Thursday 28 June 2012

अजब सिनेमा की गजब कहानी


अजब सिनेमा की गजब कहानी
माझा एक मित्र कुठलंही ताकदीचं काम करताना किंवा शक्तिमान स्टाईल काम करताना दात खाऊन उच्चारतो, 'या अली'. मी एके दिवशी त्याला विचारलं, बाबा रे, हे 'या अली'च का? तर तो म्हणे 'कुर्बानी'मध्ये अमजदखान म्हणतो म्हणून! अंधारलेल्या रस्त्याने चालताना किंवा रात्री उशिरा घरी येताना मी 'हनुमानकी जय! जय जय बजरंगबली की जय' म्हणतो.

म्हटलं का?

तं म्हणे मी 'नटवरलाल'मध्ये अमिताभ नाही का म्हणत, 'चला जा रहा था मै डरता हुआ, हनुमान चालिसा पढता हुआ!'

व्हेरी गुड! मला एक सांग आता तू चाळीस वर्षाचा होत चाल्लायस अन् तुझं हे वेड कमी झालं नाही कां?

अरे बाबा हे वेड नाही, हा आमचा धर्म आहे,

धर्म म्हणजे?

म्हणजे जसा कुलाचा हिंदू धर्म, मुस्लिम धर्म, ºिश्चन धर्म तसा आमचा हा धर्म सिनेमा!

अच्छा तं ही भानगड आहे तर..

भानगड नाही बाबा धर्म! माझ्या पिढीचे अनेक जण याच धर्माच्या आश्रयाने वाढले. अभ्यासात जेमतेम असणारे, जगाच्या अन् घरच्यांच्या दृष्टीने कवडीचं व्यवहारज्ञान असणारे आम्ही कोणाच्या आधाराने मोठे झालो? अरे सिनेमाच्या. जेव्हा जेव्हा आम्हाला नालायक ठरविण्यात आलं तेव्हा तेव्हा आम्हाला या पांढर्‍या पडद्यानेच जवळ केलंय. या पांढर्‍या पडद्यावरच अमिताभ बोलून गेला.

'उपरवाले ने सबको दिए है दो दो हाथ और कहा चिरले जमीन का सीना और निकाल ले अपने हिस्से की रोटी.'

जेव्हा की इतर म्हणायचे काय करते हे कारटं? देवच जाणे! आयुष्याच्या या वळणावर जगाच्या फुटपट्टीनुसार आम्ही फार यशस्वी नाही. अगदी भणंगही नाही, पण तरीही आम्ही त्याची काळजी करीत नाही. कारण आम्हाला ठाऊक आहे की, 'सेठ एक दिन सिकंदर का भी आएगा.' स्मशानात बसलेला कादरखान जणू आमच्यातल्याच सिकंदरशी बोलत असतो, 'सुखपे हॅंसते हो तो दुखपे कहकहे लगाओ, अपने मुकद्दर के बादशाह बनो, मुकद्दर का सिकंदर बनो.' अरे ते तं सोडा ज्या एकात्मतेसाठी तुम्ही चर्चा, मेळावे, परिसंवाद घेता ती एकात्मता आमच्या धर्मात बघा, चित्रपट खून-पसीना, मुसलमान अस्लम कसम शिवाकी म्हणतो अन् हिंदू शिवा कसम असलम की म्हणतो. अरे, आमच्या धर्माचं मंदिरही बघा.

मंदिर?

टॉकीज रे बाबा! कुठल्याही धर्म-जाती, पंथ पाळणार्‍या लोकांना गुण्यागोविंदाने तीन तास एकत्र नांदायला लावणारं मंदिर. पडदा रडला की अख्खं थिएटर रडतं अन् पडदा हसला की अख्खं थिएटर हसतं आणि साईड बाय साईड हे सत्यही अधोरेखित होतं की, दु:खात सगळ्याच धर्माचे माणसं रडतात, वेदना सगळ्याच धर्माच्या लोकांना होतात, आनंद सगळ्याच धर्माच्या लोकांना होतो अन् सगळ्याच धर्माच्या लोकांना सारखाच होतो. बाल्कनी असो की थर्ड क्लास, प्रत्येकाचे पैसे वसूल होणारचं बरं. शतकानुशतकापासून अनेकांचं मनोरंजन करणार्‍या आमच्या पांढर्‍या पडद्याने मानवी भावभावनांचे असो वा देशभक्तीचे असो वा आणिक कुठले असो अनेक रंग पाहिलेत ती तास ते रंग त्यांनी मुरल्यागत फुलवले, पण चिटकवून कुठलाच घेतला नाही. तीन तासानंतर तो कोराचा कोराच! संसारात राहून विरक्त जगण्याचं याहून श्रेष्ठं उदाहरण तुला कुठलं हवं सांग! अरे किशोरकुमारची गाणी म्हणजे आमच्यासाठी कबीराचे दोहेच! कितीही त्रस्त असू दे, काहीही झालेलं असू दे किशोरकुमारचं एक गाणं मनातला सगळ्या गाळाचा निचरा करतं अन् उत्साहाचं कारंज मनात थुईथुई नाचू लागतं!.. अरे आमच्या अंत्ययात्रेतही लोकांनी 'रघुपती राघव राजाराम'ऐवजी 'खईके पान बनारसवाला' लावावं. एक तर आत्म्याला बरं वाटेल किंवा ते ऐकून आम्ही उठूनही बसू.

बाकी मन्या तू हुशार है बटे!

'आखिर आही गये ना औकात पे! चल छोड, आ रात को चल रहा क्या?'

'कहॉं'

'अजब प्रेम की गजब कहानी..'

(लेखक नामवंत व्यंगचित्रकार व कॅलिग्राफर आहेत. 'गंमत जंमत' हा त्यांचा लोकप्रिय एकपात्री कार्यक्रम आहे.)

भ्रमणध्वनी : 9823087650

No comments:

Post a Comment