Friday 14 December 2012

असी आपली इस्टेट


शंकर बडेमांगच्या एका भागात तुमाले सांगतलं होत का म्या बोलीतली पयली कविता 'पावसानं इचिन..आर्केस्ट्रात असतानी लेयली होती. त्याच्याच्यानं माही इतर कवीसंग कायी ओयख नोती. फकस्त एकामेकाले नावानं ओयखत होतो. पयल्या कवितेनंतर मंग ह्या कवितेचा झरा वाहतचं होता. एका मांग एक 'उन्हायात गेलो होतो पोरगी पाहाले', 'हाऊसफुलं द्या,' 'झाडाखाली डोस्की' असी रांग लागत गेली आन् आर्केस्ट्राचा स्टेज असल्याच्यानं हौस भागत गेली. असे सात-आठ वर्स निंघून गेले आन् मंग आर्केस्ट्रा सोडा लागला. त्याच्या दुसर्‍या साली यवतमायच्या नेहरू युवक केंद्रात आमा काई कवीले आवतनं देल्लं. त्यातनी बोरीवून मी, दाभा पहूरवून सुभाष परोपटे, दिग्रसवून सुरेश गांजरे, दया मिश्र, राजू मिश्र बाकी एक-दोन नावं इसरलो असनं तं माफी मांगतो. हे जन्मातलं पयलं कविसंमेलन खूप हरकीजलं होतो. त्यायनं बलावलं त्याच्या दोन घंटय़ा आगुदरचं मी तिथं पोचलो. मनात तिथं जाच्या आंधी हे आलंयी का लयचं होईल का हे? आता तुमाले सांगाले हरकत नाई तुमी का दुसरे कोनी नवाडे थोडीचं हा. त्या दिसी बोरीले सकायपासूनंच मनाची येरझार यवतमायले सुरू होती. असे वाटे कवा जावं नं कवा नाई.

दोयपारचं जेवन नाई होत तं म्या झोरा (पिशवी) उचलला. त्यातनी सकायीचं लुंगी आन् एक चादर ठुली होती. प्रेयसीले सांजीले भेटाले जाचं असनं तं हा असा सकायपासून चिंत हरपून बसते तं तुमी मले सांगा तिले भेटाले जानं आन् पयलं कविसंमेलन यातनी फरक काय अस्ते? बोरीवून दोयपारी दोन वाजता निंघालो तं सव्वातीन वाजता यवतमायले पोचलो. इचार केला इतक्या आंधी सुद नाई दिसनार मंग भाडय़ाची सायकल काढून दोस्ताकडं गेलो. म्हणलं त्याले सांगनयी होते आन् आपला टाईमपासयी होते. त्याच्या घरी बसलो पन चित सारं तिकडं. आखरीले साडेचार वाजता सारस्वत चौकात आलो काऊन का ते आफिस त्यायच्याच बंगल्यात होतं. मी आफिसात जाऊन काय पाह्यतो तं दिग्रसवाली कवी मंडयी माह्या पयले हजर. मनात म्हणलं चाला निरी आपल्यालेचं घाई होती असं नाई.

आमचं कविसंमेलन त्यायनं त्या राती टाऊन हालवर्त ठेवलं हाय असं आमाले सांगण्यात आलं तं आमाले लय खुसी झाली, काऊन का त्यावक्ती कोन्त्यायी सुद्या कार्यकरमाची जागा टाऊन हालचं राहे. आमाले हालवर चाला म्हनलं तवा आमी खुसीनं निंघालो का हाल आयकनार्‍यायनं खचाखचं भरला असंनं. जवा आमी हालपासी पोचलो तवा पायतो तं काय हाल उघडून द्याले आलेला नगरपालिकेचा चपरासी कुलूप उघडत होता. भाहेरच्या भितीवर पांढर्‍या कागदावर्त काया शाईनं बोरूच्या कांडीनं लेयल्यावानी कविसंमेलनाची तेवढीचं जाहिरात चिपकवून होती. असी जाहिरात आन् दुसरं म्हणजे सारे कवी नईनं मंग लोकायनं कावून याव म्हंतो मी. आमी आतनी गेलोतं मोठी सतरंजी आथरून तिच्या तिकडच्या टोकाले चार मानसाले बसता इन असा तकतपोस, त्याच्यावर एक लहान सतरंजी. आमी असं ठरोलं, का स्टेजवर जो संचालन करन फ कस्त त्यानं बसाचं, बाकीच्यायनं सामोर. काऊन का आमी सार्‍यायनं स्टेजवर बसतो म्हनलं तं आयकाले सतरंजीचं राह्यली असती. असं ठरलं का सुभाष परोपटे संचालन कराचं आन् ज्याचं नाव घेतलं त्या कवीनं स्टेजपासी उभं राहून कविता म्हनायची. सुभासनं बोलनं चालू केलं तो आवाज स्पिकरातून भाहेर गेल्यानं दोन-दोन करता सातजन झाले. श्रोते होते असंतं सांगाले मोकये झालो. किती होते कायले सांगाचं. आखरीले सुभासनं माहा नाव घेतलं. उठतानी मनात आलं म्हनलं सातजनाचे काई सतरा झाले नाई, पन म्हनलं सतरानं खतरा कायले सात शुभ आकडा हाय. हे सातची बोहनी पुढच्या कविसंमेलनात सातसे आनल्यासिवाय राह्यनार नाई.

म्या स्टेजपासी जाऊन कविता चालू केली आन् चार-पाच जनं समोरच्या दाठ्ठय़ापासूनचं व्वा व्वा करतं आले. मनात म्हनलं याले म्हन्ते पायगुन. त्यायच्या व्वा व्वा नं कार्यकरमात एकदम जीव वतला पन तवाचं ध्यानातं आलं का ते वतूनचं इथं आले हाय. म्या नुकताचं आर्केस्ट्रा सोडला होता आन् हे त्याचेच श्रोते होते. त्यायनं कविता झाल्याबराबर बम्म टाया वाजोल्या. काऊन का ते बम भोले झाले होते ना, मी आर्केस्ट्रात असतानी जस्या वर्‍हाडी कविता म्हनो तसी एक कामेडी कव्वाली म्हनो. 'एक चायके प्यालेने दिवाना बना डाला, मस्ताना बना डाला' त्यायनं त्या कव्वालीची फरमाईस केली. सुभासच्या ध्यानात आलं का हे मंडई काई आयकत नाई म्हून तो मले म्हने, बाबा होऊ न जाऊ दे आता म्या म्हनलं आलीया भोगासी तो काई राती दहाले बंदचा जमाना नोता. कार्यकरमचं नव साडेनवले चालू होये, त्याच्याच्यानं आमाले जेवाले घालूनचं त्यायनं आनलं आन् कविसंमेलन अटपल्यावर्त आफिसात नेऊन सोडलं. तिथं बाजूच्या हाल सारक्या खोलीत आमच्या गाद्या टाकून ठुल्या होत्या. याच्या आंधी माही फकस्त सुभास परोपटे संग ओयख होती. आता सार्‍यायची ओयख झाली, चर्चा झाली आन् सकायी चार पावतर कविसंमेलनानंतरच कविसंमेलन रंगत गेलं. माहा फायदा असा झाला का मले हे दोस्त भेटल्यानं माहा दिग्रसले सुरेशकडं आन् त्याचं कवा कवा बोरीले येनंजानं सुरू झालं. दया आन् राजू मिश्रची गढीपासची खोली आमच्यासाठी ऐदी हाऊस झालं. रामाच्या देवयात मंधा मंधात कविसंमेलन व्हाले लागले. त्या मिसानं होनार्‍या भेटीतून 'इरवा' हा माझा कवितासंग्रह काढाचं ठरलं. बाकी त्याचा इतिहास एका भागात म्या तुमाले सांगतलाच हाय. आता तुमाले सांगून खरं नाई वाटनारं, पन दिग्रसच्या मंडयान काढलेला 'इरवा' हा कवितासंग्रह 'ना नफा ना तोटा' या बेसवर इकाचं ठरल्यानं 1977 साली निघालेल्या त्या पुस्तकाची किंमत ठुली होती एक रुपया साठ पयसे. लहानस्या शयरात काढूनयी दोन वर्सात ते पुस्तकं आऊट ऑफ मार्केट. रगतात धंदा असताना आता पावतर पाच, सा आवृत्ता निंघाल्या तिथचं मांग राह्यलो आपन!

भाऊसाहेब पाटणकर मराठी शायरीचे जनक पन त्यायचं या मातीवर्त आन् वर्‍हाडी बोलीवर लय पिरेम. त्यायनं पयलं वर्‍हाडी साहित्य संमेलन यवतमायात भरवलं त्यावक्ती मी एकदम नवखा कवी होतो. भाऊसाहेब, पां. श्र. गोरे, प्रा. सोटे सायेब यायच्या म्होर एवढय़ा मोठय़ा स्टेजवून आन् इतक्या हजारानं असलेल्या लोकायसमोर आपल्याले कविता म्हनाले भेटनार हाय, याची भलकाई खुसी मले झाली होती. त्या संमेलनाचा दुसरा फायदा हे झाला का अनेक लेयनार्‍याय संग ओयखी झाल्या. त्यातनी आकोल्याचे तीनजन होते श्रीकृष्ण राऊत, नारायण कुळकर्णी कवठेकर अन् पुरुषोत्तम बोरकर. काई लोकायच्या ओयखी ओयखी पावतरचं राह्यल्या पन यायची ओयख दोस्तान्यात बदलनार हाय हे जसं नियतीनं ठरूनचं ठुलं असावं.

शिरीकिह्या तवा मोठे भाऊ बॅंकेत बोरगाव मंजूच्या शाखेत असल्यानं त्यायच्यापासी राहून आकोल्याच्या कालेज मंदी सिकत होता. एका दिसी मी बोरीवून सकायी निंघून पयले बोरगावले उतरलो. शिरीकिह्याच्या वयनीनं केलेला सयपाक त्याच्यासंग बसून भरपेट जेवलो. आलेल्याले परकेपना वाटू नये असा सार्‍यायचा सभाव. दोयपारी तिथून आमी दोघ आकोल्याले पुरुषोत्तमकडं आलो. तवा तो जयहिंद चौकात मायबापासंग राहत होता. त्याचे बावाजी म्हंजे सावली देनारं झाड आन् माय मायाळू होती हे निल्ख सांगाची गरज हाय का? ते तं होतीचं पन चालता बोलता वर्‍हाडी म्हनीचा खजिनाचं. पयले कविता लेयनार पुरुषोत्तम बोरकर त्याच्या 'मेड इन इंडिया' या कादंबरीनं अख्ख्या महाराष्ट्राच्या ओयखीचा झाला तं नारायण कुळकर्णी कवठेकर गं्रथालीच्या कविता दशकाची याचा एक कवी म्हणून नईन लेयनार्‍यासाठी कवितेचा सगर (रस्ता) झाला तं अभ्यासून लेयलेल्या कोरकू वरच्या आदिवासी कविता आन् गझलावर्त त्याची असलेली हुकमत अनेक संगीतकारायले चाली देन्याच्या मोहात पाडनारी ठरली हाय. एका अंकुर साहित्य संमेलनाचा अध्यक्ष झाला नारायणसी, वि.सा. संघाच्या वाशीम साहित्य संमेलनाचा अध्यक्ष काय, 'युगवानी'चा संपादक काय! एकावक्ती संगमंग राह्यनारे इतले उची झाले का आपलातं त्यायच्या डांगीले हात नाई पुरत. असे लेयन्यानं मोठे झालेले आपले दोस्त असनं हेही आपली इस्टेटच अस्ते कानी?

(लेखक हे नामवंत वर्‍हाडी कथाकार आहेत. 'बॅरिस्टर गुलब्या' हा त्यांचा एकपात्री कार्यक्रम अत्यंत लोकप्रिय आहे.)

भ्रमणध्वनी - 9420551260

No comments:

Post a Comment