Thursday 18 October 2012

नेट : परीक्षा पाठांतराची की अध्यापन तंत्राची?


शाळेतील शिक्षकाला शिक्षकाची नोकरी करायची असेल तर बी.एड. व्हावे लागते. तसेच महाविद्यालयात शिक्षक व्हायचे तर 'नेट' नावाची परीक्षा पास होणे आवश्यक असते. नेट म्हणजे 'नॅशनल इलिजिबिलिटी टेस्ट.' ही परीक्षा आम्ही पास नसलो तरी आम्ही पास आहोत असे समजा आणि आम्हांला त्या पात्रतेचा पगार द्या या मागणीसाठी नुकताच एक खूप मोठा संप झाला. त्यामुळं काही विद्यापीठांच्या परीक्षांचे निकाल लांबणीवर पडले. समाजातले नागरिक अथवा विद्यार्थी मात्र शिक्षकांच्या/ प्राध्यापकांच्या मागणीबद्दल फारसे अनुकूल नव्हते. एक तर ते तटस्थ होते किंवा प्रतिकूल तरी होते. वरवर पाहता नागरिकांची बाजूच अधिक बरोबर आहे असेच वाटते. एक तर महाविद्यालयातील प्राध्यापकांचे पगार समाजाला न रुचण्याइतपत जास्त झाले आहेत आणि ते नको तितक्या सुटय़ा घेतात हे काही समाजाला आवडत नाही.

ही राष्ट्रीय चाचणी परीक्षेची अट लागू झाली त्या वेळी माझी सेवा वीस वर्षाची होऊन गेली होती. त्यामुळे या परीक्षेतून माझ्यासारख्याला वगळण्यात आले. सुरुवातीला या परीक्षेची प्रश्नपत्रिकाच पाहायला मिळत नसे. कारण प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका एकत्रित बांधीव रूपात

असल्यामुळे ती परीक्षेच्या हॉलमध्ये संबंधिताला देऊनच परत घ्यावे लागे. आजही हीच पद्धत आहे. पण आज मात्र अशा प्रश्नपत्रिका काढणार्‍या काही अनुभवी परीक्षकांनी पुस्तके लिहिली आहेत. बाजारात ती उपलब्ध आहेत. अतिशय हुशार विद्यार्थीसुद्धा नापास होतात.म्हणून महिला कॉलेजमध्ये माझ्या सहकार्‍यांच्या मदतीने आम्ही नेट परीक्षेच्या पूर्वतयारीचे वर्ग घेतले. त्याचा थोडाबहुत उपयोगही झाला. मी स्वत: ती परीक्षा पास नसलो तरी अनुभवाच्या आधारावर मला परीक्षक म्हणून संधीही मिळाली आणि आज मी तुम्हांला खात्रीने सांगतो, की मी वीस वर्षापूर्वी ती परीक्षा दिली असती तर नक्कीच नापास झालो असतो आणि आजही मी ती परीक्षा दिली तरी पास होईल असा मला आत्मविश्वास नाही. माझी ही मर्यादा मी जशी तुम्हांला सांगितली तशी आत्मस्तुतीचा दोष पत्करून मी माझे सामर्थ्यही सांगतो. माझ्या महाविद्यालयातला अथवा विद्यापीठातला मी एक चांगला शिक्षक होतो,असेच माझे अनेक विद्यार्थी माझ्या अनुपस्थितीतही सांगतात. हे सगळं मी माझे मोठेपण कळावं यासाठी लिहीत नाही, तर ही 'नेट' नावाची परीक्षा काय असते आणि तिचे स्वरूप नेमके काय असते याची फारशी माहितीच समाजाला नसल्यामुळे पात्रतेची परीक्षा पास व्हायला नको. पण पगार मात्र पात्र शिक्षकाचा हवा आहेअसे प्राध्यापक म्हणूच कसे शकतात? असे समाज म्हणतो. नेटबाबतची ही प्रतिक्रिया खूप जुनी आहे. त्यामुळे सुमारे वीस वर्षापूर्वीही मी याविषयी एक लेख लिहिला होता आणि वेळ वाया घालवला होता. आजही माझे म्हणणे कुणी ऐकून घेईल असे मला वाटत नाही. त्याचे कारण एकदा एखादी व्यवस्था अंगवळणी पडली, की माणसे त्या व्यवस्थेच्या संदर्भातच विचार करू लागतात.

ज्यांनी 'नेट' परीक्षेची पुस्तके वाचली असतील त्यांना एक गोष्ट पक्की कळली आहे ती म्हणजे ही परीक्षा पाठांतराची चाचणी घेणारी परीक्षा आहे. मुळात आपल्या देशात पाठांतरात जो पक्का असतो त्याला विद्वान समजण्याचा प्रघात आहे. त्यामुळे त्याला एक सुसंगत अशी रूढी निर्माण झाली. ती अशी, की पाठांतराचा हक्कच जन्माशी निगडित करून अनेकांना विद्वान होण्यापासून वंचित ठेवण्यात आले. आपल्याकडे 'दशग्रंथी ब्राह्मणाला' विद्वत्तेचा सर्वश्रेष्ठ किताब देण्याची पद्धत आहे. दोन हजार वर्षे या पाठांतरपद्धतीला श्रेष्ठ मानणारी मंडळीच जर इतरांची विद्वत्ता/पात्रता शोधू लागली तर परीक्षापद्धती पाठांतराची असणार नाही तर अन्य कोणती असणार? अशा पाठांतर परीक्षेत उत्तीर्ण होणारे उत्तम शिक्षक होऊ शकतात हे त्यातही दुसरे गृहीत. शिक्षणपद्धतीत पाठांतराला महत्त्व असतेच. पण 'पाठांतर' केंद्रस्थानी असू शकत नाही. पाठ न झालेले मुद्दे कागदावर उतरवून तो कागद समोर ठेवता आला नाही तरीएखादा शिक्षक उत्तम शिकवू शकतो. विषय कोणताही असो, तो उत्तम पद्धतीने शिकवला जातो किंवा नाही? याची खरी कसोटी कोणती? वर्गातला प्राध्यापक जो कोणता टॉपिक शिकवतो तो विद्यार्थ्यांच्या आकलनसीमेत पोचतो की नाही याची दक्षता घेतो. यानंतरचा दुसरा टप्पा या आकलनानंतर हा विद्यार्थी स्वत:च्या विचाराला चालना देऊन आपले आकलन स्वत:च्या भाषेत मांडू शकतो की नाही हा आहे आणि या आकलन प्रांतात जे जे साठवते त्यातल्या त्रुटी जाणवून त्यातून मार्ग काढण्यासाठी एखादी संशोधनात्मक दिशा तो स्वीकारतो की नाही हा तिसरा टप्पा आहे. नेट परीक्षेच्या प्रश्नपत्रिका पाहिल्या तर या तिन्ही गोष्टींचा अभाव असलेल्या असतात हे कुण्याही विचारी माणसास कळू शकते.

काही दिवसांपूर्वी एमबीबीएस परीक्षा उत्तीर्ण झालेल्या दोन डॉक्टरांची प्रांजळ कबुली मी वृत्तपत्रात वाचली. इंटर्नशिप सुरू होईपर्यंत पेशंटला इंजेक्शन कसे द्यावे याचा आत्मविश्वासच त्यांना नव्हता; पण ते एमबीबीएस परीक्षा उत्तीर्ण होते आणि रोग्यांवर इलाज करायची सनद मात्र त्यांना प्राप्त झाली होती. याचेही पुन्हा कारण तेच आहे. पाठांतर केले, की उत्तीर्ण होता येते ही रूढी आपल्या देशातले सीईटी परीक्षा पास होणारे उत्तम पाठांतरे असतात असे त्यांचे पालकच सांगतात.

नागपूरच्या मेयोचे डीन डॉ. पी. टी. वाकोडे यांच्याशी गप्पा मारीत बसलो होतो. बोलण्याच्या ओघात त्यांनी सहज म्हणून एक आठवण सांगितली. ते शिक्षक असताना त्यांच्या डिनने एक प्रश्न त्यांना विचारला, ''तुम्ही आठवडय़ाला किती लेक्चर्स देता?'' आणि त्यांनी चक्क सांगितले, ''नाही, मी लेक्चर्स देतच नाही.'' पण त्यानंतर वर्गात ते ज्या पद्धतीने शिकवतात ती पद्धत त्यांनी सांगितली. कुठल्याही नेटच्या कसोटीत न बसणारी ती पद्धत होती. विद्यार्थ्यांना आपला ईएनटी (कान, नाक, घसा) हा विषय कळावा म्हणून त्यांनी एक पुस्तक लिहिले आणि त्यांचा पुढचा अनुभव असा, की ते ज्या मागास देशात 'व्हिजिटिंग फेलो' म्हणून गेले त्या प्रत्येक देशातले अनेक विद्यार्थी त्यांना त्यांच्या पुस्तकामुळे ओळखत होते. गाईड लिहिणं कमीपणाचं मानलं जात होतं. त्या काळात माझे शिक्षक डॉ. स. रा. गाडगीळ यांनी अनेक कथा, कादंबर्‍यांचे विवेचन करणारे गाईड्स लिहिले. कोल्हापूरहून हे गाईड्स प्रसिद्ध होत असत. मी हे गाईड्स वाचून बी.ए.ची परीक्षा बहिस्थपद्धतीने नुसता पास झालो नाही, तर सर्व तृतीयही आलो. कुरुंदकर सरांनी गाडगीळ सरांच्या एका पुस्तकाला प्रस्तावना लिहिताना म्हटले आहे, की डॉ. गाडगिळांनी नको तिथे खूप काही चांगले लिहून ठेवले आहे. त्यास आमच्या अध्यापन क्षेत्रात 'टिचिंग मेथडॉलॉजीची साधनसामग्री' म्हणतात. नेट परीक्षा उत्तीर्ण होणार्‍या विद्यार्थ्यांना टिचिंग मेथडॉलॉजी विकसित करावी. टिचिंग टेक्निकल आत्मसात कराव्यात असे या नेट परीक्षेत काहीच नसते. म्हणून मी त्याही वेळी लेखात म्हटले होते, 'खरे तर महाविद्यालयीन प्राध्यापकांनी परीक्षापद्धतीचे स्वरूप बदला, तिचे स्वरूप प्रशिक्षणाचे असावे अशी तरतूद करा, अशी मागणी करायला हवी. पण पाठांतराचे यश म्हणजे पात्रता आणि परिणामकारक वक्तव्य करण्याचे कीर्तनतंत्र म्हणजे अध्यापन या दोन दोषांतून आपल्याला अध्यापन क्षेत्राला मुक्त करता येईल का? माझ्यासारख्या एका लहानशा डबक्यात तीसपस्तीस वर्षे इमानेइतबारे शिकवून, दर महिन्याचा पगार उचलून सेवानिवृत्त झालेल्या साध्या शिक्षकाला थेट देशाच्या नियोजनावर बोलण्याचा अधिकारच काय? असे समजून आपण दुर्लक्ष करायला मोकळे आहात.

(लेखक हे नामवंत आंबेडकरी विचारवंत

व नाटककार आहेत.)

भ्रमणध्वनी - 9881230084

No comments:

Post a Comment