Saturday 30 June 2012

सरपंचीन


'सरपंचीनबाई आहेत काय घरी?''

''कोन हाय?''

''मी आहो नाना.''

''काय पाह्यजे?''

''सही पाह्यजे तुमची अर्जावर.''

''त्याहिले करून मागा सही.''

''सरपंच कोन? तुम्ही की तुमचे हजबंड?''

''सरपंच मीच हावो, पन सद्या मी शेनाच्या गवर्‍या करून

राह्यली, माहे हात भरेल हायेत.''

''कुठं गेले अजाबराव?''

''ते टप्पर घेऊन गेले आखरात.''

''कमाल झाली! आपल्या गावाले हागनदारी मुक्तीचं बक्षीस भेटलं अन् तुमचे हजबंड टप्पर घेऊन गेले?''

''तसंच असते, एकखेप बक्षीस भेटल्यावर कोनी पाह्यत नसते.''

''संडास नाही काय तुमच्या घरी?''

''संडास आहे, पन संडासात त्याहीचा दम कोंडते, म्हनून ते मोकळ्या मैदानात जातात, मोकळ्या जागेत मस्त बिळी ओढता येते.''

''सही करा अर्जावर.. मले उशीर होते.''

''कायचा अर्ज व्हय?''

''नळाचा अर्ज व्हय! आमच्या पुर्‍यात पंधरा दिवसांपासून पानी नाही, सार्‍या गावात पान्याची बोंब सुरू आहे, पानी आलं तरी गढूय येते.''

''इर नाही काय तुमच्या पुर्‍यात?''

''इरीचं पानी खारं हाय.. खार्‍या पान्यानं तब्यता बिघडून राह्यल्या, जरा गावात चक्कर मारत जा..''

''हे पाहा.. मी फक्त नावाची सरपंचीन आहो,

सारा कारभार तुमचे भाऊच पाह्यतात, मले फक्त म्हशीचा धंदा येते, शेन काढता येते, चारा टाकता येते, म्हशी दोयता येतात, याच्या वरते काही समजत नाही, विधानसभा मुंबईले असते की दिल्लीले असते तेही ठाऊक नाही, पन तुमच्या भावानं कोशीश केली म्हनून मी सरपंचीन झाली.''

''मंग काय फायदा? सरपंचाले राजकारन समजलं पाह्यजे,

भाषन देता आलं पाह्यजे.''

''मले भाषन देता येत नाही.''

''भाषन देऊ नका.. आमाले पानी द्या.. आमच्या पुर्‍यातला नळ आटला.. हापसी आटली.''

''कायजी करू नका.. पुढच्या वर्षी पान्याची टाकी सुरू होइन तुमच्या पुर्‍यातली.''

''कधी होइन? पाच वर्षांपासून जलस्वराज्य योजनेतून अर्धवट पान्याची टाकी बांधून ठेवली, वरचा घुमट बांधला पन तिले पाईपच जोडले नाहीत, टाकीच्या अंदर सीडी लाऊन लोकं झोपतात, अंदर गंजीपत्ता खेयतात, तीस लाखाची टाकी बांधली, त्यातले अर्धे पैसे खाऊन साहेब फरार झाला, काम अर्धवट सोडून देलं.. यावर काय केलं तुम्ही?''

''त्या टाइमले मी सरपंचीन नव्हती.''

''मग आता काय करून राह्यल्या? नुसत्या गवर्‍याच थापता काय?''

''तुमचे भाऊ आल्यावर पान्याची सोय करतीन, सारा कारभार तेच पाह्यतात, तेच सह्या ठोकतात.''

''मग काय तुम्ही फक्त नावालेच सरपंच झाल्या?

जरा गावात चक्कर मारत जा, कुठं काय चाललं ते पाह्यत जा.. ग्रामपंचायतमध्ये पान्याच्या नावावर भ्रष्टाचार होऊन राह्यला.''

''कसा?''

''तो विहिरीवाला दादाराव पंचायतचे पैसे खाऊन राह्यला, दर मयन्याले पान्याच्या नावावर तीन हजार वसूल करते, पन पानी सोडतच नाही.''

''मग काय करते?''

''स्वत:च्या वावराले पानी देते अन् फुकटचे पैसे वसूल करते.''

''त्याहीच्या कानावर घाला.''

''काही फायदा नाही, तो दादाराव भाऊले पाटर्य़ा देते म्हनून भाऊ मुके राह्यतात, त्यात आमचं मरन होते, उद्या माह्या पुतन्याचं नानमुख हाये, त्याच्या घरात पान्याचा थेंब नाही.''

''मग मी काय करू? पुर्‍या तालुक्यातच गढूय पानी येऊन राह्यलं.. ते तुमचे भाऊ आले टप्पर घेऊन.. सांगा त्याहिले.''

''काय व्हय नाना?''

''काय राज्या अजाबराव.. अजाब काम आहे तुमचं!''

''काय झालं?''

''पंधरा दिवसापासून आमच्या पुर्‍यात पानी नाही, त्यासाठी मी सरपंचीनबाईजवळ आलो, बाई म्हनते बुवाले सांगा.''

''काय पानी पानी करून राह्यला बे? आता पावसायाच लागला.. एक जबर पानी आलं की धरनाले पानी येते.''

''उद्या लगAाले पानी कुठून आनाव ते सांगा?''

''उद्यापुरता एक टॅंकर बलाऊन घे.. फिकर करू नको.. सहा मयन्यात आपल्या गावात तीन मजली टाकी बांधून भेटते, आपल्याले तीन टक्के कमिशन भेटते, ग्रामपंचायतच्या इलेक्शनात आपले दीड लाख खर्च झाले, ते काढा लागनार नाहीत काय?''

''म्हणजे पैसे खायासाठी तुम्ही बायकोले सरपंच केलं काय?''

''दोन्ही गोष्टी होतात, गावची सेवा होते अन् पैसाही भेटते, अरे इलेक्शनच्या दिवशी म्या पाचशाच्या नोटा वाटल्या, देशीची गंगा रातदिवस सुरू होती, आगुदर आपला खर्च काढा लागते, मंग गावाच्या विकासाचा विचार करा लागते.''

''कमाल आहे तुमची!''

''पुढच्या वर्षी तिले जिल्हा परिषदले उभी करतो, अन् शंभर टक्के निवडून आनतो, लेडीज राखीव सीट असली की तुही वैनीच झेडपीची अध्यक्ष होते, पाच वर्ष अध्यक्ष राह्यली की तिले आमदारकीले उभी करतो, एकखेप आमदार झाली की तिले राज्यमंत्रीच करतो, लाल दिव्याची गाडी दारापुढे उभी करतो.. तू फक्त पाह्यत राह्य.''

''धन्य आहे तुमची! बाइले राज्यमंत्री करा अन् वार्‍यावर वरात काढा.. गावची सुधारना गेली चुलीत.. यालेच म्हंतात शायनिंग इंडिया!''

(लेखक हे नामवंत वर्‍हाडी कथाकार आहेत)

श्रीकृपा कॉलनी, अकोला रोड, अकोट जि.अकोला

भ्रमणध्वनी - 9561226572

No comments:

Post a Comment