Thursday 19 July 2012

जिंदगी, एक सफर, था सुहाना..



परवाच माझ्यापेक्षा वयाने ज्येष्ठ असलेल्या एका स्नेह्याशी बोलताना मी म्हणालो की, तुम्ही सिनेमाचा सुवर्णकाळ अनुभवलाय. 60 आणि 70 चा सुंदर गाण्यांचा, 25-50 आठवडे चालणार्‍या सिनेमांचा काळ तुम्ही अनुभवला. थिएटरमधली चेंगराचेंगरी, मारामारी, तिकिटांचा काळाबाजार, नटांसाठी वेडे झालेले प्रेक्षक हे सारं तुम्ही अनुभवलं, सिनेमाची खरी मजा तुम्ही घेतली.

आणि आज राजेश खन्ना गेल्याची बातमी ऐकली. बायको म्हणाली, अहो राजेश खन्नाबद्दल रेडिओवर काहीतरी चुकीचं ऐकलं, टीव्ही लावा बरं. मुळात तिने बरोबरच ऐकलं होतं पण ते बरोबर आहे हे मानायची तिची तयारी नव्हती. ज्याचे गाणे गुणगुणल्याबरोबरच, ज्यांच्या खांद्यावर शाल घेण्याच्या स्टाईलची आम्ही टिंगल केली तो अनंताच्या सफरला निघून गेला होता. त्याचा सुपरस्टारवाला काळ मी अनुभवला नव्हता, पण त्याच्यासाठी वेडय़ा झालेल्या प्रेक्षकांचे किस्से मात्र भरपूर वाचले-ऐकले होते.

यश तुझ्या डोक्यात गेलं होतं हे तू मान्य करतोस की नाही या एका पत्रकाराच्या प्रश्नावर तो म्हणाला होता 'मुली मला रक्ताने पत्र लिहायच्या, जिथे मी जाईन तिथे तरुण-तरुणी माझ्या पायावर लोळण घ्यायच्या. माझ्या ओझरतं व्हावं म्हणून काहीही करायचे, इतकं झाल्यावरही मी जमिनीवर राहिलो असतो तरच नवल! हे खोटंही नव्हतं. एका कॉलेजच्या गॅदरिंगच्या उद्घाटनाला राजेश खन्ना गेला असता तो कारमधून उतरताच कारपासून ते स्टेजपर्यंत तरुण-तरुणी झोपले आणि त्याला म्हणाले, तू राजेश खन्ना आहेस, तू जमिनीवर पाय ठेवायचा नाही. तू आमच्या अंगावरून चालत जा. हा किस्सा मी वाचला होता.

त्याने कधीच दाढी-मिशा लावून म्हातार्‍याचा रोल केल्याचं आठवत नाही व झुपकेदार मिशी लावून डाकू बनून तो घोडय़ावर बसल्याचंही आठवत नाही. आपला रोमॅंटिक लूक त्याने कायम जपला. त्याने घातलेल्या गुरुशर्टची फॅशन अगदी दहा-वीस वर्षांपूर्वीपर्यंत होती. आज तुम्ही गुरुशर्ट घातला तर लोकं तुम्हाला म्हणतात, 'दादा, शार्ट कुर्ती पहने क्या? दस्तुरखुद्द अमिताभ म्हणाला होता, 'माझ्या संघर्षाच्या काळात राजेश खन्नाच्या सिनेमांना असणार्‍या लांबच लांब रांगा पाहून मी आश्चर्यचकित व्हायचो. प्रेक्षकांचं इतकं वेड पाहून मी विस्मित होत असे. कालांतराने त्याच अमिताभने त्याचा सुपरस्टारपदाचा किताब हिरावून घेतला ही बाब अलाहीदा. अमिताभ बच्चन हिरो असणार्‍या 'बॉम्बे टू गोवा' सिनेमात ड्रायव्हर व कंडक्टरचं नाव अनुक्रमे राजेश व खन्ना असं होतं. त्याच्या कारकिर्दीच्या सर्वोच्च काळात त्याने राजेश खन्ना मॅनिया निर्माण केला होता. मॅनिया या शब्दाचा नेमका अर्थ विशद करणारा तो काळ होता. आपल्या सिनेमात त्याने काम करावे म्हणून नोटांची बंडलं घेऊन निर्मात्यांच्या गाडय़ांच्या रांगा त्याच्या घरासमोर उभ्या असायच्या.

आपल्या संघर्षाच्या काळात अक्षयकुमारने ज्या बंगल्यासमोर उभे राहून फोटो काढले होते तो बंगला राजेश खन्नाचा होता. कालांतराने अक्षयकुमारने तोच बंगला विकत घेतला आणि राजेश खन्नाच्याच मुलीशी लग्न केले, हाही एक योगायोग.

राजेश खन्ना आणि किशोरकुमार 'आराधना' या चित्रपटापासून फार्मात आले. राजेश खन्नाला किशोरकुमारचा आवाज असा काही मॅच झाला की पडद्यावर राजेश खन्नाच गातोय असा भास होत असे. किशोरकुमारला निर्मार्त्यांनी एकदा सांगितले की, एका नवीन नटासाठी तुम्हाला पाश्र्वगायन करायचंय. त्यावर किशोरकुमारने त्या नटाला माझ्या घरी पाठवा, मला त्याची मुलाखत घ्यायचीय असे सांगितले. ठरल्यावेळी तो नट किशोरकुमारकडे हजर झाला. किशोरकुमारने त्याला अनेक वेडेवाकडे प्रश्न विचारून भंडावून सोडले आणि शेवटी आता तुम्ही निघा करून परत पाठविले. त्या नटाने निर्मात्याकडे जाऊन किशोरकुमारबद्दल बरीच आगपाखड केली, पण जेव्हा त्या नटावर चित्रीत झालेलं गाणं त्यानं पाहिलं तेव्हा मात्र तो वेडावला आणि म्हणाला 'ये आवाज तो मेरी लगती है' तेव्हा किशोरकुमार त्याला म्हणाला, मला तुझी मुलाखत घ्यायची नव्हती तर तुझ्या बोलण्याची लकब, तुझ्या अदा बघायच्या होत्या. ज्यांचा अभ्यास करून मी तुझ्यासाठी गाणे म्हटले, तो नट राजेश खन्ना होता. पुढे किशोरकुमार गेल्यानंतर त्यांच्या श्रद्धांजलीपर कार्यक्रमात बोलताना राजेश खन्ना म्हणाला - 'आज मैने अपनी आवाज खो दी है' 69 ते 72 या चार वर्षांत सतत 15 सुपरहिट देणारा तो एकमेव सुपरस्टार आहे. हा एक रेकॉर्ड आहे. सिनेसृष्टीच्या रोमॅंटिक युगाचा तो शेवटचा शिलेदार होता. दुश्मन सिनेमात स्वत:सोबतच्या लहानग्याला मुमताजच्या बायोस्कोपवर फुकटात सिनेमा दाखविणार्‍या राजेश खन्नाला मुमताज म्हणते, ओ बाबू अपना नाम तो बताते जा त्यावर राजेश खन्ना उद्गारतो सुना नही बच्चेने क्या कहा 'दुश्मन चाचा! चाचा बच्चेका तेरा नही! हे तो त्याच्या जगप्रसिद्ध डोळे मिचकावून, मान तिरपी करत म्हणण्याच्या स्टाईलने म्हणतो. ते इतकं मस्त वाटतं की रंगा खुश हो जाता. असे अनेक क्षण आता तुमच्या-माझ्या भोवती रुंजा घालतील. 'आनंद'मध्ये ज्या दारासिंगला तो गुरू म्हणतो तो त्याच्या तीन-चार दिवस आधीच निघून गेला. आपलं भावविश्व व्यापून टाकणारे, आनंदाचे चार क्षण आपल्या ओंजळीत टाकणारे एक-एक करून आपल्यातून निघून जात आहेत. आणि आपण 'कारवा गुजर गया गुबार देखते रहे' असे म्हणत हतबल उभे आहोत असं मला अनेकदा वाटतं. शेवटी 'आनंद'मधलाच संवाद मदतीला येतो 'जिंदगी और मौत उपरवालेके हाथमें है जहापनाह! हम सब तो रंगमंच की कठपुतलीया है जिसकी डोर उपरवालेके हाथ में बंधी है कब, कौन, कैसे उठेगा कोई नही जानता. हाù हाù हाùù

(लेखक नामवंत व्यंगचित्रकार व कॅलिग्राफर आहेत. 'गंमत जंमत' हा त्यांचा लोकप्रिय एकपात्री कार्यक्रम आहे.)

भ्रमणध्वनी - 9823087650
     

No comments:

Post a Comment