Wednesday 5 December 2012

कोणत्या युगात आपण सत्यवादी होतो?


अहमदनगर येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी नाटय़संमेलनाच्या एका परिसंवादात मी सहभागी झालो होतो. बहुधा माझी ही आठवण 20-21 वर्षापूर्वीची असावी. सभामंडपात बर्‍यापैकी गर्दी होती. सुप्रसिद्ध सिनेनट सदाशिव अमरापूरकर एखाद्या स्वयंसेवकाप्रमाणे सभामंडपात वावरत होते. श्री. अमरापूरकर हे केवळ सिनेनट नाहीत. ते श्रेष्ठ दर्जाचे विचारकही आहेत आणि मुळातून नाटय़चळवळीतून ते सिनेमाकडे वळले आहेत. ते मूळचे अहमदनगरचे. पण आजच्या अगदीच नव्या पिढीला त्यांचा हा असा परिचय फारसा माहीत नसावा म्हणून मी ही नोंद केली. त्यांच्या पुढाकारामुळेही असेल कदाचित, पण परिसंवादाचा विषय हा नाटकातून प्रकट होणार्‍या प्रागतिक विचाराशी संबंधित होता. त्यामुळं त्या परिसंवादात बोलताना मलाही खूप आनंद झालेला होता.

आता नक्की आठवत नाही; पण विषयाच्या ओघात मी म्हणालो, 'आपण आपले धर्मग्रंथ काळजीपूर्वक वाचत नाही हे बरे आहे. कारण धर्मग्रंथ आपण काळजीपूर्वक वाचलेत तर आपल्या धर्मश्रद्धा कायम राहतील का, हा प्रश्नच पडतो'. काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री जयराम रमेश शौचालयाबद्दल बोलले आणि बर्‍याच हिंदुत्वनिष्ठ मंडळींच्या भावना दुखावल्या. मी ती बातमी वाचली आणि मला नगरचा तो प्रसंग आठवला.

माझे भाषणातले प्रतिपादन असे होते की, आपले धर्मश्रद्ध लेखक, कवी आपली श्रद्धा व्यक्त करण्याच्या भरात काय व्यक्त करतील याचा नेम नाही! उदाहरणार्थ : वेश्याव्यवसायाकडे आपला समाज आदराने पाहत नाही. जुन्या काळीसुद्धा तो आदराने पाहत नसावा. नाहीतर एक पवित्र आणि श्रेष्ठ व्यवसाय म्हणून आपण त्या व्यवसायाला मान्यताच दिली असती. असे असले तरी आमचा कवी थेट देवालाच वेश्येकडे पाठवतो. बरं तो देव तरी साधा का? देवांचा देव महादेव! हाच एका रात्रीसाठी वेश्येकडे जातो. त्या वेश्येचे नाव महानंदा आणि ही आपल्या व्यवसायाशी किती प्रामाणिक आहे त्याची हा आपला महादेव परीक्षा घेतो. महानंदेच्या घरी रात्रभर मुक्कामाला असताना ती ग्राहकाकडे इमानेइतबारे लक्ष देते, की आपल्या मालकी हक्कांच्या वस्तूची काळजी घेते त्याची परीक्षा घेण्यासाठी महादेव महानंदेच्या खुराडय़ाला आग लावतात. बिचारी कोंबडी भाजून मरते; पण महानंदा विचलित होत नाही. तिची ही निष्ठा पाहून महादेव प्रसन्न होतात आणि खुराडय़ातले सर्व पक्षी ते जिवंत करतात. आता ही कथा 'शिवलीलामृत' नावाच्या पोथीतल्या अकराव्या अध्यायात आली आहे आणि हा अकरावा अध्याय महाराष्ट्रभर दर सोमवारी घरोघरी वाचला जातो. माझ्या भाषणानंतर एक धर्मश्रद्ध गृहस्थ माझ्याकडे आले आणि म्हणाले, माझ्या मुलीला मी तो अध्याय वाचायला लावतो. अगदी तुम्ही म्हणता त्याप्रमाणे सोमवारी, अगदी दर सोमवारी. पण माझी मुलगी मला नेमका हाच प्रश्न विचारते आहे, 'ही कसली परीक्षा?' आणि असा अध्याय वाचून आम्ही कोणता संदेश घ्यावा? ना. जयराम रमेश हिंदुत्ववादी नसतीलही, पण ते हिंदू तर नक्कीच असावेत आणि मंदिर आणि देवांबद्दल कितीही राग आलेला असला तरी ते मंदिरांना.. म्हणतील असा तर्कही कुणी करू शकत नाही. फार काय, 'धर्म ही अफूची गोळी आहे' असे मानणारे कट्टरपंथीय कम्युनिस्ट हिंदूसुद्धा असे विधान करणार नाहीत. मी काही जयराम रमेशांच्या वक्तव्यावर लेख लिहीत नाही, तर धर्मश्रद्ध मंडळी आपल्या श्रद्धेच्या भरात काय आणि कसे भयंकर लिहून जातील याविषयी लिहितो आहे. 'तुम्ही विचार करू नका. आम्ही तुम्हांला पुण्य देऊ, पण आम्ही म्हणतो तेवढय़ा आ™ोचे पालन करा', असे या देशातल्या पुरोहितवर्गाने सातत्याने सांगितले. त्यांनी सांगितले म्हणून गेली दीडशे वर्षे आपण या पुरोहितवर्गाला झोडपतो आहोतच. त्याबद्दल मला काही म्हणायचे नाही. पण उरलेल्या सर्व धर्मश्रद्ध जनतेने खरेच आपल्या मेंदूचा मुळीच विचार न करता ते ऐकून कसे घेतले, असाही प्रश्न आपण निदान आज विचारायला नको? त्यांना हवा तर दोष देऊ नका, पण निदान 'स्वत:च्या डोळ्य़ाने विचार करा', एवढे तरी सांगण्याची आपली जबाबदारी आहे की नाही? हा माझ्या या लेखाचा मध्यवर्ती मुद्दा आहे. नगर येथील परिसंवादानंतर जो पालक मला येऊन भेटला तो माझ्या बोलण्याने अस्वस्थ का झाला? मी माझे कुठलेही मत व्यक्त केले नव्हते. धर्मश्रद्धा टाकून द्या, असेही म्हणालो नव्हतो. ज्यांनी 'शिवलीलामृत' हा ग्रंथ लिहिला त्यांचे पांडित्यही मी नाकारले नव्हते, की त्यांच्या धर्मश्रद्ध वृत्तीलाही आव्हान दिले नव्हते. 11व्या अध्यायातली आहे तेवढी गोष्ट सांगून या इथपासून आज कोणता बोध घ्यावा, एवढाच प्रश्न मी उपस्थित केला होता. तसे तर हा अध्याय वाचल्यामुळे पुण्य मिळते, निर्धन धनिक होतो, निपुत्रिकाला संपती प्राप्त होते इत्यादी बोध अध्यायाच्या अखेरीस आलेले होते. वेश्येने वेश्येचे काम निष्ठेने करावे म्हणजे तिला सुखप्राप्ती होते. पुण्य लाभते. अशा आणखी एका बोधाकडे मी श्रोत्यांचे लक्ष वेधले होते. कारण याच अध्यायात महानंदेची निष्ठा पाहून महादेवाने तिची मेलेली कोंबडी पुन्हा जिवंत केली. ते तिच्यावर प्रसन्न झाले असेही वर्णन आलेले आहे. कर्मविपाकाचा सिद्धान्त हा दृढ व्हावा यासाठी ही कथा सांगण्यात आली आहे. सामान्यपणे धर्मश्रद्ध मंडळी असे सांगत आली आहेत, की चार युगांपैकी आजचे कलियुग तेवढे पापी माणसांचे आहे. रोजची वर्तमानपत्रे उघडली, की एकदोन घोटाळे, एकदोन बलात्कार, एकदोन दरोडे या बातम्या वाचायला मिळतातच. त्यामुळे धर्मश्रद्ध मंडळींच्या मते, 'कलियुगात पापी माणसे वाढली आहेत म्हणून असे घडत आहे'. या विधानास नाकारता येत नाही. आज मी त्यांचा हा मुद्दा नाकारूही इच्छित नाही. माझा प्रश्न वेगळा आहे. कृत, त्रेता, द्वापर यांसारख्या युगात तरी जगात पापी माणसे नव्हती असे म्हणता येते का? हा आहे.

'शकुंतला : इतिहास, पुराण आणि काव्य' या नावाचा एक दीर्घ लेख गुरुवर्य नरहर कुरुंदकरांच्या 'मागोवा' नावाच्या ग्रंथात आलेला आहे. 'शाकुंतल' हे कालिदासांचे अतिशय लोकप्रिय नाटक आहे. महाभारतातल्या आदिपर्वात आलेल्या शकुंतलेच्या कथानकावर ते आधारलेले आहे. 'महाभारत' हा ग्रंथ काही कलियुगातला नव्हे. राजा दुष्यंताने ज्या शकुंतलेचा उपभोग घेतला तीच त्याला आठवत नाही, असे तो म्हणतो. याचा अर्थच तो खोटे बोलत होता. त्याने दिलेली लग्नभेट म्हणजे अंगठी ती पाहिल्यानंतर मात्र त्यास स्मरण झाले. हे आपण खरे मानायचे? खरेतर अनेक स्त्रियांचे उपभोग घेणार्‍या एखाद्या मर्द राज्यकर्त्याने कुणाकुणाचे म्हणून स्मरण ठेवावे असाही कुणी भलताच अर्थ काढला तर काय घ्या? रावण तर दशग्रंथी ब्राह्मण होता असेही सांगितले जाते. तरी त्याने विवाहित स्त्रीला पळवून न्यावे? एखादी स्त्री सुंदर आणि देखणी तर आहे, पण मासळीचा व्यवसाय करणार्‍या घरात लहानाची मोठी झाल्यामुळे त्या मत्स्यगंधेबरोबर केवळ आवडली म्हणून समागम करायचा तरी कसा? शरीराच्या दुर्गधीचे काय करायचे? मग एखादा मुनी आपल्या योगबळावर तिला योजनगंधा करून टाकतो आणि मग तिचा उपभोग घेतो. आता एवढं पुण्य ज्याच्याजवळ नाही तो कलियुगातला पुरुष आपले काम अत्तरावर भागवतो नाही का? पण मग या दोन्ही मनोवृत्तीत नेमका फरक कुठे आहे? दिवसा उजेडी समागम करता येत नाही म्हणून एखाद्या ऋषीने स्वसामर्थ्याच्या बळावर सूर्यालाच अडसर निर्माण करून तेवढय़ापुरता अंधार निर्माण करावा हे ऋषीचे कृत्य आणि आजच्या एखाद्या खलनायकाने दार लावून, दिवे विझवून हाच उद्योग करावा अशा खलनायकाचे कृत्य ह्यात प्रवृत्तिभेद तो कोणता? देवकीपुत्र आपणाला ठार मारणार या भयाने घाबरलेल्या कंसाने देवकीच्या प्रत्येक पुत्राला ठार मारावे आणि उद्या हुंडय़ापायी आजही जगणे नकोसे होईल या भयापोटी आजच्या काळातल्या एखाद्या जन्मदात्या पित्याने मुलीला जन्मास आल्याबरोबर जिवंतपणी पुरून टाकावे यात तरी वृत्तिभेद कोणता? भीमाने पुन:पुन: दोन तुकडे केलेला जरासंध मरत नाही हे पाहून श्रीकृष्ण युद्धात प्रत्यक्ष सहभागी न होता जरासंधाला कसे मारावे हे एका लहानशा कृतीने दाखवून देतात. आजचे काही डॉन अशाच पद्धतीने कृती करीत राजकारणात मुत्सद्दी म्हणून मिरवतात असे आता आपण वाचतो. हस्तकांच्या मार्फत ते खूनही घडवून आणतात असेही दृश्य पाहायला मिळते की नाही? माझ्या मनात कृत, त्रेता आणि द्वापर युगात जी पुण्यवान आणि आदर्श मंडळी होऊन गेली त्यांच्याबद्दल नितांत आदर आहे. ज्या कवी-कथाकारांनी त्यांच्या कथा लिहून ठेवल्या त्यांच्याबद्दल तर जास्तच आदर आहे. कारण त्यांनी जे लिहिले ते अतिशय प्रामाणिकपणे लिहून ठेवले असे मला वाटते. मी कुठल्याही युगाला दोष देत नाही. मला सांगायचे एवढेच आहे, की जसजसे आपण मागे जाऊ तसतसे जग अतिशय पुण्यवान माणसांचेच होते आणि आजचे युग तेवढे पापी माणसांचे आहे ही समजूत चुकीची आहे हे आपण समजून घेणार आहोत की नाही?

(लेखक हे नामवंत आंबेडकरी विचारवंत व नाटककार आहेत.)

भ्रमणध्वनी : 9881230084

No comments:

Post a Comment