Wednesday 20 June 2012

निवडणुकीची टर्मिनॉलॉजी- चारही गावं पॅक!

भारत हा उत्सवांचा देश आहे असे म्हटले जाते. दर महिन्या-दोन महिन्यांनी कुठला ना कुठला उत्सव ठरलेलाच. पण माझ्या मते, या देशातला सर्वात मोठा उत्सव म्हणजे निवडणुका. खरंतर जगातला म्हणायला हवा, कारण जगात एक तर इतका मोठा लोकशाही देश नाही अन् असला तरी इतक्या 'सिस्टीमॅटिक' गोंधळाने त्यांच्या इथे निवडणुका होत नाहीत. शह-काटशह, तुफान डॉयलॉगबाजी, सस्पेन्स, टेरर, हिरो, व्हिलन, रंगीबेरंगी वातावरण, दावे-प्रतिदावे असे मनोरंजनाला लागणारं सर्व मटेरियल या उत्सवात कोंबून कोंबून भरलेलं असतं. इथे उमेदवारापेक्षा इंटरेस्ट मतदारांना येतो आणि मग अमका अमका कसा निघतो, तो कसा तिसर्‍या नंबरवर जातो, याच्या चर्चा सर्वत्र रंगू लागतात आणि या संवादाची म्हणून एक विशिष्ट भाषा असते. सध्या आपण सर्वच जण त्याचा अनुभव घेत आहोत. यातले काही शब्द उमेदवाराचे चेलेचपाटे वापरतात तर काही तुम्ही-आम्ही.

काही वर्षापूर्वी एका आमदाराच्या निवडणुकीत मी एका कार्यकर्त्यासोबत त्या उमेदवाराचा प्रचार करायला गेलो. उमेदवाराने कार्यकर्त्याला सांगितलं, 'संजू फक्त दहीहांडा अन हिवरखेड राह्यलं, ते घे तू पाहून!' 'मी येतो ना भाऊ जाऊन!' लगेच बीगीनं आम्ही निघालो. जाताना एका ढाब्यावर मस्त जेवलो. पानबीन खाल्लं. दोन्ही गावात फेरफटका मारला, काय म्हंता? असं आहे? असं करून दुसर्‍या दिवशी दुपारी उमेदवाराला रिपोर्ट दिला, 'भाऊ दोन्ही गावं पॅक करून आलो!' गाव पॅक हा तर कार्यकत्र्यांचा खास शब्द. निवडणुकीच्या काळात दुसरा एक शब्दप्रयोग आहे 'चालवा लागते'! 'कसं आहे भाऊ सहकार लॉबी कोनाले चालोते त्याच्यावर आहे डिपेंड!' तर कधी असतं, 'अरे तीन वाजे लोकं तं लोकं मतदानालेच बाहीर नाही निंघाले अनं मंग सार्‍याईन ठरोलं हलधर चालवा लागते, तं रातच्या आठ वाजे लोग सायाचं मतदान चालूच!'

जातीचं समीकरण ही या लोकशाही उत्सवाची काळी; परंतु सर्वात इफेक्टिव्ह बाजू. एखाद्या समाजावर पकड असलेला नेता निवडणुकांमधला अविभाज्य घटक. चेहेर्‍यावरची रेषही हालू न देणारे हे नेते अनेकांचं भवितव्य आपल्या मुठीत घेऊन चालतात. मग निवडणुकीची समीकरणं मांडली जातात, 'सध्यातरी अण्णासाहेब आपल्याकडून आहेत. ते कुनीकळून बसतात हे महत्त्वाचं आहे! आपल्याइकळून बसले की ज्यमते मंग!' काही काही सामान्यांना आपली उमेदवाराशी कशी ओळख आहे हे सांगण्याचं खूप कौतुक असतं, वास्तवात त्याला कुत्राही विचारत नाही असे काही नग चेहर्‍यावर प्रचंड गांभीर्य घेऊन फिरत असतात. जोही भेटला त्याला सांगतात, 'ध्यान रखो बावा! ये शीट निकालनाही पडता,' 'निकली-निकली बोलके अंधी में रह जायेंगे अन तिसराही निकल जाएंगा,' 'अरे हव हो! मागच्या वेळेस तसंच झालं. शीट शुअर आहे असं सगळ्य़ांनाच वाटलं अन् दोघांच्या धामधुमीत तो अध्धर निघाला.'

एखादा उमेदवार जेव्हा अपेक्षेपेक्षा जास्त मतं घेतो तेव्हा म्हटलं जातं, 'वो भोत चल गया!' '17 हज्जार वोट खाया न उसने! लहान चाल्ला राज्या तो.' याव्यतिरिक्त दोन शब्द अधिकृत आहेत. एक म्हणजे गठ्ठा मतं अन् दुसरं म्हणजे पारंपरिक मतं! या गठ्ठा अन् पारंपरिक मतांव्यतिरिक्त जे असतं तो असतो पट्टा! 'ते चार गावं म्हणजे अमक्या समाजाचा पट्टा. तो पूर्ण आपल्या इकळूनच!' यात काही काही इंग्रजी शब्द जबरदस्त ठाण मांडून बसले आहेत. जसं, 'आपली शीट तं निघेतच, प्रश्न त्या दोघाईचा आहे, त्याईचे मत होतात डिवाईड. आपले डिवाईड होत नाहीत! आपला या भागात चांगला होल्ट आहे!' कधीही चर्चा थेट नंबरानीच सुरू होते. 'वो जाता तिसरे पे, और ये रहेंगा दुसरे पे!' म्हणजे पहिला कोण ते तुम्ही समजून घ्या! जेव्हा लोकसभा, विधानसभा एकत्र येते तेव्हांचा शब्दप्रयोग असतो वर अमूक खाली तमूक..! चलनदेव! लादलेला उमेदवार असला की मग त्याची वर चलती असते. एकदा निवडणुका आटोपल्या की मग पराभवाचं विश्लेषण 'तात्यानंच हॅण्ड दाखवला त्याले. याईचा खूप भरोसा तात्यावर!' किंवा मग मेहनत कमी पडली. अशा शब्दांनी केलं जातं. आता नेमकी कुठली मेहनत कमी पडली याचं विश्लेषण मात्र कुणाकडेच नसतं; पण असे नमुनेदार संवाद अन् शब्द या उत्सवातली रंगत वाढवत असतात हे मात्र खरं.

(लेखक नामवंत व्यंगचित्रकार व कॅलिग्राफर आहेत. 'गंमत जमंत' हा त्यांचा लोकप्रिय

एकपात्री कार्यक्रम आहे.)

भ्रमणध्वनी - 9823087650

No comments:

Post a Comment