एकदा राखी बांधून बहिणीने भावाला वचनात बांधून घेतल्यावर पुन्हापुन्हा दरवर्षी राखी का बांधावी? एकदा देवा ब्राह्मणासमक्ष पत्नी म्हणून स्वीकार केला. तिचे मंगळसूत्र दरवर्षी आपण रिन्यू कुठे करतो का? रक्षाबंधन दरवर्षी का? याचेही स्पष्टीकरण देण्यासाठी एखादी देवासुरद्वंदाची कथा मग त्या आचाराला जोडली जाते आणि हा आमचा आचारधर्म असेही सांगितले जाते. भविष्योत्तर पुराणात अशी एक कथा सांगण्यात आली आहे. असुरांनी इंद्रास पराभूत केले. इंद्राणीने त्याच्या उजव्या हातावर राखी बांधली. त्या राखीच्या प्रभावामुळे पुढे असुरांची दाणादाण उडाली. हा राखीचा प्रभाव वर्षभर टिकणार असल्याचेही शुक्राचार्यांनी सांगितले. त्यामुळे असुर त्या संधीची वाट पाहत वर्षभर थांबले. शक्तीचे स्थानांतर होत असते ही समजूत आदिम युगापासून चालू असून अशा समजुतींना यात्वात्मक श्रद्धा असेही म्हणतात. असे अनेक यात्वात्मक संकेत आपल्या दैनंदिन जीवनात रूढ आहेत. दृष्ट लागल्यानंतर कोंबडीचे पिलू अथवा अंडे बाळावरून उतरविणे ही अशीच यात्वात्मक समजूत. अशा या यात्वात्मक रूढींचा धर्मात समावेश केलेला असला तरी त्या धर्मश्रद्धा नव्हेत. अनाकलनीय गूढ शक्तींचे आकलन करून घेताना आदिम मानवी समूहाने निर्माण केलेल्या या समजुती होत. काळाच्या ओघात या समजुती वेगवेगळय़ा पद्धतीने विकसित होत असतात. परस्परसंबंध सबळ करण्यासाठीही अशा समजुती उपयुक्त ठरतात. म्हणून अशा आचरणातील व्यर्थता लक्षात आली तरी लोक मात्र हा आचारधर्म पाळतात. म्हणूनच आजही बाळास दृष्ट लागते ही श्रद्धा कायम आहे आणि ती काढण्यासाठी काही संकेतात्मक आचरण केले जाते; पण दृष्ट लागली म्हणून आधुनिक आई दवाखान्यात जायचे टाळते असे मात्र नाही. त्यामुळे दृष्ट काढणे यामुळे खूप मोठी हानी होते आणि आपण प्रतिगामी ठरतो असा भयगंड बाळगण्याचे काहीच कारण नाही. जसे यात्वात्मक श्रद्धेबाबत तसेच प्रतीकात्मक पद्धतीने मानवी संबंध जपावेत म्हणून पाळल्या जाणार्या आचरणाबाबतही आपण भयगंड बाळगता कामा नये. परिचित माणसाची भेट झाली की, आपणास आनंद होतो. हा आनंद कुणी 'नमस्कार' म्हणून, कुणी 'गुडमॉर्निग' म्हणून तर कुणी 'सलाम वालेकुम' म्हणून व्यक्त करतो. म्हणून 'नमस्कार' म्हटल्यावर कुणी हिंदू ठरत नसतो किंवा 'सलाम' केल्यामुळे कुणी मुसलमान ठरत नसतो. मी माझ्या महाविद्यालयात रुजू झालो त्या वेळी अनेक मुलं मला व्हरांडय़ातून जातायेता 'जयभीम'म्हणत असत. त्या वेळी काही हिंदू प्राध्यापकांना दचकल्यासारखं व्हायचं. एकानं तर हे बोलून दाखवायचं धाडस केलं. तेव्हा मी एवढंच म्हणालो, ''मी नमस्कार केला तर मी हिंदू असल्याचं समाधान तुम्हांला मिळतं का?'' तसं असेल तर बौद्ध मुलांना 'जयभीम' म्हणताना प्रथमच आपण या मध्यमवर्गीयांच्या कॉलेजमध्ये विनासंकोच बुद्ध म्हणवून घेण्याचं समाधान मिळवू द्या ना? त्यात तुमचं काय नुकसान होतंय. नंतर मात्र माझे सगळेच सहकारी प्राध्यापक अभिवादनाचा एक निरुपद्रवी संकेत म्हणून माझ्या 'जयभीम'कडे पाहू लागले. आपला देश विविध जातीजमातींचा आणि विविध उपासनापद्धती करणार्यांचा आहे. त्यामुळे अभिसरणाच्या काळात असे घडतच असते. याबद्दल कुठला भयगंड कुणी बाळगता कामा नये. अर्थात हे सर्व संकेत पाळताना कोणते निरुपद्रवी आहेत आणि कोणते आघातजन्य आहेत याचा समाज विचार करतो. तेवढा आपण केला की पुरे. असाच एक प्रसंग सांगून मी हे टिपण संपवतो. तिलावत नावाच्या माझ्या प्राध्यापक मित्राच्या लग्नातली गोष्ट. आम्ही सर्व मित्र एकाच दस्तरखानवर बसून जेवत होतो. माझ्या बाजूला माझा बालमित्र एल. डी. जहागीरदार हा आमच्या प्राध्यापक संघटनेचा खूप मोठा नेता आणि जन्मब्राह्मण मित्र तर दुसर्या बाजूला संस्कृत पाठांतर भन्नाटपणे म्हणून दाखवणारा प्रा. पठाण हा मित्र होता. जहागीरदारच्या ताटात वाढण्यासाठी एक वाढपी आला. तो त्याच्या ताटात बिर्याणी वाढणार तोच पठाण त्या वाढप्यावर जवळपास ओरडलाच, ''चल निकल आगे!'' वाढपी पुढं निघून गेला. त्यानंतर दुसर्या वाढप्याने माझ्या आणि जहागीरदारच्या ताटात व्हेज पुलाव टाकला आणि तो पुढे गेला; पण या प्रकाराने माझा जहागीरदार मित्र काहीसा गोंधळून गेला. तो पठाण का रागावला म्हणून विचारू लागला. त्याच्या बाजूच्याने सांगितले, ''सर, ओ डिश आपकी नहीं थी, वो बडे की थी'' आणि सगळे हसले. आता आपणाला ती डिश नाकारावी म्हणजे आपण काय लहान आहोत? आपणही बडेच आहोत ना? असा काहीसा भाव जहागीरदारच्या मनात होता. मी त्याला जेवण झाल्यावर 'बडे का' या शब्दाचा सांकेतिक अर्थ सांगितला तेव्हा तोही मोकळेपणानं हसला. पण एका दस्तरखानवर बसून जेवले म्हणून आपण धर्म बाटला असे त्याला वाटले नाही की त्याच्या ताटात बडे की बिर्याणी पडता कामा नये याची काळजी घेणार्या पठाणलाही 'पडू देत त्याच्या ताटात' म्हणजे तोही मुसलमान होईल असेही वाटले नाही. अभिसरण प्रक्रियेत धर्मश्रद्धा कशाला म्हणतात आणि आचरणाचे औपचारिक संकेत कोणते असतात हे सामान्य माणसांना नक्कीच कळत असतं. म्हणून तर 'तीळगूळ घ्या, जयभीम बोला' असे सांगून तीळगूळ देणारे विद्यार्थी मित्रही मला भेटतात. (लेखक हे नामवंत आंबेडकरी विचारवंत व नाटककार आहेत.) भ्रमणध्वनी - 9881230084 |
Sunday 7 October 2012
धर्मश्रद्धा आणि सांकेतिक आचार
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment