Wednesday 5 December 2012

महात्मा फुलेंचा 'शेतकर्‍यांचा आसूड'


28 नोव्हेंबर महात्मा फुलेंची पुण्यतिथी. अस्पृश्य गणल्या गेलेल्या पददलितांचे पहिले उद्धारक. हजारो वर्षांच्या भारताच्या इतिहासात मुलींसाठी शाळा स्थापन करणारे पहिले भारतीय. स्त्री-शिक्षणाचे जनक. मानवी समानतेचा पुरस्कार करून चातुर्वण्र्य आणि जातिभेदांवर कडाडून हल्ला चढविणारे पहिले लोकनेते. 'सत्यमेव जयते' या दिव्यतेजाने भारलेले पहिले सत्यशोधक. अशा या नररत्नाचा महात्मा गांधींनी 'खरा महात्मा' म्हणून गौरव करावा यात काहीच नवल नाही. महात्मा

फुलेंचा सामाजिक समतेच्या अंगाने जेवढा स्वीकार व पुरस्कार आपल्या देशात केल्या गेला, तेवढाच त्यांनी शेतकर्‍यांचा घेतलेला कैवार मात्र उपेक्षित राहिला. 1883 मध्ये महात्मा फुलेंनी लिहिलेले 'शेतकर्‍यांचा आसूड' हे पुस्तक. त्यात त्यांनी शेतकर्‍यांच्या अवस्थेचे केलेले विदारक चित्रण, त्यांच्या दुरवस्थेची केलेली कारणमीमांसा, त्यावर सुचविलेली उपाययोजना या सर्व बाबी तुलनेने उपेक्षितच राहिल्या. सामाजिक अंगाने महात्मा फुलेंचा स्वीकार करीत असतानाच शेतकर्‍यांच्या अंगाने असलेल्या महात्मा फुलेंचा 'शेतकर्‍यांचा आसूड' उपेक्षेचा धनी का बनला? महात्मा फुलेंच्या सामाजिक कार्याचा ऊहापोह करीत असतानाच 'शेतकर्‍यांचा आसूड'ला सोयीस्कररीत्या का बगल देण्यात आली? हाच प्रश्न सुप्रसिद्ध विचारवंत डॉ. भा. ल. भोळे यांच्या उपस्थितीत निळू

फुले यांना विचारला होता. (आज दोघेही हयात नाहीत.) या प्रश्नावर दोघेही क्षणभर गोंधळले होते; पण नंतर महात्मा फुलेंचा 'शेतकर्‍यांचा आसूड' उपेक्षित राहिला याची कबुली त्यांनी दिली.

मार्क्‍स आणि जोतिबा फुले जवळजवळ समकालीन. 1873 मध्ये मार्क्‍सचा 'भांडवल' हा ग्रंथ, तर 1883 मध्ये महात्मा फुलेंचा 'शेतकर्‍यांचा आसूड' हा ग्रंथ जवळपास 10 वर्षांच्या फरकाने प्रकाशित झाला. महाराष्ट्रात 'शेतकरी कामगार पक्षा'ची स्थापना झाली, तेव्हा त्यांनी सैद्धांतिक आधार 'मार्क्‍स'मध्ये शोधला. शेतकरी कामगार पक्षातील 'कामगारांसाठी' मार्क्‍सचा आधार घेणे एक वेळ समजू शकते; पण मार्क्‍सप्रणीत शास्त्रात शेतकर्‍यांच्या शोषणाला काहीच स्थान नव्हते. ग्रामीण जीवनाचा 'यडपटपणा' म्हणून उल्लेख करणार्‍या, शेतकर्‍यांना 'बटाटय़ाचे पोते' म्हणून हिणवणारा मार्क्‍स शेतकरी कामगार पक्ष स्वीकारतो; पण याच देशातील महात्मा फुलेंचा 'शेतकर्‍यांचा आसूड' ग्रंथ सैद्धांतिक आधारासाठीही स्वीकारत नाही. पण का? या प्रश्नाचे उत्तर मिळत नाही.

महात्मा फुलेंनी 'शेतकर्‍यांचा आसूड'मध्ये चुकूनसुद्धा छोटा शेतकरी, मोठा शेतकरी, अल्प भूधारक, अत्यल्प भूधारक, बागाइती शेतकरी, कोरडवाहू शेतकरी असा फरक केला नाही; पण महात्मा फुलेंना मानणार्‍यांनीसुद्धा असा फरक करत आजपावेतो शेतकर्‍यांमध्ये भेदाभेद नीतीचा बिनदिक्कतपणे अवलंब केला. येथेसुद्धा महात्मा फुलेंचा 'शेतकर्‍यांचा आसूड' कचर्‍याच्या पेटीतच टाकल्या गेला.

जवळपास 129 वर्षांपूर्वी 'शेतकर्‍यांचा आसूड' मध्ये महात्मा फुले शेतकर्‍यांच्या दुरवस्थेचे बारकाईने वर्णन करतात. ते लिहितात, ''आता मी हल्ली सालचा शेतसारा द्यावा तरी कोठून? बागायतात नवीन मोटा विकत घेण्याकरिता जवळ पैसा नाही. जुन्या तर अगदी फाटून त्यांची चाळण झाली आहे. उसाचे बाळगे मोडून हुंडीचीही तीच अवस्था झाली आहे. मकाही खुरपणीवाचून वाया गेला. भूस सरून बरेच दिवस झाले आणि सरभड गवत कडब्याच्या गंजी संपत आल्या आहेत. जनावरांना पोटभर चारा मिळत नसल्यामुळे कित्येक धट्टेकट्टे बैल उठवणीस आले आहेत. सुनाबाळांची नेसण्याची लुगडी फाटून चिंध्या झाल्यामुळे लग्नात घेतलेली मौल्यवान जुनी पांघरुणे वापरून त्या दिवस काढीत आहेत. शेती खपवणारी मुले वस्त्रावाचून इतकी उघडबंब झाली आहेत की, त्यांना चारचौघांत येण्यास शरम वाटते. घरातील धान्य सरत आल्यामुळे राताळ्य़ाच्या वरूवर निर्वाह चालू आहे. घरात माझ्या जन्म देणार्‍या आईच्या मरतेवेळी तिला चांगलेचुंगले गोडधोड करून घालण्यापुरता मजजवळ पैस नाही. याला उपाय तरी मी काय करावा? बैल विकून जर शेतसारा द्यावा, तर पुढे शेतकी कोणाच्या जीवावर ओढावी? आपला देश त्याग करून जर परदेशात जावे, तर मला पोट भरण्यापुरता काही हुन्नर ठाऊक नाही. कन्हेरीच्या मुळ्य़ा मी वाटून प्याल्यास कर्तीधर्ती मुले आपली कशीतरी पोटे भरतील. परंतु माझ्या जन्म देणार्‍या वृद्ध बयेस व बायकोसह माझ्या लहानसहान चिटकुल्या लेकरांस अशा वेळी कोण सांभाळील? त्यांनी कोणाच्या दारात उभे राहावे? त्यांनी कोणापाशी आपले तोंड पसरावे?''

(महात्मा फुले : समग्र वाङ्मय (पाचवी आवृत्ती) शेतकर्‍यांचा आसूड (पान नं. 298) वरील परिच्छेदात बागायती शेतकर्‍यांचे दु:ख, दैन्य, अगतिकता, असाहाय्यता 129 वर्षांपूर्वी महात्मा फुलेंनी मांडली. विष घेऊन (कन्हेरीच्या मुळ्य़ा वाटून प्याल्यास) आत्महत्येचा विचार त्याही वेळेस शेतकरी करीत होता. आता तो प्रत्यक्ष आत्महत्या करतो आहे एवढाच काय तो परिस्थितीत झालेला बदल.

महात्मा फुलेंनी 'शेतकर्‍यांचा आसूड'मध्ये शेतकर्‍यांची दुरवस्था, त्याची कारणमीमांसा व आपल्या परीने त्यावरील उपाययोजनाही सुचविल्या आहेत. पण उठता बसता 'समतेचा' जप करीत महात्मा फुलेंची जपमाळ ओढणार्‍यांनीसुद्धा शेतकर्‍यांचा आसूड उपेक्षित ठेवून एक प्रकारे महात्मा फुलेंवरही सूड उगवून घेतला.

शेतकर्‍यांच्या दुरवस्थेची कारणं काय?

'शेतकर्‍यांनी लागवडीकडे केलेला खर्चसुद्धा उभा राहाण्याची मारामार पडते.'

'कधी कधी शेतकर्‍याने गाडीभर माळवे शहरात विकण्याकरिता आणिल्यास त्या सर्व मालाची किंमत बाजारात जास्ती-कमती वजनाने घेणारे दगेबाज दलालांचे व म्युनिसिपालिटीचे जकातीचे भरीस घालून गाडीमध्ये अंगावर भरून, त्यास घरी जाऊन मुलाबाळांपुढे शिमगा करावा लागतो.'

(पान नं. 292)

एकूण काय तर शेतीत लागवडीसाठी केलेला खर्चसुद्धा भरून निघत नाही. त्याने बाजारात नेलेल्या मालाचे पैसे तर सोडाच; पण उलट शेतकर्‍यांच्या अंगावरच 'गाडीभाडे' पडते. इ. तपशील महात्मा फुलेंनी 129 वर्षांपूर्वी 'शेतकर्‍यांचा आसूड'मध्ये लिहून ठेवले तरीसुद्धा आजही आम्ही निर्लज्जपणे विचारतोच, ''शेतकरी आत्महत्या का करतात?''

शेतकरी आपल्या मुलामुलींच्या लग्नात वारेमाप खर्च करतात म्हणून ते कर्जबाजारी होतात असे म्हणणारे आजही आहेत. पण 129 वर्षांपूर्वीच महात्मा

फुलेंनी असे म्हणणार्‍यांची टर घेतली होती.

'ऐषआरामात गुंग असणार्‍या व संध्यासोंवळं यामध्ये निमग्न असणार्‍या भट सरकारी कामगारास फुरसत तरी सापडते काय? त्यातून इकडील कित्येक मोठय़ा आडनावांच्या सभांतील सरकारी चोंबडय़ा नेटिव्ह चाकरांनी, 'शेतकरी लोक लग्नकार्य निमित्ताने बेलगामी खर्च करितात म्हणून ते कर्जबाजारी झाले आहेत,' अशी लटकीच पदरची कंडी उठवितात.'

(पान नं. 293)

शेती पडीत ठेवण्याइतपत अधिक जमीन शेतकर्‍यांजवळ नाही. म्हणून जमिनीस विसावा नाही. त्यामुळे जमीन नापीक होते आहे. जमिनीस पाणी देता यावे म्हणून बंधारे बांधावेत. पाणी अडवावे, जिरवावे, जेणेकरून जमिनीची सुपीकताही वाहून जाणार नाही. वन्यप्राण्यांपासून पिकांचे रक्षण करावे यासाठी महात्मा फुले 'शेतकर्‍यांचा आसूड'मध्ये लिहितात, ''आमच्या सरकारी जंगलातील रानटी जनावरांपासून शूद्र शेतकर्‍यांच्या शेतांचा बच्याव करण्यापुरत्या गावंठी तोडय़ाच्या कां होईनात, जुन्या डामीस बंदुका शूद्र शेतकर्‍यांजवळ ठेवू देण्याची जर आमचे सरकारची छाती होत नाही, तर सरकारने ते काम आपल्या निर्मळ काळ्य़ा पोलीस खात्याकडे सोपवून त्या उपर शेतकर्‍यांच्या शेतांचे रानडुकरे वगैरे जनावरांनी खाऊन नुकसान केल्यास ते सर्व नुकसान पोलीस खात्याकडील वरिष्ठ अंमलदारांच्या पगारातून कापून अथवा सरकारी खजिन्यातून शेतकर्‍यांस भरून देण्याविषयी कायदा केल्याशिवाय, शेतकर्‍यांस रात्रीपोटभर झोपां मिळून त्यांस दिवसा आपल्या शेतीत भरपूर उद्योग करण्याची सवड होणे नाही. याचेच नाव 'मला होईना आणि तुझे साहिना!''

(पान. नं. 322)

वन्यप्राण्यांचा शेतीला वाढलेला त्रास व त्याबाबत 129 वर्षांपूर्वी महात्मा फुलेंनी इतक्या स्पष्ट शब्दांत लिहावे त्याचे आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही.

''शेतकर्‍यांपैकी लक्षाधीश कुटुंबास वेळच्या वेळी पोटभर भाकर व आंगभर वस्त्र मिळण्याची मारामार पडली असून, त्यांच्या सुख संरक्षणाच्या निमित्ताने मात्र आमचे न्यायाशील सरकार लष्करी, पोलीस, न्याय, जमाबंदी वगैरे खात्यांनी चाकरीस ठेविलेल्या कामगारास मोठमोठाले जाडे पगार व पेनशनी देऊन अतोनात द्रव्य उधळते. याला म्हणावे तरी काय!!! कित्येक आमचे सरकारचे नाकाचे बाल, काळे-गोरे सरकारी कामगारांनी, हजारो रुपये दरमहा पगार खाऊन तीसपस्तीस वर्षे सरकारी हुद्दे चालविले की, त्यास आमचे सरकार दरमहाचे दरमहा शेकडो रुपये पेनशने देते.''

(महात्मा फुले : समग्र वाङ्मय आवृत्ती पाचवी, शेतकर्‍यांचा आसूड पान नं. 323)

महात्मा फुलेंनी 'शेतकर्‍यांचा आसूड'मध्ये हे लिहिले तेव्हा राज्य इंग्रजांचे होते. परिस्थितीत बदल झाला असेल तर एवढाच, गोरा इंग्रज गेला त्याऐवजी काळा इंग्रज आला. शेतकर्‍यांची परिस्थिती महात्मा फुलेंच्या काळापेक्षाही वाईट आणि कर्मचार्‍यांचे पगार तर त्याहीपेक्षा गलेलठ्ठ. नशीब महात्मा फुलेंच्या काळात शेतकर्‍यांच्या आत्महत्या नव्हत्या. त्या जर असत्या तर त्याच वेळेस 'सहावे वेतन' आयोग लागू झाले असते तर महात्मा फुलेंनी त्याचे वर्णन कसे केले असते?

महात्मा फुलेंच्या 'शेतकर्‍यांचा आसूड'ची उपेक्षा स्वातंर्त्योत्तर काळातही का झाली, याची काही काही उत्तरं सापडू शकतात. गोर्‍या इंग्रजांसाठी जेवढा 'आसूड' गैरसोयीचा तेवढाच उलट त्याहीपेक्षा गैरसोयीचा काळ्य़ा इंग्रजांसाठी.

महात्मा फुलेंच्या पुण्यतिथी निमित्ताने महात्मा फुलेंसह त्यांच्या 'शेतकर्‍यांचा आसूड'लाही विनम्र अभिवादन.

(लेखक शेतकरी आंदोलक आणि सामाजिक कार्यकर्ते आहे.)

भ्रमणध्वनी - 9822587842

No comments:

Post a Comment