Monday 30 July 2012

आता आदिवासींनी कोणता आदर्श घ्यावा?



24 मार्च, 2012 रोजी झारखंडची राजधानी रांची येथे सरहूल महोत्सवाचे उद्घाटन झाले. या महोत्सवात मी उपस्थित होतो. 25 मार्च, 2012 रोजी झालेल्या भारतीय पातळीवरील दलित, आदिवासी नाटय़संमेलनाचा प्रमुख पाहुणा या नात्याने मला निमंत्रित करण्यात आले होते. आंबेडकर प्रेरणेचा नाटय़लेखक याच नात्याने मला बोलाविण्यात आले होते हे संयोजक अश्विनीकुमार पंकज यांनी सांगितले होते. नाटय़संमेलन सरहूल महोत्सवाला जोडून ठेवण्यात आले होते आणि आदिवासींचा हा राष्ट्रीय महोत्सव आम्ही पाहावा हीच त्यामागची धारणा होती.

सरहूल महोत्सव म्हणजे आदिवासींचा पारंपरिक निसर्गपूजेचा महोत्सव. 'सरहूल' अथवा 'सकुवा' हे एका वृक्षाचे नाव आहे. हा वृक्ष आपल्याकडील कडुनिंबासारखा वृक्ष. वसंतऋतूत या वृक्षाला चैतपालवी फुटते. या वृक्षांची

फुलोर्‍याची नाजूक डहाळी पाहुण्यांच्या अथवा नातलगांच्या उजव्या कानावर खोवायची आणि हात जोडून 'जोहार' या शब्दाने अभिवादन करायचे ही तिथली प्रथा. त्यानंतर नटूनथटून आलेल्या आदिवासींनी वृक्षाभोवती फेर धरून लयबद्ध नृत्य करायचं. अख्खा गावच मग या नृत्यात सहभागी होतो. आमच्याकडच्या गणेशोत्सवाची आठवण व्हावी अशी ती मिरवणूक असते. या मिरवणुकीत राज्यपाल, कुलगुरू, मुख्यमंत्री सगळेच सहभागी होतात. झारखंड हे 10-11 वर्षापूर्वी निर्माण करण्यात आलेले स्वतंत्र राज्य. हा पूर्वीचा बिहार. या झारखंडमध्ये आठ आदिवासी समूह असून प्रत्येक आदिवासीची स्वतंत्र बोली आहे. त्यातील 'खडिया' आणि 'मुंडा' हे आदिवासी विशेष प्रगत आहेत. खडियांची स्वतंत्र लिपी असून त्या भाषेत लेखन करणार्‍या लेखकांची संख्या सुमारे पाचशे आहे. हे आदिवासी घराबाहेर पडले की, नागपुरी बोलतात. नागपुरी ही एक आदिवासी जमात असून त्यांच्या बोलीला 'नागपुरी' म्हणतात. हैदराबाद संस्थानातली माणसं घराबाहेर पडली की, जसं हिंदी, उर्दू भाषेत बोलत तसा हा व्यवहार चालतो. नाहीतरी या प्रदेशाला 'छोटा नागपूर' याच नावाने लोक ओळखत असत आणि आमच्या काळी शाळेत भूगोल शिकताना आम्ही 'छोटा नागपूर' म्हणून ओळखत होतो.

या आठही बोलीत गरीब आणि श्रीमंत यासाठी शब्दच नाहीत. पंकजकुमारांनी आम्हांला माहिती दिली. दोन हजार वर्षे उलटून गेली. आमच्या वृक्षपूजेचे रूपांतर मूर्तिपूजेत झाले नाही की, देऊळ संस्कृतीत झाले नाही. सरहूल महोत्सवात कोणी पुरोहितही नव्हता. जे होते ते आदिवासी पंडितच होते. त्यामुळे इथे जमाती आहेत, पण जाती नाहीत. तरीपण भारत सरकार आमचा उल्लेख 'जनजाती' म्हणून करतात हे त्यांना फारसे रुचत नाही. महाराष्ट्रातील औरंगाबादसारख्या दीडदोन हजार किलो मीटरवरच्या लेखकाला त्यांनी पाहुणा म्हणून का बोलवावे याचे मला आश्चर्य वाटत होते. त्यांना मराठी येत नव्हते आणि धड इंग्रजीही येत नव्हते. उद्घाटन

समारंभात रंगमंचावर आम्ही चौघेच होतो. उद्घाटक म्हणून झारखंडचे मुख्यमंत्री अजरुनसिंग मुंडा, दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील प्रसिद्ध अभ्यासक आणि हिंदी साहित्याचे समीक्षक डॉ. तलवार, हरियाणाचे माजी राज्यपाल डॉ.

माताप्रसाद जे 'दलित नाटय़लेखक' म्हणून ओळखले जातात आणि त्यांचे 'गौतम बुद्धा' या विषयावरचे नाटक या क्षेत्रातील मंडळींना खूप आवडलेही होते. अशा या रंगमंचावर मी चौथा पाहुणा होतो. झारखंडचे मुख्यमंत्री अजरुन मुंडा अतिशय तरुण आहेत. त्यांनी पारंपरिक पद्धतीने नगारा वाजवून कार्यक्रमाचे उद्घाटन केले.

चर्चासत्राच्या उद्घाटन समारंभात अश्विनीकुमार यांनी केलेले प्रास्ताविक अद्भुत होते. मला स्वत:ला अंतमरुख करणारे होते. झारखंड या प्रदेशातील 50 टक्के लोकसंख्या आदिवासींची आहे. 'फॉरेस्ट कायदा' अस्तित्वात आला आणि आदिवासींची ससेहोलपट सुरू झाली. ते मैदानी प्रदेशात स्थलांतरित झाले. 'स्वस्तातला मजूर' म्हणून या भागातल्या जमीनदारांनी आदिवासींवर वेठबिगारी लादली. शिक्षण नाही, रोगराईनिवारण करण्यासाठी औषधांची सोय नाही आणि उदरनिर्वाहाचे कोणतेच साधन नाही. जे होते ते इंग्रजांनी ताब्यात घेतलेले. अशा या आदिवासींकडे शंभर-सव्वाशे वर्षापूर्वी ºिश्चन मिशनर्‍यांचे लक्ष गेले. त्यांनी शाळा आणि दवाखाने सुरू केले.

माणसांच्या रूपाने आपल्या मदतीला देव धावून आला असे आदिवासींना वाटू लागले. शिकता शिकता हे आदिवासी ºिश्चन झाले. खरेतर आपणाला 'आदिवासी' म्हणूनच जगायचे होते; पण ºिश्चन धर्म आपल्यावर लादला हे रांची येथील 'केरकट्टा' या नावाच्या आदिवासी मुख्याध्यापकाला कळले. त्याने धर्मातर रोखले. तो राजेंद्रबाबूंच्या सहवासात आला. आदिवासींना त्याने स्वातंर्त्यचळवळीत आणले. 1952च्या निवडणुकीत भारतातील सर्वाधिक मते घेणारे उमेदवार म्हणून आपण पं. जवाहरलाल नेहरूंना ओळखतो. पण या निवडणुकीत सर्वांत जास्त मते घेणारे उमेदवार होते केरकट्टा. ते खासदार झाले. स्वातंर्त्यानंतर संघपरिवाराच्या लक्षात आले. पूर्वोत्तर भारत धर्मातरामुळे धोक्यात आहे. संघकार्यकत्र्यांनी संपूर्ण आदिवासींच्या शिक्षणाकडे लक्ष केंद्रित केले. अगदी नकळतपणे आदिवासींचे हिंदूकरण सुरू झाले. दरम्यान, आदिवासींमध्ये विचारवंतांचा एक वर्ग निर्माण झाला होता. प्रा. डॉ. रामप्रसाद मुंडा हे रांची विद्यापीठातले विश्वविख्यात 'अँथ्रापॉजलिस्ट' होते.

गेल्या वर्षीच त्यांचे निधन झाले. झारखंडी भाषा आणि संस्कृतीच्या अध्ययन विभागाचे ते संस्थापक आणि विभागप्रमुख होते. आपण कुठल्याही धर्माचा स्वीकार न करता केवळ आदिवासी म्हणून या राज्यात स्वतंत्रपणे जगू शकतो ही नवी जाणीव तेथील आदिवासी विचारवंतांमध्ये आज रुजली आहे. हे राज्यघटनेमुळे शक्य आहे आणि राज्यघटनेचा मसुदा लिहिणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे महाराष्ट्राचे होते. त्यांच्या प्रेरणेने महाराष्ट्रातील साहित्य आणि रंगभूमीची नवीन चळवळ सुरू झाली. म्हणूनच या महोत्सवात महाराष्ट्रातील दलित रंगभूमीच्या लेखकांना आम्ही निमंत्रित केले आहे. त्यात प्रा. भगत, प्रेमानंद गज्वी आणि डॉ. कुमार अनिल हे उपस्थित आहेत. त्यांचे प्रास्ताविक ऐकून आम्ही थक्क झालो. आज मला हे सर्व आठवलं त्याचं तसंच एक महत्त्वाचं कारण आहे. एक महिन्यापूर्वीच अजरुन मुंडा यांच्या हेलिकॉप्टरला लहानसा अपघात झाला आणि त्यातून ते बालंबाल वाचले. म्हणून त्यांच्या पुरोहितांनी (एका राजकीय सल्लागारांनी) त्यांना मुळात त्यांचा निवास शापित असून तो शापमुक्त करायला सांगितले. अजरुन मुंडांनाही हे पटलं. त्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाच्या आवारात मारुतीचे मंदिर बांधण्यात आले. संकटमोचन हनुमानमूर्तीची तिथे प्रतिष्ठापना करण्यात आली. या मंगल सोहळ्याप्रसंगी हनुमान चालिसाचे पठण करण्यात आले. झारखंडसह भारतातल्या असंख्य लोकांनी हा मंगलसोहळा दूरदर्शन वृत्तवाहिनीवरून पाहिला. मा. अजरुन मुंडा यांच्या उपस्थितीत पंकज यांनी केलेले प्रास्ताविक आठवले. केरकट्टा यांचे अनुयायी आणि एक लेखक अश्विनीकुमार सांगत होते, आम्हांला कोणत्याही धर्माचा स्वीकार न करता सन्मानाने जगता आले पाहिजे. राज्यघटनेत तशी तरतूद आहे आणि त्यांच्या राज्याचे मुख्यमंत्री हनुमानमंदिराची स्थापना मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी करून संदेश देत होते, आपण हिंदू आहोत आणि हिंदू देवदेवताच आपले संरक्षण करू शकतील. अजरुन मुंडा हेलिकॉप्टरच्या अपघातातून बालंबाल बचावले; पण त्याच बिहार प्रांतात मोरारजी देसाई यांच्या विमानाला अपघात झाला होता आणि नव्वदी ओलांडलेला भारताचा हा माजी पंतप्रधान पायी चालत अपघात स्थळापासून दूर गेला होता. मोरारजी धर्मश्रद्धेने हिंदू होते. पण त्यांनी असे काही करून जनतेला शापमुक्तीचा संदेश दिल्याचे मला स्मरत नाही. मी सेक्युलर आहे; पण धर्म विरोधी नाही. धर्म ही वैयक्तिक पातळीवरील श्रद्धा म्हणून पाळायला आमच्या घटनेने कधीच विरोध केला नाही. धर्मश्रद्धा असणे वाईट असेही मला म्हणायचे नाही. पण जनतेला जेव्हा धर्मभोळेपणा एक राजकीय अजेंडा म्हणून सांगितले जाते तेव्हा काय होतेहे आपण आपल्या इतिहासाला विचारायला नको का? देवगिरीच्या समर्थ राजवटीला आमचा प्रधान देऊळ बांधून बसला आणि खिलजीने सर्व साम्राज्य पार बुडवून टाकले. प्रजेचे शत्रूकडून रक्षण कसे करता येईल यासाठी 365 दिवसांत 1400 व्रतं कशी करावीत या विषयावरचा 'चतुर्वर्ग चिंतामणी' हा ग्रंथ लिहिण्यात हेमाद्री पंडिताने किती वेळ घालवला? छत्रपती शिवाजी महाराजांनी देवळाच्या व्यवस्थापनासाठी देणग्या दिल्या; पण देवळे बांधण्यात स्वत: लक्ष न घालता किल्ले बांधून प्रजेचे रक्षण करण्याची तरतूद केली. आम्ही इतिहास कशासाठी शिकायचा? इंग्रज पुण्यावर तोफा डागत होते तेव्हा आमचे शूर पेशवे शनिवारवाडय़ात अभिषेक घालत बसले. तरी पराभूत झालेच ना!

आता दुसरा प्रश्न असा की, या निवासात एखादा मुस्लिम अथवा ºिश्चन मिशनरी कधीच मुख्यमंत्री होणार नाही असे गृहीत धरायचे का? आणि झालाच तर या मंदिराच्या व्यवस्थापनाची जबाबदारी त्याने उचलयाची का? की या मंदिराचा अर्धा भाग मशिदीला देऊन नव्या अयोध्याकांडाची तरतूद करून ठेवायची? असो. आता मा. अजरुन मुंडा यांची गणना चातुर्वण्र्य अवस्थेत करायची की नाही. तसे ठरले तर त्यांचा वर्ण कोणता? आणि मग हे मुंडाजी कर्मविपाकाचा सिद्धान्त ग्राह्य मानणार की नाही? अर्थात, यासाठी त्यांना फार परिश्रम करावे लागणार नाहीत. अनेक भारतीय विद्यापीठांत ज्योतिर्विज्ञान आणि संस्कृत या विषयांचा पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण करण्याचा आदेश 10 वर्षापूर्वीच विद्यापीठ अनुदान आयोगाने दिला असून मा. कपिल सिब्बल यांच्याकडे चौकशी करून तज्ज्ञ व्यक्तींचा शोध घेता येईल. मी असे आक्रमक लिहीतही नसतो; पण राज्यकत्र्यांचे खासगी जीवनही जनतेला संदेश देणारे असते याचा विसर पडता कामा नये. पण जी कृती मानवी कर्तृत्वाला हीन ठरवतेतिचा का म्हणून निषेध करू नये? कुणी कोणता धर्म पाळावा, त्यासाठी कोणत्या विधींचा वापर करावा याबद्दल कुणीच तक्रार करणार नाही. ज्या वास्तूत मी अजरुन मुंडांनी हनुमानमंदिर बांधले ते त्यांचे व्यक्तिगत मालकीचे घर नव्हते आणि नाही. त्यांनी स्वत:च्या घराला शापमुक्त केले असते तर आपण काहीच तक्रार केली नसती.पण त्यापेक्षा मला त्यांच्या या कृतीने अधिकच अंतमरुख केले. केवळ आदिवासी म्हणून आपले स्वातंर्त्य जपू इच्छिणार्‍या आदिवासींचे हे 'भगवेकरण' नव्या गुंतागुंतीचे प्रश्न निर्माण करेल यामुळे मी अधिक अंतमरुख झालो. आपल्या देशात सेक्युलॅरिझमचा स्वीकार हे आपले देशपातळीवरचे केवळ राजकीय धोरण नाही, तर ती भारतीय बहुभाषी, बहुधर्मी जनतेची जगण्याची गरज आहे हे निदान राजकीय नेतृत्वाने तरी लक्षात ठेवावे एवढेच मला सुचवायचे आहे.

(लेखक हे नामवंत आंबेडकरी विचारवंत व नाटककार आहेत.)

भ्रमणध्वनी : 9881230084

No comments:

Post a Comment