Monday 29 October 2012

श्रेष्ठ कोणता? ठरवून केलेला की प्रेमविवाह?


वरील प्रश्नांवर मतदान घ्यायचे ठरले तर माझी खात्री आहे, की ठरवून केलेला विवाह हाच श्रेष्ठ विवाह आहे असेच बहुमताने सिद्ध होईल. त्याचे कारण भारतीय मानसिकतेत दडलेले आहे. इथे ठरवून केलेला विवाह हाच श्रेष्ठ विवाह असतो असे मानले जाते आणि या मानसिकतेला भारतीय संस्कृतीचा ज्ञात इतिहास तीन हजार वर्षाचा असेल तर तेवढय़ा काळाचा नक्कीच पाठिंबा आहे. इंग्रज आपल्या देशात येईपर्यंत तरी हा प्रश्नच आपल्या जीवनशैलीत उद्भवलेला नव्हता. गेल्या शेदीडशे वर्षात मात्र भारतीय मानसिकतेला धक्का पोहोचला आहे. आमच्या जीवनशैलीत आजही ठरवून केलेला विवाह 90/95 टक्के होतात. अर्थात ही आकडेवारी अंदाजे दिली आहे. काही वर्षापूर्वी डॉ. इरावती कर्वे यांनी या प्रश्नावर एक सव्र्हे घेतला होता असे वाचल्याचे स्मरते. डॉ. इरावती कर्वे या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या मानववंशशास्त्रज्ञ आणि त्यांनी हा सव्र्हे पुणे परिसरात घेतला होता. तेव्हा त्यांना असे आढळून आले, की प्रेमविवाहाचे प्रमाणसुद्घा खूपच कमी झाले आहे. त्यांनी घेतलेला हा सर्व्हे बहुधा 1960च्या आसपास घेतला होता. आज कुणी सव्र्हे न घेता हाच प्रश्न विचारून मत अजमावयाचे ठरवले तर आपल्या असे लक्षात येईल, की विवाहेच्छुक तरुण प्रेमविवाहाला पसंती देतात. पण प्रौढ मंडळी मात्र ठरवून केलेल्या विवाहांनाच पसंती देतात. अर्थात कुणी कोणतीही उत्तरे देवोत, आपल्या देशात मात्र ठरवून केलेल्या विवाहांची संख्याच अधिक आहे हे मात्र निश्चित.

काही वर्षापूर्वी युरोपमधील विकसित देशांतील एक शिष्टमंडळ भारतीय संस्कृतीचा अभ्यास करण्यासाठी भारतात आले होते. त्यांची एक प्रकट मुलाखत औरंगाबादच्या रोटरी क्लबने आयोजित केली होती. मी काही रोटरियन नाही; पण माझ्या एम. डी. जहागीरदार या नावाच्या मित्राने अत्यंत आग्रहाने मला त्या कार्यक्रमास नेले होते. तिथे जी प्रश्नोत्तरे झाली त्यात विवाह कुटुंबसंस्थेसंबंधी काही प्रश्न होते. शिष्टमंडळात एक चाळिशी ओलांडलेली विदुषी होती. त्या विदुषीला भारतीय विद्वानाने युरोपातील विवाहसंस्थेबद्दल प्रश्न विचारला. तेव्हा ती हसून म्हणाली, ''आम्हांला दोन मुलं आहेत. आता ती बरीच मोठी झाली आहेत. पण अजून तरी आम्ही विवाह करावा या गोष्टीचा निर्णय घेतलेला नाही.'' संपूर्ण सभागृहात हास्यकल्लोळ उडाला. त्या बिचार्‍या विदुषीला मात्र हे नक्कीच कळले नसावे, की ही भारतीय माणसे का हसतात. खरेतर सगळी भारतीय माणसे का हसत होती व स्वत:ला प्रगत म्हणवणारी या देशातील माणसं विवाह न करता एकत्र राहतात. संतती निर्माण करतात. केवढी ही विसंगती? यांना नैतिकता ती कशी कळत नाही? असेच जणू त्या हसण्यातून व्यक्त होत होते. पण ती विदुषी प्रगत देशांतील म्हणून आम्हांला तिचा राग येत नव्हता. आपल्या देशात विवाहबाह्य संबंधांतून निर्माण होणार्‍या संततीला 'अनौरस संतती' मानतात आणि अशा संबंधांना अनैतिक ठरवतात. अर्थात, असे संबंध ठेवलेच जात नाहीत असे मात्र नाही. अशाच संबंधांतून जन्माला येणार्‍या संततीला उकिरडय़ावर टाकून देण्याची क्रूर चाल आपल्याकडे आढळून येते. खरेतर

महाभारतातला कर्ण हा वाहत्या पाण्यात मरण्यासाठी सोडून दिलेला कुंतीपुत्र होता. पण आमच्या महाकवी व्यासालासुद्धा कर्णाच्या पित्याचे मोठेपण नमूद करता आले नाही. व्यासाच्या प्रतिभेतली ही उणीव आपल्या युगातले महाकवी नारायण सुर्वे यांनी मात्र दूर केली. उकिरडय़ावर फेकून देणार्‍या अशा आईबद्दल आणि पित्यापेक्षाही अधिक माया लावणार्‍या पित्याबद्दल त्यांनी अत्यंत कृतज्ञतापूर्ण उद्गार काढले आहेत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या हिंदू कोडबिलाला सरदार पटेल आणि डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी कडाडून विरोध केला. बंगालमध्ये रूढ असणार्‍या स्मृतीप्रमाणे स्त्रियांना पतीच्या संपत्तीत हक्कच नव्हता. तो हिंदू कोडबिलाप्रमाणे आपल्या देशातील सर्वच स्त्रियांना मिळाला. पण बाबासाहेबांच्या मनातला मानवतावाद किती व्यापक होता हे आणखी एका उदाहरणावरून लक्षात येईल. त्यांनी स्त्रियांना पैतृक संपतीत वारसाहक्क तर दिलाच होता; पण जी अनौरस संतती आहे, रखेलीची संतती आहे त्यांनासुद्धा हा हक्क देण्यात यावा अशी तरतूद केलेली होती. बाबासाहेब काळाच्या खूप पुढे होते. विधवांच्या अनौरस संततीसाठी आश्रम सुरू करणारे महात्मा फुले, पंढरपूरचे नवरंगे आणि बाबासाहेब आंबेडकर हे काळाच्या पुढे जाऊन माणसांच्या चुकांची नवजात आणि अश्रप बालकांना शिक्षा होऊ नये म्हणून विचार करणारे, कृती करणारे एक महापुरुष होते.

विवाहबाह्य संबंधांतून जन्माला येणार्‍या संततीला आम्ही नैतिक पाठिंबा देत नसलो तरी आपल्या देशाचे अभिमानाने 'भारत' हे नाव उच्चारताना आपण लक्षात घ्यायला हवे, की दुष्यंताचा पुत्र भरत हासुद्धा विवाहबाह्य संबंधांतूनच जन्मला होता. राजा दुष्यंताने शकुंतलेशी विवाह करून भरताला औरस ठरवले. इतकेच नाही, तर 'शकुंत' नावाच्या पक्ष्याने जिचे बालपणी लालनपालन केले ती शकुंतला मेनका आणि विश्वामित्राचे अनौरस अपत्य होती. स्त्रीपुरुष संबंध विवाहोत्तरच असायला हवेत, ही भारतीय मानसिकता आहे. कारण विवाहपूर्व शरीरसंबंधातील संतती ही 'अनैतिक' म्हणून 'अनौरस' ही आमची मनोधारणा आहे.

पण ज्याचा आपला कधीच पूर्वपरिचय नाही अशा पुरुषाला भारतीय स्त्री आपले शरीर दान म्हणून द्यायला तयार होतेच कशी? हे जर्मन विदुषींना प्रचंड कोडे वाटते. त्यांना भारतीय विवाहपद्धती ही मागास व क्रूरपणाची वाटते. विवाह आणि शरीरसंबंध या दोन्ही गोष्टी प्रेमोत्तरच असायला हव्यात असे प्रगत देशांतील लोकांना वाटते.

आता या परस्परविरोधी गोष्टींचा एकत्रित विचार केला तर आपल्या लक्षात येते ती गोष्ट अशी, की आजच्या आधुनिक आणि प्रगत देशांतील लोकांना विवाह परस्पर परिचयानंतर आणि एकमेकांच्या आवडीनिवडी कळल्यानंतरच व्हायला हवा असे वाटते तर भारतीय मानसिकता मात्र ही आधुनिकता अजूनही मनाने स्वीकारायला तयार नाही. त्याची दोन कारणे आहेत. नियोजित विवाह करताना मनाला मानसिक समाधान देणारी जात टिकवून ठेवता येते हे पहिले कारण आणि नियोजित विवाह पतिपत्नीला घटस्फोटापर्यंत जाऊ न देता वृद्धापकाळापर्यंत एकत्रित ठेवतो. खरेतर ही दोन्ही कारणे आता पुरेशी समर्थनीय उरली नाहीत. आपले जात टाकून देण्याचे धैर्य होवो अगर न होवो, जात ही काही आपले संरक्षण करणारी आणि वंश शुद्धपणे टिकवून ठेवणारी संस्था आहे हे आज आपण खात्रीने मानत नाही आणि नियोजित विवाह टिकून राहतात हेही खरे नव्हे. कारण नियोजित विवाहानंतरही घटस्फोट होतच आहेत. त्यामुळे जात टिकणे आणि विवाह टिकून राहणे याआधारे कोणता विवाह श्रेष्ठ आणि कोणता विवाह कनिष्ठ ठरवणे हेच मुळात चूक आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे. कोणत्या प्रकारच्या विवाहात स्त्रीपुरुषांचे निर्णयस्वातंर्त्य अबाधित राहते, असा प्रश्न आपण उपस्थित केला पाहिजे आणि व्यक्तीच्या निर्णयस्वातंर्त्याची बूज राखतो तोच विवाह अधिक चांगला हे आपण लक्षात घेतले पाहिजे. असा विवाह मोडतो की नाही? उत्तर 'होय' असेच आहे. पण इथे जबाबदारी विवाह ठरविणार्‍यांची नसते, तर विवाहाचा निर्णय घेणार्‍यांची असते. 'स्वातंर्त्य' ही गोष्ट अतिशय जबाबदारीने स्वीकारावयाचे मूल्य आहे. स्वातंर्त्य हवे, पण माझी सुरक्षितताही धोक्यात येऊ नये असे जे म्हणतात त्यांना स्वातंर्त्य हे मूल्य आहे हेच नीट समजलेले नसते. स्वातंर्त्यचळवळीत जे फासावर लटकले ते फासावर जाताना पश्चात्तापाने रडले नाहीत, तर हसतमुखाने फासावर गेले. स्वातंर्त्याचे हे मोल सार्वजनिक चळवळीपुरते नसते, तर व्यक्तिगत पातळीवरही असते हे आपण कधीतरी लक्षात घ्यायला हवे. हे जर लक्षात आले तर वधूवरांना निर्णय घेण्याचे स्वातंर्त्य असलेला विवाह की वधूवरांचे निर्णयस्वातंर्त्य नाकारणारा विवाह यापैकी कोणता विवाह तुम्ही पसंत कराल, असा प्रश्न आपण विचारायला हवा. भारतीय माणूस कोणत्याही बदलाचे एकदम स्वागत करीत नाही. तो बदलातले धोके आणि सनातनी अवस्थेतला कोंडमारा या दोन्हींचा समन्वय करीतच वाटचाल करतो. आम्ही आज विवाहालाच मान्यता देत असलो तरी वधूवरांच्या अनुरूपतेचा कटाक्षाने विचार करीत आहोत हे इथे लक्षात घेतले पाहिजे. टप्प्याटप्प्याने का होईना आपण आज बालविवाह पद्धत टाकून देण्यासाठी अनुकूल झालो आहोत. कारण तिथे वधूवरांच्या अनुरूपतेचा विचार फारच गौण असतो. आता आम्ही वधूवरांचे शिक्षण, आरोग्य, अव्यंगत्व, अर्थोत्पादनक्षमता याही घटकांचा विचार करीत आहोत. यात हळूहळू आवडीनिवडींचाही समावेश होत आहे आणि त्या एकमेकांना सांगता याव्यात अशीही संधी देऊ लागलो आहोत. 'स्वयंवरात' स्त्रीच्या निर्णयक्षमतेचा विचार केलेला नव्हता. 'गांधर्व' विवाहात शरीरसंबंधापलीकडे असणार्‍या सहजीवनाचा विचार केलेला नव्हता. म्हणून विवाह कोणता श्रेष्ठ आणि कोणता कनिष्ठ यावर चर्चा करीत बसण्यापेक्षा तो वधूवरांना संमत व अनुरूप कसा होईल याचाच विचार करणे अधिक शहाणपणाचे ठरणार आहे. कारण या विवाहात व्यक्तीच्या स्वातंर्त्याला अवकाश आहे.

(लेखक हे नामवंत आंबेडकरी विचारवंत

व नाटककार आहेत.)

भ्रमणध्वनी-9881230084

2 comments:

  1. विवाह करण्यासाठी स्त्री-पुरूष दोघांचीही पूर्णपणे संमती असावी लागते मग तो गांधर्व विवाह असो किंवा ठरवून केलेला. कोणाच्याही मर्जी शिवाय विवाह पुढे घातपाताचे कारण ठरू शकते.

    ReplyDelete
  2. विवाह करण्यासाठी स्त्री-पुरूष दोघांचीही पूर्णपणे संमती असावी लागते मग तो गांधर्व विवाह असो किंवा ठरवून केलेला. कोणाच्याही मर्जी शिवाय विवाह पुढे घातपाताचे कारण ठरू शकते.

    ReplyDelete