Tuesday 19 June 2012

लांडग्यांचे कळप आणि वाघीण!


लांडग्यांचे कळप आणि वाघीण!
अलीकडची काही वर्षे राजकीय आघाडीवर प्रचंड उलथापालथ घडविणारी ठरतील. जगात अनेक देशात प्रचंड घडामोडी घडल्यात. मोठमोठय़ा राजसत्ता मातीत मिसळल्या. जनतेचा उद्रेक परम सीमेवर पोहोचला. सर्वसामान्य माणूस जागा झाला की इतिहास बदलायला वेळ लागत नाही.

'आता लढाई जुंपली अन् सारे इशारे आमचे

सारी धरित्री आमची अन् सूर्य तारे आमचे

आग त्यांच्या हुकमतीला दाही दिशांनी लागली

लाटाही आता आमच्या अन् सारे किनारे आमचे!'

मागील वर्षी भारतातही भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाचा संदल जोरात वाजायला सुरुवात झाली होती. लोकही रंगात आले होते. पब्लिक नाचायलाही लागली होती. दिवाळखोरीत निघालेले विरोधी पक्षही कंबरेचं सोडून धिंगाणा घालायला लागले होते. सत्ताधारी पक्षही स्वत:चेच कपडे फाडायला लागला होता. अलिबाबाही धोक्यात.. चाळीस चोरांची अवस्था तर पिसाळलेला कुत्रा चावल्यासारखी झाली होती. एकंदरीत संदलही टिपेला पोहोचला होता. नाचही टिपेला पोहोचला होता.. मेडियाला आनंदाच्या उकळ्य़ा फुटत होत्या आणि नेमक्या वेळी ढोल फुटला. ढोलाचं कातडंच कुजकं निघालं! संदल पार्टीवालेही एवढे बेभान झाले होते की ढोल वाजण्याऐवजी काडय़ा कुंचकण्यातच मजा घेऊ लागलेत आणि शेवटी व्हायचं तेच झालं!

हाय! या देशात आता खूप झाली माणसे

कंस आणिक रावणाचे रूप झाली माणसे

हक्क अपुले मागण्याला पेटल्या होत्या मशाली..

एक तुकडा पाहिला अन् चूप झाली माणसे!

राष्ट्रपती निवडणुकीच्या निमित्तानं भारतीय राजकारणाचं पुन्हा एकदा जोरात घुसळण सुरू झालं. या घुसळण्याची सारी सूत्रं अनपेक्षितपणे बंगालच्या वाघिणीनं आपल्या हातात घेतली. घेतली म्हटल्यापेक्षा अपरिहार्यपणे ती तशी एकवटली गेली. लांडग्यांचा कळप कितीही मोठा असला तरी वाघाचा बछडाही त्यांना भारी पडू शकतो, हा निसर्गाचा नियम पुन्हा एकदा सिद्ध झाला! मागील वर्षी अण्णा हजारे या कळपांना भारी पडले होते. आता ममता बॅनर्जी भारी पडत आहेत. अण्णा हजारेंच्या अनेक मर्यादा होत्या, वैचारिक गोंधळ होता आणि शेखचिल्ली सहकारी होते, आणि पर्यायाने जे व्हायचे तेच झाले. फुगा

फुटला. हवा पार निघून गेली. पुन्हा सर्व सर्कसमधले वाघ आपापल्या ठिकाणी परत गेलेत.

आता मात्र परिस्थिती वेगळी आहे. ममता बॅनर्जी स्वत: राजकारणातल्या फसलेल्या पैलवान आहेत. अनेकांना त्यांनी धोबीपछाड मारलेली आहे. यावेळी त्यांनी जे दंड थोपटले आहेत ते पाहता (योग्य काळजी घेतली गेली तर) देशाच्या राजकारणाला नवी कलाटणी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मुलायमसिंग नावाच्या महापुरुषानं यानिमित्तानं आपलं जे असली रूप दाखवलं ते कमालीचं संतापजनक आहे. खरंतर भारतीय राजकारणाचा तोच असली चेहरा आहे. मुलायमसिंग यांचं वागणं किती किळसवाणं आहे, हे वेगळं सांगण्याची गरज नाही. भारतीय राजकारणात अशीच माणसं थोडय़ाफार फरकाने सर्वच पक्षांत दिसतात. ही असली माणसं लोकशाहीची विटंबना आहे. हे सारे प्रकार पाहिलेत की आम्ही लोकशाहीचं पाविर्त्य पेलण्यास लायक नाही, असंच नाईलाजानं म्हणावं लागेल!

मुलायमसिंग यांनी कुणाला पाठिंबा द्यावा, हा त्यांचा प्रश्न आहे, तो त्यांना पूर्ण अधिकार आहे. त्याबद्दल आपल्याला बोलण्याचा अधिकार नाही. पण ज्या पद्धतीनं त्यांनी ममता बॅनर्जींना धोका दिला, सौदेबाजीसाठी एका चार्त्यिसंपन्न आणि प्रामाणिक महिला नेत्याचा वापर करून घेतला, त्याचा निषेध करण्याएवढा थोडाच आहे. यानंतर कोण विश्वास ठेवील असल्या लोकांवर? मैत्रीचा खून, माणुसकीचा खून आणि नीतिमत्तेचा खून सारं सारं एकाचं झटक्यात करून टाकलं मुलायमसिंग यांनी! धोकेबाजीला नवा चेहरा, नवे नाव दिले मुलायमसिंग यांनी!

'न गर्दन कटेगी, ये आलम न होगा

नशा दोस्ती का कभी कम न होगा

इन्सानियत भी न रोयेगी यारो

अगर दोस्त कोई 'मुलायम' न होगा!'

राजकारणातल्या 'गटारगंगा'साफ करण्याची हीच वेळ आहे! ममता बॅनर्जींच्या रूपाने एक प्रामाणिक सेनापती मिळालेली आहे! त्यांचे समर्थन करण्यासाठी लोकशाहीवर आणि या देशावर प्रेम करणार्‍या प्रत्येकाची जबाबदारी आहे असे मला ठामपणे वाटते. इथं पक्ष महत्त्वाचा नाही. राष्ट्रपतिपदही महत्त्वाचं नाही. आम्हाला आमचं नेतृत्व 'मुलायम' ब्रँडचं असावं की 'ममता' बँड्रचं असावं, हे याचा निर्णय करायचा आहे!

याचा अर्थ ममता बॅनर्जींच्या काहीच चुका नाहीत असं मला म्हणायचं नाही. एका क्षणात सारं चित्र पालटेल असा खुला आशावादही नाही; पण लढाईला योग्य सुरुवात होण्याची गरज आहे. ती झालेली आहे. यात सारे दलाल मिळून ममता बॅनर्जी यांचा 'गेम' करण्याचा प्रयत्न नक्कीच करणार, यातही संशय नाही. पण मुलायमसिंगांचा प्रयत्न त्यांनी यशस्वीपणे हाणून पाडला. व्ही. पी. सिंग यांचीही संधिसाधू लोकांनी अशीच घेरून शिकार केली होती. ममता त्यांना पुरून उरतील असे वाटते.

राष्ट्रपती निवडणूक हे एक निमित्त आहे. भ्रष्टाचारविरोध आणि सामाजिक नीतिमत्ता असा नवा अजेंडा यानिमित्ताने ममता बॅनर्जी यांनी देशापुढे ठेवलेला आहे. आता निर्णय जनतेला करायचा आहे. पुन्हा आम्हाला करायचा आहे? लोकशाहीची सूत्रं लांडग्यांच्याच हातात ठेवायची की वाघांच्या हातात द्यायची, हाच मूळ प्रश्न आहे!

'जसा काळ आला तसे शोधू या..

नव्या पावलांचे ठसे शोधू या

पुन्हा लांडग्यांच्या सुरू हालचाली

चला जिंकणारे ससे शोधू या?'

(लेखक हे नामवंत कवी असून त्यांचा 'सखे-साजणी' हा कार्यक्रम गाजलेला आहे.)

भ्रमणध्वनी - 9822278988

No comments:

Post a Comment