'' आई, एक लाडू घेतो ना ''
'' एक देइन थुतरीत. या लायन्या गंजातले लाडू कुठं गेले?''
'' बाबा खाऊन राह्यले कोठय़ात''
''सत्यानास झाला. बाप असा अन् लेकरं तसे. पुरा गंजच घेऊन गेला त्याचा बाप. आता काय डोकं घेऊ मी?''
'' काय झालं ऐश्वर्या वैनी? काहून डोकं घेऊन राह्यल्या?''
'' काय सांगू भाऊजी. या बापलेकाइनं मले मॅट केलं''
'' कसं काय?''
'' म्या बालवाडीच्या लेकरासाठी बेसनाचे लाडू केले, त्यातले वीस-पंचवीस लाडू बापलेकाइनं खाल्ले''
'' घरचं वावर असलं की, कोणीही खाते''
'' असं रोज खाल्लं तर पुरीन काय मले?''
'' कुठं न्या लागतात इतके लाडू?''
'' म्या बचतगटातर्फे मयनाभर बालवाडीचा ठेका घेतला, पन्नास पोराइले रोज सकाळी फराळ करून द्या लागते, कोन्या रोजी पोहे. कोन्या रोजी शेंगदाण्याची वडी. सिरा. अन् बारा वाजता खिचडी''
'' याचा पैसा कोन देते?''
''मयनाभर जवळचा पैसा लावा लागते, मयना झाल्यावर त्याचं बिल निघते, कसेही मयना भरला की हजार दीड हजार उरतात. पण याच्यात असे घरीच लाडू खाल्ल्यावर काय करीन धतुरा?''
''भाऊ कुठं गेले?''
''माह्या चोरून कोठय़ात लाडू खाऊन राह्यले, निरा अयदी झाले तुमचे भाऊ. रोज सकाळी संड फराळ करतात. दुपारून खिचडी खातात अन् मी वावरात कामाले गेली की दाने भाजून खातात, तुम्हीच सांगा एकटय़ा बाईनं काय करावं? शाळेत गेल्यावर मले लाडवाचा वाटप करा लागते, खायासाठी लेकरं कावरल्यासारखे करतात, नयतुरन्या पोरी एकमेकीले लोटतात''
'' म्हणजे जवान पोरीले लाडू भेटतात काय?''
'' सरकार म्हनते गावातल्या सार्या जवान पोरीले लाडू खाऊ घाला''
'' काहून?''
''नयनतुरन्या पोरी सुधरल्या पाह्यजात, खापर्या तोंडाच्या पोरीले कोनी लवकरच पसन करत नाही म्हणून त्याहीच्या तोंडावर रौनक आली पाह्यजे''
''बरोबर आहे. सरकारले वाटते की त्याहीच्या पोटी खलीसारखे पोरं जन्माले आले पाह्यजात.''
'' त्या पोरी पाहून गावातले म्हातारे बुढे उसयले''
''कसे काय?''
'' ते म्हंतात आमालेबी निराधार योजनेतून लाडू द्या''
''मंग?''
'' लांडगे मास्तरीन म्हणे तहसीलवर मोर्चा न्या''
''पुढे चालून तसं होईन. अमेरिकेनं भारताले कर्ज देलं की सरकार म्हातार्या मानसाले दोन टाइम फुकट जेवन देईन. त्याहीच्यासाठी पेशल बिअर बार उघडीन. म्हतार्याले चिकन. बिर्यानी. दात नसले तरी हड्डय़ा फोडा लेकहो''
''आता सार्याइले लाडू भेटल्यावर कोन राह्यलं?''
''जवान पोट्टे राह्यले''
''तेही पोरीच्यानं बालवाडीभोवती रुंगयतात''
''खूप लोड झाला तुमच्याभोवती वैनी''
'' मले घडीभर फुरसद नाही भाऊजी. लाडू झाले की बारा वाजता खिचडी शिजवा लागते. लेकरं संड खातात अन् जागीच लुंडकतात'
''म्हणजे?''
''जेवले की भीतीपाशी सरकतात अन् जागीच आंग टाकतात''
''लांडगे मास्तरीन काय करते?''
'' ते दिवसभर हिसोब ठेवते, लाडू किती वाटले? लेकरं किती आले? खिचडी कोणं खाल्ली, कोणं उष्टी टकाली? याचा सारा हिशेब वहीत मांडते''
'' मंग शिकोते कधी?''
''शिकवा कायले लागते? तिचा सारा टाईम हिसोबातच जाते, तसंही सरकार म्हनते आठवीलोक सारे पास करा. म्हणून मास्तरीन शिकोयाच्या नांदी लागत नाही. दिवसभर हिसोब करते अन् लाडू खात राह्यते, दोन मयन्यात मास्तरीन संड पडली.''
'' हे आठवीलोक परीक्षा नसल्यानं सगळे पोट्टे चालढकल करून राह्यले, पोराले स्पर्धा म्हणजे काय ते समजतच नाही, त्याहीच्या मेंदूतून स्पर्धा नावाची गोष्टच उडून टाकली. खिचडी खाय अन् झोपून राह्य''
'' हे शिक्षण पटलं नाही भाऊजी मले''
'' त्यात गुरुजीची काही चूक नाही, वरतूनच तसे आदेश आहेत की, सर्वकष व सातत्यपूर्ण मूल्यमापन करा. आकारीक चाचण्या घ्या''
'' म्हणजे?''
''पोराचा आकार उकार पाहा. त्याचं वजन करा. तो जाडा झाला की बारीक झाला ते पाहा. बारीक काहून झाला त्याची कारणे द्या''
'' म्हणजे आता लेखी परीक्षा होतच नाही काय?''
ते फक्त नावालेच होते''
'' हे पद्धत कोणं काढली डोकशातून?''
'' दोन-चार शायने सरकारच्या डोकशावर बसेल असतात ते सरकारले अक्कल शिकवतात.. हे फक्त हेल्पर तयार कर्याची योजना आहे''
'' म्हणजे?''
'' साधारण पोरगा आठवीलोक पास होते, दहावीत कॉपीमुक्त अभियान असते, पोट्टा कसातरी दहावीत निघते, मग बारावीत गोता खाते, एकखेप गोता खाल्ला की तो कोन्याच कामाचा राह्यत नाही''
'' मग काय करतीन आपले पोट्टे?''
'' ते घमिले उचलतीन! आता परराष्ट्रीय कंपन्या भारतात घुसून राह्यल्या, त्याहीले घमिले उचलणारे हेल्पर पाह्यजात, आपले बारावी नापास पोट्टे हेल्पर म्हणून लागतीन.. अशी आहे हे चालबाजी!
'' मंग काय फायदा. रात झोपीत जाते अन् दिवस खिचडी खायात जाते.. मोठे झाल्यावर हे पोट्टे फक्त खायाच्याच कामाचे होतीन., काय म्हणावं या शिक्षणाले? भावी पिढीचा सत्यानाश!
(लेखक हे नामवंत वर्हाडी कथाकार आहेत.)
भ्रमणध्वनी - 9561226572
No comments:
Post a Comment