पावने पाहाले येऊन राह्यले तुले.''

''मले?''

''नाही तर काय तुह्या मायले पाहाले येतीन? वा रे वा पोरगी ! चाल.''

'' कपळे गिपळे घाल.''

'' कपळे तं माह्या आंगावरच हायेत.''

''अवं भयाने.. गाऊनवर पाव्हन्यापुढे जाशीन काय? साळीगिळी नेस.. कुठी गेली तुही माय?''

''देवळात गेली.''

'' जाय बलाव पटकन.. घरी पावने येऊन राह्यले अन् हे दिवा घेऊन फिरते..वारे वा बायको.. ओ पिंटय़ा.. इकडे ये..

कुठी गेलता?''

'' मॅच पाहाले.''

'' ससरीच्या दिवसभर क्रिकेटच पाह्यत राह्यतं काय? मी काय सांगतो ते आयकून घे.. आपल्या घरी पावने येऊन राह्यले.. पलाटात जाऊन मोठे बाले बलाव.. तिकून येता येता बाप्पूले आवाज देजो.. अन् येतायेता मोठे बाच्या घरच्या नव्या चादरा आणजो.. जाय पटकन.. लायने..तू आपली बैठक झाडून घे.. अन् ते झालं की दारापाशी रांगोईमांगोई टाकजो.''

'' बाबा, आई आली.''

'' कुठं गेलती पाखराले पानी घेऊन? घरी पावने येऊन राह्यले अन् हिंडत बसते भवानी.''

''कोनते पावने?''

'' रेखीले पाहाले येऊन राह्यले.''

'' एवढय़ा लवकर?''

'' ते म्हणत दिवाई झाली की अटपून टाकू .. ''

'' कोन्या गावचे येऊन राह्यले?''

''वांगरगावचे! आताच येऊन राह्यले अकरा वाजता..पोरगा स्वत: येऊन राह्यला.''

''काय करते पोरगा?''

'' पोराची हाटेल हाय फाटय़ावर! दोन मजली मकान हाय.. चार एकर वावर हाय.. निव्र्यसनी पोरगा हाय.. सुपारीचं खांड खात नाही..जमलं तं आजच फायनल करून टाकू.'' ''असे वक्तावर पावने येत असतात काय? आगुदर काहून सांगतलं नाई?''

'' आता फोन आला त्याहीचा.. तू लवकर सैपाकाले भीड..

झांबल झांबल करू नको.''

'' घरात सौदा नाही.. भाजीपाला नाही.''

'' आता बलावतो सौदा.. सोन्या इकडे ये.. शंकरच्या दुकानातून सौदा घेऊन ये..''

'' काय काय आनू?''

'' तुह्या मायले इचार.. कागदावर लिस्ट कर.. येता येता भाजीपाला आणजो. .आलू.. वांगे.. संभार.. जाय पटकन.. ओ पक्या.. इथं एक पाट आन पाय धुवाले.. पान्याची बकेट भरून ठेव.. नवं साबन आन.. साबनाचा कागद काढू नको.. आपच लागलं तर काढतीन ते..चला रे पोरंहो बाहीर खेळा..''

'' पावने आले बाबा..''

'' आले काय? या या.. नमस्कार.. कुर्त्याले भिऊ नका.. काही करत नाही..या आबा.. बसा गादीवर.. तढवावर कायले बसले? बाबू पंखा लाव.''

'' पंखा राहू द्या.. तशीच थंडी वाजून राह्यली.''

'' बाबू पानी आन..चहा आन.. हे मेसूरवाले पावने कोन हायेत?''

'' मी वयख करून देतो.. हे पोराचे मावसे.. हे चुलते..हा पोरगा.. अन् हे पोराचे आबा! या बुढय़ानं उशीर केला.. बुढा वक्तावरच दाढी कराले गेला.. म्हणून पह्यली एसटी हुकली.''

'' काही हरकत नाही.. तुम्ही च्या घेत ना काय? मंग दूध घ्या.. पिंटय़ा.. एक शिंगल दूध सांगजो.. अरे नरम सुपारीचं कूट आनलं नाही काय? कूट आन आबासाठी.'' '' तुमच्या घरच्या म्हशीचं दूध आहे वाटते?''

'' घरचीच म्हैस हाये.. उकळय़ाचं दूध पतलं भेटते.''

'' हो राज्या.. डेअरीवरचं दूध लय पतलं भेटते.''

'' त्याले काय चव राह्यते हो? घ्या पान.''

'' बलावा पोरीले.. उशीर कायले करता?''

'' जाय रे मंग्या .. बाइले बलाव.''

'' आपले किती घरं हायेत या गावात?''

'' दहा-बारा घरं हायेत.. सरपंचीन आमच्या घरातलीच झाली, मागच्याच मयन्यात इलेक्शन झालं.''

'' कोन झाली सरपंचीन?''

'' आमच्या पुतण्याची बायको झाली! सरपंचपद लेडीज राखीव झालं, मग यानं बायको निवडून आनली.''

'' आमच्याही गावात बाईच सरपंच आहे.. तिले काहीच येत नाही.. सारा कारभार नवराच पाह्यते..हे फक्त नावालेच सरपंचीन झाली.''

''असंच हाय जिकडे तिकडे.. सरपंच बायको होते अन् नवरा तिच्या खांद्यावर बंदूक ठेऊन गोई मारते.''

'' आली पोरगी.''

'' ये बाई.. बस पाटावर.. विचारा नावगाव.''

'' काय नाव बाई?''

'' लेखा.''

'' शिक्षण?''

'' मॅटलीक फेल.''

'' जन्मतारीख?''

'' सोला हजाल नव्वद.''

'' पोरगी जरा तोतरी बोलते काय?''

'' हो ..लहानपनापासून तोतरी बोलते.''

'' सध्या काय शिकून राह्यली?''

'' कांपुटल शिकून राह्यली.''

'' सार्‍याइच्या पाया लाग बाई अन् जाय घरात.''

'' मंग सांगा तुमची पसंती.''

'' पोरगी तशी पसन हाय पन..''

'' पन काय?''

'' जरा तोतरी बोलते.''

'' मंग?''

'' आमाले इचार करा लागीन.''

'' पोराच्या मामाले इचारा.. बोला मामा.''

'' काही इचार करू नका.. आमचा पोरगाबी जरा तोतरा हाये.. बोलताखेपी

जीप ओढते.. काही लांबन लावूनका..घ्या आटपून.''

'' पन हुंडय़ाची सोय नाही आमची.''

'' हुंडा कोनाले पाह्यजे हो? जोळय़ाले जोळा झाला.. याच्यापेक्षा काय पाह्यजे? रजिस्टर लगन करून टाकू..आना कुकाची वाटी!''

(लेखक हे नामवंत वर्‍हाडी कथाकार आहेत.)

भ्रमणध्वनी-9561226572
     

तारुण्यातील शिकवण


दोन भिन्न कुटुंबातील भिन्न संस्कार झालेल्या व्यक्ती काही कारणाने एकत्र येतात. त्या वेळी त्यांच्यातील संवाद आणि वर्तन औपचारिकतेच्या मर्यादेबाहेर गेल्यास त्यातून वेगळ्या सामाजिक समस्या निर्माण होतात. आणि त्या समस्यांच्या परिणामाने भयावह रूप धारण केले की, त्या समाजव्यवस्थेच्या पारंपरिक बाबींना हादरे देतात. घटिताने समाज गोंधळून जातो. हे घडले कसे? मानवी जीवन एवढे हिंसक असू शकते का? मानवतावाद, सहानुभूती या बाबींना काही अर्थ आहे की नाही? असे अभिप्राय मग सहजपणे व्यक्त होतात.

वास्तविक स्त्रीदेहाच्या आकर्षणातून निर्माण होणारी शोकांतिका किंवा विध्वंस आदिम आणि पुरातन आहे. स्त्रियांसाठी झालेली युद्धे जगाच्या पाठीवर सर्वश्रुत आहेत. या विध्वंसात कधी स्त्री स्वत: बळी गेली, तर कधी अनेकांना जावे लागले.

आजच्या व्यक्तिस्वातंर्त्याच्या काळात मात्र स्वत: स्त्रीने हे संदर्भ बदलणे ही काळाची गरज झाली आहे. जगातील अनेक देशात स्त्रियांनी स्वत:च्या कर्तृत्वाने आणि मानसिकतेने सन्माननीय स्थान निर्माण केले आहे. महिला राखीव धोरणामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेत वाढलेला स्त्रियांचा वावर लक्षवेधी आहे. गावाचे पंचवीस वर्षापूर्वीचे चित्र डोळ्यासमोर आणले तर असे दृश्य दिसायचे की, मुली थोडय़ा मोठय़ा झाल्या म्हणजे स्त्रियांसोबत शेताशिवारात खुरपणी, कापणी अशा शेतकामासाठी जायच्या. आज मात्र मुलींचे थवे शालेय गणवेशात दिमाखाने शाळेत जाताना दिसतात.

स्त्रीशिक्षणाचा प्रसार आज खर्‍या अर्थाने शिगेवर झालेल्या अगदी दूरवरच्या खेडय़ापर्यंत झालेला दिसून येतो. परिणामी, बहुतेक भूतबाधेचे, करणी-कवटाळ इत्यादी अंधश्रद्धाळू बाबींचे प्रमाण कमी झाले आहे. आज मुलींमधील संकोच भावही मोठय़ा प्रमाणावर कमी झालेला दिसून येतो. मुले-मुली शाळा-कॉलेजमधून एकाच वर्गातून वावरू लागले. कधी कामाच्या व नोकरीच्या निमित्ताने स्त्री-पुरुष सहवास वाढू लागला. दीर्घ सहवासातूनच प्रेम आणि मिलन ह्या गोष्टी घडून येत असतात. चर्चा आणि संवाद यातून परस्परांविषयीची ओढ निर्माण होते. समान विचारधारा, आवडीनिवडी आणि गुणधर्म यातून आकर्षण निर्माण होते. आकर्षणाच्या पूर्तीसाठी वेगवेगळ्या ठिकाणी सोयीच्या वेळा ठरवून भेटीगाठी होऊ लागतात. त्यातून आधी भावनिक आणि मग शारीरिक निकटता अपरिहार्य बनते. या निकटतेच्या ओढीलाच प्रेम असे म्हणतात. हे प्रेम निर्माण होण्याची वेळच खरी धोक्याची वेळ असते. कारण चिरकाल टिकणारे असे गुणधर्म नसले तरी त्यातूनच पुढे विसंगती आणि विकृती निर्माण होते. बर्‍याच वेळा एकतर्फी प्रेम निर्माण होण्यासही सहवासातील मूळथोंब लक्षात न येणे; ही बाब कारणीभूत ठरते. अशा एकतर्फी प्रेमातून पाशवी हत्या घडू शकतात 'लव्ह' स्टोरींचे रूपांतर 'क्राईम' स्टोरीमध्ये होऊ शकते. आजच्या उत्तान प्रसारमाध्यमातून जाहिरातींमधून मुलींच्या वेशभूषेत आणि वागण्या-बोलण्यात नको तेवढा धीटपणा आलेला असतो. टीव्हीवरील मालिका, चित्रपटांतील अर्धनग्न नायिकांप्रमाणेच आपणसुद्धा दिसले पाहिजे किंवा इतरांपेक्षा आपण भारीच स्मार्ट आहोत, आपले खूप चाहते, दिवाणे आहेत, असे संस्कार उमलत्या वयात मुलींवर प्रसारमाध्यमांतूनच केले जातात. पुरेसे बौद्धिक अथवा सामाजिक भान येण्यापूर्वीच हे संस्कार अर्धकच्च्या स्वरूपात झालेले असल्यामुळे कधी केवळ उथळ कल्पकतेतून भिन्नलिंगी आकर्षण निर्माण होते. त्यात कधी मैत्री झालेला एखादा अपरिपक्व मानसिकतेचा युवक दुखावला जातो. आपण जिच्यावर एवढे जिवापाड प्रेम करतो ती दुसर्‍याच्या प्रेमात गुंतली आहे असा संशय आला की, त्या तथाकथित एकनिष्ठ एकतर्फी प्रियकराचा जळफळाट होतो. आधी वैयक्तिक पातळीवर त्याला त्रस्त करणारा हा मानसिक उद्रेक, मग एखाद्या अवसानघातकी क्षणी हिंसेत रूपांतरित होतो.

कधी स्वत:च्या दिमाखडौल मिरवताना तर कधी भावनेच्या भरात अशा दोन्ही प्रकारात मात्र बळी तो प्रेयसीचाच. कारण कधी कधी आपणच टाकलेल्या मोहजाळात अटळपणे त्यांना गुरफटून घ्यावे लागते आणि त्यांच्या लायक नसलेल्या भर्ताड प्रियकराशी नाईलाजाने विवाह करावा लागतो. जेव्हा मनावरची भावनेची झापड दूर होते, तेव्हा आपल्या हातून फार मोठी चूक झालेली आहे हे लक्षात येते. ही जन्मगाठी जीवकाचणी कुरतडत- कुरतडत मनाला आतल्या आत खात राहते. मुळाशी लागलेल्या भुई उधळीने ओलसर खोडाचं खोडूक होऊन जाते. असे अभावग्रस्त मानसिकतेचे संसार कधीही सुखी होऊ शकत नाहीत. कारण वेगवेगळ्या कारणांनी आर्थिक, सामाजिक स्तर खालावलेल्या अवस्थेत कुठं कोणी सुखी होत असतं का?

आईवडिलांच्या नजरेआड होणं हे आजच्या मुलामुलीचं भागधेय झालेलं आहे. शिक्षण किंवा नोकरीच्या ठिकाणी वेगळ्या कुटुंबातील व्यक्तीशी संवाद, चर्चा करताना पुरुष सहकार्‍याच्या नजरेत तसा भाव दिसला तर त्याला योग्य वेळी योग्य ती समज देण्याची मुलीची तयारी असली पाहिजे. म्हणजे पुढचे बरेच अनर्थ यामुळे टळू शकतात. प्रेमप्रकरणातील भाबडेपण आणि अनाकलनीय दुबरेध संदिग्धता हाच खरा अडसर असतो. म्हणूनच अशा वेळी मनभावीपणाच्या व आत्मगौरवाच्या आहारी जाणे योग्य ठरत नाही. आंतरजातीय विवाहाच्या संदर्भात भविष्याचा सारासार विचार करून योग्य तो निर्णय घेण्याची क्षमता आणि डोळस भान आजच्या काळातही विशेषत: ग्रामीण भागात आवश्यक आहे. कारण इथे प्रत्यक्ष संबंध भोवतीच्या प्रदूषित सामाजिक पर्यावरणाशी असतो.

आजच्या कुटुंबसंस्था विघटनाच्या काळात आर्थिक मिळकत ही अपरिहार्य बाब आहे. पूर्वीच्या संयुक्त कुटुंबात कळपातळ्या प्राण्याप्रमाणे बरेच माणसंही आयुष्य फरफटत न्यायचे किंवा अबाधितपणे कौटुंबिक संस्कारातून ते नेलं जायचं. म्हणूनच जोडीदाराची निवड करताना त्याच्या आर्थिक सक्षमतेचा परस्परांनी विचार करणे आवश्यक ठरते.

उमलत्या वयात भिन्नलिंगी आकर्षण आणि ओढ निर्माण होणे ही बाब नैसर्गिक असली तरी तिला एकारलेपण येऊ नये म्हणून या वयातच लैगिंक शिक्षणाची गरज असते. बारावीच्या विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना मानवी गुप्तेंद्रियांच्या प्रयोजनासंबंधी कळत-नकळत अभ्यासक्रमातूनच माहिती मिळत जाते. याच पद्धतीने कला शाखेच्या विद्यार्थ्यांची आकलनक्षमता त्याला नेमलेल्या अभ्यासक्रमातून कथा-कवितांच्या माध्यमातून वाढवता येऊ शकते. त्याचे भान अभ्यासमंडळाला पाठय़क्रमाची निवड करताना आवश्यक असते. त्याचा अभाव जाणवतो.

प्रेमसंबंधातील छुप्या व एकतर्फी भावना कधीही घातकच असतात. त्यातूनच 'लव्ह स्टोरी'चे 'क्राईम स्टोरी'त रूपांतर झालेले समाजात अनेक वेळा दिसून येते. एकमेकांच्या वर्तनात किंवा आपल्या भोवतीच्या कुणाच्या वर्तनात अशी दग्ध संक्षिप्तता कोडे निर्माण करण्याची शक्यता निर्माण होत असल्यास वेळीच त्या कोडय़ाचा उलगडा होणे आवश्यक असते. त्यातूनच पुढच्या निखळ मैत्रीभावाची पेरणी होत असते. आकर्षणातली मोहतुबी काव्यमयता अनुभवणे काही काळ आनंददायी वाटत असले तरी त्यातून पुढे दु:खदायी कुरूपता निर्माण होत असते. पूर्वीच्या वर्ग अकरावीच्या मराठीच्या पुस्तकात कुसुमाग्रजांची ' प्रेम म्हणजे' ही अतिशय छान कविता होती. या वयात निर्माण होणार्‍या प्रेमांकुराला कोणत्या भावनेचे खतपाणी घालावे, याचे अतिशय समर्पक दिशादर्शन या कवितेत होते. म्हणूनच त्या वयातील भावनेच्या झुल्यावर हिंदोळे होणार्‍या मनाला एकदम व्यवहाराच्या रस्त्यावर आणून उभे करण्याचे काम ही कविता करते.

पुरे झाले चंद्र, सूर्य, पुरे झाल्या तारा,

पुरे झाले नदी, नाले, पुरे झाला वारा ..,

अशी भावनिक धूसरता बाजूला सारून प्रेम म्हणजे खरं काय असतं? हे या महाकवीने फारच भेदकपणे उमलत्या पिढीला समजावून सांगितले आहे. अतिरेकी, भाबडय़ा, आंधळ्या प्रेमात पडलेला तो त्याचा आणि तिचाही व्यक्तिमत्त्व विकास विसरतो आणि तिच्या नकारानंतर क्रोधाच्या मद-मोह, मत्सराच्या आहारी जाऊन नको ते कृत्य करतो. अशा प्रेमवीरांना इशारा देताना कुसुमाग्रज म्हणतात,

''शब्दांच्या या धुक्यामध्ये अडकू नकोस,

बुरुजावरती झेंडय़ासारखा फडकू नकोस ..''

आणि मग प्रेम कोणासारखं करावं याचे आदिम व पौराणिक संदर्भ ते फारच समर्पक रीतीने देतात. अभ्यासक्रमात नेमलेल्या अशा अभिजात कथा-कवितांमधून त्या विशिष्ट वयात विद्यार्थीं-विद्यार्थिंनींच्या मनावर जे संस्कार होतात ते चिरस्थायी स्वरूपाचे आणि त्यांचे भवितव्य घडवणारे असतात.

(सदानंद देशमुख हे साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखक असून 'बारोमास', 'तहान' या त्यांच्या गाजलेल्या कादबंर्‍या आहेत.)

मु.पो. जानेफळ, ता. मेहकर, जि. बुलडाणा

'शिका'मध्ये 'शिकवा' हे अपेक्षित नाही का?


गेल्या वर्षी जालंधर येथील बोधिसत्त्व आंबेडकर पब्लिक स्कूलचे संस्थापक अध्यक्ष सोहनलाल जिंढा यांचे या शाळेच्या वर्धापनदिनानिमित्त निमंत्रण होते. इंग्रजी माध्यमाची एखादी चांगली शाळा महाराष्ट्रातल्या आंबेडकरी अनुयायांनी काढली असल्याचे मला माहीत नाही. एवढेच नाही, तर सर्वच जातिधर्माच्या लोकांना आजच्या शिक्षणसंस्थांच्या स्पर्धेत आंबेडकर अनुयायांनी सुरू केलेल्या एखाद्या शाळेत जावे आणि आपला पाल्य त्या शाळेत शिकतो आहे हे त्यांनी इतरांना अभिमानाने सांगावे अशीही एखादी मराठी माध्यमाची शाळा महाराष्ट्रात चालू असल्याची मला माहिती नाही. सर्वाना सोडून देऊन मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांबद्दलच असा प्रश्न का विचारावा याचा काहींना थोडा रागही येण्याची शक्यता नाकारता येत नाही; पण त्याचे कारणही तसेच आहे. सर्व क्रांतिकारक परिवर्तन शिक्षणाच्या माध्यमातून घडू शकते याची जाणीव 19व्या शतकातल्या सर्व महापुरुषांना झाली. म्हणूनच 19व्या शतकात महात्मा फुले यांनी शाळा सुरू करून आपल्या कार्याचा आरंभ केला. लोकमान्य टिळकांनी आणि आगरकरांनी चिपळूणकरांच्या सहकार्याने न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली. राजर्षी शाहू महाराज कोल्हापूर संस्थानचे असले तरी त्यांना शिक्षणाचे महत्त्व किती कळले होते याची आम्हांला माहिती आहे. कर्मवीर भाऊराव पाटलांनी स्थापन केलेल्या शिक्षणसंस्थेचा केवढा मोठा वटवृक्ष झाला. महर्षी कर्वे यांनी स्त्रियांच्या शिक्षणासाठी सगळे आयुष्य वेचले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्याच मालिकेतले

महापुरुष आहेत. म्हणूनच त्यांनी प्रचंड कार्य करीत 1945 साली 'पीपल्स एज्युकेशन सोसायटी'ची स्थापना केली. या सर्वच महापुरुषांना शिक्षण किती महत्त्वाचे वाटत होते हे कुणी वेगळे सांगायला नको. अशा या महापुरुषांच्या शाळेत अथवा महाविद्यालयांत शिक्षण घेतलेल्या अनेकांनी त्यांच्यानंतरच्या काळात यथाशक्ति गावोगावी शिक्षणाचा प्रसार केला हेही आपल्याला माहीत आहे. उदाहरणादाखल मी काही कार्यकत्र्यांची नावे घेऊ शकेल. विदर्भातले खडसे, पंजाबराव देशमुख, सोलापूरचे जगताप, कोल्हापूरचे कॉ. पानसरे, मराठवाडय़ातील केशवराव धोंडगे, गोविंदभाई श्रफ, विनायकराव पाटील हे नंतरच्या काळातही शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून विशेष प्रयत्न करणारे कार्यकर्ते होत. या पिढीला थोडेबहुत का होईना अनुदानाचे पाठबळ मिळाले आणि शिक्षणाचा प्रसार महाराष्ट्रभर झाला. दुसर्‍या फळीतल्या शिक्षणप्रसारकांच्या शाळा-महाविद्यालयातून ध्येयवादी तरुण निर्माण झाला नसेल; पण या शाळेतल्या विद्यार्थ्यांमधून एक नवा मध्यमवर्ग महाराष्ट्रात निर्माण झाला हे नाकारता येत नाही. 'डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मिलिंद महाविद्यालयाचे आम्ही विद्यार्थी आहोत' हे अत्यंत गर्वाने सांगणारे आंबेडकर अनुयायी आहेत तसे जन्मदलित नसणारे, पण ज्यांच्या आयुष्यात बदल घडून आला असेही असंख्य विद्यार्थी मला माहीत आहेत, जे आंबेडकर अनुयायांइतकेच अभिमानाने आपण मिलिंदचे विद्यार्थी आहोत असे सांगतात. बाबासाहेबांच्या मिलिंद हायस्कूल अथवा काँग्रेसचे अपवादात्मक उदाहरण सोडून दिले तर दुसर्‍या टप्प्यावर आणि अनुदानाच्या मदतीने का होईना शाळा, कॉलेज नेटाने चालू ठेवणारे आंबेडकर अनुयायी किती आहेत?

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे पूर्वकालीन अथवा समकालीन महापुरुष शिक्षणाचे महत्त्व ओळखत होते. पण त्यांच्यापैकी कुणीही आपल्या आयुष्याचे घोषवाक्य 'शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा' असे दिलेले नाही. याचा अर्थच असा, की अन्य सर्व महापुरुषांच्या तुलनेत शिक्षणाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना वाटणारे महत्त्व निश्चितच मूल्यात्मकदृष्टय़ा वेगळे होते. अशा या पाश्र्वभूमीवर महाराष्ट्रापासून हजारो मैल दूर असलेल्या, फारसे शिक्षण नसलेल्या एका पंजाबी अनुयायाने पब्लिक स्कूल जालंधर येथे स्थापन करावे याचे मोल मला अधिक वाटते. माझी इच्छा असूनही मी जालंधरला जाऊ शकलो नाही. पण हा माणूस 56 वर्षापूर्वी दीक्षाभूमी येथे आला. तो विराट जनसागर पाहून प्रभावित झाला आणि महाराष्ट्रात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातली बौद्धसंस्कार करणारी एखादी शाळा आहे का याचा शोध घेऊ लागला. या शोधात तो विदर्भातल्या पुलगावात आला. हे गाव रसायनीसाठी प्रसिद्ध आहे. लष्कराची स्वातंर्त्यपूर्व काळातली अतिशय महत्त्वाची छावणी असल्यामुळे हे गाव महाराष्ट्रातल्या अनेक मोठय़ा शहरांशी रस्त्यांनी जोडलेले आहे. भंडार्‍याच्या निवडणुकीत या लहानशा गावाने 1954 साली बाबासाहेबांचा सत्कार करून तीन हजार रुपयांची थैली त्यांना दिली. त्या घटनेचे स्मरण म्हणून बाबासाहेबांनी एका रिकाम्या जागेवर कुदळ मारली. तिथे आज बुद्धविहार आहे. 1954 पासून एवढेच नाही, तर तेथील बाबासाहेबांच्या अनुयायांनी स्थापन केलेले एक सिद्धार्थ ग्रंथालय आहे. आज या ग्रंथालयाला साठ वर्षे पूर्ण झाली असून ते तालुकापातळीवरचे 'अ' दर्जाचे गं्रथालय आहे. या ग्रंथालयात बाबासाहेबांच्या अस्थींचा कलशही जपून ठेवण्यात आला आहे.

अशा या गावात सोहनलाल जिंढा आले. या गावातील ग्रंथालय सातत्याने साठ वर्षापासून चालू ठेवणार्‍या गावकर्‍यांची जिद्द त्यांनी पाहिली. अतिशय विपन्नावस्था असूनही साठ वर्षापूर्वी पै-पैसा गोळा करून बाबासाहेबांना तीन हजार रुपयांची थैली देणारे गावाचे औदार्य लक्षात घेतले आणि अस्थिकलश जपण्याची भाविकताकही अनुभवली. महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात किमान एक तरी इंग्रजी माध्यमाचे पब्लिक स्कूल हवे ही त्यांची महत्त्वाकांक्षा. त्यांनी थोडा शोध घेतला आणि त्यांची भेट चंद्रसेन डोंगरे व लता डोंगरे या दाम्पत्याशी झाली. चंद्रसेन बँक अधिकारी तर लता डोंगरे नाटय़कलावंत. मी त्यांचा 'रमाई'चा एकपात्री प्रयोग पाहिला आहे. ही 'रमाई' त्यांनी थेट परदेशात पोहोचवली. हे दाम्पत्य पुढे आले. आयु. जिंढांनी तीन एकर जमीन खरेदी केली. 25 हजार रुपये देणगी देणारे अकरा जण चंद्रसेन यांनी गोळा केले. ही देणगी म्हणजे संस्थापक सदस्यांची वर्गणी आणि सुरू झाली जालंदर येथील बोधिसत्त्व बाबासाहेब आंबेडकर पब्लिक स्कूलची शाखा. अवघ्या पाच वर्षात शाळा, परिसर आणि इमारत या सर्वच गोष्टी नजरेत भरतील अशा या शाळेच्या वर्धापनदिनानिमित्त 'पुलगावला तरी यावे' असे जिंढा यांचे जिव्हाळ्याचे निमंत्रण आले. वर्धापनदिनाचा सोहळा धम्मचक्र प्रवर्तनदिनाच्या दुसर्‍या दिवशी होता. मी माझ्या कल्चरल संस्थेच्या सर्व कार्यकारिणीसह समारंभात सहभागी झालो.

शाळेच्या चिमुरडय़ा मुलांनी नृत्य-गायनाच्या आविष्कारातून भारतीय एकात्मतेचे दर्शन घडवले. खास जालंधरच्या शाळेच्या पंधरावीस तरुण शिक्षकांनी पंजाबचे तर पुलगावच्या शिक्षकांनी महाराष्ट्राचे सांस्कृतिक दर्शन घडवले. जिंढांनी माहिती दिली, या शाळेत 40 टक्के दलित मुले आहेत तर 60 टक्के मुलेमुली गावातली आहेत. जन्मदलित नसलेली, अभ्यासक्रम महाराष्ट्र राज्याचा, पण अध्यापन तेच आणि उपक्रमशीलता यातून संस्कार मात्र बुद्धिप्रामाण्यवादी बौद्धपद्धतीचे. मुलांनी वापराव्यात यासाठी 'ना नफा, ना तोटा' या तत्त्वावर शाळेने छापलेल्या वह्या. या वह्यांची मुखपृष्ठे त्यांच्याच शाळेच्या चित्रांची. अगदी बारीकसारीक तपशिलात आढळून येत होती ती नियोजनबद्धता. कार्यक्रमात चेन्नई येथील विजय मेश्रम, नागपूरचे बिल्डर गुणवंत देवपारे यांनी शाळेच्या मदतीसाठी नजरेत भरेल अशी देणगी दिली, तर जालना येथील दिलीप कोल्हे यांनी फारशी आर्थिक कुवत नसूनही भरीव देणगी दिली आणि तेही अगदी

उत्स्फूर्तपणे. अवघ्या चारपाच वर्षाचे हे रोपटे दहापंधरा वर्षात कसे वाढेल याचा तर्क मी करू लागलो. हवे तर 'बाणाई'च्या सदस्याने सांगावे मी खोटे बोलत आहे का? आज बाबासाहेबांच्या अनुयायांजवळ पुरेसे अर्थबळ आहे. आपण समाजासाठी काही करावे ही इच्छाशक्तीही अखेर आहे. पण सगळा समाज निवडणुकीच्या राजकारणाला जुंपलेला आणि तीर्थस्थळे बांधून संघटित होऊ पाहणारा. विहार, महाविहार बांधून कृतार्थ होणारा. विहारांचे महत्त्व मी मुळीच नाकारत नाही. पण प्राधान्य कशाला द्यावे यालाही महत्त्व द्यायला हवे की नको?

परतीच्या वाटेवर यवतमाळला संध्याकाळ झाली होती. हिवरी येथे असेच एक तीर्थस्थळ लागले. बन्सोड नावाच्या कुण्या श्रद्धाळू अधिकार्‍याने स्वबळावर 3 एकरांत 'जेतवन तीर्थस्थळ' उभे केले होते. नियोजनबद्ध विद्युतरोषणाईमुळे तथागताच्या अनेक मूर्ती त्या विस्तीर्ण प्रांगणात विलोभनीय दिसत होत्या. विहार होता आणि विहारातही अनेक बुद्धमूर्ती होत्या. नांदेडजवळ पोचलो आणि दाभडचे 25 कोटी रुपये खर्च करून उभे राहत असलेले महाविहार पाहिले. खरेतर उमरखेडजवळ मुळावा इथे उभारण्यात आलेले विहार मात्र पाहायचे राहून गेले. धम्मसेवक भन्ते यांनी ते 'तीर्थस्थळ' करण्याऐवजी 'ज्ञानकेंद्र' व्हावे हा उद्योग सुरू केला आहे. प्रतिज्ञांचा आग्रह धरणार्‍या बौद्ध उपासकांना 'तीर्थ' कसे चालले, हा प्रश्न मला अजूनही सुटलेला नाही. बाबासाहेबांच्या घोषवाक्यातील 'शिका' या पहिल्याच शब्दावर अजून आपण रेंगाळत आहोत. संपूर्ण देश 'मूलनिवासी लोकांचा आहे'. सत्ता त्यांच्या हाती केंद्रित कधी होईल? याचा आटापिटा करणार्‍या आमच्या कार्यकत्र्यांना हे कधी कळणार, की त्यासाठी बालवयापासून आपल्या पद्धतीचे शिक्षण द्यायला हवे. ज्या आर्यांना शिव्या घालायच्या त्यांच्याच केंद्रात शिक्षण घेऊन मुले निब्बर होतील याची आपणहून व्यवस्था करायची आणि त्यानंतर तुम्ही 22 प्रतिज्ञांचे पालन का नाही करीत म्हणून उपासकांना दोष द्यायचा ही आपली लोकप्रिय पद्धत. आर्य समाजाने भारतभर गुरुकुल पद्धत रूढ केली. इंग्रजविरोध रक्तात रुजावा म्हणून सनातनी लोकमान्य टिळकांनी न्यू इंग्लिश स्कूल स्थापन केले. इतकेच काय, सत्ता हाती येताच त्या वेळच्या सत्तेतल्या उजव्या मंडळींनी इतिहास विषयाचा अभ्यासक्रम बदलण्याचा कार्यक्रम हाती घेतला. यापैकी कुणासाठीही बाबासाहेबांचे ते घोषवाक्य नव्हते. ते होते दलित, पीडित जनतेसाठी. म्हणूनच 'शिका' या सं™ोचे आपण काय केले, हा प्रश्न इतर कुणालाही विचारण्यापेक्षा बाबासाहेबांच्या अनुयायांनाच विचारला तर त्याचा कुणी राग मानू नये असे मला वाटते. दर पाच वर्षानी नेते एकत्र का येत नाहीत म्हणून आगपाखड करीत स्वत:चा क्रमाने शक्तिपात करून घेतलेल्या जनतेला 'जिल्हा तिथे पब्लिक स्कूल' या दिशेनेही वाटचाल करायला काय हरकत आहे? हजारो मैलांवरच्या सोहनलाल जिंढांना जे सुचले ते आपणाला निदान जाणवायला तरी काय हरकत आहे?

(लेखक हे नामवंत आंबेडकरी विचारवंत व नाटककार आहेत.)

भ्रमणध्वनी : 9881230084