Thursday 21 June 2012

शेतीतून बाहेर पडण्याची आकांक्षा

शेतीतून बाहेर पडण्याची आकांक्षा
सीईटीच्या निकालानंतर अनेकांचे फोन आले. प्रत्येक जण आपल्या पाल्याला मिळालेले गुण मोठय़ा कौतुकाने सांगत होता. तेवढय़ात सुभाष मायेकरचा फोन आला. सुभाष हा माजलगाव तालुक्यातील एक जाणकार शेतकरी. शेतकरी संघटनेचा कार्यकर्ता. त्यामुळेच माझी ओळख झालेली. पेरणीचे दिवस आहेत. खत, बियाण्यांची वानवा आहे. मला वाटले की, त्यासाठीच त्याने फोन केला असावा. वीज कंपनीचे लोक हल्ली कनेक्शन तोडत फिरत आहेत. यानेही आकडा टाकलेला असावा. कदाचित त्यासाठी फोन केला असेल. असा विचार करीतच मी मोबाईलचे बटन दाबले. तिकडून सुभाष म्हणाला, 'अमर काका, मी आज खूप खूश आहे. आजचा दिवस माझ्यासाठी दिवाळी-दसर्‍यापेक्षाही जास्त आनंदाचा आहे. कोणाला सांगू, कोणाला नाही, असे मला झाले आहे म्हणून मी तुम्हाला फोन लावला.' नेमके काय झाले, हे मला समजेना. मी काही विचारण्याच्या आत सुभाष म्हणाला, 'पोराला सीईटीमध्ये 177 गुण मिळाले. स्टेट लिस्टमध्ये 607 वा आहे. मेडिकलच्या 2007 जागांपैकी ओपनसाठी 1030 जागा आहेत. त्याचा मेडिकलला नक्की नंबर लागतो. काका, मी सुटलो. माझ्या पुढच्या पिढीला शेतीतून बाहेर पडण्याचा मार्ग सापडला. त्याला शेतीचा नरकवास भोगावा लागू नये हीच माझी इच्छा होती. बस, मला एवढेच पाहिजे होते..' सुभाषला काय बोलू, काय नको असे झाले होते. आपल्या मुलाच्या यशाचे कौतुक कोण्या बापाला नसते? सगळ्यांनाच असते. पण हा आनंद वेगळा होता. एका शेतकर्‍याचा आनंद होता.. या आनंदाची जातकुळी

इतर आनंदाहून वेगळी होती. ती नव्याने समजून घ्यायला हवी.

पुढार्‍यांना वाटते, आपला मुलगा आमदार, खासदार व्हावा. किमान सोसायटीचा चेअरमनतरी व्हावा. चित्रपट कलावंतांना वाटते, आपला मुलगा हिरो व्हावा. डॉक्टरांना वाटते, आपला मुलगा डॉक्टर व्हावा. एवढेच काय, साध्या शिक्षकालाही वाटते की, आपला मुलगा नोकरदार म्हणून चिटकला जावा. मात्र शेतकर्‍याला आपला मुलगा शेतकरी व्हावा असे अजिबात वाटत नाही. असे का? पुढारी, बिल्डर, चित्रपट कलावंत, उद्योगपती किंवा नोकरदार यांना त्यांच्या क्षेत्राच्या सुखाचा अनुभव असल्यामुळे आपल्या पाल्यासाठी तेच क्षेत्र ते निवडतात. मात्र शेतकर्‍याचा अनुभव अत्यंत कडवट असतो. शेती करणे म्हणजे निखार्‍यांवर चालणे आहे, हा त्यांच्या आयुष्याचा सार असतो. मी जे भोग भोगले ते माझ्या लेकराच्या वाटय़ाला येऊ नयेत, अशी त्याची धारणा असते. म्हणूनच शेतकरी आपल्या लेकरांना शेतकरी होण्यास प्रोत्साहन देत नाही. उलट त्याने दुसरे काहीही करावे, पण शेती मात्र करू नये, यासाठी तो प्रयत्नशील असतो. सुभाषच्या आनंदाच्या तळाशी हीच वेदना होती.

हीच परिस्थिती स्त्रियांची आहे. आपल्याला मुलगी होऊ नये, अशीच बहुतेक स्त्रियांची सुप्त इच्छा असते. आपल्याला मुलगी झाली, याचा विषाद पहिल्या बाळंतिणींच्या चेहर्‍यावर अनेकदा दिसून येतो. त्याचेही कारण हेच आहे. तिने आयुष्यात जे चटके सोसले, राबराब राबावे लागले, अपमान सहन करावा लागला, सगळी स्वप्नं आपल्यादेखत जळून जाताना पाहावी लागली, वाईट नजरा, वखवखलेपण नजरेआड करावे लागले, आई-बाप, नाते-गोते, नवरा-सासू-सासरे, जाणणारे न जाणणारे यांच्याशी वागताना जशी तारेवरची कसरत करावी लागली, हे सगळे आपल्या अपत्याच्या वाटय़ाला येऊ नये, हीच तिचीही भावना असते. काही जणी हे बोलून दाखवितात. काही जणी बोलत नाहीत, एवढेच. स्त्रियांच्या बाबतीत परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की, मुलगी जन्मालाच येऊ नये, यासाठी भ्रूणहत्या केल्या जाऊ लागल्या आहेत. शेतकरी आपल्या मुलांचा जीव शेतीत अडकू नये याची खबरदारी घेऊ लागले आहेत.

शेतकरी आणि स्त्री यात समान संकटाचे विलक्षण साम्य आहे. आमच्या समाजात सर्वाधिक अडचणीत हेच दोन घटक आहेत. या दोघांमध्ये दुसरे एक साम्य आहे. हे दोघेही सृजनशील आहेत. शेतकरी मूठभर बियातून मणभर दाणे निर्माण करतो. एका दाण्याचे हजार दाणे करणारा तो किमयागार आहे. स्त्री नव्या जीवाला जन्म देते. आपल्या गर्भात ती नऊ महिने सांभाळते. माणसासारख्या माणसाला जन्माला घालते. त्याचे संगोपन करते. दोघेही सृजनाशी संबंधित आहेत आणि दोघेही संकटात आहेत.

स्त्री आणि शेतकर्‍याशिवाय हे जग चालू शकत नाही. ते इमारतीचा पाया आहेत. हा पाया आज खिळखिळा झाला आहे. दुबळा झाला आहे. खंगला आहे. भंगला आहे. इमारतीच्या ¨भती कितीही सजवलेल्या असल्या तरी त्यांना उभे राहण्यासाठी पाया नसेल तर त्या सुंदर भिंती एका क्षणात जमीनदोस्त होऊन जातात. शेतीबाहेर राहून गमजा करणार्‍यांनी हे लक्षात घ्यायला हवे की, तुम्ही आता ज्वालामुखीच्या तोंडावर बसला आहात. ही परिस्थिती सर्वावर कोसळणार्‍या भीषण संकटाची पूर्वसूचना आहे.

शेती तोटय़ात ठेवल्या गेली. शेतकरी आपल्या गरजा मारून जगले. क्रयशक्तीच्या अभावामुळे त्यांच्या गरजा मागणीत रूपांतरित होऊ शकल्या नाहीत. मागणी नसल्यामुळे नव्या वस्तूंचे मोठय़ा प्रमाणात उत्पादन झाले नाही. उत्पादन नाही म्हणून रोजगार नाही. रोजगार नाही म्हणून शेतकरी शेतीत अडकून पडले. त्यात तुम्ही सिलिंगचा कायदा आणला. कोरडवाहू असेल तर चोपन एकर, बागायत असेल तर अठरा एकर अशी मर्यादा घालण्यात आली. भाऊ वाटण्या होत गेल्या. जमिनीचे तुकडे पडत गेले. आज बहुसंख्य शेतकरी अल्पभूधारक म्हणजे पाच एकराच्या आतले आहेत. त्यांनी कोणतेही तंत्रज्ञान वापरले आणि सरकारने हमीभाव वाढवून दिले तरी त्यांना सन्मानाने जगता येईल का? याबद्दल शंका वाटते. या परिस्थितीत शेतीतून बाहेर पडण्याची आकांक्षा तयार होणे स्वाभाविक आहे. पण बाहेर पडून जाणार कोठे? बाहेरतरी कितीक रोजगार आहेत? बरे रोजगार मिळाला तरी खेडय़ातून येणार्‍या या युवकांना बाहेरचे जग सन्मानाने स्वीकारणार आहे का? सुभाषचा मुलगा शेतीतून सुटला. उद्या तो डॉक्टर होईल. कदाचित मोठा डॉक्टर होईल. तो तसा व्हावा. वडिलांचे पांग फेडावे. कोणीतरी एखादी महिला जेव्हा त्याच्याकडे उपचारासाठी येईल तेव्हा तो कसा वागेल? एकेकाळी शिकलेल्या कुणब्यांकडून जशी महात्मा फुले यांनी अपेक्षा केली होती तशीच अपेक्षा करता येईल; परंतु शिकलेल्या लोकांनी जसा म. फुलेंचा अपेक्षाभंग केला तसा तो करणार नाही, अशी अपेक्षा करू.

(लेखक हे नामवंत सामाजिक कार्यकर्ते आहेत. 'कलमा', 'आवतन' या त्यांच्या गाजलेल्या

कादंबर्‍या आहेत.)

भ्रमणध्वनी - 9422931986

1 comment:

  1. Durdaiwane kahi shetakari ase karu pahaat asatilahi. Parantu he Sarvatrik Chitra nahi. Aajacha bacutansh sdetaie1h(1 mhani a� )je wyasanadhin aahet, wyasan rajakaran he suddha asu shakate, aani jyanna galelattha pagaar khunawatoy te sheti pasun dur jatayat. Parantu tyanna pastawanyachi pali yeil hi kalya dagadawaril regh aahe.

    ReplyDelete