Wednesday 5 December 2012

असे मानुसकीचे घरं


शंकर बडेवर्धेच्या एका कार्यकरमात मले नाटककार सतीश पावडे यायनं इचारचं का 'या कवितेने तुम्हांला काय दिले?' म्या त्या वक्ती त्यायले देल्लेलं उत्तर होतं का ं'ही कविता जर मला महाराष्ट्रातील अशी अनेक घरं देत असेल की, ज्या घरी मी त्यायचाच असल्यावानी जाता येत असेल तर याहून कवितेनं काय द्यावं?' खरंतं हे एकच उत्तर असनं त्या प्रश्नाचं? नाई! काऊन का या कवितायनं जे मले भटलं ते अखीन कायनंच भेटलं नाई. कविता लेयल्या गेली का मनाले होणारी खुसी, आयकनार्‍याले सुखावतानी पाह्यताना खुसीत होनारा वाढवा. परिसिद्दीच्यानं वाढत जानार्‍या ओयख्या हे इतर जनावानी माह्यायी हिस्यावर्त आलं. पन याहीपरीस बोलीतल्या या कविता जवा माह्या जगन्याचा अधार झाल्या तवा कविता माह्यासाठी सर्वेसर्वा झाली. रिकाम्या पोटाले कविता भाकर देऊ शकते हा अनुभव आयुक्श्याले पुरून उरनारा ठरला.

अंदाजे 85/86च्या साली मी 'युगवाणी' या वि. सा. संघाच्या संपादक मंडयावर्त होतो. तवा मिटिंगच्या निमतानं नागपूरले जानं होये. तवा बंधू म्हनजे बर्‍हानपुरे यायच्या ओयखीच्यानं नागपुरातल्या बर्‍याचं मोठय़ा मंडयीसंग ओयख व्हाचा योग ये. माही त्या मंडयावर्त असन्याची खुसी हे होती की, आमच्या भागातल्या सुद्या कविता लेयनार्‍यायच्या कविता तवा छापून आनता आल्या. त्यादरम्यान नागपूरच्या कवयित्री श्रद्घा पराते यायची ओयख झाली. ओयख वाढल्यावर नांदगाव पेठ, वरूड, उमरावतीच्या आझाद हिंद मंडयाच्या गनपतीच्या कविसंमेलनात बलावता आलं. पुढ काई अडचनीच्यानं ते खंडलं, पन ओयख अजूनयी कायम हाय. त्यायच्या घरातयी अनपुर्नेचा वास हाय. ह्या अनपुर्नेच्या लेकी आलेला पावना रिकाम्या पोटी कवाच जाऊ देत नाईत. मनापासून केलेल्या अन्नाले आपसुकचं चव येते त्याच्या अनुभव म्या कैकदा घेतला. चांगल्या ओयखी वाया जात नाई म्हंते. भाऊ समर्थसारक्या इतल्या मोठय़ा चित्रकाराची ओयख श्रद्घाजीच्यानं झाली. भाऊसारक्या मोठय़ा कलाकारानं माह्यासारक्या लहानस्या लेयनार्‍यावर्त जीव लावला. त्या वक्ती एकडाव भाऊच्या घरी जाचा योग आला. अस्या मोठय़ा

मानसाचा उलिसा भेटलेला सहवास आपल्या जिवाचं सोनं करून टाकते. चंदनासंग राह्यल्यानं घडीभर्‍यासाठी का होयना अपनंयी सुवासाचे धनी होऊन जातो.

मीतं म्हन्तो मानूस आपल्यापरीस मोठा असो का लहान, पन सामोरच्याच्या कायजात उलिसाक कोपरा भेटनं म्हनलतं अवघड आन् म्हनलतं खूप सोपं असते. दि. 25 जाने. 82 नागपूरले रिझर्व्ह बँकेच्या रिक्रेशन क्लबचा रंजन सभागृहात कविसंमेलनाचा कार्यक्रम होता. कलीम खान, मिर्झा बेग हेतं होतेच. पन आयोजकायनं मले इचारलं कां 'राजा धर्माधिकारी नावाचा नवोदित पण चांगला कवी आहे. तो तुमच्यासोबत असला तर चालेल कां?' मनात म्हनलं लेकं आपन मोठे झालो कां? मंग म्यायी तवा राजेशाही थाटात म्हनलं, 'चालेल' ही राजाची पहिली भेट. आता खरं सांगाले हरकत नाई. पह्यल्या भेटीत असं वाटलं हा लोकाचा लयंच चोपडा बोलते. मलेच घसरल्यावानी वाटे. तवा मी बोरीले खेडय़ात राहो. तवा इतकं सुदं आयकाची आदत नोती. मंग त्याले म्या बलावलं यवतमायच्या नगरपालिकेले शंभर वर्स झाले म्हून. जे मोठमोठे कार्यकरम होते त्यातनी वर्‍हाडी कविसंमेलन ठुलं होतं. त्यासाठी गडी भाई खुस झाला. काऊन कां कविसंमेलनंच तसं होतं ना! वध्रेचे प्रा. देवीदास सोटे, प्रा. डॉ. विठ्ठल वाघ, सौ. मीराताई ठाकरे आन् मी तवा शिक्षणाधिकारी होते श्री. वातिले सायेब. मले म्हने, कार्यकरम ठेवाचा कुठी? दोन ठिकानं होते. त्यासाठी लहान कार्यकरमाले टाऊन हाल आन् मोठय़ाले आझाद मैदानात भल्लामोठा मांडव टाकला होता. पंचवीस हजार मानसं मावतीन इतला. म्या मनात म्हनलं झोल नाई खाची आपल्या बावाजीनं सांगतलं हाय. म्या वातिले सायबाले म्हनलं मांडवात. ते म्हनेत मांडवात? म्हनलं मी सांगतो तसी धुवाधार जाहिरात करत असानं तं मांडवात ठुवा. माहा यवतमायकराच्या रसिकतेवर इस्वास हाय. झालंयी तसंच बारा तेरा हजाराच्यावर्त माहे यवतमायचे रसिक हजरी लावाले आले होते. प्रा. इठ्ठल वाघ म्हनेत, अरे, काय साऊंड सिस्टीम हाय आणि काय लोकं आहेत! तं राजा सारका नईन गडी खुसचं नाई होनार?

आपन कोनाचं नाव सांगतो म्हंजे उपकार नसतो करत सामोरच्यावर. त्याच्यापासी काईतरी अस्ते म्हून आपल्या तोंडून नाव निंघते. बी सकस असनंतं जमिनीत पडल्यावर्त उगवनारतं हायेच. आज ना उद्या मंग द्याना हात. मले एक-दोन वाचकानं फोनवर्त म्हनलं का, तुमी जवातवा सुदंच जादा लेयता. तुमच्या संग कुदं घडतंच नाई का? आता सांगू घडतेना.. पन कोयसा उगायन्या परीस चंदन घासावं म्हंजे आपल्याले समाधान भेट्टे आन् जगालेयी सुवास देता येते. एका दिसी राजा धर्माधिकारीचा फोन आला. बाबासाहेब घरी आहा का? म्या उत्तर देल्लं. राजा, मी जेव्हा लँडलाईनवर बोलून राहलो तर मी घरी नाही, तर कलेक्टरच्या बंगल्यावून बोलणार आहो का? आपन कवी असल्याचं त्यानं एकडाव अखीन सिद्घ केलं. त्यानं सांगतल्यापरमानं तो दहा-पंदरा घरी पोचला. आमी दोघं सामोरच्या खोलीत बसून होतो. हा आला म्हून पानी आनासाठी हे उठाले लागली. तवा तिचा उठाचा तरास. मंग भितीचा अधार घेतल्यासिवाय तिचं चालता ना येनं पाह्यल्यावर्त हा हबकून गेला. तो मले म्हने, 'तुमी जो त्रास सांगितला याच्यावर बोराळ्य़ाचे वैद्य झाडपत्तीचं जालीम औषध देतात. तुम्ही परतवाडय़ापर्यंत या. मी माझ्या गाडीत तिकडे घेऊन जातो. माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवा.' मी गाडी करूनच गेलो. परतवाडय़ावून तो आमच्या संग आला. त्याची तिथयी ओयख होती. वापेस येतानी एका खेडय़ात गाडी थांबवाले लावून एका घराचे गावरानी कवेलू फेरनं चालू होते. तिथून दोन कवेलू मांगून आनले. त्याच्यातली एक दवाई खपरेलावर गरम करून खाची होती. तो म्हने, 'तुम्ही शहरात हे गावरानी कवेलू कुठं शोधणार?' मले पह्यल्या भेटीत चोपडा बोलते वाटनार्‍या राजाचं बोलनं मलमावानी गुनकारी वाटाले लागलं.

परतवाडय़ाले आलो तं राज्याच्या रानीनं पाहुनचार तयार ठुलेला. जसे आमी तिच्या माहेरचे पावने होय. राजाच्या घरात अनपुर्नाचा वास हाय. माह्या नसिबात असेच घरं हायेत त्याले मी तरी काय करू ? या पावसातलं अखीन एक घर. तुमाले एक सांगू, वरच्यानं याचं वाटप करतानी ढकलचं नाई केली. निवडून निवडून सुदे घरं माह्या हिस्यावर देत गेला. आता इतक्या सालात सोबतीनी, मैतरीनीतं भेटल्या; पन ताई दोनच. एक सौ. मीनाताई गावंडे (मोर्शी) आन् सौ. मीराताई ठाकरे (आकोला). मीराताई माह्यातं ताई झाल्याचं, पन ईची ननंद, पोरा-पोरीची आत्या आन् ठाकरे सायेब आमचे बापू. रगताच्या नात्यापरीस उजवेपनं या नात्याले आलं. सुखदु:खाले वाटून घ्याले असं घरं नसिबानंच भेट्टे.

मांगच्या साली याच मयन्यात माह्या लहान पोरीचं कीर्तीचं लगन झालं. त्यासाठी मीराताई आन् ठाकरे सायेब दोघयी आले. राजा धर्माधिकारी, प्रा. घोंगटे, सुरेश गांजरे, प्रमिला उमरेडकर मॅडम, अकोटाचे अन्ना पारसकर फुल फॅमिलीसंग. ही मले घर देनारे मानसं पोरीच्या लगनात घरच्या मानसासारके जातीनं हजर होते. तुमाले वाटनं सरले असतीनं घरं, पन तसं नाई. टायमा-टायमानं घेऊन जाईन घरं हिंडवाले. या कोजागिरीच्या वक्ती यवतमायले बी अँड सीत माहे दोस्त हायेत मारूळकर सायेब. त्यायले माहा कार्यकरम पाह्यजे होता, पन त्या तारकीले माहा कार्यकरम पुसदले होता. म्या त्यायले सांगतलं, सायेब, मी दोन नावं सांगतो. राजा धर्माधिकारी आन् गौतम गुळधो मस्त कार्यकरम करतेतं. कवा राजा माहा नंबर माईत नसनार्‍याले नंबर सांगते. एकमेका साह्य करू.. काई असेयी हायेत कां आपलंच सावडत बसतेतं. त्यायचं त्यायच्या पासी. एकजन मले इचारे, 'काहो, दोन कवीतूनतं ईस्तू नाई जात म्हन्ते तुमीतं कवीच्या घरातयी कसे पोचता?' म्या सांगतलं, 'तसे कवी फुलटाईम कवी असोतं. मी कविता लेयत असलो, म्हनत असलो का कवी असतो. बाकी टायमाले मानूस असतो. म्हून असे मानुसकीचे घरं माह्या हिस्यावर्त येते! येवू का?'

(लेखक हे नामवंत वर्‍हाडी कथाकार आहेत.

'बॅरिस्टर गुलब्या' हा त्यांचा एकपात्री कार्यक्रम अत्यंत लोकप्रिय आहे.)

भ्रमणध्वनी - 9420551260

No comments:

Post a Comment