Monday 25 June 2012

बुद्धविहार : भक्तिस्थळ की सेवा केंद्र?


डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूर येथे दीक्षा घेईपर्यंत एकदोन अपवाद वगळता महाराष्ट्रातल्या कुठल्याही गावात विहार नव्हते. पण आज चित्र बदलले. महाराष्ट्रात तर अनेक गावांत आता नव्याने विहार बांधून झाले आहेत. दलितांच्या पारंपरिक देवालयांनी विहारांची जागा घेतली आहे तर ज्या ठिकाणी दलितवस्तीत पारंपरिक देवालयं नव्हती तेथे दलितांनी आता स्वत:च्या वर्गणीतून विहार बांधले आहेत. पांढर्‍याशुभ्र वस्त्रातील महिला पौर्णिमेच्या दिवशी अशा विहारांत येऊन वंदना घेताना दिसतात. आता ही विहारं केवळ प्रार्थनेसाठी जमण्याचा जागा उरलेल्या नसून सार्वजनिक कार्यक्रमाचीही महत्त्वाची ठिकाणं झाली आहेत. पण त्याच वेळी अशा विहारांमधील भन्ते अथवा श्रद्धाळू उपासक वारंवार एक खंत व्यक्त करताना दिसतात. दर गुरुवारी अथवा रविवारी किमान एक वेळ तरी उपासकांनी श्रद्धेने या विहारात जमायला हवे; पण अशी उपस्थिती मात्र तेथे नसते. ही खंत सर्वाचीच आहे. विहार बांधताना जो उत्साह असतो तो उत्साह दैनंदिन व्यवहारात मात्र दिसून येत नाही.

रविवारी भारतातले सर्व चर्च ºिश्चन अनुयायांनी फुलून जातात. मशिदीमध्ये सायंकाळी सर्व मुस्लिम बांधव नमाज पढण्यासाठी मशिदीत जमतात. शुक्रवारच्या नमाजाला सर्व मशिदीत किती गर्दी असते हे आपण नेहमीच पाहतो. हिंदूंच्या मंदिरांची, देवतांची विविधता खूप. त्यामुळे तिथे प्रत्येक दिवशीच हिंदू पूजेअर्चेसाठी मंदिरात गर्दी करतात. असा हिंदू, ºिश्चन, मुस्लिम अनुयायातला उत्साह बुद्ध अनुयायांमध्ये नसतो. त्याची एक खंत अनेक भन्तेंना वाटते. श्रद्धाळू अनुयायांनाही वाटते. त्यामुळे विहारात जमण्याचे आवाहन वारंवार केले जाते. अर्थात, नागपूरच्या दीक्षाभूमीवर येण्याचे आवाहन मात्र करण्याची गरज पडत नाही. तिथे रोजच भरपूर वर्दळ असते.

ज्याचे-त्याचे आपल्या धर्मावर प्रेम असते. श्रद्धा असते. ºिश्चन, हिंदू अथवा मुस्लिम यांना अशा श्रद्धेचा हजार, दोन हजार वर्षाचा इतिहास आहे. त्यामुळे त्यांनी त्यांच्या प्रार्थनास्थळाविषयी श्रद्धा व्यक्त करावी अशी एक घट्ट मानसिकता त्यांच्या ठायी दिसते. बुद्ध अनुयायांबाबत मात्र असे नाही. अर्थात, हे विधान नवदिकितांपुरते सीमित आहे. मुळात धर्मातराची प्रक्रियाच एक पारंपरिक श्रद्धाभाव फेकून सुरू झाली आणि आजूबाजूच्या जवळच्या प्रदेशांत बौद्धांचे कुठलेही पारंपरिक कर्मकांड शिल्लक नाही. त्यामुळे बुद्धानुयायांना विहारात गेलेच पाहिजे अशी ओढ नाही.

मुस्लिम अथवा ºिश्चन माणसाला घरात एक देव्हारा असावा असे वाटत नाही. कारण प्रार्थनेचे ठिकाण सार्वजनिक असते ही त्यांची श्रद्धा आहे. हिंदूंचे मात्र असे असत नाही. त्यांना घरात एक देव्हारा हवा असतो. कोणतीही नवी गल्ली अस्तित्वात आली की, तिथे एक सार्वजनिक मंदिर हवे असते. श्रद्धाभाव वेगवेगळ्य़ा देवतांवर असल्यामुळे एकाच गल्लीत पुन्हा वेगवेगळ्य़ा देवांची मंदिरे हवी असतात. त्यात गावात जर पारंपरिक देवालय असतील तर तीही जतन व्हावीत ही मानसिकता व त्या प्रेमाचे श्रद्धायुक्त वर्तन असते. शिवाय अत्यंत जुनी देवालयं असतील तर त्यांचेही जीर्णोद्धार हवे असतात. कारण या देवालयाशी निगडित चरितार्थ चालेल अशी एक यंत्रणा विकसित होत असते. पूजा साहित्याच्या दुकानाला जोडून मग निवासासाठीचे हॉटेल्स असतात. प्रपंच आणि परमार्थ यांची एक सांगड घातलेली असते. हिंदू माणूस देवळात जातो. कारण त्याला मोक्ष मिळवायचा असतो. ºिश्चन माणूस प्रार्थनास्थळी जातो. कारण त्याला आपल्या चुकांची कबुली देऊन मन हलके करायचे असते, तर मुस्लिम माणूस मशिदीत जाऊन अल्लाहची जवळीक साधक असतो. या दृष्टीने आपलेही प्रार्थनास्थळ असावे असे बौद्धांना वाटणे अगदी स्वाभाविक आहे. पण आपण विहारात का जावे? याचे सर्वमान्य होईल असे एक पारंपरिक उत्तर मात्र बौद्ध धर्मात नाहीय. मुळात देवता, मंदिर ही संकल्पनाच तिथे नाही. भिक्खूंच्या निवासासाठी विहार आले. काही भिक्खूंना चैत्याऐवजी बुद्धमूर्ती हवी असे वाटले. त्यातून होनयान व महायान अशा दोन परंपरा निर्माण झाल्या. पण बौद्ध परंपरेत भिक्खूचे स्वरूप

समाजाची सेवा करणार्‍या कार्यकत्र्यांचे राहिले. भिक्खूंनी अभ्यास करावा, वैदकशास्त्र आत्मसात करावे, त्या मोबदल्यात समाजाने त्यांच्याविषयी आदर व्यक्त करावा. पण असा आदर व्यक्त न केल्यास भिक्खू शापवाणी उच्चरेल अशा कथा मात्र जन्माला आल्या नाहीत. विहार हे भक्तांना मोक्ष देण्याचे ठिकाण नसून ते एक ज्ञानोपासकांचे केंद्र अथवा आरोग्यसेवेचे ठिकाण असे विहाराचे स्वरूप जुन्या काळी होते. हा इतिहास डोळ्य़ासमोर ठेवला तर बुद्धानुयायांची मानसिकता नियमितपणे विहारात येण्याची का नसते हे समजून घेता येते. अर्थात, असे असले तरी उपासकांनी विहारात जमावे ही भन्तेची अपेक्षा चुकीची आहे असे कुणी म्हणणार नाही. पण त्यासाठी विहाराचे स्वरूप बदलायला हवे. बौद्ध तत्त्वज्ञानाशी ते सुसंगत व्हायला हवे असे मला वाटते. तसे स्वरूप झाले तर विहारात या अशी विनंती कुणाला करावी लागणार नाही.

आज महाराष्ट्रात बहुधा एकही मोठे गाव असे नसेल जिथे बौद्ध मतानुयायी डॉक्टर नसेल. तालुका, जिल्ह्याच्या गावी तर एकापेक्षाही संख्या अधिकच. डॉक्टरांनी ठरवलेच तर ते दररोज एक तास मोफत तपासणी करण्यासाठी फक्त विहाराचे ठिकाण निवडू शकतात. आज आरोग्यसेवा किती महाग झाली आहे याची आपणास कल्पना आहे. विहारात एखादी लहानशी लायब्ररी असावी आणि काही नसले तरी धार्मिक पुसतकांशी संबंधित वाचनालय चालविण्यासाठी एखाद्या शिक्षकाने आठवडय़ातले दोन तास मोफत द्यावेत म्हणजे हळूहळू गरजू विद्यार्थी तिथे जमू शकतील. स्वत:च्या मालकीचे सीडी प्लेअर आहे. सीडींचा संग्रह आहे असे बुद्धानुयायी कमी का आहेत? तर 'विहारात या!' असे कुणाला सांगण्याची गरज पडेल असे मला वाटत नाही. स्वावलंबी शिक्षणाचे वर्ग चालवणे, आरोग्यतपासणीचे केंद्र चालवणे, वृत्तपत्रे अथवा विद्यार्थ्यांना उपयुक्त होतील असे शिकवणीवर्ग चालवणे, संगीत, चित्राचे वर्ग चालवणे, बुद्ध तत्त्वज्ञानातील बहुचर्चित विषयांवरील व्याख्याने आयोजित करणे अशी कितीतरी समाजोपयोगी कामे विहारातून करता येतील. विहार हे भक्तीचे ठिकाण असावे की समाजोपयोगी शिक्षणाचे केंद्र? याचाच आधी निर्णय घ्यावा लागेल. नागपूरच्या दीक्षाभूमीस भेट देण्यामागे एक श्रद्धाभाव आहे. पण अगदी तेवढाच प्रचंड खर्च करून भव्यतेच्या बाबतीत दीक्षाभूमीशी स्पर्धा करेल असे गुलबर्गा येथील ठिकाण मी का पाहावे? एक प्रेक्षणीय स्थळ म्हणूनच ना? कारण विहारात गेल्याशिवाय मला मोक्ष मिळणार नाही असा कुठलाच श्रद्धाभाव माझ्या मनात नाही. माझ्यासाठी विहार नवसासायसाचे ठिकाण नाही. किमान धर्मकांड करण्यासाठी तरी तिथे जावेच अशी कोणतीही परंपरा माझ्या श्रद्धेत नाही. अशा परिस्थितीत मी विहारात गेलेच पाहिजे. का गेलेच पाहिजे याचे एकच उत्तर माझ्या मनात शिल्लक राहते ते म्हणजे 'मी बुद्ध आहे.' एवढय़ासाठीच तिथे गेले पाहिजे. शिवाय श्रद्धाभावाच्या आवाहनाखेरीज अन्य कुठलेही आवाहन यामागे आहे का? जर नसेल तर काही गोष्टी कर्मकांड म्हणूनसुद्धा ठसवाव्या लागतात. कुठल्याही मंगलकार्यासाठी विहाराशिवाय अन्य ठिकाण निवडायचेच नाही, असा निर्णय घेऊन पाहा. एक कर्मकांडाचे ठिकाण म्हणून का होईना, विहारात गेलेच पाहिजे ही भावना उत्पन्न होऊ शकते. बौद्ध संस्काराचे एक केंद्र म्हणून जरी विहाराकडे जाणे अपरिहार्य झाले तरी विहाराचे स्वरूपही बदलू शकेल आणि विहारात येण्याचे आवाहनही संपुष्टात येऊ शकेल. पण इथे तर एखाद्या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभासाठी आम्हांला कार्यालये लागतात. एकदिवसीय साहित्य मेळावे किती होतात? पण त्यासाठी कधी विहाराची आम्हांला आठवण येत नाही आणि समजा आलीच, तर आमचे भन्ते आम्हांला परवानगी तरी देतील का? धर्म ही श्रद्धेने टिकवायची गोष्ट आहे, तर धम्म ही व्यक्तीव्यक्तीतल्या स्नेहसंबंधाने जतन करावयाची बाब आहे. आपण त्यापैकी कशाचा स्वीकार करायचा? हे आपणालाच ठरवावे लागेल.

(लेखक हे नामवंत आंबेडकरी विचारवंत

व नाटककार आहेत.)

भ्रमणध्वनी - 9881230084
     

No comments:

Post a Comment