Friday 14 December 2012

'शिका'मध्ये 'शिकवा' हे अपेक्षित नाही का?


गेल्या वर्षी जालंधर येथील बोधिसत्त्व आंबेडकर पब्लिक स्कूलचे संस्थापक अध्यक्ष सोहनलाल जिंढा यांचे या शाळेच्या वर्धापनदिनानिमित्त निमंत्रण होते. इंग्रजी माध्यमाची एखादी चांगली शाळा महाराष्ट्रातल्या आंबेडकरी अनुयायांनी काढली असल्याचे मला माहीत नाही. एवढेच नाही, तर सर्वच जातिधर्माच्या लोकांना आजच्या शिक्षणसंस्थांच्या स्पर्धेत आंबेडकर अनुयायांनी सुरू केलेल्या एखाद्या शाळेत जावे आणि आपला पाल्य त्या शाळेत शिकतो आहे हे त्यांनी इतरांना अभिमानाने सांगावे अशीही एखादी मराठी माध्यमाची शाळा महाराष्ट्रात चालू असल्याची मला माहिती नाही. सर्वाना सोडून देऊन मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांबद्दलच असा प्रश्न का विचारावा याचा काहींना थोडा रागही येण्याची शक्यता नाकारता येत नाही; पण त्याचे कारणही तसेच आहे. सर्व क्रांतिकारक परिवर्तन शिक्षणाच्या माध्यमातून घडू शकते याची जाणीव 19व्या शतकातल्या सर्व महापुरुषांना झाली. म्हणूनच 19व्या शतकात महात्मा फुले यांनी शाळा सुरू करून आपल्या कार्याचा आरंभ केला. लोकमान्य टिळकांनी आणि आगरकरांनी चिपळूणकरांच्या सहकार्याने न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली. राजर्षी शाहू महाराज कोल्हापूर संस्थानचे असले तरी त्यांना शिक्षणाचे महत्त्व किती कळले होते याची आम्हांला माहिती आहे. कर्मवीर भाऊराव पाटलांनी स्थापन केलेल्या शिक्षणसंस्थेचा केवढा मोठा वटवृक्ष झाला. महर्षी कर्वे यांनी स्त्रियांच्या शिक्षणासाठी सगळे आयुष्य वेचले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्याच मालिकेतले

महापुरुष आहेत. म्हणूनच त्यांनी प्रचंड कार्य करीत 1945 साली 'पीपल्स एज्युकेशन सोसायटी'ची स्थापना केली. या सर्वच महापुरुषांना शिक्षण किती महत्त्वाचे वाटत होते हे कुणी वेगळे सांगायला नको. अशा या महापुरुषांच्या शाळेत अथवा महाविद्यालयांत शिक्षण घेतलेल्या अनेकांनी त्यांच्यानंतरच्या काळात यथाशक्ति गावोगावी शिक्षणाचा प्रसार केला हेही आपल्याला माहीत आहे. उदाहरणादाखल मी काही कार्यकत्र्यांची नावे घेऊ शकेल. विदर्भातले खडसे, पंजाबराव देशमुख, सोलापूरचे जगताप, कोल्हापूरचे कॉ. पानसरे, मराठवाडय़ातील केशवराव धोंडगे, गोविंदभाई श्रफ, विनायकराव पाटील हे नंतरच्या काळातही शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून विशेष प्रयत्न करणारे कार्यकर्ते होत. या पिढीला थोडेबहुत का होईना अनुदानाचे पाठबळ मिळाले आणि शिक्षणाचा प्रसार महाराष्ट्रभर झाला. दुसर्‍या फळीतल्या शिक्षणप्रसारकांच्या शाळा-महाविद्यालयातून ध्येयवादी तरुण निर्माण झाला नसेल; पण या शाळेतल्या विद्यार्थ्यांमधून एक नवा मध्यमवर्ग महाराष्ट्रात निर्माण झाला हे नाकारता येत नाही. 'डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मिलिंद महाविद्यालयाचे आम्ही विद्यार्थी आहोत' हे अत्यंत गर्वाने सांगणारे आंबेडकर अनुयायी आहेत तसे जन्मदलित नसणारे, पण ज्यांच्या आयुष्यात बदल घडून आला असेही असंख्य विद्यार्थी मला माहीत आहेत, जे आंबेडकर अनुयायांइतकेच अभिमानाने आपण मिलिंदचे विद्यार्थी आहोत असे सांगतात. बाबासाहेबांच्या मिलिंद हायस्कूल अथवा काँग्रेसचे अपवादात्मक उदाहरण सोडून दिले तर दुसर्‍या टप्प्यावर आणि अनुदानाच्या मदतीने का होईना शाळा, कॉलेज नेटाने चालू ठेवणारे आंबेडकर अनुयायी किती आहेत?

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे पूर्वकालीन अथवा समकालीन महापुरुष शिक्षणाचे महत्त्व ओळखत होते. पण त्यांच्यापैकी कुणीही आपल्या आयुष्याचे घोषवाक्य 'शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा' असे दिलेले नाही. याचा अर्थच असा, की अन्य सर्व महापुरुषांच्या तुलनेत शिक्षणाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना वाटणारे महत्त्व निश्चितच मूल्यात्मकदृष्टय़ा वेगळे होते. अशा या पाश्र्वभूमीवर महाराष्ट्रापासून हजारो मैल दूर असलेल्या, फारसे शिक्षण नसलेल्या एका पंजाबी अनुयायाने पब्लिक स्कूल जालंधर येथे स्थापन करावे याचे मोल मला अधिक वाटते. माझी इच्छा असूनही मी जालंधरला जाऊ शकलो नाही. पण हा माणूस 56 वर्षापूर्वी दीक्षाभूमी येथे आला. तो विराट जनसागर पाहून प्रभावित झाला आणि महाराष्ट्रात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातली बौद्धसंस्कार करणारी एखादी शाळा आहे का याचा शोध घेऊ लागला. या शोधात तो विदर्भातल्या पुलगावात आला. हे गाव रसायनीसाठी प्रसिद्ध आहे. लष्कराची स्वातंर्त्यपूर्व काळातली अतिशय महत्त्वाची छावणी असल्यामुळे हे गाव महाराष्ट्रातल्या अनेक मोठय़ा शहरांशी रस्त्यांनी जोडलेले आहे. भंडार्‍याच्या निवडणुकीत या लहानशा गावाने 1954 साली बाबासाहेबांचा सत्कार करून तीन हजार रुपयांची थैली त्यांना दिली. त्या घटनेचे स्मरण म्हणून बाबासाहेबांनी एका रिकाम्या जागेवर कुदळ मारली. तिथे आज बुद्धविहार आहे. 1954 पासून एवढेच नाही, तर तेथील बाबासाहेबांच्या अनुयायांनी स्थापन केलेले एक सिद्धार्थ ग्रंथालय आहे. आज या ग्रंथालयाला साठ वर्षे पूर्ण झाली असून ते तालुकापातळीवरचे 'अ' दर्जाचे गं्रथालय आहे. या ग्रंथालयात बाबासाहेबांच्या अस्थींचा कलशही जपून ठेवण्यात आला आहे.

अशा या गावात सोहनलाल जिंढा आले. या गावातील ग्रंथालय सातत्याने साठ वर्षापासून चालू ठेवणार्‍या गावकर्‍यांची जिद्द त्यांनी पाहिली. अतिशय विपन्नावस्था असूनही साठ वर्षापूर्वी पै-पैसा गोळा करून बाबासाहेबांना तीन हजार रुपयांची थैली देणारे गावाचे औदार्य लक्षात घेतले आणि अस्थिकलश जपण्याची भाविकताकही अनुभवली. महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात किमान एक तरी इंग्रजी माध्यमाचे पब्लिक स्कूल हवे ही त्यांची महत्त्वाकांक्षा. त्यांनी थोडा शोध घेतला आणि त्यांची भेट चंद्रसेन डोंगरे व लता डोंगरे या दाम्पत्याशी झाली. चंद्रसेन बँक अधिकारी तर लता डोंगरे नाटय़कलावंत. मी त्यांचा 'रमाई'चा एकपात्री प्रयोग पाहिला आहे. ही 'रमाई' त्यांनी थेट परदेशात पोहोचवली. हे दाम्पत्य पुढे आले. आयु. जिंढांनी तीन एकर जमीन खरेदी केली. 25 हजार रुपये देणगी देणारे अकरा जण चंद्रसेन यांनी गोळा केले. ही देणगी म्हणजे संस्थापक सदस्यांची वर्गणी आणि सुरू झाली जालंदर येथील बोधिसत्त्व बाबासाहेब आंबेडकर पब्लिक स्कूलची शाखा. अवघ्या पाच वर्षात शाळा, परिसर आणि इमारत या सर्वच गोष्टी नजरेत भरतील अशा या शाळेच्या वर्धापनदिनानिमित्त 'पुलगावला तरी यावे' असे जिंढा यांचे जिव्हाळ्याचे निमंत्रण आले. वर्धापनदिनाचा सोहळा धम्मचक्र प्रवर्तनदिनाच्या दुसर्‍या दिवशी होता. मी माझ्या कल्चरल संस्थेच्या सर्व कार्यकारिणीसह समारंभात सहभागी झालो.

शाळेच्या चिमुरडय़ा मुलांनी नृत्य-गायनाच्या आविष्कारातून भारतीय एकात्मतेचे दर्शन घडवले. खास जालंधरच्या शाळेच्या पंधरावीस तरुण शिक्षकांनी पंजाबचे तर पुलगावच्या शिक्षकांनी महाराष्ट्राचे सांस्कृतिक दर्शन घडवले. जिंढांनी माहिती दिली, या शाळेत 40 टक्के दलित मुले आहेत तर 60 टक्के मुलेमुली गावातली आहेत. जन्मदलित नसलेली, अभ्यासक्रम महाराष्ट्र राज्याचा, पण अध्यापन तेच आणि उपक्रमशीलता यातून संस्कार मात्र बुद्धिप्रामाण्यवादी बौद्धपद्धतीचे. मुलांनी वापराव्यात यासाठी 'ना नफा, ना तोटा' या तत्त्वावर शाळेने छापलेल्या वह्या. या वह्यांची मुखपृष्ठे त्यांच्याच शाळेच्या चित्रांची. अगदी बारीकसारीक तपशिलात आढळून येत होती ती नियोजनबद्धता. कार्यक्रमात चेन्नई येथील विजय मेश्रम, नागपूरचे बिल्डर गुणवंत देवपारे यांनी शाळेच्या मदतीसाठी नजरेत भरेल अशी देणगी दिली, तर जालना येथील दिलीप कोल्हे यांनी फारशी आर्थिक कुवत नसूनही भरीव देणगी दिली आणि तेही अगदी

उत्स्फूर्तपणे. अवघ्या चारपाच वर्षाचे हे रोपटे दहापंधरा वर्षात कसे वाढेल याचा तर्क मी करू लागलो. हवे तर 'बाणाई'च्या सदस्याने सांगावे मी खोटे बोलत आहे का? आज बाबासाहेबांच्या अनुयायांजवळ पुरेसे अर्थबळ आहे. आपण समाजासाठी काही करावे ही इच्छाशक्तीही अखेर आहे. पण सगळा समाज निवडणुकीच्या राजकारणाला जुंपलेला आणि तीर्थस्थळे बांधून संघटित होऊ पाहणारा. विहार, महाविहार बांधून कृतार्थ होणारा. विहारांचे महत्त्व मी मुळीच नाकारत नाही. पण प्राधान्य कशाला द्यावे यालाही महत्त्व द्यायला हवे की नको?

परतीच्या वाटेवर यवतमाळला संध्याकाळ झाली होती. हिवरी येथे असेच एक तीर्थस्थळ लागले. बन्सोड नावाच्या कुण्या श्रद्धाळू अधिकार्‍याने स्वबळावर 3 एकरांत 'जेतवन तीर्थस्थळ' उभे केले होते. नियोजनबद्ध विद्युतरोषणाईमुळे तथागताच्या अनेक मूर्ती त्या विस्तीर्ण प्रांगणात विलोभनीय दिसत होत्या. विहार होता आणि विहारातही अनेक बुद्धमूर्ती होत्या. नांदेडजवळ पोचलो आणि दाभडचे 25 कोटी रुपये खर्च करून उभे राहत असलेले महाविहार पाहिले. खरेतर उमरखेडजवळ मुळावा इथे उभारण्यात आलेले विहार मात्र पाहायचे राहून गेले. धम्मसेवक भन्ते यांनी ते 'तीर्थस्थळ' करण्याऐवजी 'ज्ञानकेंद्र' व्हावे हा उद्योग सुरू केला आहे. प्रतिज्ञांचा आग्रह धरणार्‍या बौद्ध उपासकांना 'तीर्थ' कसे चालले, हा प्रश्न मला अजूनही सुटलेला नाही. बाबासाहेबांच्या घोषवाक्यातील 'शिका' या पहिल्याच शब्दावर अजून आपण रेंगाळत आहोत. संपूर्ण देश 'मूलनिवासी लोकांचा आहे'. सत्ता त्यांच्या हाती केंद्रित कधी होईल? याचा आटापिटा करणार्‍या आमच्या कार्यकत्र्यांना हे कधी कळणार, की त्यासाठी बालवयापासून आपल्या पद्धतीचे शिक्षण द्यायला हवे. ज्या आर्यांना शिव्या घालायच्या त्यांच्याच केंद्रात शिक्षण घेऊन मुले निब्बर होतील याची आपणहून व्यवस्था करायची आणि त्यानंतर तुम्ही 22 प्रतिज्ञांचे पालन का नाही करीत म्हणून उपासकांना दोष द्यायचा ही आपली लोकप्रिय पद्धत. आर्य समाजाने भारतभर गुरुकुल पद्धत रूढ केली. इंग्रजविरोध रक्तात रुजावा म्हणून सनातनी लोकमान्य टिळकांनी न्यू इंग्लिश स्कूल स्थापन केले. इतकेच काय, सत्ता हाती येताच त्या वेळच्या सत्तेतल्या उजव्या मंडळींनी इतिहास विषयाचा अभ्यासक्रम बदलण्याचा कार्यक्रम हाती घेतला. यापैकी कुणासाठीही बाबासाहेबांचे ते घोषवाक्य नव्हते. ते होते दलित, पीडित जनतेसाठी. म्हणूनच 'शिका' या सं™ोचे आपण काय केले, हा प्रश्न इतर कुणालाही विचारण्यापेक्षा बाबासाहेबांच्या अनुयायांनाच विचारला तर त्याचा कुणी राग मानू नये असे मला वाटते. दर पाच वर्षानी नेते एकत्र का येत नाहीत म्हणून आगपाखड करीत स्वत:चा क्रमाने शक्तिपात करून घेतलेल्या जनतेला 'जिल्हा तिथे पब्लिक स्कूल' या दिशेनेही वाटचाल करायला काय हरकत आहे? हजारो मैलांवरच्या सोहनलाल जिंढांना जे सुचले ते आपणाला निदान जाणवायला तरी काय हरकत आहे?

(लेखक हे नामवंत आंबेडकरी विचारवंत व नाटककार आहेत.)

भ्रमणध्वनी : 9881230084

No comments:

Post a Comment