Wednesday 31 October 2012

माहेतीन घरं


शंकर बडेमाहं जलमगाव यवतमाय जिल्ह्यात पह्यलंच बोरी अरब आन् आताचं बोरीस्वामी चंद्रशेखर. माहे बावाजी त्यायले आमी नाना म्हनो अन् गाववाले मुनीमजी. ते नगर म्हंजे अहमदनगर जिल्ह्याच्या पार्थडी तालुक्याच्या वडगांव बडय़ाचं इथून दुकाय पडल्यानं गाव सोडून पोट जगवासाठी म्हून पह्यले यवतमायले आले ते मायबापासंग. तवा ते सहा-सात वर्साचे होते. तिथून मंग सारे बोरीले याच्यासाठी का इथयी कापसाचे जीनं होते. कंपन्याचे आफीस होते म्हंजे गेल्या गेल्या काम भेटाचा चानस होता. त्यायनं लहानपनापासून लढ्ढा मालानी अँड सन्स या फर्ममधे तेवीस वर्स आन् श्री जोधराजजी बाजोरीया यायच्याकडं सतरा वर्स मुनिमजी केली. सोताच्या कमाईतून थोडी थोडी अरा अरामान शेती आन् मंग आखरीले घर घेतलं. लहानपनापासून ज्या घरानं मले मोठं केलं. ते बोरीचं घर. खूप आठोनीच्या त्या घराच्या अजूनयी लहानपनात घेऊन जाते. ते घर दोन मजली. खाली जवय जवय सात-आठ खोल्याचं घर आन् अरध्या भागावर माडी. घर सडकीले लागून. माडीच्या भिती मातीच्या आन् खालच्या मातीचं. आता खालची जमीन रोज गर्दीच्या पांढर्‍या मातीनं सारवलया जाये. पन भितीले घरी देवीचे घट राहे म्हून नवरातीच्या आंधी तवा दगडूमामा कामावर राहे तं त्याले आंदिलल्या दिसी माय सांगून ठुवे का, 'दादा घरी गेल्यावर्त माह्या घरी निरूप देजो उद्या सारवनाले या लागते म्हून. हे दरसालचं असल्याच्यानं मामाले बाकी मालूमचं राहे. दुसर्‍या दिसी मामा आन् पारबतामामी. मामा लाकडाच्या सिडीवर वर्त आन् खालून द्याले मामी.

माडीवर्त मधांतल्या खंब्याले माय रई लावे. आता तं सारा आयत्याचा जमाना आला त्यायले याची मजा आन् त्या मागचं कष्ट समजनारच नाई. माय रई लावे तवा घुसयनार ताक पायतानी आन् रईच्या दोरीचा येणारा लयबद्ध आवाज आयकतानी आन् आखरीले ताथा लोण्याचा गोया जिभीले उगीचंच पाणी सोडे. तवा सयपाक चुलीवरच राह्ये त्यासाठी मातीचाच सयपाकाचा मोठा वटा उला असलेली मोठी चूल. वटय़ाच्या त्या कोंटय़ात लहान चूल कवा पावन्याची गडबड असली तं ते लागे. मायचा भाकरी थापतानी बिल्लोराचा होणारा किनकिन आवाज त्याच्यात उल्यावर असलेल्या कास्याच्या कासील्यात शिजाले वरनासाठी सिजाले ठुलेली तुरीची दाय सिजत आल्यावर त्याच्या वाफीनं झाकनं म्हून ठुलेली थुडथुड उडनानी वाटी तिच्या आवाजानं भूक चेलवून टाके. सकायी चार वाजता उठलेली माय सडा टाकण्यापासून सयपाक अटपला का आमाले वाढून लगलग चार घास पोटात ढकलसे का वावरात निंदाले गेलेल्या बायामांग ध्यान द्याले निंघे. सांजीले घरी आली का हातपाय धुवून पोरीनं केलेला च्या पोटात ढकलला का देवाले दिवा लावून हात जोडनं झाले का रातीच्या सयपाकाची तयारी सुरू असतानी गडी कोटय़ातून बादलीभर दूद घेवून ये. मंग मोठय़ा पितयी गंजात (अंदरून कलयी केलेल्या) ते दूद तपवाले ठुवे. सार्‍यायचे जेवन अटपले का आखरीची झाक पाकं करून चुलीवर पोतेर फिरवता फिरवता जीनातले दहाचे टोले पडे. अशी माय कामाले जुतल्या जुतून पन वटवट नाई का बडबड नाई. कवा हे दुखते नाई का ते दुखते नाई. आता हे सारं आठोलं का डोयात पानी कवा आलं समजू पडत नाही.

आमा सहायी बईन भावाचे लगन याच घरानं पाह्यले तवा सुखावला. तं मोठी वयनी गेली मंग काई वर्सानं नाना गेले तवा दुखावलायी. घराची आपल्याले आन् आपली घराले इतकी आदत पडून जाते त्यालेचं नातं जुयन म्हनतेत. एक वक्ता असी आली का बायकोपोरं घेवून घरचं नाई तं गावचं सोडा लागलं. या दुखाले शब्दात नाई सांगता येत. ज्या वयात मानसाचा जन्म बसत असते त्या वयाच्या सदतिसाव्या वर्षी जगन्याची नईन इनिंग सुरू करा लागली. टेंपररी लिझच्या जागेवर नेताजी चौकात सुभाष पावडे या कवी मित्राच्या ओयखीनं बेकरी अँटमचं दुकान सुरू केलं. त्याच्या भरोस्यावर्त सहा जनाची सर्कस खेचनं सुरू झालं. अरे 'संसार संसार' कायले म्हन्ते त्याचे चटके अनुभवत होतो. त्यातनी खुसीची गोठ असी का यवतमाय माह्यासाठी नवाड नोतं आन् अधाराले दोस्त होते. आमी इथ आलो तवा माही मोठी पोरगी भारती पाचव्या वर्गात, निता तिसरीत, गजू बालकमंदिर आन् लायनी कीर्ती एकदम लहान. आमाले येवून दहाक मयने झाले असतीन. का एका दिसी माहे 'वर्गमित्र' सुरेश कैपिल्यवार त्यायचा निरूप आला का दुकान बंद झाल्यावर्त भेटून जा. मी घरी जाण्याआंधी त्यायच्याकडं गेलो. ते घराच्या बैखटीत बसून होते. आलेलं पानी पिल्यावर म्या इचारलं, ''सेठ कसं काय बोलावलं होतं?'' त्याच्यावर त्यांनी सांगितलं की, ''या या ठिकाणी असं असं घर आहे ते उद्या सकाळी जाऊन पाहून घे आणि पसंत आहे का सांग.'' असं म्हणून त्यायनं किल्ली समोर धरली ती हातात घेत म्या इचारलं. ''कोणासाठी?'' त्याच्यावर ते तडकले. म्हने, ''माझ्यासाठी मला घर नाही ना म्हनू!'' आन् मंग शांत होत बोल्ले, ''स्टेजवरून बोलायला सांगा तर एकदम पुढं, बाकी ववहारात शून्य. अरे आता तू कायम इथे रहायला आल्यावर तुला घर नाही लागणार का? कसा रे बाबा तू!'' माझ्या डोयात आसूचं जमले ते त्यायले दिसू नोय म्हून तोंड फिरवलं आन् ताडताड घराकडं निंघालो.

एखांदी सुदी गोठ घडाची असनं तं त्याचे योगयी तसेच येतेत. मी राती घरी आल्यावर्त घरी बायकोले काय झालं ते सांगतलं आन् सकायी दुकान उघडायच्या आंधी ते घर पाहून या लागन म्हून सकायी रोजच्या परीस आंधी उठवाले सांगून आंग टाकलं. सकायी उठून तयारी होत आली. आंघोय करून देवाले हात जोडून कपडे घालूनंच राह्यलो तं दाठ्ठय़ात (दारात) फटफटी थांबल्याचा आवाज आला म्हनू वाकून पाह्यलतं तवा नेरले असलेले आन् माह्यासाठी रगताच्या नात्या परीस जवयचे असलेले डॉ. दादा पुरी. मनात आलं कसे देवावानी आले दादा. मले रातीपासून वाटत होतं का घर पाह्यतानी कोनीतरी घरच्या सारक पाह्यजे होतं आन् अवचित दादा हजर. मी मनातून खूप खूस झालो. म्या दादाले सारी हकीगत सांगल्यावर दादा म्हने, ''घर न पाहता तुला एक सांगू का ज्याच्या खिस्याला वजन आहे त्याच्यासाठी चॉईस असते. तुझ्यासारख्या मानसानं जन्माची सावली मिळत आहे हे समजून हो म्हनाव. असे योग पुन्हा पुन्हा येत नसतात आणि निसटलेतं पुन्हा हातात सापडत नसतात समजलं? चल बस माझ्या गाडीवर.'' ते घर गल्लीत होत जाचा रस्ता हिवायात असा तं बरसातीत कसा? असं मनाले वाटून गेलं. सडकीपासून पाच फूट खोल. इंग्रजी कवेलूचं बैठ लहान घर. उत्तर दिसेले तोंड. एका मांग एक अस्या दोन खोल्या. त्याच्या बाजुले तसं आन् त्याले लागून चिरोटीवानी लंबी खोली. आतनी काया फरस्या बाजूच्या चिरोटीत खाली माती. हरेक खोलीले समोरचे दाठ्ठे (दारं) आन् इकून तिकडे जाले अंदरूनयी दाठ्ठे. चिरोटीले लागून भाहेरून तट्टयाची न्हानी आन् सादा संडास. घर आतून पाहून पाहून मातीच्या आंगनात उभे झाल्यावर्त दादानं इचारलं, ''आता तुझं मत सांग?'' ''घर पाहाच्या आंधी तुमी जे सांगतलं तरी माहा मत इचारता? पसंत हाय.'' सुरेश सेठले माह्या खिस्याच्या वजनाची कल्पना असल्यानं पसंती सांगून पुढं बोलाले गेलो तं मले मधांत अडवून म्हणे, ''पसंत आहे ना बस बाकी मी पाहतो! दादाच्या सल्ल्यानं आन् दोस्ताच्या अधारानं माहं घर तवा झालं म्हणून झालं. ते घर सादंसुदं होतं म्हंजे साद्याभोया मानसाच्या मनासारकं पन तितलंच त्या घरानं जीव लावला आमच्यावर. पावसायात मांगच्या आन् बाजूच्या भितीले वल (ओलं) चढे पन आखरी पावतर कवा दगा नाई देल्ला. याचं घरात लेकरं लायन्याचे मोठे होत सिकले. दोन पोरीचे लगन झाले. मोठय़ा पोरीची पयली नात याचं घरातली. पन आता ते घर थकलं होतं. किती साल आसरा द्यावं त्यानं? जुन्या घरमालकापासून मोजलं तं सत्तरीले टेकलं होतं ते. बिना सिमीटच्या जुडायीच्या घरानं किती तग धरावं? त्यातनी पोरगं नवकरीले लागलं तो म्हणे, मले लोन भेटते आपन नईन घर बांधू. कागदपत्रापासून घर बांधे पावतरच्या सार्‍या कटकटी त्यानं सोसल्या आन् हे घर उभं झालं. असं हे माहं तिसरं घर. हे चित्रातल्या सारकं घर पाहून मन हरकीजलं तसा अजून या घराले मी नवाडाचं वाटत असीन. त्या दोन घराच्या कितीतरी आठोनी कायजात बसून हायेत. एकदम एकरूप नाई होता येत मानसाले नव्या घरासंग पन थायी घरांच्या आंगाखांद्यावर खेयाले उसीर नाई लागणार. तसं यायी घरानं लहान पोरीच्या लगनाच्या आठोनीनं सुरुवात केली हायेच. नशिबाचा भाग अस्ते नाई तं गाव सोडा लागन, घर सोडा लागनं असं वाटलयी नोतं. नियती फिरवते आपण फिरतो. मनात सच्चपना असनं तं कुठीजा सावली ह्याले घर भेट्टेचं.

(लेखक हे नामवंत वर्‍हाडी कथाकार आहेत. 'बॅरिस्टर गुलब्या' हा त्यांचा एकपात्री कार्यक्रम अत्यंत लोकप्रिय आहे.)

भ्रमणध्वनी - 9420551260
     

No comments:

Post a Comment